प्राचार्य डोळे सर : संशोधनाचा निर्मळ मार्ग आणि एक निरिच्छ दर्शक
पडघम - साहित्यिक
भूषण जोरगुलवार
  • ‘स्मृतिसाद’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि प्राचार्य ना. य. डोळे सर
  • Sat , 09 October 2021
  • पडघम साहित्यिक ना. य. डोळे N. Y. Dole पीएच.डी. Ph.D. अरुणकुमार वैद्य Arunkumar Vaidya राज्यशास्त्र Political Science मराठवाडा विद्यापीठ Marathwada Vidyapeeth

उद्या १० ऑक्टोबर रोजी प्राचार्य ना. य. डोळे सरांचा २०वा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने प्रा. भूषण जोरगुलवार (अहमदपूर, जि.लातूर) यांच्या ‘स्मृतिसाद’ या आत्मचरित्रातील हा संपादित अंश… दिलीपराज प्रकाशन, पुणे यांच्या सौजन्याने…

..................................................................................................................................................................

प्राध्यापकी पेशातील अत्युच्च पदवी म्हणजे पीएच.डी. या पदवीशिवाय प्राध्यापक या पदाला परिपूर्णता व भारदस्तपणा येत नाही. निदान आमच्या काळी तरी अशी अवस्था होती. संपूर्ण मराठवाड्यात राज्यशास्त्रात मोजक्याच प्राध्यापकांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली होती. मीही मनाने ठरवले की, आपल्याला जोपर्यंत पीएच.डी. पदवी मिळत नाही, तोपर्यंत आपली प्राध्यापकी परिपूर्ण होत नाही. मी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून एम.ए.चे शिक्षण घेतलेले नसल्याने विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापकांशी माझी ओळख अशी नव्हतीच. पीएच.डी.साठी योग्य गाईड मिळणे म्हणजे एक अवघड काम. हे गाईड मिळवायचे त्या काळी एकमेव ठिकाण म्हणजे विद्यापीठातील त्या विभागाचे प्राध्यापक. माझी विभागात कोणाशी फारशी ओळख नव्हती. याच सुमारास उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य ना. य. डोळे सरांना पीएच.डी.चे गाईड म्हणून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादने मान्यता दिली आणि त्यांच्याकडे एक-दोन विद्यार्थांनी नोंदणी केलेली होती. मी एके दिवशी सरांच्या भेटीला उदगीर येथे जाऊन माझी पीएच.डी. करण्याची इच्छा बोलून दाखवली. सर ‘ठीक आहे, हरकत नाही’ म्हणाले. त्यानंतर प्रबंधाचा विषय निश्चित करण्यासाठी एक-दोन बैठकीमध्ये आमच्या दोघांत चर्चा करून अंतिम विषय निश्चित केला- ‘RPI : An Analytical Retrospection’. लवकरच प्रबंधाचे प्रारूप तयार करून मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.साठी नोंदणी केली. प्रबंधाच्या कामाला सुरुवात तर जोरात झाली, पण नंतर मधला काही काळ हे काम खोळंबले. पण नंतर नेटाने काम करून १९८६मध्ये विद्यापीठाला प्रबंध सादर केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

डोळे सरांचा पीएच.डी.चा विद्यार्थी होण्याअगोदरपासूनच सरांची माझी चांगली ओळख झालेली. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी त्यांनी लिहिलेल्या पुरस्कारामुळे मी अधूनमधून सरांना भेटत असे. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा प्रबंध पूर्ण केला. या प्रबंधाच्या निमित्ताने मी सरांच्या खूप जवळ आलो. या काळात सरांनी जे सहकार्य आणि प्रेम दिले, ते मी आयुष्यात विसरू शकत नाही. भारतात जिथे कुठे माझ्या प्रबंधासाठी उपयुक्त पुस्तके मिळतील, ती मागवण्याचा सरांनी मला पूर्ण अधिकार दिला. कॉलेजच्या कोऱ्या लेटरहेडवर स्वाक्षरी करून ते माझ्याकडे देत व आवश्यक पुस्तकांची ऑर्डर या पत्राच्या माध्यमातून मी देत असे. प्रत्येक भेटीत सरांचा पहिला प्रश्न असायचा की, ‘इतक्यात नवीन काय वाचन झाले?’ वर्तमान परिस्थितीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भात एक छान फेरफटका सरांच्या सहवासात व्हायचा. बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांच्या बाबतीतही आमची चर्चा व्हायची. सर प्राचार्य म्हणून तर असामान्य होतेच, पण एक माणूस म्हणून तर खूप उंचीचे होते.

माझा प्रबंध विद्यापीठात सादर केल्यानंतर त्याचे एक परीक्षक होते कर्नाटकातील म्हैसूर विद्यापीठाचे डॉ. विश्वनाथअय्या आणि दुसरे होते पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. आर. इनामदार. प्रबंध मूल्यांकनानंतर दोन्ही परीक्षकांचा अनुकूल शेरा आल्यावर तोंडी परीक्षेसाठी या दोन परीक्षकांपैकी एक तरी परीक्षक असणे आवश्यक होते. डॉ. विश्वनाथअय्या यांनी सेवानिवृत्ती व प्रकृतीचे कारण पुढे करून तोंडी परीक्षेला उपस्थित राहण्याबद्दल असमर्थता दर्शवली. डॉ. इनामदार सरांनी कार्यबाहुल्यामुळे तत्परता दाखवणे शक्य नव्हते. मी डोळे सरांकडे जाऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मग सरांनी एक-दोन दिवसांत सरांशी संपर्क साधून असे ठरवले की, इनामदार सर तोंडी परीक्षेला औरंगाबादला येणार नाहीत, तर गाईड व विद्यार्थी म्हणजे सर आणि मी पुणे विद्यापीठात जाऊन डॉ. एन. आर. इनामदार यांच्या केबिनमध्ये तोंडी परीक्षा द्यावी. त्याचप्रमाणे तोंडी परीक्षेची तारीख निश्चित झाली. माझ्या आठवणीप्रमाणे ९ ऑगस्ट १९८६ ही तारीख होती. सकाळी अकरा वाजता सरांची भेट घेऊन पुण्याला जायचा कार्यक्रम निश्चित केला. सर म्हणाले, ‘आठ ऑगस्टला सकाळी आठ वाजेपर्यंत माझ्याकडे उदगीरला या. न जेवता या. आमच्या घरी जेवण घेऊन आपल्याला सकाळी नऊची उदगीर-पुणे बस पकडायची आहे.’ कारण त्या काळी या भागातून पुण्याला जायची बस म्हणजे एकमेव बस.

ठरल्याप्रमाणे आठ ऑगस्टला सकाळी आठ वाजता मी सरांच्या घरी पोहोचलो. आम्ही दोघांनी जेवण घेतले. सरांनीच आदल्या दिवशी एसटीची दोघांची तिकिटे बुक केलेली होती. आम्ही पुण्याला निघालो. सर त्या वेळी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष होते. सर सरळ मला साने गुरुजी स्मारकात घेऊन गेले. रात्री आम्ही तेथेच जेवण घेतले. दुसरे दिवशी पुणे विद्यापीठात डॉ. इनामदार सरांनी माझी तोंडी परीक्षा घेतली. एका बंद पाकिटात या तोंडी परीक्षेचा निकाल टाकून औरंगाबादला विद्यापीठात समक्ष देण्यास सांगितले व तसे दुसरे एक पत्र पोस्टाने पाठवले. इनामदार सरांनी ‘अभिनंदन! तुमच्या डॉक्टरेटच्या पदवीची मी विद्यापीठाला शिफारस केलेली आहे. तुम्ही आता नोटिफिकेशन नंतर डॉक्टर झालात.’ असे म्हणून माझा हात हातात घेतला. मला अतिशय आनंद झाला. डोळे सर आणि इनामदार सरांना मी वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. पीएच.डी. प्राप्त विद्यार्थी म्हणून मी त्या सर्वांना मेजवानी देण्याऐवजी इनामदार सरांनी आम्हा दोघांना त्यांच्या घरी रात्री जेवणाचे आमंत्रण दिले.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

यानंतर दुपारी मी आणि सर विद्यापीठाच्या बाहेर आलो. मी सरांना म्हणालो, ‘मला माहीत नाही इथे कोणते चांगले हॉटेल आहे. कदाचित तुम्हाला कल्पना असेल, तर तुम्ही सांगा. आपण दुपारचे जेवण तिथे घेऊ.’ सर म्हणाले, ‘हो, मला माहीत आहे.’ मग ऑटो करून आम्ही चेतक नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. सर म्हणाले, ‘हे आमच्या काळातील पुण्यातील सर्वांत चांगले हॉटेल.’ सरांनी जेवणाची ऑर्डर दिली. ते म्हणजे फुल थाळी शाकाहारी. ती थाळी समोर आली. वाट्या आणि पदार्थांनी संपूर्ण ताटे भरलेली. सर म्हणाले, ‘मला मधुमेह आहे, तेव्हा माझ्या खाण्यावर मर्यादा आहेत. तुम्ही भरपूर खा. आपले दोघांचे पैसे वसूल झाले पाहिजेत.’ रात्री इनामदार सरांकडे जेवण घेऊन आम्ही परत साने गुरुजी स्मारकावर आलो आणि मुक्काम केला. सर दोन दिवस कामानिमित्त पुण्याला थांबणार होते व मला सकाळी मिळेल त्या गाडीने औरंगाबाद गाठायचे होते.

सकाळी लवकर उठून मी बस स्टँडवर जाण्याच्या तयारीत होतो, इतक्यात पुण्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली. जनरल अरुणकुमार वैद्य यांना शीख अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या.

जनरल वैद्य हे भारताचे भूदल प्रमुख होते. अमृतसर सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे संपूर्ण नियोजन करून ते अमलात आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. त्यानंतर शीख अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर त्यांचे नाव होते. सेवानिवृत्तीनंतर जनरल वैद्य हे पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या मागावरच हे अतिरेकी होते. १० ऑगस्ट १९८६ रोजी जनरल वैद्य आणि त्यांच्या पत्नी बाजारातून घरी परत येताना, जिंदा आणि सुखा या शीख अतिरेक्यांनी त्यांच्यावर नऊ गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर सील करण्यात आले. सर्व वाहतूक बंद करण्यात आली. बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मी स्मारकात अडकून पडलो.

संध्याकाळी सरांनी स्मारकातील एका कार्यकर्त्याला बस स्टँडवर पाठवून काय परिस्थिती आहे, हे बघून यायला आणि मिळाल्यास तिकीट आरक्षित करायला सांगितले. तसा त्या कार्यकर्त्यांनी आठ वाजता येऊन निरोप दिला की, रात्री साडेबारा वाजता एक गाडी औरंगाबादला निघणार आहे. असे म्हणून त्याने बुक केलेले तिकीट माझ्या हाती दिले. रात्री ही साडेबाराची बस पकडून मी औरंगाबादला पोहचलो. विद्यापीठात सरांनी दिलेले पत्र देऊन पीएच.डी. बहाल केल्याचे नोटिफिकेशन काढून त्याची एक प्रत घेऊन मी अहमदपूरला निघालो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डॉ. डोळे सर हे खरे जगावेगळे व्यक्तिमत्त्व होते. नाही तर पीएच.डी.ची तोंडी परीक्षा म्हणजे त्या विद्यार्थ्याला येणाऱ्या परीक्षकांची पंचतारांकित सोय करावी लागे. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मित्रांचा यथोचित (ओल्या पार्टीसह) पाहुणचार करावा लागे. याचा अर्थ त्या काळात हजारोंचा खर्च अगदी सहज होत असे. आज यापेक्षाही वाईट अवस्था आहे. पण माझ्या तोंडी परीक्षेसाठी माझ्या खिशातून खर्च झाला तो केवळ पंचवीस रुपये. जाताना सरांच्या घरी जेवण, रात्री स्मारकातच, दुसऱ्या दिवशी दुपारी चेतक हॉटेल, ज्याचे बिल देण्यास मला सरांनी मना करून स्वत:च दिले. रात्री इनामदार सरांकडे जेवण. तिसऱ्या दिवशी दोन्ही वेळचे जेवण नाश्त्यासह स्मारकावरच. कारण संपूर्ण पुणे त्या दिवशी बंद होते. शिवाय परतीच्या तिकिटाची व्यवस्था सरांनी सेवादल कार्यकर्त्यांच्याकडून करून दिली, त्याचेही पैसे सरांनीच दिले. हे सर्व आजच्या पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात खरे वाटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. डोळे सरांसारखी माणसे माझ्या आयुष्यात आली, हे माझे केवढे भाग्य!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा