तरुण स्वतःचं भविष्य वयाच्या १६व्या वर्षीसुद्धा ठरवू शकत नाहीत, यासारखं दुसरं दुर्दैव काय?
पडघम - राज्यकारण
आदित्य देशमुख
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 09 June 2021
  • पडघम राज्यकारण शिक्षण व्यवस्था कोटा पद्धत कलचाचणी शिक्षक विद्यार्थी

हा लेख औरंगाबादमध्ये इयत्ता बारावी, विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा आहे. त्यामुळे त्यातील आक्रमकपणा किंवा थोडा एकांगीपणा यांकडे सुहानुभूतीने पाहायला हवे. त्याच्या भावना समजून घ्यायला हव्यात. हा संवेदनशील मुलगा आपल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल, तिच्या रचनेबद्दल, नियमांतल्या भोंगळपणाबद्दल बोलतो आहे. ते आपण नीट समजून घ्यायला हवे, ऐकायला हवे. कारण ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक भावना आहे...

..................................................................................................................................................................

काल सहज दहावीच्या परीक्षेपूर्वी होणाऱ्या कलचाचणीचा निकाल हातात आला. तो तेव्हा घरातल्या सगळ्यांनी पाहिला होता. त्यात माझा ९५ टक्के कल कला व वाणिज्य शाखेकडे असल्याचं सांगितलंय. तरीही आज मी विज्ञान शाखेत शिकतोय!

सहज म्हणून काही मित्रांना फोन लावले. त्यांच्या बाबतीतही असंच घडलंय. त्यातल्या ७० टक्के मुलांनी ‘आई-वडिलांची इच्छा’ म्हणून विज्ञान शाखा निवडलीय, १० टक्के मुलांनी स्वतःला आवडतं म्हणून आणि उर्वरित २० टक्के मुलांना शाखा निवडण्याचं कारणसुद्धा सांगता आलं नाही! आता यातले किती जण प्रत्यक्ष lecture करतात, हा वेगळा मुद्दा. त्याहून भयंकर म्हणजे ज्यांचे दहावीच्या निकालात विज्ञानाचे गुण ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मध्ये गणलेच गेले नाहीत, त्यांनीसुद्धा विज्ञान शाखा निवडलीय! का, तर टक्केवारी वरच्यासारखीच म्हणून. मग हा कलचाचणीचा अट्टाहास हवा कशाला? मग यांना विद्यार्थी म्हणायचं का परीक्षार्थी?

पालक या कलचाचणीला भाव देत नाहीत. महाविद्यालयेही प्रवेशाच्या वेळी त्याचा काडीचाही विचार न करता थोडी फी जास्त दिली, तर टक्केवारीसुद्धा न बघता प्रवेश देतात. मग कशाला उगाच शासनाचा अन विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवला जातो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एकंदरीतच काय तर तरुणाईचं करिअर आता आवड, क्षमता, संधी यावर अवलंबून न राहता पालकांची इच्छा, मान, मिळणारा पैसा अन ‘लोक काय म्हणतील?’ यावर अवलंबून राहिलेलं दिसतंय.

यामुळे विद्यार्थ्यांचं मजुरांमध्ये होणारं रूपांतर वाढत चाललंय. इच्छा नसताना नको त्या क्षेत्रात मुलांना ढकलणं, त्यातही ‘तुझं डोकं चालवू नको सांगितलंय तेवढं कर. कॉलेजला गेला नाहीस तरी चालेल, पण खासगी ट्युशनवाल्यांची घरदारं व्यवस्थित भर अन त्यानंतर कागदी शिक्षण घेऊन त्याच कागदाचे घोडे नाचवून एखाद्या ठिकाणी कायमची नोकरी अर्थात पर्मनंट जॉब नावाच्या फांदीवर घट्ट बसून सुरक्षित आयुष्य जग. शिवाय जर सरकारी नोकरी मिळाली तर होणाऱ्या बायकोच्या बापाला दोन-तीन लाखाला जास्त लुटता येईल’, ही आमची मानसिकता!

कधी बदलणार ही मानसिकता? बरं पुन्हा मराठी माणूस धंदा करत नाही, निर्णय घ्यायला घाबरतो, मराठी माणूस सगळीकडे कमी पडतो, असं म्हणणाऱ्यांची पोरं महाराष्ट्रात राहून ‘कोटा पॅटर्न’ शिकतात. म्हणजे यांना महाराष्ट्रातल्या शिक्षकांवरसुद्धा विश्वास नाही, मग यांना महाराष्ट्राबद्दल बोलायचा अधिकार दिला कुणी?

माझं तर स्पष्ट मत आहे की, ‘दर्जेदार शिक्षणाचा कोटा पॅटर्न आता आपल्या महाराष्ट्रात’ अशा जाहिराती करून पालकांना लुटणाऱ्यांना पोकळ बांबूंनी हाणलं पाहिजे. महाराष्ट्रातलं शिक्षण अन शिक्षक विद्यार्थी घडवूच शकत नाहीत का? आणि जर शिक्षण व्यवस्था कमी पडतेय, तर ती बदलणार कोण? त्याविषयी तुम्ही बोलणार कधी?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तरुण स्वतःचं भविष्य वयाच्या १६व्या वर्षीसुद्धा ठरवू शकत नाहीत, यासारखं दुसरं दुर्दैव काय असणार?

मुळात पालकांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जास्त फी अन भव्य इमारत म्हणजे चांगलं शिक्षण ही संकल्पना डोक्यातून काढून टाकायला हवी. तुमच्या मुलाला जगण्यासाठी व्यावहारिक ज्ञान हवं असतं. ‘दूध कोण देतं?’ हा प्रश्न विचारल्यानंतर ‘दूधवाला भैय्या दूध देतो’ असं उत्तर देणाऱ्या आपल्या मुलांना पावशेर अन पाऊण किलोमधला फरक कळत नाही. मराठीतले ‘७५’ म्हणजे नेमके किती हा यक्षप्रश्न उभा राहतो त्यांच्यासमोर. चुकून एखाद्यानं मराठीत मोबाईल नंबर सांगितला, तर हीच स्मार्ट मुलं भूत बघितल्यासारखी बघतात. इंग्रजी हे तुम्हाला जगाशी जोडणारं माध्यम आहे, पण तुमचं सर्वस्व तिला का देताय?

महाराष्ट्रात राहून मराठी शाळा बंद करणाऱ्यांनाही धरून हाणलंच पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पोरांना ढोरं बनवून कोंडवाड्यात टाकू नका. त्यांना करिअर निवडताना मार्गदर्शन करा. पण तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. शासनाने कलचाचणीच स्वरूप बदलावं. दहावीची परीक्षा जेवढी कडक घेता, तेवढीच ही चाचणीसुद्धा घ्या. तिच्या माध्यमातून कल लक्षात आल्यावर आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी शारीरिक व मानसिक चाचणी घ्या. नसेल तर त्यासाठी अभ्यासक्रम ठरवा. प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थानं आदर्श नागरिक तयार करा. तीन महिन्यांच्या ‘Summer vacation Class’ नावाच्या पिंजऱ्यात कोंडण्यापेक्षा हे जास्त उपयोगी ठरेल.

आणि महत्त्वाचं म्हणजे कलचाचणीचे ६० टक्के अन लेखी परीक्षेचे ४० टक्के गुण, यावर महाविद्यालयांना प्रवेश द्यायचे आदेश काढावेत. तिथून पुढची तीन वर्षे कौशल्यभिमुख शिक्षण द्या. रोजगाराच्या संधी निर्माण करा. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा.

मग वेगळा असा ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडवण्याची गरजच भासणार नाही आणि भारताला खरीखुरी ‘महासत्ता’ व्हायलाही वेळ लागणार नाही!

..................................................................................................................................................................

लेखक आदित्य अशोकराव देशमुख औरंबादच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये शिकत आहेत.

rjadityadeshmukh@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा