अवघ्या २४व्या वर्षी पठ्ठ्याने पॅनल उभा केला व निवडूनही आणला...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
चेतन राजेंद्र राक्षे
  • मोहन अरुण बाणचं निवडून आलेलं ग्रामपंचायतीचं पॅनेल
  • Tue , 02 February 2021
  • पडघम कोमविप मोहन अरुण बाण Mohan Arun Ban ग्रामपंचायत Gram Panchayat

ही गोष्ट आहे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या, परतुर तालुक्यातल्या बाणाची वाडी या गावातल्या मोहन अरुण बाण या तरुणाची. त्याच्या घरातील कोणीही राजकारणात नाही. जेमतेम चार एकर शेत. घरातील सर्व माणसं घरची शेती व शेतमजुरी करून स्वतःचा गाडा हाकतात. तब्बल चार वर्षांपूर्वी मोहनने स्वतःचं हॉटेल चालू केलं. त्याचाही कसलीही पूर्वानुभव नव्हता, तरीही त्याने त्यात यश मिळवलं. आज आष्टी येथील सर्वांत प्रसिद्ध हॉटेल, अशी त्याची ओळख आहे.

तसा मोहन त्याच्या धंद्यात आणि कौटुंबिक कारभारात खुश होता, पण गावातील परिस्थिती आणि विविध प्रश्न पाहून त्याचं मन चलबिचल व्हायचं. ज्या वेळेस गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र बसून गावातील समस्यांवर चर्चा करायचे, त्या वेळेस असं जाणवायचं की, या समस्या छोट्या आहेत, परंतु गावातील पुढारी मंडळींकडे राजकीय शक्ती असतानाही या समस्या सोडवण्याची त्यांची इच्छाशक्ती मात्र दिसून येत नाही.

मोहनचा पहिल्यापासून सामाजिक कार्यात सहभाग होता. गावातील स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा छोटे-मोठ्ठे उत्सव असतील, त्याच्या पुढाकाराने सर्व उत्सव जोमात साजरे होतात. या वेळी मतदानाच्या दोन महिने आधी मोहनने राजकीय क्षेत्रात यावे व गावातील खूप दिवसांपासून असलेल्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी गावातील बहुतांश वृद्ध व तरुणांची  इच्छा होती.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

खरं तर आम्ही तरुणांनी या वर्षी बदल घडवायचा हे मनात पक्कं ठरवलं होतं. त्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून करत होतो. पण विरुद्ध बाजूने असलेला प्रचंड अनुभव आणि आम्ही नुकतीच ओठावर मिश्या फुटलेली तरुणीबांड पोरं, असा विसंगत सामना होता! पण आमच्यासासोबत गावातील सामान्य माणूस उभा होता, कारण त्यालाही बदल हवा होता. तयारीचा भाग म्हणून आम्ही निवडणूक यादीची चाळणी, उमेदवाराची निवड, निवडणूक अजेंडा या गोष्टी आमच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मांडल्या आणि सर्वानुमते त्याला होकारही दिला...

खरी लढाई

निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा घोषित झाल्या आणि आमची कसरत सुरू झाली. अनुभवाची कमतरता असल्यामुळे आमच्या मनामध्ये भीती असायची, पण जेव्हा सामान्य माणसांनी दिलेला साथीचा हात आठवायचा, तेव्हा वाटायचं नाही, यंदा बदल होणार!

निवडणूक अर्ज भरण्यासाठी कागदाची जमवाजमव करताना मात्र नाकीनऊ आले. ही पायरी पार केल्यानंतर प्रचार करायचा होता. आजपर्यंत फक्त थियरी बेस अभ्यास होता, मात्र आता प्रॅक्टिकल मैदानात उतरून, प्रचार करून लोकांना आमची उद्दिष्टं, अजेंडा कसा चांगला वाटेल, हे पटवून सांगायचं होतं. आम्ही प्रचार व्यक्तीनुसार, गटानुसार केला म्हणजे, ज्या वेळेस महिलांकडे मत मागण्यासाठी गेलो, तेव्हा महिलांचे प्रश्न काय आहेत, ते मांडले. तरुणांकडे गेलो तेव्हा तरुणाईचे प्रश्न मांडले. याचा फायदा असा झाला की, सर्वांची साथ व विश्वास मिळू लागला. गावात आजवर निवडणुकीसाठी कधीही प्रचारसभा घेतली गेली नव्हती, ती आम्ही छोटेखानी का होईना पण घेतली, लोकांना विश्वासात घेतलं... हे सर्व चालू असताना आम्ही आडवाआडवी व जिरवाजिरवीचं राजकारण केलं नाही, प्रचार करतानाही शब्द मोजूनमापूनच वापरले!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शेवटी प्रचार संपला आणि मतदानाचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी एकही कार्यकर्ता नीट झोपला नव्हता. सकाळी-सकाळी सर्व कार्यकर्ते मतदान केंद्रापाशी जमा झाले. प्रमुख कार्यकर्त्यांनी अगोदर मतदान करून घेतलं आणि ते केंद्रावर येऊन बसले. येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतपत्रिका देऊन चिन्हं परत एकदा समजावून सांगण्याचे काम चालू होते. 

मतदान केंद्र एक प्रकारचं हॉटस्पॉट ठरलं होतं. सकाळपासून एकाही कार्यकर्त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. हे सर्व कशासाठी तर फक्त बदल, विकास यासाठी. मोहनसारखा तरुण चेहराच गावाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो, यासाठी कार्यकर्ते शर्तीला पेटले होते.

अखेर मतदान पार पडलं. सगळे कार्यकर्ते घरी गेले. गेल्या आठ दिवसांपासून झोप मिळाली नव्हती, आराम मिळाला नव्हता, तो घेण्यासाठी सर्व जण आतुर झाले होते. गावातलं वातावरण एकदम शांत झालं होतं! गेल्या पंधरा दिवसांत ज्या चर्चा पारावर तावातावानं व्हायच्या, त्या आता दिसत नव्हत्या. एरवी दोन माणसं एकत्र बसून बोलायला लागली तरी त्यांच्याकडे संशयी नजरेनं पाहिलं जायचं...

निकालाची आतुरता

मतदानानंतरच्या तिसऱ्या दिवशी निकाल होता. दोन दिवसांपासून चाललेले तर्कवितर्क आज संपणार  होते. पहिल्यापासूनच मोहनची बाजू भरभक्कम दिसत होती, पण तरीही शेवटचा निकाल लागेपर्यंत काहीच सांगता येत नव्हतं. कारण लोकांनी कोणाला मत दिलंय हे फक्त त्यांनाच माहीत होतं. सकाळी १० वाजल्यापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची फौज मतदान मोजणी केंद्राबाहेर येऊन उभा ठाकली. गावातील इतर लोकही त्यांचा निकाल पाहण्यासाठी आले होते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

मतमोजणी केंद्राला जत्रेचं रूप आलं होतं. आमचा नंबर सातव्या फेरीत होता. जसजशी फेरी जवळ येत होती, तसतशी आमची धडधड वाढू लागली. सर्व हितचिंतक, गावातील मित्रमंडळी यांचे फोन चालू होते. अशातच मतमोजणी अधिकाऱ्याने आमच्या गावाचं नाव पुकारलं. फक्त उमेदवारांना आतमध्ये प्रवेश होता. दोन्ही बाजूचे उमेदवार आत गेले आणि कार्यकर्ते बाहेर वाट बघत बसले. प्रत्येक सेकंद तासासारखा वाटत होता, फोनही चालूच होते. तेवढ्यात अचानक मोहन बाहेर आला. सगळ्याच्या नजरा त्याच्याकडे लागल्या. आमच्या या वाघानं हात वर केला आणि सगळ्यांना मॅसेज पास झाला! आमचं पॅनेल जिंकलं होतं. प्रत्येक कार्यकर्ता नाचू लागला, सगळ्यांना फोन करून सांगू लागला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

फोन उचलल्यावर एकच वाक्य असायचं - ‘९ पैकी ९...’ म्हणजे आमचे सर्व उमेदवार निवडून आले होते. आमच्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा विजय एका तरण्याबांड पोरानं खेचून आणला...

विजयी जल्लोष

सर्व कार्यकर्ते आनंदाने नाचत होते. बघता बघता ही बातमी गावात व अख्ख्या तालुक्यात पसरली. एका बातमीचं शीर्षक असं होतं - ‘मोहन बाण याने नऊपैकी नऊ निवडून आणले!’ मोहनने ‘हा विजय माझा नसून माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे’ हे घोषित केलं!  विजयी भाषणात कसल्याही प्रकारचा गर्विष्ठपणा न बाळगता ‘विजयी व पराभूत उमेदवार आपलेच आहेत. निवडणुकीला निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवू आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून हातभार लावू,’ हा ग्रंथ आमच्या पठ्ठ्यानं तिथं वाचला.

एका नवीन पर्वाला सुरुवात झाली...

..................................................................................................................................................................

लेखक चेतन राजेंद्र राक्षे विधी महाविद्यालयामध्ये शिकत आहेत.

chetan.rakshe5@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा