जर नागपूरसारख्या शहरात, शिकलेल्या कुटुंबात आणि उच्च जातीत जन्माला येऊन हे माझ्या वाट्याला येत असेल तर...
पडघम - सांस्कृतिक
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • लेखिकेचं छायाचित्र
  • Thu , 31 December 2020
  • पडघम सांस्कृतिक आंतरजातीय लग्न Inter-caste marriage सैराट Sairat आंतरधर्मीय लग्न Interfaith marriage देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण Deshastha Rigvedi Brahmin तिरळे कुणबी Tirale Kunabi हिंदू Hindu जात Caste धर्म Religion

‘सैराट’ या सिनेमाचा शेवट अनेक प्रकारे प्रतीकात्मक आहे. आंतरजातीय लग्न करणार्‍या परश्या-आर्चीला त्यात जिवानिशी मारलं जातं आणि त्यांचं मूल रडत घराबाहेर येतं, असं त्यात दाखवलं आहे. त्या मुलाचं पुढे काय होतं, हेही नागराज मंजुळेंनी दाखवायला हवं होतं, कारण आंतरजातीय लग्नाचा त्रास त्या जोडप्यांच्या मुलांनाच जास्त होतो.

‘जात नाही ती जात’ असा विचार करणार्‍यांना मी ‘जात’ वापरत नाही, ही गोष्ट पचत नाही. मा‍झ्या कुठल्याही प्रमाणपत्रात जातीचा उल्लेख नाही, केवळ धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ व राष्ट्रीयत्वाच्या रकान्यात ‘भारतीय’ असं नमूद केलेलं आहे.

याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आई देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून वडलांची जात तिरळे कुणबी आहे. त्याने असा काय विशेष फरक पडतोय असं बहुतेकांना वाटेल, पण ज्या समाजात जातीवरून आयुष्याची गणितं (ज्यात सामाजिक ओळख, शिक्षण, नोकरी व आयुष्याचा जोडीदार) ठरतात, तिथं जात कागदावर न आल्याने मा‍झ्या संपूर्ण अस्तित्वावर असंख्य वेळा प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आहे.

आई-वडलांची सरकारी नोकरी असल्याने माझं बालपण आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे गेलं. मी फक्त रात्री झोपायला घरी जायचे. त्यामुळे मा‍झ्या व्यक्तिमत्त्वावर आजी व मामा यांचा प्रचंड प्रभाव आहे. ब्राह्मणी संस्कारात राहूनही मा‍झ्यात वेगळेपण टिकून राहिलं, याचं कारण माझी आजी. तिचं नाव ‘गया’ होतं, हेसुद्धा अनेकांना झेपत नाही. आजीने कधी कुणाचाही द्वेष केला नाही आणि मलाही शिकवला नाही, उलट महात्मा गांधींना लहानपणी बघितल्याचं तिला कौतुक होतं! मामासुद्धा कधीही संघाच्या शाखेत गेले नाहीत. त्यांचे सगळ्या जातीचे मित्र होते, आहेत. आणखी एका मामाचाही आंतरजातीय विवाह आहे. आजीने मुला-मुलींना अशा पद्धतीने लग्न केली म्हणून दूर केलं नाही, उलट सगळ्या नातवंडांमध्ये मी तिची सर्वांत लाडकी होते.

मामांच्या शिवराळ भाषेवरून ते चुकूनसुद्धा ब्राह्मण वाटत नसत. माझं पदव्युत्तर शिक्षण नागपुरात झालं. बडकस चौक, संघ इमारत व महाल (भोसलेंचा महाल) या परिसरात बालपण गेलं. त्यामुळे अठरापगड जातीचे लोक आजूबाजूला होते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आईला आंतरजातीय विवाह असूनही सासुरवास झाला नाही. वडलांकडच्या लोकांनासुद्धा माझं तेवढंच कौतुक आहे. किंबहुना दोन्ही बाजूच्या बहीण-भावंडांमध्ये रूढार्थानं मी यशस्वी आहे. एवढं सगळं असताना माझं दु:ख काय?

लहानपणापासूनच मी आजूबाजूला वावरणार्‍या लोकांसारखी नाही (पूर्ण ब्राह्मण किंवा पूर्ण कुणबी) हे कळायला कठीण जायचं. वाढत्या वयात आपली ओळख विकसित होत असताना अन्नाचा खूप मोठा वाटा असतो. बहुजन समाज बहुतेक करून मांसाहारी आहे, मात्र मी शाकाहारी घरात वाढल्याने (महानुभावपंथी असल्याने वडलांकडूनही शाकाहारी) मी शाकाहार पसंत करते. मात्र मोठी झाल्यावर त्यावरूसुद्धा मला टोमणे ऐकावे लागले, लागतात. त्याचा सूर आई ब्राह्मण आहे, असाच असतो; वडलांकडेही शाकाहारच आहे, याचा कुणी विचारही करत नाही.

बाह्य रंग व रूप ही जात ओळखायची पहिली पायरी, मात्र दिसायला अगदीच बंगाली धाटणीची (विशेष करून डोळे) आहे. त्यामुळे मी ब्राह्मण वा कुणबी दिसत नाही. त्यामुळे मा‍झ्या अस्तित्वावरचं ‘प्रश्नचिन्ह’ आणखी गडद होतं. त्यातही माझा रंग सावळा असल्याने आई, बाबा, मामा व आजी हे लोक वगळता शेजारी, शाळा, नातेवाईक व ऑफिस या सगळ्या ठिकाणी दुय्यम वागणूक मिळाली. गुण व मेहनत असूनही पाहिजे तसं यश कधी मिळालं नाही.

यामागचं आणखी एक कारण असं की, मी कुठल्याही एका जातीच्या लोकांसोबत राहिले नाही. त्यामुळे जातीची मंडळं, सोशल मीडिया ग्रुप, जातीची संमेलनं असल्या कशातही नसल्याने मला आई/वडलांच्या जातीचा आर्थिक-सामाजिक फायदा झाला नाही. ओबीसी असूनही चांगल्या गुणांमुळे खुल्या प्रवर्गामधूनच शिक्षण पूर्ण केलं.

माझी ओळख प्रामुख्याने शाळा, कॉलेज व नंतर ऑफिस अशा गोष्टींमुळे आहे. त्यामुळे अनेक वेळा अगदी साधारण लोकांना ‘जातीच्या सानिध्यात’ राहिल्याने आपल्यापेक्षा जास्त यश मिळालेलं बघून त्रास होतो. आई-वडलांनासुद्धा त्यांचा स्वत:च्या जातीचा फायदा व्हायचा. त्यामुळे जातीमुळे मिळणारी ओळख किती महत्त्वाची आहे, हे मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रकर्षानं जाणवतं. कुठूनही पूर्णपणे न स्वीकारलं जाण्याच्या भावनेनं मा‍झ्यात एक परिपूर्ण होण्याची धडपड सुरू झाली, ती अजूनही आहे. काही गोष्टी निसर्गानेच दिल्यात. उदा. नृत्यकला, ऊर्जा, तब्येत व बर्‍याच इतर गोष्टी, तर भाषा, शिस्त, अभ्यास, नियोजनबद्धता या गोष्टी मी स्वत: विकसित केल्या. त्यामुळे जातीचा पाठिंबा नसल्याने थोडं का होईना यश मिळू शकलं. इतरांप्रमाणे जातीची नाळ काही माझ्यासाठी उपयोगाची ठरली नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अगदी शाळेत असतानासुद्धा मोजक्या ब्राह्मण शिक्षकांनी केलेला दुजाभाव, त्रास याची आठवण अजूनही जात नाही. काही गोष्टींचे ओरखडे अजूनही राहिलेत, तर काही ब्राह्मण शिक्षकांचं शिकवणं नेहमीच स्मरणात राहील.

साधारण आई-वडीलसुद्धा आपलं मूल त्यांच्यासारखं दिसावं, असावं यासाठी धडपडतात, मग आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहातून जन्माला येणार्‍या मुलांवर ‘स्वत:ची ओळख’ कशी विकसित करावी, याचं किती दडपण येत असेल याची कल्पना करा. कारण दोन्ही बाजूचे लोक व आई-वडीलसुद्धा मूल आपल्या जातीप्रमाणे असावं असा प्रयत्न करतात. असे विवाह यशस्वी होऊ नयेत, यासाठी समाज सतत प्रयत्न करतो. कारण अशा विवाहातून जन्माला आलेली मुलं जर यशस्वी झाली तर जाती-व्यवस्था टिकणार नाही, हे त्यांना माहीत असल्याने समाज अशा मुला-मुलींना स्वीकारत नाही. (बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर एक ‘हायब्रिड’ जगाच्या महासत्तेच्या सर्वोच्च पदावर आला, हे मा‍झ्या वडलांनी मोठ्या आनंदानं मला सांगितलं होतं!)

आपला समाज अशा मुला-मुलींना सतत अपराधीपणा व कमीपणाची भावना कशी येईल व राहील याची काळजी घेतो. मी भेटलेल्या व ऐकून असलेल्या सर्व ‘हायब्रिड’ लोकांमध्ये mutant प्रमाणे विशेष गोष्टी असतात (त्याला अपवाददेखील आहेत). ‘हायब्रिड’ हा शब्द हिणवण्यासाठी वापरतात. मी तो अनेक वेळा सहन केला आहे. माझे अनेक ब्राह्मण नातेवाईक मी त्यांच्यातील नसल्याने ओळख दाखवत नाहीत किंवा अंतर ठेवून वागतात. त्यांच्यापैकी किती अनेकांच्या मुला-मुलींनी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत तरीही.

लग्न झालेल्या जोडप्यांतले मतभेद मा‍झ्या आई-वडलांमध्येही होते, परंतु त्यात त्यांनी कधी आपल्या जातीचा वापर नुकसान करून घेतलं नाही. पण मतभेद बहुतेक आंतरजातीय/धर्मीय जोडप्यांत होतात तेव्हा समाजाला बोलण्याची संधी मिळते की- जातीतच लग्न करा. Compatibility काही जातीवर अवलंबून नाही, अन्यथा जातीत लग्न करणार्‍या लोकांचे कधीच घटस्फोट झाले नसते!

भारतीय लग्नसंस्था जातीव्यवस्था कशी टिकून राहावी, यासाठी झटत असते. त्यामुळे अशा मुला-मुलींची लग्नं हा खूप मोठा प्रश्न आहे. तुझी आई ब्राह्मण आहे, तू नाहीस, असं पुण्यातल्या सुप्रसिद्ध लग्नसंस्थांनी मला अनेक वेळा गोड आवाजात सांगितलं आहे. मी अ-विवाहित असून लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेतील अमानवीय गोष्टी- जातीच्या चाळणीतून व्यक्तीला तपासणं व १०० टक्के शुद्धता ही आई-वडलांच्या जातीवरून ठरवली जाणं अनुभवलं आहे. मला तर अगदी आईची जात चांगली की वडलांची असे प्रश्न विचारण्यात आले. हा मामला फक्त ठरवून लग्नात येत नाही, तर तो प्रेमविवाहातही येतो. लहानपणापासून ओळखत असणार्‍या लोकांनीसुद्धा लग्नाची वेळ आल्यावर जातीचा बहाणा पुढे करून नाकारल्याचे अनुभव आहेत, त्यामुळे मी चांगले मित्रसुद्धा गमावले आहेत.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

तसं बघायला गेलं तर कोणत्याही एका जातीला शरण गेले असते, तर माझं आयुष्य ठरल्याप्रमाणे पुढे गेलं असतं, पण मी माझी ओळख वेगळी ठेवण्यात यशस्वी ठरले. माझे मत, माझा दृष्टीकोन वेगळा ठरतो, कारण मा‍झ्यात दोन्ही जाती येतात आणि येत पण नाहीत. लहान असताना मी माधुरी दीक्षितची जबरदस्त चाहती होते. तिला बघून नाचायला शिकले, तेव्हा तिची जात ब्राह्मण आहे, असं मनातसुद्धा आलं नाही.

एका चौकटीतल्या ब्राह्मण कुटुंबात न वाढल्याने मा‍झ्यात सहसंवेदना, भावनिकता आपसूक आली. तसंच टोकाचं व्यवहारीपण, गांधीद्वेष, अप्पलपोटेपणा, तुसडेपणा हे ब्राह्मण समाजाचे स्वभाव-दोष मा‍झ्यात नाहीत. कारण ते मा‍झ्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांतच नव्हते. याचं पूर्ण श्रेय मा‍झ्या ब्राह्मण आजीला आहे. तिने जात व धर्म न बघता लोकांना आपलंसं करायला शिकवलं. तसंच कुणबी/मराठा समाजात असणारे अहंकार, अंधश्रद्धा, खोटा बडेजाव व स्त्रीला दुय्यम वागणूकसुद्धा मा‍झ्यात नाही. त्यामुळे सरसकट सर्व बहुजन चांगले व सर्व ब्राह्मण वाईट किंवा ब्राह्मण चांगले, बहुजन वाईट हा समज चुकीचा आहे.

एखाद्याच्या जातीवरून त्याचं व्यक्तिमत्त्व जोखणं कठीण व त्या व्यक्तीवर अन्यायकारक असू शकतं. गेल्या काही वर्षांत विशेष करून माझी आजी गेल्यावर व इतर अनेक कारणांनी मा‍झ्या आजूबाजूचे लोक बदलले. हा बदल स्वीकारणं मला अवघड गेलं. त्यातही भारतात गेल्या काही वर्षांत मुद्दाम वाढवला गेलेला जातीभेद मा‍झ्यासारख्या व्यक्तीच्या आयुष्यावर खूप परिणाम करून गेला. माझे ब्राह्मण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, ऑफिसमधील सहकारी यांच्यात अचानक झालेला बदल आणि निर्माण झालेली दरी खूप क्लेशकारक आहे. मी कधीही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते, नाही, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ बालपण घालवूनही मी कोणत्याही एका विशिष्ट विचारापेक्षा सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या संपर्कात राहिले. त्याला माझी विज्ञान शाखेतील पदवीही कारणीभूत आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मात्र गेल्या काही वर्षांत मी भेटल्यावर काँग्रेसने इतके वर्षं काय केलं, यावरून टोमणे वाढल्याने अगदी जवळ असलेल्या रक्ताच्या नात्यात दुरावा आला. मुळात मी जाती-धर्माचे चष्मे लावून लोकांकडे बघत नाही. मात्र सध्या लोक जात/धर्माची दूर्बीण घेऊन फिरतात. त्यामुळे नाती कशी सांभाळावी हा प्रश्न आहे. उद्या जातीनुसार वसाहती निर्माण झाल्या तर नवल नाही, इतका हिंदू लोकांच्या मनातला द्वेष टोकाला पोहोचला आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात, चांगल्या शिकलेल्या कुटुंबात व उच्च जातीत (समाज नियमांप्रमाणे) जन्माला येऊन जर हे जर माझ्या वाट्याला येत असेल तर गाव-खेड्यात, शिक्षण नसलेल्या लोकांना, विशेषत: स्त्रियांना जातीमुळे काय काय सहन करावं लागत असेल?

कागदावर नसलेली जात मा‍झ्या मनात व डोळ्यात नाही, द्वेष नाही, पण सहसंवेदना आहे. त्यामुळेच सॉफ्टवेअर जगतासारख्या धर्म, वंश व भाषा यांचं वैविध्य असलेल्या ठिकाणी मनुष्यबळ विकास व औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून जवळपास दीड दशकापासून यशस्वीरीत्या काम करत आहे. ज्या गोष्टीमुळे त्रास झाला, त्याचे माणूस म्हणून जगताना बरेच फायदे झाले.

लहानपणी मा‍झ्या मामाचे बहुजन मित्र गंमतीने ‘मामाला ‘बामन्या’ म्हण, तुला चॉकलेट देतो’ असं सांगायचे. मी म्हणायचेसुद्धा. तेव्हा मा‍झ्या मामाने व त्याच्या बहुजन मित्रांनी भांडणं केली नाहीत, मात्र आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीने आडनावांवरून लोक एकमेकांवर तुटून पडतात, ते पाहून आपण कुठे चाललोय असं वाटतं.

‘मनें प्रतिमा स्थापिली। मनें मना पूजा केली।

मनें इच्छा पुरविली। मन माऊली सकळांची।।

मन गुरू आणि शिष्य। करी आपुलेंचि दास्य।

प्रसन्न आपआपणांस। गति अथवा अधोगति।।

साधक वाचक पंडित। श्रोते वक्ते ऐका मात।

नाहीं नाहीं आन दैवत। तुका म्हणे दुसरें।।’

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 01 January 2021

नमस्कार डॉक्टर वृषाली रामदास राऊत!

जातीचा आधार न घेता तुम्ही जिथवर पोहोचला आहात त्याबद्दल अभिनंदन. हे कठीण काम आहे खरं. पण कठीण काम नाय केलं तर मनुष्य जन्म काय कामाचा ! असंही म्हणता येईल नाहीका !
तुमची काही विधानं महत्त्वाची वाटली :
१.

कारण अशा विवाहातून जन्माला आलेली मुलं जर यशस्वी झाली तर जाती-व्यवस्था टिकणार नाही, हे त्यांना माहीत असल्याने समाज अशा मुला-मुलींना स्वीकारत नाही.

माझ्या मते हे कारण तितकंसं बरोबर नव्हे. जातीव्यवस्था हा एक प्रकारचा सामाजिक विमा ( = social insurance ) आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. मला ते पटलं. त्याच्या आधारावर मी म्हणू इच्छितो की आंतरजातीय विवाहांतनं जन्माला आलेल्या मुलांमुळे सामाजिक विम्याला तितकासा हातभार लागंत नाही. हे माझ्या मते मिश्र संततीस नाकारण्याचं कारण आहे. अगदी अमेरिकन सैन्य व्हियेतनामात होतं तेव्हा उत्पन्न झालेल्या मिश्र संततीस व्हियेतनामी सरकारने अमेरिकेत पाठवलं ( संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Amerasian#Legal_action ). अर्थात, तुमची कथा अमेरेशियन पेक्षा बरीच वेगळी आहे.
तुमच्यासारख्या भारतीय मिश्र मुलांना तुमच्यासारखं स्वतंत्रपणे यश मिळवून दाखवावं लागतं. त्यांना जातीचा फायदा होईलंच याची खात्री नसते. अर्थात हा विचार आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याने केला पाहिजे. तुमच्या आईवडिलांनी केला असेलही कदाचित. जमल्यास त्यांच्याशी बोलून बघा. हा सल्ला अशासाठी देतोय की; ज्या प्रश्नाचा तुम्ही सामना केलात, नेमका तोच प्रश्न तुमच्या मुलांच्या समोर उपस्थित व्हायची शक्यता आहे. बघा विचार करून.
मला विचारलंत तर तुमच्या एकटीच्या कथेवर भाष्य करणं अवघड आहे. पण सामूहिक धोरणावर विचार करता यावा. आंतरजातीय विवाह करायचे असतील तर घाऊक प्रमाणावर करावेत. जेणेकरून जी मिश्र संतती जन्मास येईल तिला एक प्रकारची सामूहिक ओळख म्हणजेच सामाजिक विमा लाभेत. अशा प्रकारचे विवाह भारतात पूर्वी झाले आहेत. परकीय आक्रमण झालं तेव्हा सिंध प्रांतातील मालव व योधेय यांच्यात आपसांतलं वैर मिटवण्यासाठी घाऊक बेटीव्यवहार झाले होते. महाभारतकाळी सूत ही ज्ञाति क्षत्रिय वर व वैश्य वधू यांच्यातनं उत्पन्न झालेली असे.
२.
उद्या जातीनुसार वसाहती निर्माण झाल्या तर नवल नाही, इतका हिंदू लोकांच्या मनातला द्वेष टोकाला पोहोचला आहे.

माझ्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा द्वेषाशी संबंध नाही. समानशीलव्यसनेषु सख्यं म्हणतात याला.
३.
अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ बालपण घालवूनही मी कोणत्याही एका विशिष्ट विचारापेक्षा सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या संपर्कात राहिले.

यावरून रास्व संघात जातीभेद मानला जातो असं सूचित होतंय. प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट आहे. संघात आजिबात जातीभेद पाळला जात नाही. तुम्ही संघाचं कार्य करायला घ्यावं म्हणून सुचवेन. तिथे तुमची खरी कदर होईल (असं मला वाटतं).
४.
मात्र गेल्या काही वर्षांत मी भेटल्यावर काँग्रेसने इतके वर्षं काय केलं, यावरून टोमणे वाढल्याने अगदी जवळ असलेल्या रक्ताच्या नात्यात दुरावा आला.

काँग्रेसच्या कारणामुळे असा दुरावा आला तर ते नातं रक्ताचं असलं तरी जवळचं नव्हे.
५.
ज्या गोष्टीमुळे त्रास झाला, त्याचे माणूस म्हणून जगताना बरेच फायदे झाले.

यालाच विजिगीषु वृत्ती ( = winner's attitude) म्हणतात. ती जोपासल्याबद्दल तुमचं अभिनंदन व कौतुक आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......