‘सर्व शिक्षा अभियाना’ला विसर पडलेल्या वीटभट्टीवरील मुलांच्या गोष्टी...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण खुंटे
  • ‘अराईस विश्व सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या ‘मिलाफ’ प्रकल्पाच्या माध्यमातून दर रविवारी आम्ही वीटभट्टीवरील मुलांची शाळा भरवतो
  • Fri , 15 April 2022
  • पडघम कोमविप सर्व शिक्षा अभियान वीटभट्टी वीटभट्टी कामगार मुलं शाळा शिक्षण

भारतीय संविधानाची निर्मिती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, अशी तरतूद करून ठेवली होती. मात्र मागील ७२ वर्षांत देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळू शकलेले नाही, हे वास्तव आहे.

देशातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा शिक्षण हक्क कायदा २००९मध्ये संसदेत पारित करण्यात आला. त्यालाही आता १२ वर्षांहून अधिक काळ लोटला. आजही देशातील करोडो मुलं शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. यामध्ये स्थलांतरित मजुरांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. या स्थलांतरित मजुरांपैकीच एक घटक म्हणजे वीटभट्टीवर काम करणारे मजूर. दरवर्षी सहा महिने आपले गाव, जिल्हा, राज्य सोडून येणारे मजूर सोबत मुलांना घेऊन येतात. या सहा महिन्यांच्या काळात या मुलांची शाळा पूर्णपणे बंद असते. त्यामुळे प्रतिभा असूनही ती शिक्षणापासून तुटतात आणि पिढ्यानपिढ्या मजुरीच्या विळख्यात अडकून पडतात. महाराष्ट्रात दरवर्षी शिक्षणाबाहेर फेकल्या जाणाऱ्या मुलांची संख्या काही लाखांमध्ये आहे, पण याकडे कोणाचेही लक्ष नाही.

या सगळ्याचा विचार करून ‘अराईस विश्व सोसायटी’ ही स्वयंसेवी संस्था मागील आठ वर्षांपासून शालाबाह्य, झोपडपट्टी, अनाथ आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी काम करते. झोपडपट्टीमधील मजुरी करणाऱ्यांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर, अनाथ मुलांचे कौटुंबिक पुर्नवसन करण्याचे काम करते. यासोबतच झोपडपट्टी आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील विविध प्रकारचे काम संस्थेच्या वतीने जात आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या ‘मिलाफ’ प्रकल्पाच्या माध्यमातून दर रविवारी आम्ही वीटभट्टीवरील मुलांची शाळा भरवतो. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

रखरखतं ऊन, माती, पाणी, चिखल, चिखलात बरबटलेले हात, लोखंडी साचा, त्यात चिखल भरत असलेले भट्टीवरील मजूर. त्यांना मदत करणारी त्यांची मुले. भट्टी लावण्यासाठी गाडा ओढणे, एकावर एक विटा रचून त्यांची भट्टी तयार करणे. भाजून तयार झालेल्या विटांची लॉरी, ट्रॅक्टरची ट्रॉली आपल्या आई-वडिलांसोबत भरणारी ही मुले. चिखल, माती, विटांच्या उचलापाचलीमुळे खरबरीत झालेले हात. हातावर, तोंडावर मातीचा थर. वरखडलेल्या वनासारखे पांढरे पडलेले पाय. मातीने मळलेली कपडे. उन्हाने रापलेले चेहरे. काळी पडलेली त्वचा...

भट्टीवरील तुकड्या-टाकड्यांपासून बनवलेल्या कोप्या. एका ढांगेच्या कोपीत कंबरेपर्यंत वाकल्याशिवाय आत शिरता येत नाही. सगळं निस्तेज वातावरण. कुठल्याही वीटभट्टीवर गेल्यास प्रत्येकाला बऱ्यापैकी असंच चित्र दिसतं. त्यामुळेच आपल्या समाजातील दुर्लक्षित झालेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी वीटभट्टीवरील शाळेचा खटाटोप सुरू आहे.

पुणे-सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटाच्या वर असलेल्या आक्सरवाडीमधील वीटभट्ट्यांवर या शाळा भरवल्या जातात. आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा चौकशी करण्यासाठी या भट्ट्यांवर गेलो, तेव्हा ही मुलं त्यांच्या पालकांसोबत भट्टीवर काम करत होती. त्यांना एकत्र करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे का? शिकायचं आहे का? आम्ही शिकवलं तर चालेल का? असे प्रश्न विचारले, तर सर्वांचं उत्तर अगदी आनंदानं ‘हो’ असं आलं. मग त्यांच्या पालकांशी चर्चा केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी वीटभट्टी मालकाची परवानगी घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर भट्टी मालकांची परवानगी मिळवली. भट्टी मालकांच्या परवानगीशिवाय आम्हाला तिथं काहीही करता आलं नसतं. आणि मग आमची शाळा सुरू झाली.

पहिल्या दिवशी भट्टीवरील मुलांचा सर्व्हे केला. मुलांची संख्या, वय, शिक्षण, गाव आदींची माहिती घेतली. त्यातून असं लक्षात आलं की, प्रत्येक वीटभट्टीवर शिक्षण घेत असलेली सरासरी १० ते १२ मुलं आहेत. यातील बहुसंख्य मुलं आपल्या आई-वडिलांसोबत वीटभट्टीवरच काम करतात. विटा वाहणं, चिखल कालवणं, भट्टी लावणं, भाजलेल्या विटांची गाडी भरणं, अशी कष्टाची कामं करत असतात. वीटभट्टीवर विरंगुळ्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नसल्यानं काम करत स्वतःचा विरंगुळा करून घेतात. यातून पालकांना मदत होते आणि मुलं दिवसभर त्यांच्या नजरेसमोरही राहतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मागील तीन महिन्यांमध्ये मुलांशी संवाद साधताना पुढे आलेली काही निरीक्षणे -
१) या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. त्यांना अभ्यास करायला आवडतो, पण शिकण्याची कुठलीच व्यवस्था नसल्यानं त्यांचा नाईलाज होतो.
२) पालकांनाही आपली मुलं शिकावीत असं वाटतं. अनोळखी ठिकाणी आल्यामुळे भट्टीपासून शाळा दूर असतात. कामाची आणि शाळेची वेळ जुळत नसल्यानं नाईलाजानं कामाला प्राधान्य द्यावं लागतं.
३) अनोळखी ठिकाण असल्यानं मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यास पालक धजावत नाहीत.
४) पालक निरक्षर असल्यानं त्यांना मुलांना शिकवता येत नाही. पोटाचाच प्रश्न गंभीर असल्यानं मुलांच्या शिक्षणाकडे इच्छा असूनही लक्ष देता येत नाही.
५) या मुलांमध्ये स्पार्क असतो. मेहनतीची तयारी असते, पण केवळ योग्य मार्गदर्शन व संधी न मिळाल्यानं ती मागे पडतात.
६) भट्टीवर काम करणारी बहुतेक सर्व कुटुंबं मागासवर्गीय समाजातील आहेत. खरं तर या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत, परंतु प्राथमिक शिक्षणही पूर्ण होत नसल्यानं या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही मुलं पात्र ठरत नाहीत.

काही उदाहरणं पाहूया.

१) भीमाशंकर गुरुशांतप्पा, अक्कलकोट, वय वर्ष १३, गाव - जाळकी, ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य - कर्नाटक. हा मुलगा सातवीमध्ये आहे. पण मागील सहा महिन्यांपासून शाळेचं तोंड पाहिलेलं नाही. अभ्यासाशीही संबंध नाही. तरीही भीमाशंकरचं अक्षर मोत्यासारखं सुरेख आहे. त्याला लिहायला आवडतं. तो कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो. येथील गावातल्या शाळेत का जात नाही, असं विचारलं असता भीमाशंकर म्हणाला, “गावाला कोणी सांभाळण्यासाठी नसल्यामुळे आई-वडील इथं घेऊन आले. येथील शाळा मराठी शाळा असल्यामुळे जाता येत नाही. मराठी भाषा थोडी-थोडी समजते, पण चांगली बोलता आणि लिहिता येत नाही. मग इथं दिवसभर बसून काय करायचं, म्हणून वडिलांना विटा बनवायला मदत करतो. मी स्वतः कमवलेल्या पैशातून नवीन मोबाईल घेतला आहे. आता गावाला परत गेल्यावर तिथल्या शाळेत परत जाणार.”  

२) राणी बसवराज श्रीगणी, वय ११ वर्ष, गाव - माड्याळ, ता. आळंद, जि. कलबुर्गी, राज्य - कर्नाटक. ही मुलगी मागील चार महिन्यांपासून वीटभट्टीवर आहे. ती गावाला पाचवीच्या वर्गात शिकते. तिलाही अभ्यास करायला लिहायला वाचायल खूप आवडतं. तिला विचारलं, “तू का आलीस इथं?” राणी म्हणाली, “आई-वडील दोघंही भट्टीवर काम करतात. मला तीन लहान भावंडं आहेत. त्यांना सांभाळायला कोणचं नसतं, म्हणून आई-वडील घेऊन आले आहेत.” राणी दिवसभर मुलांना सांभाळत घरातील कामं करते. तीला इंग्रजी शिकायला आवडतं. पुढे जाऊन तिला पोलीस व्हायचं आहे. त्यासाठी धावण्याचा सराव, व्यायाम करावा लागतो, हे ती आम्हाला सांगत होती. पण पोलीस होण्यासाठी शिकावंही लागतं, हे मात्र तिला सांगता आलं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................


३)  अक्षरा राजेश घाटे, वय ९ वर्ष, गाव - मन्सकर्गा, ता. देगलूर, जि. नांदेड. ही मुलगी तिसरीच्या वर्गात शिकते. सहा महिन्यांपासून भट्टीवरच आहे. आई-वडिलांना विटांचा गाडा ढकलायला आणि भट्टी लावायला मदत करते. अक्षराला अभ्यास करायला प्रचंड आवडतो. दर रविवारी ती आम्ही येण्याची आतुरतेनं वाट बघते. शिकून तुला काय व्हायचं, असं विचारल्यावर म्हणाली, “मला न्यायाधीश व्हायचं आहे. त्यासाठी मी खूप शिकणार. पण माझ्याकडे वही-पुस्तकं काहीच नाही. तुम्ही दिलेल्या वहीवरच मी रोज अभ्यास करते.”

४) कीर्तन घाटे, वय १३ वर्ष, गाव - सुवगाव, ता. देगलूर, जि. नांदेड. शिक्षण ७ वी. हा मुलगा प्रचंड हुशार आहे. मागील सहा महिन्यांपासून अभ्यासाचा गंधही नसलेल्या या मुलाचे ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. त्याला कुठलाही शब्द सांगितला तरी त्याचं अचूक स्पेलिंग सांगतो. त्याचं सामान्य ज्ञान खूपच चांगलं असून कितीतरी इंग्रजी शब्द त्याला माहिती आहेत. कीर्तनला विचारलं, “तू कसा अभ्यास करतोस?’ तो म्हणाला, “तोंडीच अभ्यास करतो. वह्या-पुस्तकं नसल्यामुळं लिहायला मिळत नाही. मला अभ्यास करायला आवडतो. पण इथं कुठलीच सोय नाही. त्यामुळं नाही करता येत.”

५) नंदिनी, वय १२ वर्ष, ता. देगलूर, जि. नांदेड. ही मुलगी शिक्षण सहावीच्या वर्गात शिकते. आई-वडिलांना कामातून वेळ मिळत नाही, म्हणून स्वयंपाकापासून घरातील सगळं काम ही मुलगी करते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. भट्टीवरील सर्व मुलांसाठी तिने अनेकदा पावभाजी बनवली आहे. या मुलीला शिक्षणातदेखील खूप रस आहे. आम्ही भट्टीवर आलेलो पाहताच, हातातील सगळं काम सोडून सगळ्या मुलांना गोळा करण्याचं काम ही मुलगी करते.

ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. ही यादी कितीही वाढू शकते. कारण येथील प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. दोन वीटभट्ट्यांवर आम्हाला  २५ मुलं अशी सापडली, ज्यांचा शाळेत प्रवेश आहे, परंतु मागील चार-सहा महिन्यांपासून त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही. राज्यात हजारो, तर देशात लाखो वीटभट्ट्या असतील. तेथील मुलांची संख्या किती असेल?  

या मुलांचे शिक्षणासोबतच आरोग्य, कुपोषण यांसारखे प्रश्नदेखील गंभीर आहेत. त्यामुळेच माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत आणि प्राथमिक हक्कांपासून ही मुलं वंचित आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आणि हा केवळ एक वर्षाचा प्रश्न नाही. वर्षानुवर्षं हे चक्र सुरूच आहे. याकडे ना सरकारचं लक्ष आहे, ना समाजाचं. शिक्षणाची सर्वाधिक गरज असलेल्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे, परंतु ती होताना दिसत नाही.

सरकारी पातळीवरील उदासीनतेमुळेच आम्हाला वीटभट्टीवर जाऊन या मुलांना शिकवण्याची गरज भासली. या मुलांच्या भवितव्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना किंवा वैयक्तीक पातळीवर शक्य तेवढी मदत आणि वेळ, या अशा मुलांच्या विकासासाठी देण्याची गरज आहे.

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण खुंटे मुक्त पत्रकार आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा