‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ : शाश्वत विकासाचा संकल्प निश्चित करून त्यावर काम करण्याचा सामूहिक संकल्प काल देशभर केला गेला
पडघम - देशकारण
आर. एस. खनके
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 April 2022
  • पडघम देशकारण पंचायतराज दिन National Panchayati Raj

२४ एप्रिल हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ म्हणून साजरा केला जातो. २०२२ या वर्षाचा ‘पंचायतराज दिन’ अनेक अर्थाने आगळा वेगळा ठरला. संपूर्ण भारतातील सुमारे साडेसहा लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा स्वीकार करण्यात आला. एका ध्येयाने संकल्पित होऊन देश लोक सहभागाने एका विकास पथावर चालण्याचा आणि आपल्या गावाच्या सभोवतालच्या परिसंस्थेला (ecology) समजून घेत ती जतन करण्याचा सामूहिक संकल्प केला गेला. शहराला जसा शहर विकास आराखडा असतो, त्याप्रमाणे आता ग्रामपंचायतीदेखील ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करू लागल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीत आता शाश्वत विकासाचा संकल्प निश्चित करून त्यावर काम करण्याचा सामूहिक संकल्प काल देशभर केला गेला. या अर्थाने कालचा दिवस स्थानिक स्वराज्यात महत्त्वाचा ठरला.

आर्थिक आणि औद्योगिक विकास हे विकासाचे महत्वाचे भौतिक अंग असले, तरी त्याने परिपूर्ण मानव विकासाचे सर्व पैलू साध्य होऊ शकत नाहीत. याची जाणीव जगाला झाल्याने जगभरातील अनेक जानकारांनी एककल्ल्ली विकास प्रवाहाच्या विरोधात आवाज उठवल्याने. वैश्विक पातळीवर बहुआयामी आणि समतोल विश्वसमुदायाला मान्य असा विकासाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

२०१५ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य असलेल्या देशांनी एकत्र येऊन भविष्य सुखकर आणि शाश्वत विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठीचा निर्णय घेतला आणि २०१६पासून त्याची अंमलबजावणी करण्याचा संकल्प घेतला. त्यासाठी २०३०चे साध्य करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. असा संकल्प करणाऱ्या जगातल्या या अनेक देशांपैकी भारत हा एक प्रमुख देश आहे.

विकासाचे एकूण १७ कृती कार्यक्रमाचे लक्ष्य निवडण्यात आले. ते असे- १) गरिबी निर्मुलन, २) उपासमारीचे समूळ उच्चाटन, ३) निरोगीपणा आणि क्षेमकुशल, ४) गुणवत्तापूर्ण शिक्षण, ५) लिंग समभाव, ६) शुद्ध पाणी आणि स्वच्छता, ७) परवडण्यायोग्य आणि सौर उर्जा, ८) चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ, ९) उद्योग, नावीन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा, १०) विषमता कमी करणे, ११) शाश्वत शहरे आणि समुदाय, १२) शाश्वत वापर आणि उत्पादन, १३) हवामानासाठी कृती कार्यक्रम. १४) पाण्याखालचे जीवन, १५) जमिनीवरचे जीवन, १६) शांतता, न्याय आणि सशक्त संस्था, आणि १७) ध्येयांसाठी भागीदारी

ही सर्व ध्येये एकमेकांशी पूरक आहेत. एक सोडून दुसरा साध्य होण्यासारखे नसल्याने त्यांच्या साध्यासाठी अंमल करण्यायोग्य कृती कार्यक्रम असावा, म्हणून भारताने या ध्येयांना एकूण नऊ विकास संकल्पनांमध्ये प्रस्तावित केलेले आहे. केंद्रीय स्तरावरून देशभरासाठी भारतीय संघ शासनाचे विविध विभाग यासाठी एकत्रितपणे पुढाकार घेत आहेत.

वैश्विक समुदायाने स्वीकारलेल्या या ध्येयांना अनुषंगून भारताने कृती कार्यक्रम अंगिकारला आहे. त्याचा सामुदायिक स्वीकार करण्याचा संकल्प काल देशभरच्या पंचायतीराज व्यवस्थेच्या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत स्तरावरून स्वीकारण्याचा काल संकल्प दिवस असल्याने २०२२ वर्षाचा हा ‘राष्ट्रीय पंचायतराज दिन’ विशेष ठरला, असे म्हणावे लागेल. या नऊ विकास संकल्पना पुढील प्रमाणे आहेत-

१) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव

२) आरोग्यदायी गाव

३) बालस्नेही गाव

४) जल समृद्ध गाव

५) स्वछ आणि हरित गाव

६) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव

७) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव

८) सुशासन युक्त गाव

९) लिंग समभाव पोषक गाव

या संकल्पनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार पंचायतराज व्यवस्थेमध्ये शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वैश्विक पातळीवरच्या या संकल्पना स्थानिक पातळीवर कशासाठी, असा प्रश्न ओघाने काही लोकांच्या मनात येऊ शकतो. पण मुळात या संकल्पना वैश्विक वाटत असल्या तरी त्या स्थानिक प्रश्नांशी अधिक जवळच्या आहेत. ब्रह्मांडी ते पिंडी या क्रमाने. ‘विश्वची माझे घर’ या आपल्या मराठी संस्काराप्रमाणे बघायचे तर आपली दृष्टी आणि लक्ष विश्वाला पूरक असण्यासारखे आहे. आधुनिक भाषेत ‘थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली’ या तत्त्वाने या संकल्पना राबवायच्या आहेत. जग एक खेडे झालेले असताना कुण्याही देशाची समस्या आता एकट्या देशापुरती राहत नाही तर जगभरातील इतरांनाही त्यात घेत असते. कोविड-१९ने जगाला याची जाणीव करून दिलेली बाब ताजी आहे.

वरील नऊ विकास संकल्पनांपैकी आपल्या ग्रामपंचायतीशी संबंधित असणारी संकल्पना निवडून आगामी वर्षभर त्यावर काम करत, त्या संकल्पनेचे ध्येय साध्य करणे, म्हणजे या वैश्विक संकल्पनांचे स्थानिकीकरण करणे आहे. नेमके तेच या पुढे भारताला करायचे आहे. व्यक्ती, समाज म्हणून सर्व सामाज घटक आणि गाव यांनी एकत्र येवून, सर्वांना सोबत घेऊन गावाच्या शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठीचा संकल्प आज संपूर्ण ग्रामीण भारत करणार आहे.

या नऊ विकास संकल्पना/विषयांमध्ये आवश्यक असणारी स्थानिक ध्येये काय असावीत, कुठले उपक्रम गावाने हाती घ्यावेत, याबाबतची संकल्पनिहाय माहिती पुढील प्रमाणे-

१) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव

अशा गावासाठी व्हिजन- गरिबी मुक्त गाव म्हणजे असं गाव, ज्या गावात सर्व समाज घटकांची भरभराट आणि वाढ होण्यासाठी आवश्यक उपजिविका विकासाची पुरेशी साधने उपलब्ध असतील. ज्या गावात कुणीही मागे राहणार नाही, यासाठी सर्व समाज घटकांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध असेल असं गाव.

गरिबीला अनेक अंगे असतात. त्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, लिंगभाव आणि अन्य सामाजिक क्षेत्रातही संधीपासून वंचित राहिल्याने व त्यातून असमानता निर्माण होत असल्याने समाजातील अनेक घटकांना गरिबीचा प्रश्न भेडसावत असतो.

२) आरोग्यदायी गाव

अशा गावासाठी व्हिजन- असे गाव ज्या गावात सर्व वयोगटांच्या महिला पुरुषांचे आरोग्य आणि खुशालीची खात्री असेल.

गावातील सर्व समाज घटकांना पुरेशे अन्न मिळेल आणि गावातील कुपोषण नाहीसे होईल यासाठी शाश्वत आणि एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देणे; बालके, किशोरवयीन मुले-मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आहारातील पोषणमूल्ये वाढवणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांची उपब्धता असेल असे गाव.

३) बालस्नेही गाव

अशा गावासाठी व्हिजन- गावातील सर्व मुलांना निर्धोक आणि सुरक्षित वातावरण तसेच चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करणे. बालक आणि किशोरांच्या समस्या जाणून घेत गावाला बाल स्नेही बनवण्यासाठी अनेक ग्रामपंचायती चांगल्या प्रकारे पुढाकार घेत आहेत. त्यातून बाल सांसद तयार होत आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

४) जलसमृद्ध गाव

अशा गावासाठी व्हिजन- गावातील सर्व घरांसाठी वैयक्तिक नळजोडणीद्वारे मापदंडानुसार गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पाणी पुरवठा. उत्तम पाणी व्यवस्थापन, शेती आणि पाण्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील इतकी पाण्याची उपलब्धता, पाण्याचा पुनर्वापर आणि जलपुनर्भरण. जलसाक्षर होवून कृतीशील समाज निर्माण करणारे गाव.

५) स्वच्छ आणि हरित गाव

अशा गावासाठी व्हिजन- बालकांच्या भविष्यासाठी बालस्नेही गाव तयार करणे. निसर्गसंपन्न हरित गाव निर्माण करणे, अपारंपारिक उर्जेचा वापर, स्वच्छता, पर्यावरणाशी अनुकूल व्यवहार आणि पर्यावरण रक्षण. गावाची हवा, पाणी, मृदा (माती), स्थानिक लता-वेली, वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करत परिसंस्थेचे जतन होईल आणि गाव व परिसरातील नैसर्गिक जैव विविधता अबाधित राहील यासाठी कृती कार्यक्रम हाती घेणारे गाव.

६) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव

अशा गावासाठी व्हिजन- पायाभूत सुविधांच्या दृष्टीने गाव स्वयंपूर्ण करणे, गावातील सर्वांना परवडणारी घरे, निर्धोक आणि पुरेशा प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. गावाला ग्रामपंचायत इमारत, नागरी सुविधा केंद्र, प्राथमिक आरोग्य सुविधा असलेले केंद्र, दवाखाने, समाज मंदिरे, आंगणवाडी, ग्रंथालय यासाठी इमारती, शाश्वत पाण्याचे स्त्रोत, नळपाणी पुरवठा, महिला व मुली आणि पुरुष यांच्यासाठी पाण्याची उपलब्धता असतील अशी पुरेशी स्वछतागृहे, स्वच्छ आणि किफायतशीर ऊर्जा देणारे सौर दिवे, सोलार ट्री, मुलांना खेळण्यासाठी बागा-उद्याने, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, बारमाही वापरता येतील असे रस्ते, दळनवळण साधने, संचार साधने. यासारख्या सुविधा उपलब्ध असणारे गाव. 

७) सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव

अशा गावासाठी व्हिजन- गावात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते याची भावना गावक-यांमध्ये निर्माण करणे. गावातील सर्व पात्र नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे.    

गावातील गरिब व असुरक्षित नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक संरक्षण यंत्रणा निर्माण करणे जेणेकरून सर्वांना गावाच्या विकासामध्ये सोबत घेऊन जाणे शक्य होईल. जेष्ठांकरता विरंगुळा केंद्र, निराधारांना योजनांचा लाभ मिळवून देणे, महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण, घरातून होणारी हिंसा थांबविण्याच्या उपाय योजना, गरजूंना परवडेल असे कायदेविषयक सल्ला व सहाय्य. शारीरिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेण्यासाठी सुविधा असणारे, सर्व समाज घटकांना राहण्यासाठी सुरक्षित व सुविधांचा लाभ घेता येईल असे सामाजिक एकोप्याचे वातावरण व त्याचे जतन करणारे, गाव विकासाच्य सर्व निर्णय प्रक्रियेत सर्व समाज घटकांचा-महिलांचा, बालकांचा, किरोरवयीन मुलींचा सहभाग घेणारे गाव.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

८) सुशासन युक्त गाव

अशा गावासाठी व्हिजन- सुशासनाद्वारे गावातील सर्व लोकांना विविध विकास योजनांचा लाभ व जबाबदार सेवा वितरणाची हमी देणे. विकासाची ध्येये साध्य करण्यासाठी तसेच गावामध्ये सुधारणा विषयक कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने पारदर्शकता, विश्वास आणि निधी कोष हे घटक महत्वाचे आहेत. आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे काम करणारे गाव. गावकरी म्हणून मिळणा-या सुविधांसाठी आणि आपल्या धारण केलेल्या मालमत्तेपोटी त्याचा कर भरून आपले उत्तरदायित्व निभवण्यासाठी प्रयत्नशील गाव.

९) लिंग समभाव पोषक गाव

अशा गावासाठी व्हिजन- गावात लिंगसमभाव स्थापन करण्यासाठी महिलांना समान संधी उपलब्ध करून देणे. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे.

भारतीय संविधानाच्या १४व्या कलमान्वये देशातील सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता प्रदान करणेत आली असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा अंमल गावात होत असल्याची खात्री करणे आणि गावाला तसा विश्वास वाटणे, लिंगसमभाव, समानता, महिलांच्या हक्कांचे रक्षण व त्यांचा सहभाग याशिवाय सामाजिक व आर्थिक विकासातील विषमता नष्ट करणे अशक्य आहे. महिला-मुली यांच्यासोबत कुठलाही भेद होणार नाही, त्यांना समान संधी आणि त्यांचे अरोग्य, शिक्षण यासह मानसिक, शारीरिक, सामाजिक आरोग्य रक्षण होईल, असे वातावरण निर्माण करणारे गाव.

..................................................................................................................................................................

आर. एस. खनके

sangmadhyam@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा