प्रकाश विश्वासरावांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘साने गुरुजी जीवनदर्शन’!
पडघम - सांस्कृतिक
अरुण शेवते
  • प्रकाश विश्वासराव आणि ‘साने गुरुजी जीवनदर्शना’ची काही छायाचित्रं
  • Mon , 08 November 2021
  • पडघम सांस्कृतिक प्रकाश विश्वासराव Prakash Vishwasrao लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक Sane Guruji Rashtriya Smarak

लोकवाङ्मय गृहाचे माजी प्रकाशक-मुद्रक आणि चित्रकार प्रकाश विश्वासराव यांच्या कल्पकतेतून अमरावतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांचं सचित्र जीवनदर्शन उभं राहिलं आहे, तर माणगावच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये ‘साने गुरुजी जीवनदर्शन’. सहा-सात वर्षांपूर्वी ‘साने गुरुजी जीवनदर्शन’च्या कामाला विश्वासरावांनी सुरुवात केली, तेव्हा लिहिला गेलेला पण अप्रकाशित असलेला हा लेख खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

..................................................................................................................................................................

प्रकाश विश्वासरावांशी जेव्हा केव्हा भेट व्हायची, तेव्हा ते साने गुरुजींचं पुस्तक वाचत बसलेले दिसायचे. साने गुरुजींची छायाचित्रं, इतर साहित्य यांनी त्यांचं टेबल व्यापून गेलेलं असायचं. साने गुरुजींचं हस्ताक्षर आणि इतर दुर्मीळ वस्तू पाहून मन भारावून जायचं. मलाही त्यांच्या कामाबद्दल उत्सुकता असायची. विश्वासराव एखादा प्रकल्प हाती घेणार म्हणजे त्यात काहीतरी वेगळेपण असणार. सामाजिक दृष्टी तर त्यांच्याकडे आहेच. पण त्याचबरोबर ते चित्रकार असल्यामुळे रंग आणि रूप यांचं सुंदर दर्शन त्यांच्या हाती घेतलेल्या प्रकल्पात पाहायला मिळतं. माणगावच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा ‘साने गुरुजी जीवनदर्शन’ प्रकल्प त्यांनी हाती घेतला आणि तेव्हापासून त्यांच्याभोवती ‘गुरुजीमय’ वातावरणाला सुरुवात झाली.

महापुरुषांची स्मारकं आपल्याकडे पुष्कळ होतात, पण त्या महापुरुषाऐवजी इतरच चर्चेला उधाण आलेलं असतं. एखादा पुतळा, सांस्कृतिक भवन असं ठरावीक साच्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर स्मारक आपल्या हाती आलेलं एक सांस्कृतिक संचित समजून त्याकडे पाहिलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

प्रकाश विश्वासरावांनी ‘साने गुरुजी जीवनदर्शन’ उभं करताना साने गुरुजी आणि त्या कालखंडाचा इतिहास आपल्याशी बोलतो आहे, गुरुजींशी संवाद घडतो आहे, असंच स्वरूप ठेवलं. त्यामुळे एक सांस्कृतिक संचिताचा ठेवा आपण चित्ररूपानं बघतो आहोत, असं वाटतं. याचं श्रेय त्यांच्या संकल्पनेला आणि संपादनाला आहे असं मला वाटतं.

या जीवनदर्शनामध्ये ४००-५०० दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश आहे. त्यामधून आणि इतर माहितीतून गुरुजींच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं दर्शन आपल्याला घडतं. कोकणच्या पार्श्वभूमीपासून प्रारंभ होतो. राम गणेश गडकरींची ‘महाराष्ट्र देशा’ ही कविता वाचायला मिळते. फुले, टिळक, महर्षि कर्वे यांची परंपरा पाहायला मिळते. इतिहासाशी प्रामाणिक राहून याची मांडणी केलेली आहे. वसंत आबाजी डहाकेंसारख्या सिद्धहस्त कवीनं याचं लेखन केलं आहे. त्यामुळे गुरुजींच्या आयुष्यातील काव्यात्मकता प्रकर्षानं दिसते.

साने गुरुजींचं कौटुंबिक छायाचित्र, गुरुजींचं पालगडमधील घर, गुरुजी पोहायला शिकले ती विहीर, गुरुजी ज्या शाळेत शिकले त्या घराचं छायाचित्र, औंध येथील शाळेच्या रजिस्टरमधील गुरुजींचं नाव असलेलं पान, साने गुरुजींनी शाळा सोडल्याचा दाखला, गुरुजी भित्तीपत्रक दैनिक चालवायचे त्याचं दुर्मीळ छायाचित्र, असहकार चळवळीत गांधींसोबतचं छायाचित्र, नेहरू-डांगे यांचं चळवळीतील दुर्मीळ छायाचित्र, गुरुजींचा भाषण करतानाचं छायाचित्र, धुळे कारागृहात गुरुजी होते ते कारागृह, साने गुरुजी-विनोबा भावे यांचं एकत्रित छायाचित्रं, कारागृहात गुरुजींनी लेखन केलं त्याचं छायाचित्र, फैजपूर अधिवेशनाचं छायाचित्र, साने गुरुजींनी ‘सोन्या मारुती’ पुस्तक लिहिलं त्याची पार्श्वभूमी, ‘काँग्रेस’ साप्ताहिक गुरुजींनी काढलं त्याची छायाचित्रं, आचार्य विनोबा भावे, शंकरराव देव यांची छायाचित्रं, धुळे कारागृहाचं छायाचित्र, साने गुरुजी आणि एस. एम. जोशी यांचं दुर्मीळ छायाचित्र, वर्तमानपत्रातील कात्रणं, गुरुजींचं हस्ताक्षर, ‘खरा धर्म’ ही त्यांची कविता, त्यांच्या सर्व पुस्तकांची मुखपृष्ठं, शिरीषकुमारचं छायाचित्र, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, सेनापती बापट यांचं एकत्रित छायाचित्र, असं इतरही बरंच काही आहे. सगळा तपशील दिला तर एक पुस्तिकाच तयार होईल.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

साने गुरुजींचं जीवनदर्शन म्हणजे नुसता छायाचित्रांचा संग्रह नव्हे, तर त्याबरोबर गुरुजींच्या आयुष्याचा जीवनपट आपल्याला उलगडत जातो. त्या काळचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. नव्या पिढीला ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखक म्हणून साने गुरुजी माहीत आहेत. पण त्यापलीकडे जे गुरुजी आहेत त्याचं दर्शन या संग्रहालयातून घडतं.

साने गुरुजींचं वलय आजही टिकून आहे. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराईट संपल्याबरोबर अनेक प्रकाशकांनी त्याच्या आवृत्त्या काढल्या. यातून या पुस्तकाचं मोठेपण अधोरेखित होतं. ६० वर्षांनंतरही एखादं पुस्तक चिरतरुण राहतं. लेखक म्हणून असलेलं गुरुजींचं महत्त्व, चळवळीचं नेतृत्व करणारे गुरुजी, मुलांसाठी तळमळणारे गुरुजी, आईचं वात्सल्य असलेले गुरुजी, अशी अनेक रूपं आहेत. ती नव्या पिढीला या संग्रहालयात पाहायला मिळतात, ही मोठी गोष्ट आहे.

आज टुरिझमचं प्रस्थ वाढत चाललेलं आहे. प्रवाशांना देवदर्शन आणि निसर्गाबरोबर ‘इतिहास’ही माहीत झाला तर ती नाविन्यपूर्ण गोष्ट ठरेल. साने गुरुजींच्या या जीवनदर्शनातून प्रवासाला जाणार्‍या पांथस्थानं वाटवाकडी करून इकडे यायला हवं. गुरुजींचं जीवनचरित्र नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. ‘समाजापुढे आदर्श नाही’ असं ओरडण्याचं जे फॅड आहे, ते चुकीचं आहे. समाजापुढे गुरुजींसह अनेकांचे आदर्श आहेत. फक्त ते व्यवस्थितपणे तरुणांपुढे जाण्याची गरज आहे. जागोजागी इतिहास घडलेला आहे. त्या इतिहासाचं मर्म ओळखून तरुण पिढी त्याकडे आकर्षित कशी होईल, यादृष्टीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे. साने गुरुजी स्मारक ट्रस्टने उचललेलं हे पाऊल महत्त्वाचं आहे.

साने गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त १९९८ साली ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ची स्थापना झाली. पालगडपासून ५० कि.मी. अंतरावर वडघर ता. माणगाव, जि. रायगड इथं ट्रस्टने ३६ एकर जमीन खरेदी करून राष्ट्रीय स्मारक उभारलं आहे. स्मारकाच्या उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांनी करून घेतला आहे. ७० हजार विद्यार्थ्यांनी ६० लाख रुपयांचा निधी जमवला. साने गुरुजींना मुलं, विद्यार्थी प्रिय असायचे. त्यांचा सहयोग ट्रस्टला लाभतो, हे विशेष आहे.

या स्मारकाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे साने गुरुजी जीवनदर्शन घडवणारं स्वतंत्र भवनच आहे. स्मारक ज्यांच्या नावानं आहे त्या मोठ्या माणसांचं बिंब-प्रतिबिंब स्मारकाच्या ठायी ठायी दिसलं पाहिजे. तसं ते दिसलं नाही, तर त्या माणसावर आणि इतिहासावरही अन्याय होतो. पण इथं साने गुरुजींवर निष्ठेनं प्रेम करणारी साहित्य, कला, पत्रकारिता, समाजकारण या क्षेत्रांतील चांगली माणसं असल्यामुळे स्मारक अतिशय देखणं झालं आहे. हे गुरुजींच्या प्रतिमेशी जुळणारं आहे. उल्हास राणे, गजानन खातू, सुनीलकुमार लवटे, चित्रकार सतीश भावसार यांचा महत्त्वपूर्ण सहयोग साने गुरुजी जीवनदर्शनात आहे. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे, त्यांच्या आयुष्याची जडणघडण, त्याबरोबरच घडलेला इतिहास पाहून मन थक्क होतं. एका एका फ्रेममधून, छायाचित्रातून आणि इतिहासातून गुरुजींचं आयुष्य उलगडत जातं.

कोकणाच्या वैभवात एक महत्त्वाचा प्रकल्प उभा राहिला हे मला महत्त्वाचं वाटतं. इतिहासाला मृत्यू नसतो. फक्त तो इतिहास सतत तरुणांच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. आणि हे काम अशा स्मारकातूनच उभं राहतं.

.................................................................................................................................................................

लेखक अरुण शेवते कवी, लेखक आणि संपादक आहेत.

shevatearun@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा