दीर्घकथेला मराठी भाषेतून काहीएक दर्जा किंवा मान्यता मिळाल्यास अन्य भाषांनादेखील तो विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरू शकेल
पडघम - साहित्य संमेलन विशेष
भारत सासणे
  • संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि उदगीर संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ९५वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर 95th A. B. Marathi Sahitya Sammelan संमेलनाध्यक्ष Sammelanadhyaksha साहित्य संमेलन SahityaSammelan भारत सासणे Bharat Sasne

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून उदगीर, जिल्हा लातूर इथं सुरू झालं आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथा-कादंबरीकार भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा दुसरा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

प्रदीर्घ कालावधीपासून मी लेखन करतो आहे. लघुकथा, दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी, नाटक, बालसाहित्य, ललितलेख इत्यादी विविध साहित्यप्रकारातून आणि माध्यमातून मी स्वतःला प्रकट करत आलो आहे. या लेखनामुळे मला रसिकमान्यता आणि राजमान्यता प्राप्त झाली. आजपर्यंत माझी जवळपास ३९ पुस्तकं प्रकाशित झाली असून त्या पुस्तकांना विविध सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. हे सन्मान स्वीकारताना, ‘तुम्ही का लिहिता?’ अशा सैद्धांतिक प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. असे प्रश्न लेखकाला विचारात पाडतात. हा प्रश्न व्यापक करून लेखक मुळातून का लिहितो, याबाबत उत्तर देण्याची मग लेखकावर जबाबदारीही येऊन पडते.

विविध साहित्यप्रकारांना मी यथाशक्ती स्पर्श केला असला तरी सुरुवातीस मी ‘लघुकथाकार’ म्हणून ओळखला गेलो व नंतर ‘दीर्घकथाकार’ म्हणून माझी ओळख निश्च{त झाली. लघुकथेचा चेहरामोहरा कसकसा बदलत गेला, इत्यादी संदर्भात इथे काही सांगणं अभिप्रेत नाही. तथापि लघुकथेच्या विकासातल्या टप्प्यातली सहसा न नोंदवलेली एक घटना येथे सांगावयाची आहे. लघुकथा स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये समूहवादी होती. समाजाच्या विघटनानंतर व एकत्र कुटुंबव्यवस्थेतून माणसं वेगवेगळी होऊ लागल्यानंतर, माणसाच्या मनावर जे नैतिक ताण निमार्ण झाले, त्या ताणांचं प्रतिबिंब मनोविश्लषणात्मक कथांमधून उमटू लागलं व कथा व्यक्तिवादी, व्यक्तिकेंद्री झाली. आता पुन्हा लंबक हेलकावे खातो आहे. लघुकथा पुन्हा समूहवादी होऊ लागलेली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लघुकथा हा दुय्यम साहित्यप्रकार आहे किंवा क्षुद्र साहित्यप्रकार आहे, अशा आशयाची टीका झालेली आहे. या टीकेचा एक मानसशास्त्रीय परिणाम असा झाला की, काही लिहिते लघुकथाकार लघुकथा लिहिता-लिहिता थबकले, थांबले आणि त्यांनी आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आहे. यातून कादंबरीविश्वाचं भलं झालं की नाही, हा संशोधनाचा विषय असला तरी, लघुकथेच्या क्षेत्राचं मात्र नुकसान झालेलं आहे. याच काळात मी मात्र काहीएक निष्ठेने आणि लघुकथेच्या आंतरिक शक्तीवर श्रद्धा ठेवून कथा आणि दीर्घकथा लिहीत राहिलो.

कथा आणि दीर्घकथा म्लान अवस्थेत पोहोचली होती, तेव्हा लघुकथेबरोबरच मी, सातत्याने दीर्घकथा लिहीत राहिलो. माझे पूर्वसूरी दीर्घकथा लिहीत राहिले होते, पण त्यानंतर मात्र दीर्घकथेचं सातत्य टिकलेलं नव्हतं. अशा अवस्थेत माझ्या लेखनामुळे दीर्घकथेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये नवचैतन्य निर्माण झालं, अशी चर्चा तुम्हां समीक्षकांनीच केलेली आहे. म्हणजे येथे आत्मप्रौढीचा प्रश्न उद्भवत नाही.

माझ्या मते १९८० ते १९९० हा कालखंड अतिशय संवेदनशील, महत्वाचा व काही प्रमाणात सगळीकडेच उलथापालथ करणारा असा होता. कथेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कथेमध्ये आलेली मरगळ कथाकारांना जाणवत होती. कथा स्तब्ध आणि ग्लानीग्रस्त झाल्यामुळे लघुकथा म्हणून जो कोणता रूढ असा आकृतीबंध परंपरेने स्वीकारला होता, तो आकृतीबंध मोडून काढण्याची आवश्यकता कथाकारांना वाटायला लागली होती. जागतिकीकरणाबद्दल याच सुमाराला चर्चा सुरू झालेली आहे. या अस्वस्थ कालखंडात जी कथा लिहिली गेली ती नव्या रूपात पुढच्या दशकात म्हणजे १९९० नंतर आपल्याला भेटते. आपल्या सशक्त अभिव्यक्तीने कथेला आधुनिक असे रूप प्रदान करणाऱ्या या कालखंडातील लेखकांची यादी सुप्रसिद्ध आहे. स्थानभयास्तव ही यादी विस्ताराने देता येणार नसली तरी त्यांच्या योगदानाचे मी आदरपूर्वक स्मरण करत आहे. याच काळात साहित्यातील दलित, ग्रामीण, इत्यादी प्रवाह सशक्त झालेले आहेत.

१९९० ते आजपर्यंतची कथा कोणत्या स्वभाववैशिष्ट्यासह आपल्याला भेटते हा उत्सुकतेचा विषय. १९९० नंतरच्या प्रमुख व गुणवान कथाकारांची यादी समीक्षक-अभ्यासकांनी काळजीपूर्वक तयार केलेली आहे. अर्थात तरीही ही यादी परिपूर्ण असेल असे नाही. १९९० नंतरच्या बदलत्या वास्तवाला सामोरे जाऊन, नव्या प्रेरणेने कथेला नवा आशय प्राप्त करून देणाऱ्या काही प्रतिभावंत साहित्यिकांची यादी पाहूयात. रंगनाथ पठारे, मिलिंद बोकील, प्रवीण पाटकर, प्रतिमा जोशी, भारत सासणे, सुबोध जावडेकर, केशव मेश्राम, सदानंद देशमुख, अर्जुन व्हटकर, राजन गवस, मनोहर तल्हार, राजन खान, मधुकर धमार्पुरीकर, पंकज कुरुलकर, प्रकाश नारायण संत, अनंत सामंत, सानिया, आशा बगे, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, रोहिणी कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, नीरजा, उर्मिला पवार, प्रतिमा इंगोले, नागनाथ कोत्तापल्ले, रविंद्र शोभणे इत्यादी कथाकारांचे नामोल्लेख आवर्जून करावे लागतीलच. परंतु नवे अविष्कार प्रकट करू पाहणाऱ्या शक्तिमान लेखकांमध्ये किरण येले, प्रणव सखदेव, किरण गुरव, ॠषिकेश गुप्ते, शिल्पा कांबळे, आसाराम लोमटे, पंकज भोसले, गणेश मतकरी, संजय ढोले इत्यादी लेखकांचादेखील समावेश या यादीत करावा लागेल. मात्र, ही यादी परिपूर्ण नाही, याची मला खात्री आहे. अभ्यासकांनी ही यादी अधिक विस्तृत करून दिल्यास आपणास उपयुक्त ठरू शकेल.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

जागतिकीकरणाची चाहूल लागल्यानंतर आणि त्याचे परिणाम दरवाजाच्या बाहेरपर्यंत येऊन ते दरवाजा ठोठावू लागल्यानंतर उत्तराधुनिक कालखंडातील मराठी कथेने हळूहळू आपला चेहरा व स्वभाव बदलायला सुरुवात केली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या अफाट अशा मायाजालातून मानवी मनाचा शोध अधिकाधिक प्रभावीपणे घेतला जाऊ शकतो, हे माहीत झाल्यानंतर पूर्वीची मनोविश्लेषणात्मक कथा जास्त गडद झाली, हे खरे असले तरी उत्तराधुनिक कालखंडातील कथा विश्वमनाचा शोध घेऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा व्यक्तीजीवनाकडून समाजजीवनाकडे अशी प्रवास करू लागली. तिच्यामध्ये समूहमनाचे हुंकार, समूहमनाच्या वेदना उमटताना दिसत असल्यामुळे एकूणच कथा सामाजिक जीवनापासून प्रारंभ करून व्यक्तीजीवनाकडे आली आणि पुन्हा व्यक्तीजीवनापासून समूहजीवनाकडे जास्त ताकदीने वाटचाल करू लागली आहे, असे दिसते. आत्ताची कथा सजग, सावध व समकालीन घटनांची नोंद घेणारी अशी होताना दिसते ही स्वागतार्ह घटना.

याच कालखंडात महानगरीय कथा आणि दीर्घकथा, शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानणाऱ्या सशक्त कथा, मुस्लीम स्त्री-पुरुषांचा वेदना-प्रवास प्रतिबिंबित करणाऱ्या दीर्घकथा, बॉम्बस्फोट, दंगली, जातीय तणाव इत्यादींचे भेदक चित्रण करणाऱ्या वास्तववादी कथा आणि स्त्रीजीवनाचं व तिच्या शोषणाचं भेदक व प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या कथा अवतरित झालेल्या आहेत. १९९० नंतरच्या कथेचा चेहरा बदलता दिसतो आहे. हा चेहरा जीवनाच्या जवळचा आहे, मानवी आहे आणि समूहातील स्त्री-पुरुषांचा असा आहे. भारतीय कथापरंपरेमध्ये १९९० नंतरच्या कथेने विलक्षण ताकदीची अशी भर घातलेली आहे असं माझं मत आहे.

उत्तराधुनिक कालखंड व दीर्घकथा

मात्र १९९० च्या सुमाराला व त्यानंतर मराठी कथेच्या विश्वात एक अभूतपूर्व अशी घटना घडू पाहते आहे, याची विशेष अशी नोंद अभ्यासकांनी अद्याप केलेली नाही. म्हणून या घटनेबाबत थोड्याशा विस्ताराने बोलले पाहिजे. कथेच्या रूढ अशा प्रांगणातून वेगळी अशी फुटून स्वतःच्या स्वायत्ततेने, स्वतंत्रपणे व सशक्तपणे दीर्घकथा उभी राहते आहे, ही ती घटना होय. कादंबरीपेक्षा लघुकादंबरी वेगळी असून तिचा विचार स्वतंत्रपणे व वेगळा असा साहित्यप्रकार म्हणून केला जाऊ शकत असेल, तर दीर्घकथेलासुद्धा तिची स्वाभाविक स्वायत्तता मान्य केली जावी, अशी दीर्घकथेची स्वतःचीच मागणी आहे. मागील २५ वर्षांत मराठीत दीर्घकथा सातत्याने लिहिली गेली व लिहिली जाते आहे. प्रयोगशीलतेतून व्यक्त होण्याच्या अनेक नव्या वाटा दीर्घकथा शोधते आहे. उत्तराधुनिक कालखंडात कलाप्रकाराचे आदानप्रदान होताना दिसते. दीर्घकथासुद्धा नाटक, श्रुतिका, चित्रकला इत्यादी कलाप्रकाराशी जवळीक साधून लघुकादंबरीच्या ताकदीने अनेक तपशीलांसह प्रकट होते आहे. त्यामुळे स्वतंत्र असा साहित्यप्रकार म्हणून दीर्घकथेकडे पाहिले जावे, अशी चर्चा सुरू झालेली आहे. हिंदीमध्ये व अन्य भाषांतूनसुद्धा दीर्घकथा लिहिली जात असली तरी तिचे स्वरूप काय म्हणून स्वीकृत करावे, याबाबत काहीएक निश्चिती अद्याप त्या भाषांतसुद्धा झालेली नाही. उदयप्रकाशसारखा हिंदी लेखक त्याच्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये याबाबत तक्रार करून हतबलता व्यक्त करतो. दीर्घकथा लघुकथेच्या शाईने लिहायची असते, मात्र सामग्री लघुकादंबरीची वापरावी लागते, असे दीर्घकथेने वारंवार सांगितले. मराठी समीक्षेने दीर्घकथेची स्वायत्तता मान्य केली असली व तिची व्याख्या केली असली तरी दीर्घकथेला वेगळा असा दर्जा किंवा वेगळी अशी मान्यता दिली जावी असं म्हटलेलं नाही. अन्य भाषांचे लेखक व समीक्षक मराठीतील दीर्घकथेच्या संदर्भातील तात्त्विक चर्चेबाबत कुतूहल दर्शवत आहेत. दीर्घकथेला मराठी भाषेतून काहीएक दर्जा किंवा मान्यता मिळाल्यास अन्य भाषांनादेखील तो विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरू शकेल, असं त्यांना वाटतं. एकूणच उत्तराधुनिक व्यामिश्र जीवनपद्धतीला स्वतःत सामावून घेण्याची व समकालीन परिस्थितीबद्दल काहीएक समर्थपणे सांगण्याची शक्ती दीर्घकथेमध्येच असल्यामुळे येथून पुढे दीर्घकथेकडे आपण आशेने पाहू शकू, असं चित्र दिसतं. दीर्घकथेची काहीएक परिभाषा तयार करणं, दीर्घकथेचे तंत्र काही प्रमाणात स्पष्ट करणं असं काही काम मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये होणं आता गरजेचं आहे. मराठीतल्या दीर्घकथेच्या रूपाने मराठी भाषेने अन्य भाषांना देणगी दिली आहे, अशी चर्चा मी नुकतीच वाचली. मी या विधानाचं स्वागत करतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गूढत्व

माझ्या दीर्घकथांमध्ये काहीएक गूढत्व प्रतिबिंबित होतं अशी प्रशंसावजा तक्रार केली जाते. या संदर्भात थोडं बोललं पाहिजे. हृदयगम्यता आणि बुद्धिगम्यता हे काही एकमेव हेतू साहित्याचे नसतात. त्याहीपलीकडे जाऊन जीवनाच्या परीघामध्ये जी अतर्क्यता आहे, तीदेखील साहित्याने शोधाची असते. मिर्झा गालिब या कवीने म्हणून ठेवलं आहे की,

है ग़ैब-ए-ग़ैब जिस को समझते हैं हम शुहूद

हैं ख़्वाब में हुनूज़ जो जागे हैं ख़्वाब में

ग़ैब म्हणजे रहस्यमयी गूढ. शुहूद म्हणजे साक्षीदार. आता, ग़ैब-ए-ग़ैब म्हणजे रहस्याचं रहस्य. हे जे विश्व दिसतं आहे ते रहस्यमय रहस्याचा भाग आहे. आणि जे प्रत्यक्ष दिसतं आहे ते दिसणं म्हणजे स्वप्नात स्वप्न पाहणं असतं. साक्षीभावाने हे स्वप्नातलं स्वप्न बघायचं आहे. गालिब असं काही म्हणतो. माझ्या दीर्घकथांमध्ये जीवनाची अतर्क्यता, गूढता स्वप्नवत् वास्तव आणि वास्तववत् स्वप्न यांचं जे काही दर्शन घडतं आहे, त्याबाबतची साक्ष पूर्वसूरींनी या ना त्या नात्याने देऊन ठेवलेली आहे. ‘जगन्मिथ्या’ असं आपल्याकडे ॠषींनी नोंदवलेलं आहेच. सर्वसामान्य माणसाच्या तळापर्यंत पोहोचताना हे जे काही स्वप्नवत वास्तव आहे, त्याचं दर्शन माझ्या दीर्घकथांमधून व्हायला लागतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

समीक्षकांनी माझ्या लघुकथांबाबत आणि दीर्घकथांबाबत विश्लेषण करताना असं नोंदवलं आहे की, तथ्य कथ्याच्या सोबतीने अवतरित होतं, पण ते मिथ्याच्या साक्षीने अवगुंठीत झालेलं असतं. म्हणून सत्य आभासमय होतं व लेखक, म्हणजे मी ज्या ज्या वेळेस सत्याला स्पर्श करू पाहतो, त्या त्या वेळेस सत्य क्षितीजापर्यंत दूर गेलेलं असतं. सर्वसामान्यांचा मृगजळांचा पाठलाग माझ्या दीर्घकथांमधून स्पष्ट होतो, अशी नोंद समीक्षकांनी केलेली आहे. माझ्या शैलीत त्यांना ‘मॅजिकल रिअॅलिझम’सुद्धा दिसतं आहे.

पण माझ्यासारख्या लेखकाची ही अडचण असते. नवं काही सांगावं तर परिस्थितीनुरूप ते सांगणं जटिल आणि गुंतागुंतीचं झालेलं असतं, जुनं काही सांगावं तर ते अवघड वाटलेलं असतं.

हृदयगम्यतेच्या आणि बुद्धिगम्यतेच्या झगड्याच्या पलीकडे वास्तवाचं गूढ आहे आणि गूढाचंदेखील वास्तव आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा