टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रिक्षा, बैलगाडी शर्यत, पेप्सी-कोकाकोला आणि बराक ओबामा
  • Tue , 28 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या ऑटोरिक्षा. Auto Rickshaw बैलगाडी शर्यत Bullock Cart Race पेप्सी Pepsi कोकाकोला Cocacola ओबामा २०१७ Obama 2017

१. नवीन रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी, अशी सक्ती प्रादेशिक वाहतूक विभागाने (आरटीओ) केली होती. मात्र अशी सक्ती करणे योग्य नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मिरा भाईंदर चालक संघटनेने राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ‘रिक्षाचालकांना बॅच देताना मराठीचा आग्रह धरल्यास ते समजून घेतले जाऊ शकते. मात्र परवाने देताना मराठीची सक्ती करणे चुकीचे आहे. कारण अनेकदा रिक्षा परवाना घेणारी व्यक्ती त्याची रिक्षा दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने चालवण्यास देत असतात,’ असे मिरा भाईंदर चालक संघटनेने म्हटले होते.

मुंबईच्या परिसरातल्या याच भागातल्या नव्हे, तर कोणत्याही भागातल्या रिक्षाचालकांना, मालकांना, त्या धुणाऱ्यांना, त्यांची दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमालकांना, सीएनजी पुरवठादारांना, स्पेअरपार्टवाल्यांना… सगळ्या सगळ्यांना मराठी यायलाच पाहिजे, अशी सक्ती करता येईल. पण, तिचा उपयोग काय? या सगळ्यांना एकमेकांशीच मराठीत बोलायला लागेल. मुंबईत कोणाही परप्रांतीयाला मराठीत बोलण्याची कधीच कुठेच गरज भासत नाही, सगळी कामं हिंदीतून आरामात होतात. कारण, मराठी माणूस घराच्या दाराबाहेर पडला की, आपल्याच बायकोपोरांशीही हिंदीत बोलायला लागतो. त्याने मराठीत बोलावं याचीही सक्ती करायची का?

………………………………………………………………………

२. तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधि आणि न्याय विभागाकडून बैलगाडी शर्यतीसाठी विधेयक आणले जाणार आहे.

असं इतक्या सहजगत्या कसं काय करताय राव? थोडं आंदोलन होऊद्यात, ध्रुवीकरण होऊद्यात. लाखोंचे मोर्चे निघूद्यात. राज्याच्या जीवनमरणाची ही अस्मिता आहे, अशा भावनेनं सगळ्या शहरांचं कामकाज बंद पाडलं जाऊद्यात. पाचदहा माणसांचे आंदोलनात बळी जाऊद्यात. त्यानंतर हा प्रश्न सोडवला तर नेतृत्व कसं झळाळून उठेल तुमचं.

………………………………………………………………………

३. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आता रेल्वे स्थानकांवर शीतपेये मिळणार नाहीत. पश्चिम मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पेप्सी आणि कोकाकोलाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र असे कोणतेही प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पश्चिम मध्य रेल्वेच्या ३०० स्थानकांवर आता शीतपेयांची विक्री केली जाणार नाही. केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी लोकसभेत शीतपेयांमध्ये कॅडमियम आणि क्रोमियम असल्याचे सांगितले होते. यानंतर आरोग्य विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यावर बंदी घालण्यात आली होती.

तर मग आता धडधडत्या चित्ताने रेल्वे स्टेशनांवर ट्रेनबरोबरच वाट पाहा कॅडमियम-क्रोमियममुक्त आणि अत्यंत आरोग्यदायी अशा पतंजलीच्या शुद्ध स्वदेशी शीतपेयांची… काय म्हणताय? चव अगदी सेम टु सेम पेप्सी किंवा कोकाकोलाचीच लागतेय? असूद्याना, बाटली शुद्ध स्वदेशी पतंजलीची आहे ना? झालं तर मग.

………………………………………………………………………

४. सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे, असे मला वाटते. कारण सकाळी कुठलीही वाहिनी सुरू करा आपल्याला त्यावर एक भविष्य सांगणारा ज्योतिषी वाहिन्यांनीच नेमलेला दिसतो. मला वाटतं, अशा गोष्टींमध्ये वेळ घालविण्याऐवजी त्या वेळेत तरुणांना जोडू शकेल, असे काही वैज्ञानिक कार्यक्रम दाखवले तर ते अधिक चांगले ठरेल. दुर्दैवाने तसे कुठेही होताना दिसत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विस्फोट होतोय हे खरं, पण कशासाठी त्याचा वापर व्हायला हवा, याचा विचार, त्याविषयीचे चिंतन मात्र होताना दिसत नाही. : डॉ. जयंत नारळीकर

नारळीकर साहेब, मुळात समाजाने आणि संस्कृतीने इतका कडेकोट बंदोबस्त ठेवलेला असताना तुमच्यासारख्या काही मोजक्या मंडळींच्या डोक्यात हे विज्ञानवादी विचार कुठून शिरले, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. खरं चिंतन त्याविषयी करायला हवं. आपल्या पुरातन ज्ञानाविषयी तुमचं घोर अज्ञानच तुम्ही दाखवून देत आहात. रोज आयुकामधून बाहेर पडल्यावर काळ्या शेपटीच्या गायीला दोन घास द्या, तिची शेपटी डोळ्यांना लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावून पाहा आठ गुरुवार. फरक पडेल काहीतरी तुमच्या विचारशक्तीत.

………………………………………………………………………

५. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. फ्रान्समधील जनतेला ते राष्ट्रपती हवे आहेत. सध्या फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणुका सुरू आहेत. ‘ओबामा२०१७’ संकेतस्थळाने ओबामा यांना फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष होण्याची गळ घालणारी याचिका तयार केली आहे. या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

फ्रेंच भाऊ, घाई करू नका. तुम्ही रांगेत आहात. ओबामा यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद दोन कार्यकाल उपभोगलं असलं तरी नियमांत बदल करून, घटनादुरुस्ती करून त्यांनाच तिसऱ्यांदा पाचारण करावं, अशी मागणी खुद्द अमेरिकेतून होते आहे. तिथे ट्रम्पतात्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता खरोखरच असं झालं तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही हवं तर तात्यांना घेऊन जा… फ्रेंच भाऊ, ओ फ्रेंच भाऊ… क्षणात कुठे गायब झालात?

………………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......