घटस्फोट प्रत्येक वेळी दुःखदच असेल असं नाही, मात्र तो बऱ्याच जणांना नेहमीच दुर्दैवी, तर काहींना चुकीचा वाटतो. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
अनिरुद्ध राम निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 31 March 2022
  • पडघम कोमविप विवाह लग्न Marriage कुटुंब Family घटस्फोट Divorce नातेसंबंध Relations

आजही कुणी ‘वैवाहिक स्थिती’ (Marital status) या रकान्यात ‘घटस्फोटीत’ (Divorcee) असं लिहिलं की, लोकांच्या भुवया उंचावतात. ‘अरेरे!, हो का?’ असं प्रश्नचिन्ह त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये स्पष्टपणे दिसतं. आणि हे कोणत्याही वयात होवो? प्रतिक्रिया हीच असते! पण खरंच वास्तवात असं असतं का?

घटस्फोट का होतो?

या गहन प्रश्नाचं एक साधं आणि सोपं उत्तर आहे - दोन माणसांचं एकत्र नाही जमलं! पण ती दोन माणसं वैयक्तिक पातळीवर चांगली असूही शकतात, फक्त त्यांचं सूत आपसात जुळू शकत नाही. पण लोक नक्की काय झालं, हे संबंधित व्यक्तींकडून दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून न घेता, अर्धवट, ऐकीव माहितीच्या आधारावर आपली एक गोष्ट बनवतात, ते मात्र दुर्दैवी आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अर्थात कोणत्याही प्रकारच्या संबंधांत नाती टिकवणं ही नेहमीच तशी कठीण गोष्ट असते. अर्थात  प्रेम खूप असेल, आतून इच्छा असेल आणि समोरून तशी साथ असेल, तर ते अवघड नसतं. मात्र प्रेम कमी झालं की, त्याच गोष्टी दुष्कर वाटायला लागतात. नवरा-बायकोच्या नात्यात अनेक अदृश्य कंगोरे किंवा बाजू असतात. त्यात मुलं, व्यसनं, आजार, अनैतिक संबंध, करिअर, या किंवा अशा इतर अनेक गोष्टींमुळे समस्येची तीव्रता बदलत जाते आणि प्रसंगी छोट्या गोष्टींतून झालेला बेबनाव घटस्फोटापर्यंत जातो.

बरं, यामध्ये वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उदा., तरुण जितक्या पटकन घटस्फोट घ्यायचा विचार करतात, तसे मध्यम वयाचे किंवा ज्येष्ठ नागरिक करतातच असं नाही. मात्र बेबनावाचं दुःख सगळ्यांना थोडंफार अनुभवावं लागतंच. माझ्या जवळच्या एकाची गोष्ट सांगतो.

त्याचं नाव अर्णव. त्याने ज्या वेळी लग्नासाठी मुली पाहणं सुरू केलं, त्या वेळी त्याच्या काही प्राथमिक अपेक्षा होत्या. तशी त्या प्रत्येक मुलाला वा मुलीला असतातच, मग तुमचा प्रेमविवाह असो की ‘कांदे-पोहे विवाह’. त्या एकमेकांना मान्य झाल्या, तर आपण पुढे जातो. अर्णवनेही त्याच्या अपेक्षा लग्नाच्या आधी, पहिल्या भेटीत, होणाऱ्या बायकोला सांगितल्या. त्या अशा -

१) मी माझ्या आई-बाबांसोबत त्यांच्या घरात राहतो. एक बेडरूमचं घर आहे. चालेल का? नाहीच चालणार असेल तर भाड्याचं घर पाहू, पण आई-बाबा सोबत असतील. आई-बाबा एका घरात आणि नवरा-बायको दुसऱ्या, असं मी करणार नाही.

२) मी बाहेर नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे, पण त्याला एक-दोन वर्षं लागू शकतात. नागपूरच्या बाहेर जायला आवडेल का?

३) मी आई-बाबांसोबत राहतो, पण सध्या नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी शिफ्ट झालो, तर आई-बाबा येऊन-जाऊन असतील. पण जेव्हा ते थकतील, तेव्हा आपल्यासोबत राहतील. चालेल का?

४) माझ्या घरी येणारे-जाणारे लोक बऱ्यापैकी आहेत. सर्वच नातेवाईकांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे सोबत फिरायला जाणं, मजामस्ती करणं सुरू असतं. हे आवडेल का?

याला त्याच्या होणाऱ्या बायकोची ‘होय’ अशी उत्तरं होती, म्हणून पुढची बोलणी सुरू झाली. मध्ये काही काळ गेला. त्यांत अनेक वेळा ती घरी आली, त्याचे आई-बाबा, जवळचे नातेवाईक यांना भेटली. त्या वेळी सर्व गोष्टी आवडत होत्या, पण लग्न झाल्यानंतर एका महिन्यातच कुरकुर सुरू झाली. कारण तसं फालतू होतं. नवीन घरात रुळायला कुणालाही वेळ लागतोच. पण तो फक्त मुलीलाच लागतो, असं नाही. ज्या घरात ती गेली आहे, तिथं राहणाऱ्या लोकांनाही स्वत:त काही बदल करावे लागतातच. ते रातोरात होत नाहीत. पण ‘मी हे करणार नाही, मला हे करायचं नाही. तुम्ही मला आवडेल तसा बदल तुमच्यात करा, पण मी बदलणार नाही’ असा स्वभाव असेल तर?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मुळात ॲडजेस्टमेंट फक्त लग्नानंतरच असते असं नाही. उदाहरणार्थ, जे लोक शिक्षण, नोकरी यानिमित्त मित्र-नातेवाईक यांच्याकडे राहतात. समजा चार मित्र नोकरीसाठी पुण्यात तीन वर्षांपासून सोबत राहत आहेत. नंतर चौथा मित्र त्यांच्यासोबत रहायला येतो, तर त्या वेळी सर्वांत जास्त अॅडजेस्टमेंट त्या नव्या मित्रालाच करावी लागते. तसेच नातेवाईकांकडे जर राहत असू, तर ते तुमच्या एकट्यासाठी त्यांच्या जगण्याची पद्धत बदलत नाहीत. तुम्हाला त्यांच्या घरात राहायचं असतं, म्हणून तुम्हाला स्वत:त बदल करावा लागतो. ते तुम्ही करू शकलात, हळूहळू काही सवयी बदलवण्याची तयारी दाखवली, तर तुम्ही त्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांच्या घरी राहून शिक्षण, नोकरी व्यवस्थित करू शकता. नाही तर भांडण होऊन वेगळं, एकटं राहण्याची वेळ येते.

एका व्यक्तीसाठी चार लोक लगेच बदलत नाहीत. जी व्यक्ती नंतर आली आहे, तिलाच स्वत:मध्ये काही बदल करावे लागतात. मग पुढे जाऊन ती चार माणसं बदलतात. मग ते लग्नाच्या बाबतीत असो किंवा नोकरी-शिक्षणाच्या. पण अर्णवच्या बाबतीत बदल समोरच्याला म्हणजेच त्याच्या  बायकोला स्वत:मध्ये करूनच घ्यायचा नव्हता. परिणामी हळूहळू वादाला सुरुवात झाली. अर्णवने अनेकदा समजवण्याचाही प्रयत्न केला, पण समजूनच घ्यायचं नसेल, तर कोण काय करणार?

पुढे अर्णव फारशी दाद देत नाही, हे लक्षात आल्यावर कायदेशीर हत्यार काढून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांत तक्रार केली आणि अर्णवला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश आला. दरम्यान घरात सुरू असलेला वाद नंतर लोकांना समजला आणि सुरू झाली ‘आपापले तर्क-वितर्क’ लावून वेगळी एक गोष्ट तयार करण्याची लोकस्पर्धा. “आम्ही पहिलंच म्हटलं होतं की, आजकालच्या मुलींना मोठं घर पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे” वगैरे वगैरे... पण अर्णव त्याच्या निर्णयावर ठाम होता.

त्याचं म्हणणं होतं- “मला १००१ टक्के मान्य की, प्रायव्हसी पाहिजे, पण मी लग्नाच्या आधी घराच्या बाबतीत काही लपवलं होतं का? लग्न होईपर्यंत अनेकदा घरी येऊन गेलेली मुलगी एकदा तरी घराच्या बाबतीत काही बोलली का नाही? जर तिला या गोष्टींचा त्रास होत होता, तर पोलीस चौकशी ते न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात घर किंवा प्रायव्हसी यासंदर्भात कुठेही लिखित किंवा तोंडी उल्लेख का नाही. घर मोठं किंवा छोटं हे घटस्फोटासाठी कारणीभूत असतं असं नाही किंवा सासू सासरे सोबत राहतात, हे आजकाल मुलींना नको असतं म्हणून घटस्फोट होतात, हे सुद्धा खरं कारण नाही. कारण माझ्या अगदी जवळच्या मित्राचाही घटस्फोट झाला आहे. त्याचं तर घर मोठं होतं, आई-वडीलही दुसऱ्या शहरात होते, पण तरी घटस्फोट झालाच. त्यामुळे घटस्फोट हा अॅडजेस्टमेंट करण्याची वृत्ती नसेल तरच होतो. जर तसं असतं तर, कोणत्याच श्रीमंताच्या घरात घटस्फोट झाला नसता आणि कोणत्याच गरिबाने प्रायव्हसी नाही म्हणून लग्न केलं नसतं.”

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पुढे जेव्हा पोलीस चौकशी सुरू झाली, त्या वेळी अर्णव आणि त्याच्या घरच्यांनी माझा मानसिक छळ केला असा आरोप त्याच्या बायकोने केला. अर्णवने पोलिसांना विचारलं की, मानसिक छळ म्हणजे नेमकं काय केलं आम्ही, हे थोडं स्पष्ट करून तिने सांगावं. त्यावर तिचाकडून उत्तर आलं की, “मी  एकदा रात्री बाथरूमला गेली असताना सासूने लाईट बंद केला. मला माझी सासू घरातल्या परंपरा - पूजा, नवरात्र - यांबद्दल सांगते.”

हे पोलीस कौंसिलरलादेखील हास्यास्पद वाटलं, पण काय करणार. शेवटी कायदा आहे आणि तो असा आहे की, या गोष्टीदेखील मानसिक छळ म्हणून ग्राह्य धरल्या जाऊन ‘घरगुती हिंसाचार’ या कायद्याअंतर्गत केस दाखल होऊ शकते. पुढे चौकशी पूर्ण झाली. अर्णवने पोलिसांच्या पाच महिने चाललेल्या चौकशीत पूर्ण सहकार्य केलं, त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरं दिली. परिणामी पोलीस कारवाई झाली नाही. नंतर त्याच्या बायकोने न्यायालयात नवीन आरोपपत्र दाखल केलं. त्यात तिने कलम १२५ अंतर्गत मानसिक छळासोबत मारहाण केली, असा आरोप केला.

कलम १२५ म्हणजे काय तर, बायको नवऱ्यापासून वेगळी राहते. त्यामुळे तिला महिन्याला भरणपोषणासाठी खर्च मिळावा, यासाठी केली गेलेली केस. ही नवरा बायकोवर किंवा आई-वडील आपल्या मुलावरही करू शकतात. तर ही केस अर्णववर सुरू झाली.

अर्णव लग्न झाल्यापासून बायको घरातून स्वत:हून निघून जाईपर्यंतची घुसमट कोणाजवळही बोलला नव्हता. कारण भीती होती की, ‘लोक काय म्हणतील’. पण तरी तीन महिने कसेतरी काढले. नंतर घरी सांगितलं. त्याच्या बहिणीने पूर्ण पाठिंबा दिला आणि वकिलाशी बोलण्याचा सल्ला दिला. अर्णवला ती निघून आज ऐकेल, उद्या ऐकेल असं वाटतं होतं, पण आपण नुसती वाट पाहतो आहोत, अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्याने त्याच्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी पाहिली होती, जी आपला जोडीदार सुधारेल, या अपेक्षावर जगत होती.

या सर्व मानसिक तणावाच्या काळात अर्णव त्याच्या घरच्यांना एक गोष्ट सांगत असायचा. ती अशी की, “आपण पृथ्वीवर जगतो आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:ख असतात, अगदी देवाला पण ते चुकलं नाही. त्यामुळे माझाच घटस्फोट का झाला, असं म्हणतं दुःखं करण्यात अर्थ नाही. आपल्या आजूबाजूला असेही लोक आहेत, ज्यांचं दुःख घटस्फोटाच्या वेदनेपेक्षा जास्त आहे.”

आत्ताची परिस्थिती पाहता या पुढे घटस्फोटाचं प्रमाण वाढतच जाणार, यात शंका नाही. पुढच्या दोन-तीन पिढ्यांत तर हे प्रकार खूप सर्रास होतील.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घटस्फोटामुळे खरंच सगळं काही वाईट होणार असतं का? तर नक्कीच नाही! कधी कधी घटस्फोट झाल्यानं माणसं सुखीही होतात, त्यांची प्रगती होते किंवा तब्बेत ठीक होते, अशीही उदाहरणं आहेत. त्रास काय होता आणि त्याची तीव्रता कशी होती, यावर ठरतं की, संबंधित माणसं सुखी होतील की नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्फोट मुलांसाठी अतिशय त्रासदायक ठरतो. मुलांना नेहमीच आई-बाबा दोघेही हवेच असतात. आई-बाबा ही वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं असतात. कोणीच एकमेकांची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे विभक्त व्हावं, पण सामंजस्यानं. परिणामी मुलांना कमीत कमी झळ पोचते...

एखाद्या माणसाला स्वतःच्या आयुष्यात बोलावून, त्याला नंतर निरोप द्यावा लागणं, हे सुखद किंवा सोपं नक्कीच नाही. त्यात संबंधित सर्वांनाच त्रास होतो. मात्र तरीही जेव्हा निर्णय घेतला जातो, तेव्हा ती त्या जोडप्याची गरज आहे, हे मान्य करावं. 

‘आपल्या आयुष्यात असं काही होऊ नये बुवा!!’ असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि तरीही आपल्याबाबतीत असं काही होणार की नाही, हे कुणालाही छातीठोकपणे सांगता येत नाही. यामध्ये अनंत गुंतागुंती, विविध कारणं, परिणाम, फायदे-तोटे आणि मानसिक-शारीरिक-सामाजिक पैलू आहेत. घटस्फोट प्रत्येक वेळी दुःखद असेलच असं नाही, मात्र तो बऱ्याच जणांना नेहमीच दुर्दैवी, तर काहींना चुकीचा वाटतो. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.

.................................................................................................................................................................

लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.

aniruddhanimkhedkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा