कवयित्री लुईस ग्लूक यांची यंदाच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली, त्यामागच्या शक्यता…
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • लुईस ग्लूक
  • Fri , 09 October 2020
  • पडघम साहित्यिक लुईस ग्लूक Louise Glück नोबेल पारितोषिक Nobel Prize

या वर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार काल जाहीर झाला. अमेरिकी कवयिज्ञी लुईस ग्लूक यांना तो जाहीर झाला आहे. तो जाहीर करताना स्वीडीश अकादमीने सांगितलं की, लुईस ग्लूक यांच्या ‘निर्विवाद काव्यात्म उदगारा’साठी हा पुरस्कार त्यांना दिला जात आहे. त्यांची कविता अत्यंत उत्कट रीतीने वैयक्तिक आयुष्याचे मोठेपण सांगण्याचा प्रयत्न करते.

लुईक ग्लूक यांचा परिचय

ग्लूक अमेरिकेतील येल विद्यापीठामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९४३ रोजी झाला आहे. त्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांची कविता प्रामुख्याने बाल्यावस्था, कौटुंबिक जीवन, आई-वडील आणि भाऊ-बहीण यांच्यातील घनिष्ठ संबंधांवर भाष्य करते.

ग्लूक यांचा ‘फर्स्टबॉर्न’ हा पहिला कवितासंग्रह १९६८मध्ये प्रकाशित झाला. या पहिल्याच कवितासंग्रहाने त्यांचा अमेरिकेतील नामवंत कवयित्रीमध्ये समावेश झाला. ग्लूक यांचे आतापर्यंत १२ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यात ‘Firstborn’ (१९६८), ‘The House on Marshland’ (१९७५), ‘Descending Figure’ (१९८०), ‘The Triumph of Achilles’ (१९८५), ‘Ararat’ (१९९०), ‘The Wild Iris’ (१९९२), ‘Meadowlands’ (१९९७), ‘Vita Nova’ (१९९९), ‘The Seven Ages’ (२००१), ‘Averno’ (२००६), ‘A Village Life’ (२००९), ‘Faithful and Virtuous Night’ (२०१४) या कवितासंग्रहांचा समावेश आहे. तर ‘The First Four Books of Poems’ (१९९५) आणि ‘Poems : 1962–2012’ (२०१२) हे त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत.

आतापर्यंत ग्लूक यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘पुलित्झर पारितोषिक’, ‘नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल’, ‘नॅशनल बुक अवार्ड’, ‘नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवार्ड’ इत्यादी. २००३-२००४ दरम्यान त्या अमेरिकेच्या ‘पोएट लॉरिट’ होत्या.

ग्लूक यांची ओळख बहुतांश वेळा आत्मचरित्रात्मक कवयित्री म्हणून करून दिली जाते. त्यांची कविता प्रासादिक आणि ओघवती म्हणून नावाजली गेली आहे. तसेच ती तीव्र भावनिक संवेदनेसाठी ओळखली जाते. ती वैयक्तिक अनुभव व आधुनिक जगाकडे दंतकथा, इतिहास किंवा निसर्गाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करते. त्यांची कविता एकाकीपणा आणि उदासीनता यांची अभिव्यक्ती करते. आत्मचरित्र आणि शास्त्रीय मिथके यांची सांगडही त्यांच्या कवितेतून पाहायला मिळते.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

ग्लूक यांची नोबेलसाठी का निवड झाली असावी?

हे वर्ष जगभरातल्या माणसांच्या अस्तित्वावर घाला घालणारे ठरले आहे. करोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला आहे. अमेरिका, फ्रान्स, इटली, ब्रिटन, भारत अशा अनेक देशांमध्ये या महामारीने कितीतरी लोकांचा जीव घेतला आहे. जवळपास सबंध जग करोनाचा सामना आपल्यापरीने करत आहे. कुठल्या देशातले सरकार करोनावर किती चांगल्या प्रकारे मात करत आहे आणि कुठल्या देशातले सरकार करोनामुळे उदभवलेली परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, या चर्चेत जायला नको.

पण एक मात्र खरे आहे, जगभरात करोनामुळे जगभर भीतीचे वातावरण आहे. आपल्या देशात ‘आपदा में अवसर’ म्हणत सरकारपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत आणि जातीयतेने ग्रासलेल्यांपासून नफ्याच्या लालसेने बरबटलेल्यांपर्यंत अनेक जण आपापला मतलब साधण्यात मग्न आहेत, असं चित्र वरकरणी दिसतं. तसं ते कमी-अधिक फरकानं जगातल्या अनेक देशांतही दिसतं. त्या क्षुद्रतेपेक्षा जगभरचा सामान्य माणूस चिंताग्रस्त झालेला आहे, हा कितीतरी मोठा विषय आहे. त्याची केवळ आर्थिक गणितेच कोलमडली आहेत असे नाही. तर तो भावनिक, कौंटुबिक, वैचारिक पातळीवरही काहीसा चिंताग्रस्त झालेला आहे. उद्याच्या काळजीने, महागाईच्या विचाराने त्याचे मन सैरभैर झालेले आहे. त्याच्या आचारापासून विचारापर्यंत आणि पेहरावापासून वावरापर्यंत अनेक बंधने आली आहेत. ती राजसत्तेने आपले अपयश झाकण्यासाठी वाढवली आहेत की, अजूनही ती पुरेशी सैल केलेली नाहीत, हेही प्रश्न वेगळे आहेत. पण आपल्यासह जगभरच्या माणसांचे वैयक्तिक आयुष्य थोड्याफार फरकाने पणाला लागले आहे, हे नक्की.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या गाठीभेटींवर, संवादांवर मर्यादा तरी आल्या आहेत किंवा त्यात एक अवघडलेपण तरी आले आहे. त्याचे कारण मात्र भलतेच आहे. तो ताण, ती बंधन हळूहळू सैल होताहेत हेही तितकेच खरे. अशा वेळी माणसांचा आशावाद बुलंद करण्याचे काम साहित्य करते. त्यातही कविता करते. कारण कविता हा मानवी जगण्याचा असा उत्कट, भावनाशील उदगार असतो, जो तुम्हाला थोडक्या शब्दांत जगण्याची भव्यदिव्यता सांगण्याचे काम करते. जगण्याचे मर्म सांगतो. त्याची लांबी-रूंदी दाखवून देण्याचेही काम करते. जगावर म्हणजे आपल्यावर आजवर काही कमी संकटे आलेली नाहीत. पहिले-दुसरे महायुद्ध, स्पॅनिश फ्लू, प्लेग, अणुबॉम्ब, जैविक अस्त्रे अशी कितीतरी… त्या सर्वांतून माणूस टिकून-तगून राहिलेला आहे.

मानवी अस्तित्वाचा लंबक कायम या किंवा त्या टोकालाच राहत नाही, हेच आजवरच्या मानवी इतिहासाने दाखवून दिले आहे.

माणूस कशाच्या जोरावर टिकून राहिला आहे? कुणी याचे उत्तर साहित्य असे देईल, कुणी चित्रपट, कुणी संगीत, कुणी लोककला, कुणी शिक्षण, कुणी विज्ञान, कुणी तंत्रज्ञान, कुणी शासनपद्धती, कुणी निसर्ग… असे वेगवेगळ्या प्रकारे देईल.

या सगळ्या उत्तरात सत्याचा थोडा थोडा अंश नक्कीच सापडतो. पण सत्याचा सर्वांत मोठा अंश माणसाच्या जगण्याच्या विजिगीषू वृत्तीत पाहायला मिळतो.

‘समाजविकासाठी स्वविकास’ गरजेचा आहे, असा एखादा समाजशास्त्रज्ञ सांगेल, तर एखादा धर्म सांगेल की, बाहेर चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी स्वत:च्या आत पाहायला हवे. हेच एखादा तत्त्वज्ञ या शब्दांत सांगेल की, जग समजून घेण्यासाठी आधी स्वत:ला योग्य प्रकारे समजून घ्या. जगाच्या सुखाची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या सुखाचा शोध घ्या.

विल्यम वर्डसवर्थ या जगविख्यात कवीने “Poetry is the spontaneous overflow of powerful feelings : it takes its origin from emotion recollected in tranquility,” अशी कवितेची एक व्याख्या केली आहे. ‘कविता हा उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. एकांतात आठवलेल्या भावनांतून तिचा उगम होतो’ असा त्याचा मराठी अनुवाद करता येईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मानवी जगण्याचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यासाठी, कुटुंब-नातेसंबंध यांच्यातले चिरकालीन सौंदर्य दृढ करण्यासाठी आणि स्वत:ला जसे वाटते तसे व्यक्त होण्यासाठी आजघडीला कशाची गरज आहे, तर ती स्वत:वरच्या विश्वासाची. स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची. स्वत:ला समजावून घेण्याची. स्वत:लाच धीर देण्याची. आणि स्वत:ला नीट व्यक्त करण्याचीही. या गोष्टींच्या बळावर आपण विद्यमान संकटाचा सामना करू शकतो.

लुईस ग्लूक यांची कविता तेच अधोरेखित करते. त्याचीच महत्ता सांगते. फार मोठ्या क्रांतीची किंवा बंडखोरीची भाषा ग्लूक यांची कविता करत नाही. ती कुणाहीविरुद्ध उभी राहत नाही. पण ती माणसाच्या, त्याच्या माणूसपणाच्या, त्याच्या अस्तित्वाच्या बाजूने मात्र ठामपणे उभी राहते. (म्हणूनच त्यांची कविता आजवर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वाखाणली गेली असावी. मान्यताप्राप्त झाली असावी.)

म्हणूनच कदाचित त्यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड करण्यात आली असावी.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा