गांधींनी अहिंसेला पुन्हा प्राणपणाने प्रतिष्ठा मिळवून दिली. या संदर्भाने आणि महत्कार्याने त्यांना ‘पंचविसावे तीर्थंकर’ म्हणता येते!
पडघम - देशकारण
नानासाहेब गव्हाणे
  • म. गांधी आणि भगवान महावीर
  • Sat , 02 October 2021
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi भगवान महावीर ‌Bhagvan Mahavira अहिंसा शांती Peace

पहिले जागतिक महायुद्ध १९१४ ते १९१८ दरम्यान झाले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागसाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून क्रौर्याचे विदारक आणि हिडीस दर्शन घडवले. या महायुद्धाची अशी रौद्र भीषण अखेर होते न होते, तोच जगात तिसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले. तिसऱ्या महायुद्धाचा स्फोट कुठल्याही क्षणी होऊ शकतो, अशी जगाला धास्ती वाटत होती. तसे झाले तर सर्व जगाचा विध्वंस व्हायला वेळ लागणार नाही, याची चुणूक जपानवरील अणुबॉम्बच्या हल्ल्याने दाखवली होती.

तशात नवनव्या शोधांतून युद्धसाहित्यात महाविनाशक क्षेपणास्त्राची भर पडत गेल्याने आता जे महायुद्ध होईल, ते जगाला बेचिराख करून टाकणारे ठरेल, याची दुखरी जाणीव विचारवंतांना प्रखरपणे होऊ लागली. एकीकडे युद्धपिपासू वृत्ती वाढीला लागत असताना दुसरीकडे युद्धापासून जगाला परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. शांततेसाठी असा ध्यास घेतला जात असताना युद्धाचा हव्यास धरणाऱ्या उन्मत्त राष्ट्रांना संभाव्य नाशाचे भान येत होते. परिणामत: युद्धासाठी पुढे झेपावणारे पाऊल या धसक्याने मंदावत होते. या बदलत्या मानसिकतेमागे जशी प्रलयंकारी विनाशाविषयी वाटणारी भयकातरता होती, तशी विश्वशांततेसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी चाललेल्या प्रामाणिक प्रयासांची सार्थकताही आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

याचे मोठे श्रेय अंगावर कमीत कमी वस्त्रे ठेवून भगवान महावीरांच्या अपरिग्रह व्रताचे प्रत्यक्षात काटेकोर पालन करणाऱ्या म. गांधींच्या युगप्रवर्तक कार्याला द्यावे लागेल. ‘गांधीयुगा’तल्या पिढीने हे समक्ष पाहिलेले आहे. कुणी कुणी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे अनुभवलेले आहे. इतिहास याचा साक्षीदार आहे.

गांधीजींचा जन्म सोज्वळ सात्त्विक वैष्णव कुटुंबात झाला होता. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराई जाणे रे’ या सहृदय धारणेवर त्यांच्या विचारांचे आणि यास अनुलक्षून त्यांच्या आचारांचे भरणपोषण झाले होते. अशात त्यांच्या आचार विचार प्रणालीला जैन तत्त्वज्ञानाची भरभक्कम जोड मिळाल्याने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य (अर्थात शील) आणि अपरिग्रह या व्रतांनी त्यांच्या जीवनाला उजाळा मिळत गेला. ‘सुदामपुरी’तल्या निर्मळ पवित्र वातावरणात लहानपणापासूनच असे संस्कार होत गेल्याने पोरबंदरच्या या मृदू पाषाणातून सुभग सुंदर अशी मूर्ती घडत गेली.

“राजकोटमध्ये मला अनासायेच सर्व संप्रदायाविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदू धर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो.... वडिलांपाशी जैन धर्माचार्यांपासून कोणी ना कोणी नेहमी येत. वडील त्यांना भिक्षाही घालीत. ते वडिलांबरोबर धर्मासंबंधी व व्यवहारासंबंधी गोष्टी करीत. याशिवाय वडिलांचे मुसलमान आणि पारशी मित्रही होते. या सर्व वातारणाचा माझ्यावर असा परिणाम झाला की, सर्व धर्मांबद्दल माझ्या मनामध्ये समान भाव उत्पन्न झाला.”

‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेतील गांधीजींच्या या निवेदनातून त्यांच्या मनोवेधक जडणघडणीचे आणि त्यातून साकारलेल्या त्यांच्या सुस्वरूप मूतींचे दर्शन घडते. छिन्नीने कसब करावे, अशा तऱ्हेने जन्मदात्या पुतळीबाने मोठ्या व्यवहारकुशलतेने हे संसारी कर्तव्य पार पाडले होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

उच्च शिक्षणासाठी परदेशी निघालेला आपला मुलगा तेथील मायावी मोहमयी वातावरणाने भारून बिघडू नये, असे मातेला वाटत होते. पुतळीबाची अशी कोणीतरी समजूत करून दिली होती की, तरुण लोक विलायतेला जाऊन बहकतात, मांसाहार करतात. तेथे दारूशिवाय चालत नाही. आईचा हा गैरसमज दूर व्हावा यासाठी ‘मोहन’ने आईला विचारले, ‘तुला माझा विश्वास नाही?’ असे विचारून पुतळीबाचा मोहन थांबला नाही, तो आश्वासक स्वरात म्हणाला, ‘मी तुला फसवणार नाही, शपथ घेऊन सांगतो की, या तिन्ही वस्तूंपासून मी दूर राहीन.’ मुलाने असे खात्रीपूर्वक सांगितले तशी आई म्हणाली, ‘मला तुझा विश्वास आहे. पण दूर देशात कसे होणार? या विचाराने माझी मतीच गुंग होते. मी बेचरजी स्वामींना विचारते’, पुतळीबा एवढे बोलून थांबली नाही. तिने बेचरजी स्वामींना घरी बोलावून घेतले. बेचरजी स्वामी गुजरातेतल्या मोढवाण्यातून जैन साधू झाले होते. त्यांनी पुतळीबाला भरवसा दिला, ‘मी या मुलापासून या तिन्ही बाबतीत व्रत घेववितो. मग त्याला जाऊ देण्यास हरकत नाही.’ आधीच पेरणी झाली- मांस, मदिरा आणि मदिराक्षी यापासून दूर राहण्याची! मोहनने १८८७मध्ये वयाच्या अठराच्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर ही अशी प्रतिज्ञा घेतली. हे शिक्षाव्रत मोहनने निष्ठेने, निग्रहाने निभावले. संयमाचा हा जणू वस्तुपाठच होता!

पुढे बॅरिस्टर झाल्यानंतर आफ्रिकेतल्या वास्तव्यात म. गांधींनी दरबान शहरातून श्रीमद् राजचंद्र यांच्याशी मुंबई येथे १८९३ आणि १८९४ मध्ये आणि आणंद येथे १८९५ मध्ये वयाच्या ऐन पंचविशीत जो पत्रव्यवहार केला. त्याद्वारा त्यांनी श्रीमद् राजचंद्र अर्थात रायचंदभाई यांच्याकडून जैन तत्त्वज्ञानाची विशेष ओळख करून घेतली. या तपस्वी आध्यात्मिक गुरूंच्या प्रबोधनाचा म. गांधींच्या आचारविचारसरणीवर अधिक प्रभाव पडला. आफ्रिकेत असताना ब्रिटिशांच्या वर्णद्वेषी धोरणाविरुद्ध गांधीजींनी जो अहिंसक लढा दिला होता, तो सत्याच्या प्रतिष्ठेसाठी आणि मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी होता. अनुभवाची ही शिदोरी घेऊन गांधीजी १८९६ मध्ये भारतात परतले आणि पुढे यथाकाल त्यांनी भारतीय स्वांतत्र्यासाठी जी असहकार आणि कायदेभंग यांची चळवळ उभी केली, ती अहिंसा आणि सत्य या तत्त्वांच्या पायावर!

तीर्थंकर भगवान महावीर, महात्मा गौतम बुद्ध या महामानवांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी जगाला अहिंसेची जी शिकवण दिली होती, ती शिकवण केवळ भारतच नव्हे, तर दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने प्रेमाचा जो अहिंसामूलक संदेश पाश्चात्य देशांसह सर्व जगाला दिला होता, तो संदेश सर्व जग जणू विसरून गेले होते. साम्राज्य तृष्णा, संपत्तीची हाव या अतिरेकी दुराचारांना सगळे जग बळी पडले होते. एकाचे वर्चस्व दुसऱ्याला बघवत नव्हते आणि साहवतही नव्हते.

या घातक स्पर्धेतूनच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात दोन महायुद्धे झाली. पाच सहस्त्र वर्षांपूर्वी झालेल्या भारतीय युद्धाहून महाभयानक अशी ही जागतिक महायुद्धे होती. तिसऱ्या महायुद्धाची भेसूर भयानकता जगाला चिंताग्रस्त आणि भयग्रस्त करत असतानाच ‘अनेकान्त’ सरणीचा अवलंब करणाऱ्या परमत सहिष्णुतेतून महावीरांच्या अहिंसेचा संदेश जगाला पुन्हा नव्याने देण्यासाठी एक नवा महापुरुष गांधीजींच्या रूपाने जगापुढे आला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ज्या तत्त्वाचा जगाला विसर पडला होता, त्याची पुनश्च प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीच जणू एक महामानव या धरतीतलावर अवतरला. गांधीजींनी हे जीवित कार्य मानले. पूर्वेच्या क्षितिजावर जसा नवा सूर्योदयच झाला, जो पश्चिमेसह सगळ्याच दिशा उजळून टाकण्यास कारणीभूत ठरला. अंत्योदयास महाप्रेरक ठरला. भगवान महावीरांप्रमाणे सर्वत्र विहार व ‘दांडी’सारखी पदयात्रा करून त्यांचे संदेश गांधीजींनी देशभर व त्या प्रभावाने जगभर पोहोचवले.

अहिंसेचा महादिव्य प्रतिबोध देणाऱ्या तीर्थंकर महावीरांच्या जीवनातील अंतिम घटकेतल्या एका हृद्य प्रसंगाचे अशा वेळी स्मरण झाल्यावाचून राहत नाही. गर्भावतरण, जन्म, दीक्षा, केवलज्ञान म्हणजे सर्वज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण अर्थात मोक्ष या तीर्थंकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या घटना! त्यांच्या आयुष्याचे त्याचबरोबर इतरांच्या आयुष्याचे कल्याण करणाऱ्या असल्याने त्या ‘पंचकल्याणक’ म्हणून ओळखल्या जातात. महावीरांच्या निर्वाणाची घटका जवळ येत होती. ती अश्विन अमावास्येची रात्र होती. आता जगावर अंध:काराचे साम्राज्य पसरणार, या भीतीने देवराज शक्रंद्र देवगणांसह महावीर यांच्या चरणाशी आला आणि मोठ्या लीनतेने आणि तितक्याच उद्विग्नतेतून त्याने मनातली सल महावीरांजवळ बोलून दाखवली, “प्रभो, आपल्या गर्भप्रवेशाच्या, जन्माच्या, दीक्षेच्या आणि केवलज्ञानप्राप्तीच्या प्रसंगी हस्तोत्तरा नक्षत्र होते. या वेळी त्यात भस्मग्रहाचे संक्रमण होत आहे. या भस्मक योगावर आपले निर्वाण झाले तर दोन-अडीच हजार वर्षांपर्यंत आपण दिलेल्या प्रतिबोधाचा प्रभाव क्षीण होत जाईल. यात जगाचे अकल्याण आहे. यासाठी निर्वाणाची ही घटका टाळावी म्हणून आपण आयुर्बल स्थिर ठेवावे.”

शक्रंद्राची व्यथा ऐकून महावीर म्हणाले होते, “शक्रंद्रा, आयुष्य कधीच वाढवता येत नाही, अर्हन्त पुण्यप्रभावाने बलशाली असले तरी त्यांनाही आयुर्बल वाढवता येत नाही. तेव्हा कालप्रवाहात जे काही घडणार असेल त्याला कोण रोखू शकणार?” यावर बोलण्यासारखे शक्रंद्राजवळ काही उरले नव्हते. आश्विन अमावास्येला रात्रीच्या चार घडी शेष राहिल्या असताना भगवान महावीरांचे विदेह/ मगध क्षेत्रातल्या- बिहार राज्यातल्या ‘अपापा’ नगरीत महानिर्वाण झाले. ही पापविमुक्ता अपापा अर्थात मध्यम पावा नगरी ‘पावापुरी’ म्हणून ख्याती पावली.

देवराज शक्रंद्र देवगणांसह स्वर्गातून खाली उतरून धरतीवर महावीरांच्या अंत्यसमयी उपस्थित राहिला. या घटनेचा सांकेतिक अर्थ कोणी श्रेष्ठीवर असंख्य ग्रामजणांसह महावीरांच्या अंत्यकाळी उपस्थित राहिला, असा घेता येतो. महावीरांनी स्वत:चे निर्वाण नियम असण्याचा निर्वाळा या प्रसंगी दिला. त्यातून एक प्रखर सत्य ध्वनित झालेले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भगवान महावीरांनी जगाला अहिंसेची जी अनमोल शिकवण दिली होती, तिचा जगाला दोन अडीच हजार वर्षे विसर पडला होता. पण म. गांधीजींच्या उदयाने हा अंध:कार नाहीसा होऊन जग जागे झाले आणि या जागृतीतून अहिंसेचा नव्याने विचार सुरू लागले आहे. महावीरांच्या जीवनातील अंतिम घटना ही आख्यायिका किंवा किंवदंती नसून हे एक ऐतिहासिक सत्य आहे. हे कोणी अलीकडे लिहून ठेवले नसून दोन सहस्त्र वर्षांपूर्वीच्या संग्रहित आगमांत व दहाव्या शतकातील श्वेतांबर जैनाचार्य श्री. हेमचंद्र यांच्या ‘त्रिषष्टि शलाका पुरुष चरित्र’ या ग्रंथात हे विशद झालेले आहे.

जैन सिद्धान्ताप्रमाणे कालचक्राचे ‘उत्सर्पिणी’ आणि ‘अवसर्पिणी’ असे ‘उन्नती’चे आणि ‘अवनती’चे दोन अर्धांश असतात. हे नियत असते, अशी जैनधारणा आणि शास्त्रमान्यता आहे. पण कधी कधी सृष्टीचक्र अनियत होत असते. हे लक्षात घेऊन ‘तीर्थंकर वाणी’वर अधिक्षेपाचा उद्देश नसताना असे म्हणता येऊ शकते की, चालू ‘अवसर्पिणी’ काळात महावीर या चोवीसाव्या तीर्थंकरांनंतर त्यांच्या अहिंसा तत्त्वाचा विसर पडलेला, दोन-अडीच हजार वर्षांचा कालखंड संपून महात्मा गांधींनी अहिंसेला पुन्हा प्राणपणाने प्रतिष्ठा मिळवून दिली. या संदर्भाने आणि महत्कार्याने त्यांना ‘पंचविसावे तीर्थंकर’ म्हणता येते.

..................................................................................................................................................................

लेखक नानासाहेब गव्हाणे प्रादेशिक आणि जागतिक सिनेमाचे अभ्यासक आहेत

gavhanenanasahebcritics@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा