सॅम माणेकशॉ यांच्यापासून अदर पूनावाला यांच्यापर्यंत… भारतातील बुद्धिमान आणि कर्तृत्ववान पारश्यांचा धावता आढावा…
पडघम - सांस्कृतिक
सतीश बेंडीगिरी
  • अदर पुनावाला, सॅम माणेकशॉ, होमी भाभा, नानी पालखीवाला, जमशेटजी टाटा, पॉली उमरीगर, बोमन इराणी आणि सोली सोराबजी
  • Tue , 01 June 2021
  • पडघम सांस्कृतिक अदर पुनावाला Adar Poonawalla सॅम माणेकशॉ Sam Manekshaw होमी भाभा Homi J. Bhabha नानी पालखीवाला Nani Palkhivala जमशेटजी टाटा Jamsetji Tata पॉली उमरीगर Polly Umrigar बोमन इराणी Boman Irani सोली सोराबजी Soli Sorabjee

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड-१९च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांमध्ये सातत्याने घेतले जात होते, आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील एका व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदर पूनावाला.

२०१४च्या जनगणनेनुसार भारतात पारशी समुदायाची संख्या साधारण ६९००० एवढी होती. हा समुदाय मूलत: शांतताप्रेमी, अहिंसक आहे. या अशा छोट्या समुदायाने भारतीय अर्थव्यवस्थेला आणि उद्योगाला मोठे योगदान दिले आहे.

१९७१च्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम करून ९०,००० सैनिकांना बंदिस्त करणाऱ्या आणि बांगलादेश या नवीन राष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय सैनिकांची कमान जनरल सॅम माणेकशॉ यांच्याकडे होती. नंतर त्यांना संरक्षण दलातील ‘फिल्ड मार्शल’ या सर्वोच्च किताबाने गौरवण्यात आले.

गुजरातमधील नवसारी या छोट्याशा गावात जन्मलेल्या जमशेटजी टाटांचे कुटुंब कजार सत्ताधाऱ्यांच्या छळामुळे इराण सोडून भारतात स्थायिक झाले. त्यानंतर जमशेटजी यांनी ‘टाटा’ या अग्रणी उद्योग समूहाची स्थापना केली. आज हा भारतातला सर्वांत मोठा उद्योगसमूह आहे. नेहरू त्यांना ‘वन-मॅन प्लॅनिंग कमिशन’ असे म्हणत.

भारतात अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करणाऱ्या होमी भाभा यांचे योगदान कसे विसरता येईल?

१९६५च्या भारत-पाक युद्धात पूना हॉर्स रेजिमेंटचे नेतृत्व करणारे कर्नल ए.बी. तारापोर यांनी सियालकोटमध्ये शत्रूवर जबरदस्त चाल करत, स्वतःच्या रणगाड्यावर गोळ्या बरसत असतानासुद्धा पाकिस्तानचे तब्बल ६५ रणगाडे नष्ट केले.

‘परम विशिष्ट सेवा’ पदक मिळवणारे एअर स्टाफ प्रमुख फली होमी मेजर यांनी ६५७७ फ्लाइंग अवर्सचा अनुभव घेत सियाचीन या जगातील सर्वांत उंच क्षेत्रात अनेक धोकादायक मोहिमेचे नेतृत्व केले आहे.

व्हाईस ॲडमिरल रुस्तम गांधी यांनी भारताने आतापर्यंत युद्ध केलेल्या सर्व युद्धामध्ये लढाऊ जहाजांचे नेतृत्व केले आहे.

प्रख्यात बॅरिस्टर आणि कर-कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या नानी पालखीवाला यांना ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ मानले जात असे.

सरोश होमी कपाडिया यांनी भारताचे ३८वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.

सोली सोराबजी हे भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आणि मानवाधिकारांचे प्रबळ प्रवर्तक होते.

अर्देशिर गोदरेज यांचे ‘गोदरेज’ कपाट घराघरांत असायचे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

विख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्राप्त केकी बायरामजी ग्रँट यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय मान्यताप्राप्त ‘रूबी हॉल क्लिनिक’ची स्थापना केली.

बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी थर्मेक्सची धुरा अनु आगा आणि त्यांची कन्या मेहर पदमजी समर्थपणे पेलत आहेत.

सायरस पूनावाला यांचे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ पोलिओचे सर्व समाजातील मुलांना उपलब्ध करून देते.

पहिला बोलपट ‘आलम आरा’चे निर्देशक अर्देशीर इराणीपासून आताचे सिनेकलावंत डेझी इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कलेचे योगदान दिले आहे.

क्रिकेटमध्ये पॉली उमरीगर यांचा विक्रम सुनील गावस्कर येईपर्यंत अखंडित होता. नरी कॉन्ट्रॅक्टर, फारोख इंजिनिअर आणि डायना एडुल्जी हेदेखील भारतीय क्रिकेटमधील चमकते तारे. फारोख इंजिनिअरनंतर २७ वर्षांनी अर्झान नागवसवाला या नावाच्या खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

या सर्व व्यक्ती भारतात सर्वांत अल्पसंख्याक असणाऱ्या पारशी समुदायातील आहेत.

‘पारसी’ (पहिल्या मोठ्या स्थलांतरानंतर भारतात स्थायिक झालेले झोरोस्ट्रियन लोक) हा दान व परोपकारासाठी समानार्थ शब्द बनला आहे. झोरोस्ट्रियन धर्माची पवित्र गाथा ‘यास्ना’ हिंदू धर्माप्रमाणेच  सहिष्णुता, प्रेम आणि सार्वभौम बंधुता याचा उपदेश करते. ही धार्मिकता चांगले शब्द, चांगले विचार आणि चांगली कर्मे करायचे, असे सांगून अंतःकरणाच्या शुद्धीकरणाशिवाय काहीही नसते, असे सांगते.

भारतीय घटनेनुसार अल्पसंख्याक दर्जाचा दावा पारशी समुदायाने कधीही केला नाही. उलट जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा या छोट्या समुदायाचे नेते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे गेले आणि त्यांनी अशी मागणी केली की, त्यांची केवळ १,००,००० एवढीच अल्प लोकसंख्या असूनही त्यांना ‘अल्पसंख्याक’ दर्जा दिला जाऊ नये. आता तर ही संख्या घटून ६९०००पेक्षा कमी झाली आहे. अशा प्रकारे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता वाखाणण्याजोगीच आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘झरतुष्ट्र’ (किंवा झोरोस्टर, म्हणजे शहाणा माणूस) किंवा ‘लाफिंग प्रॉफेट’ म्हणून ओळखले जाणारे पारश्यांचे संत इ.स.पू. ६५०च्या सुमारास इराणमध्ये राहत होते. पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि सूर्य या पाच मूलभूत तत्त्वांद्वारे आपण ईश्वराचे अस्तित्व पाहू शकतो आणि त्याची प्रचिती घेण्याकरता मानवी मनासारखे अपूर्व माध्यम दुसरे नाही, असे सांगतानाच त्यांनी इतर धर्मियांच्या सहनशीलतेचा आणि सत्याचा बौद्धिक शोध घेण्याला प्रोत्साहन दिले.

अग्निपूजा करणारे त्यांचे अनुयायी ‘झोरोस्टेरियन’ म्हणून ओळखले जातात. इस्लामिक हल्लेखोरांच्या हातून छळ आणि जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतर, यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांना इराणमधून  पळ काढावा लागला. पहिल्यांदा ते गुजरातमध्ये आले आणि ते ‘पारसी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. काही शतकानंतर जो दुसरा स्थलांतरितांचा मोठा जत्था आला, त्यांना ‘इराणी’ म्हणून ओळख मिळाली.

भारतात येताना ते आपला पवित्र अग्नि घेऊन आले आणि त्यांनी भारताला आपलेसे केले. पारसी मंदिरांमध्ये पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि सूर्य असे पाच घटक असतात. त्यांची सूर्याकडे तोंड करून प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. सौराष्ट्रातील दीव बंदरावर उतरल्यानंतर जादव राणा या तिथल्या राजाकडे ते जेव्हा आश्रय मागायला गेले, तेव्हा त्याने काही अटी घातल्या - १) त्यांची भारता (किंवा हिंदुस्थाना)वर निष्ठा असेल. २) ते त्यांचा धर्म पसरवणार नाहीत किंवा लोकांचे धर्मांतर करणार नाहीत. ३) नवजोत सोहळा (पारशी मुलांचे मौंजीबंधन) आणि मृत्यूच्या वेळी होणारी विधी वगळता ते सर्व हिंदू विधी स्वीकारतील.

या धर्मात उच्च स्तरावरील अध्यात्म आहे, त्याचा खरा अर्थ समजणे कठीण आहे. इराणमध्ये  इस्लामच्या बरोबरीने तो अस्तित्वात राहणे शक्य नव्हते, कारण या दोन्ही धर्माच्या विचारसरणीत मूलभूत फरक  आहे. पारशांचा ‘अग्नि-उपासक’ म्हणून गैरसमज करून घेतला जातो, परंतु त्यांची अग्नी, पाणी, पृथ्वी, वायू आणि सूर्य या पाच मूलभूत तत्त्वाद्वारेच देवाचे प्रतिनिधित्व केले जाते, अशी धारणा आहे. म्हणून झोरोस्टेरिनिझम ही एक सतत चालू असणारी प्रार्थना आहे. ती जन्मापासूनच सुरू होते आणि मृत्यूनंतर संपते. ईश्वराशी सतत संवाद चालू राहावा, जो मनुष्याच्या दयाळू कृतीच्या आधारे अनुभवला जावा, असे ते मानतात.

हा जगातील सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक आहे, परंतु त्यांचे बरेचसे ग्रंथ इस्लामच्या हल्ल्यात नाश पावले.   जे टिकले ते ‘चिश्ती’ (तत्त्वज्ञान) आणि ‘दीन’ (अनुष्ठान)मध्ये विभागले गेले आहेत. ‘गाथा’ या ग्रंथात    तत्वज्ञान, तर ‘दीन’मध्ये जे श्लोक आहेत, त्यांना ‘वंदीदाद’ असे नाव आहे. त्यामध्ये ‘मनाची आणि शरीराची शुद्धता’ मिळवण्याच्या आकांक्षाविषयी लिहिलेले असून चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्मे (हुमाता, कुक्त आणि हुवरास्था) याद्वारे व्यक्ती शुद्धता कशी मिळवू शकते, हे स्पष्ट केलेले आहे.

थोर विद्वान, संत दस्तूर मेहरजी राणा आणि संत दस्तूर नरियोसांग धवल यांनी आध्यात्मिक शहाणपण आणि त्याद्वारे ईश्वराचा आशीर्वाद कसा प्राप्त करायचा, याचे पाठ घालून दिलेले आहेत. दस्तूर सोरबजी कुकादारू यांनी अंधश्रद्धेतून मनुष्याच्या मुक्तीचा उपदेश केला आणि वैयक्तिक उदाहरणांद्वारे माणसाला समाजात इतरांना प्रश्न विचारण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारण्यास सांगून मानवी चेतनेची पातळी कशी वाढवावी, याचा उपदेश केला. त्यांनी सहिष्णुता, मानवजातीबद्दल आदर आणि मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, याचे समर्थन केले.

शतकानुशतके कमी लोकसंख्या आणि समुदायाबाहेर रोटीबेटी व्यवहार नसल्याने त्यांच्या जनुकात  असा फेरबदल झाला आहे की, पारशी व्यक्ती काही वेळेला अगदी टोकाच्या भूमिका घेतात (रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री). परंतु याच वेळी त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेसह येणारा विलक्षण दयाळूपणा आणि सर्वसमावेशक अशी मानसिकता. पण मात्र त्यांचे धर्मगुरू (ज्यांना ‘दस्तूर’ असे म्हणतात) अंतर्मुख होऊन अति-पुराणमतवादी झाल्याचे आढळते. प्राचीन काळातला ‘झोरोस्ट्रिअन’ धर्मच गौरवशाली आहे, असा विश्वास ठेवून ते वस्तुस्थिती स्वीकारण्यात मागे पडतात.

उदाहरण द्यायचे झाल्यास रुमी आणि खोरशेद भावनगरी यांचे द्यावे लागेल. त्यांनी अध्यात्माचा ध्यास घेऊन आत्म्याचे एक वेगळे जग (astral universe) अस्तित्वात आहे, असे मानले. या अशा जगात मार्गदर्शक आणि गुरू आहेत जे ‘ट्विलाईट झोन’ (Twilight zone)मध्ये राहतात आणि पृथ्वीवरील व्यक्तीशी संपर्क ठेवतात. (संदर्भ : The Laws of the Spirit World – Jaico Publication).

धर्मातील तत्त्वज्ञान बाजूला ठेवून कर्मकांड मानणाऱ्या दस्तूर यांना आता कळले आहे की, काही विधी अगदी पुरातन आहेत आणि आता त्यांची वैधता संपली आहे. फक्त आपल्याच समुदायात लग्न करणे वगैरे  कायद्यामुळे आपण डायनासोरप्रमाणे इतिहासात जमा होऊ आणि आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा गमावू, हेही त्यांना उमजले आहे. म्हणून आता ते बदलत आहेत. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये गिधाडांना खाण्यासाठी मृतदेह ठेवणे, समुदायाबाहेर विवाहाला परवानगी नसणे, अशा रूढींचा हळूहळू त्याग करण्यात येत आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पारश्यांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकारने २०१३मध्ये ‘जियो पारसी’ ही योजना सुरू केली. ऑक्टोबर २०१९पर्यंत या योजनेंतर्गत जन्मलेल्या मुलांची संख्या २१४ आहे. या समाजात जन्मदराच्या तुलनेत मृत्यदर जास्त आहे. कमी होत जाणारी पारशी लोकसंख्या चिंताजनक आहे. येत्या काही दशकांत ते नामशेष  होतील. ज्या समुदायाने भारताला आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी खूप योगदान दिले आहे, त्यांना इतिहासजमा होण्यापासून वाचवले पाहिजे.

भारतीय अर्थव्यवस्थेतून टाटा आणि शापूरजी पालनजी उद्योगसमूह वजा केले, तर भारताची आर्थिक स्थिती पाकिस्तानच्या वाटेवर जाईल. मोदी सरकारने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९’ केला आहे. त्याचा फायदा घेऊन शेजारील देशांत म्हणजेच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे पारशी बांधव आहेत, त्यांनी इथे येऊन भारताचे नागरिक बनावे आणि स्वतःच्या समुदायाला नष्ट होण्यापासून वाचवावे.

याच पारशी समाजातील अदर पुनावाला ‘कोविशील्ड’ या करोनावरील लसीचे उत्पादन करून देशातील नागरिकांचे प्राण वाचवत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा