श्रीचक्रधरांची तीन बंडे : धर्मसत्तेविषयी, स्त्रीस्वातंत्र्याविषयी आणि भाषेविषयी...
पडघम - सांस्कृतिक
हंसराज जाधव
  • श्रीचक्रधर
  • Thu , 20 August 2020
  • पडघम सांस्कृतिक श्रीचक्रधर Shree Chakradhar लीळाचरित्र Leelacharitra

आज महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांची जयंती. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

..................................................................................................................................................................

सर्वज्ञ श्रीचक्रधरांनी महत्त्वाची तीन बंडे केली. पहिले धर्मसत्तेविरुद्ध, दुसरे स्त्रीस्वातंत्र्याविषयी आणि तिसरे भाषेविषयी. धर्मसत्तेने लादलेल्या देवी-देवता आणि त्यांची पूजाअर्चा, व्रतवैकल्ये यांविरुद्ध आवाज उठवला. उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढत सर्वांनाच मोक्षाचा म्हणजेच स्वातंत्र्याचा अधिकार असल्याची दवंडी पिटवली. आपण स्वतःच ईश्वर असल्याचे निर्भीडपणे सांगितले, हे धर्मसत्तेविरुद्धचे बंड.

दुसरे बंड स्त्रीस्वातंत्र्याचे. हे बंडसुद्धा अत्यंत महत्त्वाचे होते. कारण श्रीचक्रधरांना आयुष्यात जी काही किंमत मोजावी लागली, त्यांच्यावर जे जीवघेणे हल्ले झाले, ज्या शिक्षा सुनावल्या गेल्या, त्या सर्वांच्या पाठीमागे ‘स्त्रियांना वेधणे’ हा मुख्य आरोप होता.

प्राकृत(मराठी)चा आग्रह का?

तिसरे बंड भाषेचे. लोकांच्या तोंडी असलेली भाषा हीच निरुपणाची भाषा ठरवून प्राकृतला-मराठीला ‘देववाणी’चा दर्जा मिळवून दिला. संस्कृतला नाकारून लोकभाषेचा- मराठीचा आग्रह धरला आणि त्याची अंमलबजावणीही केली हे भाषेचे बंड! श्रीचक्रधरांनी आणि त्यांच्या शिष्य परिवाराने मराठीचा मोठा अभिमान बाळगला आणि दैनदिन व्यवहारात, लिखाणात, विवेचनात मराठीचा आग्रहपूर्वक वापर केला, ही गोष्ट आता सर्वश्रुत आहे. या विधानाच्या पुष्टयर्थ ‘लीळाचरित्रा’तील, ‘स्मृतीस्थळा’तील दाखलेही दिले जातात. परंतु या पाठीमागची श्रीचक्रधरांची मूळ भूमिका काय होती आणि मराठीच्या संदर्भातली त्यांची पात्रता काय होती, या दोन्ही बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत.

श्रीचक्रधरांनी तत्त्वज्ञानात आणि व्यवहारात (म्हणजे तात्त्विक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळीवर) मराठीच्या वापरावर अधिक भर का दिला? याचे उत्तर सरळ आहे. संस्कृत भाषेच्या बंदिवासात अडकलेले ज्ञान सामान्यांना कळणे अशक्य होते. देववाणी म्हणून संस्कृतचे जे मोठेपण लादले जात होते, ते समाजाला नागवणारे होते.

साधं गणित आहे. भाषा हे ज्ञानाचे साधन आहे का अज्ञानाचे हत्यार? जर तुम्ही सांगितलेलं आणि बोललेलं आम्हाला समजतच नसेल तर ती बोली ‘भाषा’ कशी? आम्हाला कोणती ‘बोली’ कळते? मराठी! तर मग मराठीत बोला आणि मराठीत सांगा. किती सोपं आहे! देवाची भाषा लोकांनी शिकण्यापेक्षा लोकांची भाषा देवांनी शिकली तर? मूठभरांची भाषा ‘बहु’जनांवर लादण्यापेक्षा त्यांची भाषा मूठभरांनी अंगिकारली तर? स्वीकारली तर? हे जास्त नैसर्गिक आणि न्यायिक! श्रीचक्रधरांनी तेच केलं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

बरं, एखादी भाषा येत नाही म्हणून ती नाकारणे किंवा तिचा अव्हेर करणे हे समजण्यासारखे आहे, पण स्वत: चक्रधर आणि त्यांचे बहुतेक सर्व शिष्य व्युत्पन्न पंडित आणि संस्कृतचे जाणकार असूनही ते संस्कृतचा धिक्कार आणि मराठीचा स्वीकार करतात हे विशेष आहे. श्रीचक्रधरांचा मराठी वापराचा आदेश पाळताना काहींची आंतरिक घालमेल होते. मानवी स्वभावाप्रमाणे विद्वत्ता प्रकट करणे कोणासही आवडते आणि म्हणून केशोबासासारखे विद्वान संस्कृत भाषेतून रचना करण्यासाठी सिद्ध होतात, पण भटोबासाच्या सुचनेवरून ती चूक करणे टाळतात हे ‘स्मृतीस्थळा’ने नोंदवले आहे.

तो काळच मोठा गमतीचा! लादण्याचा. कोणतीही गोष्ट लादली जात होती. भाषाही लादली. चक्रधरांनी ‘लादण्याचे’ धोरण मोडून ‘स्वीकारण्याचे’ तत्त्व आरंभले. समाजातल्या प्रत्येक ‘नाकारलेल्यांना’ स्वीकारले. मग भाषेबाबतीत तरी हे धोरण कसे सोडतील? भाषासुद्धा स्वीकारली. कोणाची? नागवलेल्या समाजाची. जो समाज आधीच नागवला गेलाय तो आणखी नागवला जाऊ नये, ही त्यांची भूमिका होती.

म्हाइंभट आणि श्रीचक्रधरांची पहिली भेट

श्रीचक्रधरांची ही भूमिका समजून घेण्यासाठी ‘लीळाचरित्रा’तला एक प्रसंग समजून घेतला पाहिजे. ‘लीळाचरित्रा’चे संकलक म्हाइंभट आणि श्रीचक्रधरांच्या प्रथम भेटीची लीळा मोठीच उद्बोधक आहे. गणपत आपयो या आपल्या सासर्याकडून म्हाइंभट नेहमी गोसावियांची (चक्रधरांची) स्तुती, त्यांच्या ज्ञानाची चर्चा ऐकायचे. गणपत आपयोला श्रीचक्रधरांकडून श्रवण होते. म्हाइंभटाच्या विद्वत्तेची, पांडित्याची आणि त्यातून आलेल्या अहंकाराची नोंद ‘लीळाचरित्र’ करते. संस्कृत भाषेतील सर्वच शास्त्र पारंगत असलेला म्हाईंभट ‘प्रभाकर’ नावाचे शास्त्र, जे शास्त्र शिकण्याची सोय महाराष्ट्रात नव्हती. ते तेलंगणामध्ये जाऊन, अत्यंत खडतर परीक्षेला सामोरे जाऊन पारंगत होऊन येतो. या मिळवलेल्या ज्ञानाचा गर्व होऊन तो ‘पायात वाकी आणि हातात दिवटी’ घेऊन फिरत असतो. म्हणजे सगळे विद्वान माझ्या पायातील वाकी (गवताची काडी)प्रमाणे तृणवत आहेत. हातातील दिवटीतून ‘आकाशात तो एक सूर्य आणि पृथ्वीवरचा मी ज्ञानसूर्य’ मर्हाटी हा भाव व्यक्त करत होता. आपल्याशी चर्चा करण्याइतपत पात्रतेचा कोणी विद्वानच उरला नाही, या अहंभावाने त्याला पछाडले.

गणपत आपयोच्या ध्यानात ही गोष्ट येते. ते त्याला ‘तुझ्या शास्त्राचे, ज्ञानाचे चीज होईल. तुझे शास्त्र उजळेल असे एक विद्वान गंगातीरावर आहेत’ अशा शब्दांत ते श्रीचक्रधरांची स्तुती करतात. गणपत आपयोने स्वामींविषयी सांगितल्यानंतर संस्कृत विद्वानांचं प्रतिनिधीत्व करणारा ‘सकलशास्त्रसंपन्न’ म्हाइंभट त्याला जो पहिला प्रश्न विचारतो तो प्रश्न तथाकथित विद्वानांच्या मानसिकतेचा निदर्शक आहे. तो चक्रधरांविषयी विचारतो, ‘ते संस्कृत जाणती?’ म्हणजे संस्कृत जाणतो तोच विद्वान किंवा विश्वातले सगळे ज्ञान केवळ संस्कृत मध्येच! हा विद्वानांचा अट्टहास. भाषेच्या अकारण मोठेपणाचे हे किती मोठे उदाहरण! हा भाषाभिमान जाती अभिमानासी आणि सामाजिक व्यवस्थेसी निगडीत आहे. ‘भाषेवरून विद्वत्ता ठरावी’ अशी मानशिकता आजही काही प्रमाणात आहेच.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मधुकर अनंत मेहेंदळे : आयुष्यभर अभ्यास-संशोधनावर प्रेम करणारा प्रकांड पंडित

..................................................................................................................................................................

मर्हाटी तंव अनावर बोलति

म्हाइंभटाच्या प्रश्नावर गणपत आपयोने संस्कृत जाणतात की नाही माहीत नाही, पण ‘ते मर्हाटी तंव अनावर बोलति’ असा खुलासा केला. श्रीचक्रधरांविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी भक्तांना तर माहिती होतीच, पण जे केवळ नाव ऐकून होते, त्यांनाही स्वामींच्या अस्खलित मराठी बोलण्याविषयी माहिती होती. गणपत आपयो अशा स्वामींविषयी केवळ ऐकून असलेल्यांपैकी होते. संस्कृत येत नाही म्हणावं तर संस्कृत ग्रंथांतून, पुराणातून आलेलं ज्ञान संदर्भानुसार स्वामींच्या विवेचनातून प्रकट व्हायचं. संस्कृत येतं म्हणावं तर ते कधीच संस्कृतमधून कथन करायचे नाही. निरोपण करताना आणि दैनंदिन व्यवहारतही ते मराठीचाच वापर करायचे. धर्मग्रंथांनी क्लिष्ट करून ठेवलेलं ज्ञान ते सूत्ररूपानं अगदीच सोपं करून सांगायचे. जे ज्ञान पंडितांबरोबरच अडाणी, अज्ञानी लोकांना, स्त्रियांना समजण्यास सोपे जाई. ‘अनावर मराठी’ बोलणं हेच त्यांचे सामर्थ्य आहे. श्रीचक्रधरांची ही बंडखोरी आहे. श्रीचक्रधरांनी समाजपरिवर्तनासाठी जे जे बंड केले त्यापैकी पहिले बंड ठरतं ते भाषाबंड! श्रीचक्रधरांच्या या भाषाबंडाने संस्कृतनिष्ठ समाजव्यवस्थेला पहिला हादरा दिला. मराठीला- लोकभाषेला ज्ञानभाषा बनवलं.      

‘लीळाचरित्र’ वाचल्यानंतर, सूत्रपाठ पाहिल्यानंतर श्रीचक्रधर स्वामींच्या अनावरपणाची जाणीव आपणास पदोपदी होते. रुढार्थाने गुजराती असूनही हे अनावरपण श्रीचक्रधरांनी कुठून मिळवलं? ‘अनावर मराठी’ त्यांना कशी जमली?

‘अनावर’ हे रूप ‘अनिवार्य’ या शब्दापासून बनले आहे. ‘अनिवार्य’ म्हणजे टाळता न येणारे. इंग्रजीत त्याला ‘Compalsory’ हा पर्यायी शब्द. महानुभावीय मराठी शब्दकोशाने (खंड पहिला) ‘अनावर’चा आणखी एक अर्थ ‘पराभूत करणे अशक्य’ असाही दिला आहे. एखादी भाषा जर आपल्या जीवनात आपण अनिवार्य मानली, Compalsory मानली तर तिच्या वापरातला, ती बोलण्यातला ‘अनावरपणा’ मिळवणे कोणालाही शक्य आहे. श्रीचक्रधरांनी मराठीला अनिवार्य मानले म्हणून ते मराठी अनावर बोलती आणि जे अनावर बोलती त्याला पराभूत करणे कसे शक्य आहे?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजची महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था आणि राज्यव्यवस्था मराठीला अनिवार्य मानत नाही. ती इंग्रजीला अनिवार्य (Compalsory) आणि मराठीला द्वितीय भाषा (Second Language) मानते. एकीकडे मराठीला दुय्यम मानायचे आणि दुसरीकडे तिच्या समृद्धीच्या आणि विकासाच्या गप्पा मारायच्या, हे दुटप्पीपण महाराष्ट्राला विकासापासून कोसो दूर नेणारं आहे.

श्रीचक्रधरांनी या ‘अनावर मराठी’च्या बळावरच संस्कृतला पराभूत केले. गणपत आपयोच्या सुचनेवरून म्हाइंभट स्वामींच्या भेटीला जातो. भेटीला जाताना वादविवादाची तयारी करतो. ‘त्यानं असा प्रश्न विचारला तर मी असं उत्तर देईन. त्याला मी असा प्रश्न विचारीन...’ अशी मनातल्या मनात पूर्वतयारी करत येणारा म्हाइंभट स्वामींना बघितल्यावर मात्र गप्प होऊन जातो. ‘मी एक ज्ञानसूर्य’ अशा तोऱ्यात वावरणारा षड्शास्त्रसंपन्न म्हाइंभट, त्याची बोलती बंद होते. ‘भटो! तुम्ही काई बोला!’ असं म्हटल्यावरही तो चर्चेस तयार होत नाही. स्वामी स्वत:च म्हाइंभटासी चर्चा करतात. अनेक मुद्द्यांवर त्यांची चर्चा होते. शेवटी ‘लीळाचरित्रा’ने म्हाइंभटाविषयी ‘मग उगाची राहिला’ असे मत नोंदवले आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हंसराज जाधव पैठणच्या ‘प्रतिष्ठान महाविद्यालया’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

hansvajirgonkar@gmail.com                                                                                            ..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा