कुठलीही व्यक्ती अचानक आत्महत्या करत नाही, त्याला काहीतरी पूर्वइतिहास असतो. अबोध मनात काहीतरी दाबून ठेवलेलं असतं. ते सतत समाजमान्य मार्गानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं.
पडघम - विज्ञाननामा
सोपान मोहिते
  • चित्र https://www.newyorker.com/books/under-review/the-two-faces-of-suicide वरून साभार
  • Thu , 18 June 2020
  • पडघम विज्ञाननामा आत्महत्या Suicide

आत्महत्यांचं वाढतं प्रमाण ही एक चिंतेची बाब झाली आहे. अलीकडील काही घटना पाहता आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आता गरीब-श्रीमंत असा भेद राहिलेला नाही असे वाटते. कर्जबाजारी शेतकरी ते उच्चभ्रू श्रीमंत या दरम्यानच्या सर्व वर्गात हे प्रमाण सारखेच जाणवते. आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे भैय्यूजी महाराज, आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय, आयएएस म्हैसकर दाम्पत्याचा मुलगा मन्मथ, रोहित वेमुला आणि आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सर्व वयोगटात हे प्रमाण सारखंच दिसतं.

आरोन, जोशेफ, अब्राहम या मानसतज्ज्ञांनी २००४ साली ११ ते १९ या वयोगटातील मुलांच्या आत्महत्येचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी दक्षिण भारतातील वेल्लोरजवळच्या ग्रामीण भागातील १,०८,००० तरुण नमुना म्हणून निवडले. या अभ्यासात आत्महत्या अपेक्षेपेक्षा जास्त आढळून आल्या. तीन चतुर्थांशपेक्षा कमी मुलींच्या मृत्यूचं कारण आत्महत्या हे होतं. एक लाख पैकी ५८ तरुणांनी आत्महत्या केल्याचं या संशोधनातून दिसून आलं. आत्महत्या करण्यामागची कारणं कौटुबिक संघर्ष, हिंसाचार, अपयश, अद्भुतरम्य कल्पना, शारीरिक, मानसिक आजार, अशी अनेक होती.

पूर्वी प्राथमिक शाळेत शिक्षक मुलांना नैतिकतेचे धडे देत असत. काही वास्तव, काल्पनिक कथा, गोष्टी सांगितल्या जात. त्यामुळे जगण्याचा पाया भक्कम होत होता. आपण का जगावं? कोणासाठी जगावं? कशासाठी जगावं? पैशाला किती महत्त्व द्यावं? व्यवहार कोणासोबत करावा? कोणासोबत करू नये? अशा प्रश्नांची उत्तरं या  बोधकथांतून सहज मिळत असत. त्यातून मानवी जीवनात ‘संयम’ किती महत्त्वाचा आहे, हे मनावर बिंबवलं जात असे. ‘संयम थोर असतो’, ‘सब्र का फल मिठा होता है’ यांसारख्या सुवचनांतून त्याची उजळणी होत असे. पण काळाच्या ओघात याचं प्रमाण कमी होत गेलं. काळानुसार बदल होत गेला, बदलावं लागलं आणि त्याचे काही ‘साइड इफेक्ट’ही व्हायला लागले.

आपण भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलो आणि आत्मिक सुख हरवून बसलो. आज प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं आहे. ‘आज, आत्ता आणि ताबडतोब मिळालंच पाहिजे’ अशी धडपड होऊ लागली. एकाच वेळी अनेक दडपणं येत गेली. दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटायला लागलो आणि तिथंच आपल्या चुका होऊ लागल्या.

एकमेकात मिसळणं, चर्चा करणं, भावनिक ओलावा टिकवणं, आपल्या समस्या इतरांना सांगणं, इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणं, याचं प्रमाण कमी झालं. परिणामी आपण एकाकी झालो. आपल्याजवळ ‘संयम’ नसल्या कारणामुळे एकदम टोकाचा निर्णय घेऊन हे जीवनच नकोसं वाटू लागलं. आवडती टीव्ही वाहिनी नाही लावली म्हणून, आवडती भाजी केली नाही म्हणून, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही झाला म्हणून, नोकरी गेली म्हणून, नापास झालो म्हणून, अशा जीवनातल्या अनेक कारणांमुळे आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललंय.

आत्महत्याप्रवण व्यक्तींमध्ये काही पूर्वलक्षणं जाणवतात. कुठलीही व्यक्ती अचानक आत्महत्या करत नाही, त्याला काहीतरी पूर्वइतिहास असतो. अबोध मनात काहीतरी दाबून ठेवलेलं असतं. ते सतत समाजमान्य मार्गानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं. उदा. आत्महत्याप्रवण व्यक्ती सतत मृत्यूविषयी बोलत असते, त्यासंबधी काही साहित्य वाचते, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. बोलण्यातून नकारात्मक विचारांचं प्रकटन होत असतं. उदा. या जगात जगून काही फायदा नाही, मी कोणत्याच कामाचा नाही, मला सतत अपयश येत आहे, मी कुचकामी आहे इत्यादी इत्यादी.

अशा व्यक्तींची भूक मंदावते किंवा ती विचारांच्या तंद्रीत अति खात असते. तिच्या झोपेच्या वेळेत बदल होतो, निद्रानाशाचा त्रास होतो. कोणाशी फारसं न बोलणं, आपल्याच कामाच्या तंद्रीत असणं, इतरांशी संपर्क ठेवावसा न वाटणं आदी लक्षणं या व्यक्तींमध्ये जाणवतात. नेहमीच्या वर्तनात बदल होत असतो. एखादी व्यक्ती लाजाळू असेल तर ती अचानक बंडखोर बनते, क्रियाशील होते. मुलं शाळेत अनुपस्थित राहतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं इत्यादी इत्यादी. 

मनोविश्लेषण प्रणेते सिग्मंड फ्रॉइड असं म्हणतात की, आपलं भावविरेचन होणं आवश्यक आहे. मनात जे साठलं आहे, ते बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या जीवनात असा एक तरी नातेवाईक किंवा मित्र असला पाहिजे की, ज्याच्याशी आपल्या वैयक्तिक, खाजगी गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. अशा व्यक्तीशी सतत बोललं पाहिजे. बोलल्यामुळे मनात जे साठून राहिलं आहे ते बाहेर येतं आणि मूळ समस्येवर उपचार करता येतो.

एखाद्या व्यक्तीला सतत संघर्ष करावा लागत असेल, अडीअडचणींचा सामना करावा लागत असेल, अपयश येत असेल, तर अशा व्यक्तीला एकटं सोडू नये. कारण अपयश, अडचण यांमुळे व्यक्तीला वैफल्य येतं आणि त्यातून हे जीवन नकोसं वाटून आत्महत्या करण्याची इच्छा प्रबळ होत जाते. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मानसिक आधाराची खूप गरज असते आणि त्या व्यक्तीला आधार मिळाला की, त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकतेची बीजं रुजायला सुरुवात होते. तू एकटा नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत असा आश्वासक धीर दिल्यास त्याचं एकटेपण निघून जातं आणि तो सामान्य अवस्थेत येतो. सतत संपर्कात राहिल्यास वचनबद्धता, बांधीलकी निर्माण होते. तसंच तिला पुढील आयुष्याचं नियोजन करण्यासाठी मदत करणंही गरजेचं आहे. 

अशी आत्महत्याप्रवण व्यक्ती जिथं राहत असेल, काम करत असेल तेथील परिसर, वातावरण सुरक्षित करणं गरजेचं आहे. धारदार शस्त्रं, दोरी, विषारी औषधं, गोळ्या, बंदूक अशा धोकादायक वस्तू त्याच्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत. अशा व्यक्तीला आव्हान न देता तिच्याशी बोलून प्राप्त परिस्थितीशी सुसंगत विचार करायला प्रवृत्त केलं तर आत्महत्येपासून परावृत्त करता येऊ शकतं.

..................................................................................................................................................................

लेखक सोपान हनुमंत मोहिते बार्शीमधील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

profshmohite@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Rahul Palke

Thu , 18 June 2020

वास्तव!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रशियाचा भारताला भडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्यामागचा हेतू असावा. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल असणार...

आपण घरात घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला.......