विजया राजाध्यक्ष : साहित्यावर उत्कटपणे प्रेम करणाऱ्या आस्वादक समीक्षक
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • विजया राजाध्यक्ष
  • Fri , 20 January 2017
  • पडघम साहित्यिक विजया राजाध्यक्ष Vijaya Rajadhyaksha जनस्थान पुरस्कार Jansthan Puraskar कुसुमाग्रज प्रतिष्ठान Kusumagraj Pratishathan मर्ढेकर Mardhekar

“कवितेबाबत माझी आवडनिवड विशिष्ट किंवा ठरावीक नाही. स्वायत्त कविता माझ्या मनात घर करून राहते.”

‘‘जी. ए. कुलकर्णीच्या दर्जाची, जातीची कथा मला लिहिता आली नसती. त्या पातळीवर जाण्याची आपली कुवत नाही याची मला जाणीव आहे.’’

‘‘मर्ढेकरांच्या सर्व कवितांचा अर्थ मला कळला आहे, असा माझा दावा नाही.’’

असा प्रांजळपणा विजयाबाई राजाध्यक्ष करू शकतात, नव्हे करतात. कारण कुठल्याही दुराग्रहापासून, अट्टाहासापासून त्यांनी स्वत:ला मुक्त ठेवलं आहे. खरं तर विजयाबाईंची पिढीच अशी आहे. ती सातत्यशील वृत्तीनं वाङ्मयाचा गंभीरपूर्वक अभ्यास करणारी, साहित्यावर उत्कटपणे प्रेम करणारी आहे. रा. ग. जाधव, सुधीर रसाळ ही त्यांपैकीच काही नावं.

प्रा. विजया राजाध्यक्ष म्हटले की, ‘बहुपेडी विंदा’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘कवितारती’, ‘शोध मर्ढेकरांचा’, ‘पुन्हा मर्ढेकर’ असे समीक्षाग्रंथ आठवतात. ‘संवाद’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंनी विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आणि वा. ल. कुलकर्णी यांच्या घेतलेल्या वाङ्मयीन मुलाखती मोठ्या रोचक आहेत. विजयाबाईंनी आस्वादक समीक्षेला मराठीमध्ये काहीएक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी काही दमदार पावले टाकली आहेत, पण तरीही आस्वादक समीक्षेविषयीचे समज काही पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत. या समीक्षालेखनाला दुय्यम मानले जातेच. पण विजयाबाईंनी त्याची पर्वा न करता आपले लेखन चालू ठेवले.

विजयाबाई पूर्णपणे वाङ्मयीन स्वरूपाचे-त्यातही समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. पण एवढीच काही त्यांची ओळख नाही. विजयाबाई प्रदीर्घ काळ कथालेखनही करत आल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सतरा-अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तीनेक वर्षांपूर्वी ‘तीन प्रहर’ या संग्रहात त्यांच्या दोन लघुकादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

विजयाबाई मूळच्या कोल्हापूरच्या, विजया आपटे. शालेयवयात त्यांची वि. स. खांडेकर यांच्याशी मैत्री झाली. कोल्हापुरातच त्यांचं एम. ए. पर्यंतचं शिक्षण झालं. १९५२साली मं. वि. राजाध्यक्ष कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून आले. विजयाबाई त्यांच्या प्रेमात पडल्या, पत्नी झाल्या. नवपरिणीत जोडपं मुंबईला आलं, आणि त्यावेळच्या मुंबईत आणखी एका साहित्यिक दांपत्याची भर पडली. मुंबईत आल्यावर त्यांची पहिल्यांदा दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. वा. ल. कुलकर्णीचा तेव्हा समीक्षेमध्ये चांगला दबदबा होता. चित्र्यांनी बाईंची वा.लं.शी, करंदीकरांशी ओळख करून दिली. ‘मौज’च्या गोटात सामील होण्याचा मार्ग ‘मौज’, ‘सत्यकथे’त विजयाबाईंनी आधीच कथा लिहून सुकर करून घेतला होता.

विजयाबाई पहिल्यांदा एल्फिन्स्टन कॉलेजात मराठीच्या प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्या. पुढे एसएनडीटी विद्यापीठात गेल्या. तिथून मराठीच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. तिथं विजयाबाईंनी अनेक उत्तमोत्तम चर्चासत्रं घेतली. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांची ‘प्रोफेसर एमिरेटस’ म्हणून नेमणूक केली. विजयाबाईंनी त्याचं ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’असं शुद्ध मराठी नामकरण केलं, स्वत:ला शोभेलंसं! 

विजयाबाई गेली पन्नासहून अधिक वर्षे कथालेखन करत आहेत. अठरा-वीस कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यातही त्यांनी स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. पण समीक्षेची पुस्तकं मात्र त्याच्या निमपटही नाहीत. आणि तरी ती मोलाची आहेत.

कवितेच्या आस्वादक समीक्षक अशीही विजयाबाईंची ओळख आहे. कविता हा त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा, आस्थेचा, प्रेमाचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणूनच त्यांचं समीक्षालेखन प्राधान्यानं कवितेविषयीचंच आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांनी चिंतनाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी मर्ढेकरांवरच पीएच. डी. केली. मर्ढेकरांच्या एका एका कवितेवर आणि त्यातल्या एका एका शब्दांवर विजयाबाईंनी रमेश तेंडुलकर, शांता शेळके, मं. वि. राजाध्यक्ष यांच्याशी अतिशय सखोल चर्चा केल्या. पुढे ते चिंतन ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ (१९९१) या दोन खंडातून प्रकाशित झालं. त्याला १९९३ साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.

त्यानंतर त्यांनी ‘पुन्हा मर्ढेकर’ आणि ‘शोध मर्ढेकरांचा’ ही दोन चरित्रपर पुस्तकंही लिहिली. त्यामुळे काही वेळा असं वाटतं होतं की, बाई मर्ढेकरांमध्येच अडकून पडल्या आहेत की काय! पण करंदीकरांच्या समग्र साहित्याचं परिशीलन ‘बहुपेडी विंदा’ या दोन खंडी ग्रंथातून त्यांनी केलं. त्यांनी आरती प्रभूंवरही सविस्तर लिहिण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. म्हणजे ८४व्या वर्षीही लेखनाचे नवेनवे विषय त्यांना हाकारे घालत आहेत. हेही पुन्हा त्यांच्या ‘सार्वकालिक आणि समकालीन’ अभ्यासूवृत्तीचं द्योतक आहे. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘संवाद’ (१९८५) या पुस्तकात विजयाबाईंनी वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ आणि विंदा करंदीकर यांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्यात या तीन श्रेष्ठींच्या वाडमयीन व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या लेखनामागील प्रेरणांचा, त्यांच्या एकंदर साहित्यिक वाटचालीचा सविस्तर आढावा आहे. वाड्मयीन मुलाखती कशा घ्याव्यात त्याचं हे पुस्तक चांगलं उदाहरण ठरावं. 

विजयाबाई वृत्तीनं धार्मिक, सश्रद्ध आहेत. तोच प्रकार त्यांच्या लेखनाबाबतीतही आहे. पण विजयाबाईंच्या श्रद्धेला कर्मकांडाची झालर नसते. म्हणूनच त्यांना तटस्थ राहता येतं आणि मोकळेपणाने केवळ कवितेचाच विचार करता येतो. ‘बहुपेडी विंदा’च्या दुसऱ्या खंडांमध्ये ‘अष्टदर्शने’वर त्यांनी लिहिलं आहे, ‘‘पद्यीकरणाच्या मर्यादा ओलांडण्याइतपत तरी काव्य करंदीकरांकडून अपेक्षित होतेच. ‘अष्टदर्शने’मधून ही अपेक्षा त्यांना पूर्ण करता आलेली नाही.’’ ही टिप्पणी कुणाला सावधपणाची वाटेल. पण विजयाबाईंचं एकंदर लेखन पाहिलं तर त्या सगळ्यामध्ये असाच सूर दिसेल. ‘मला हे असं असं वाटतं…इतरांना यापेक्षा वेगळंही वाटू शकतं’ अशी त्यांची विनयशील आणि अनाग्रही भूमिका असते. विजयाबाईंनी काही वर्षापूर्वी ‘मराठीतील काही कादंबऱ्या या भरकटलेल्या कथा आहेत, असे म्हटले जाते. त्याला धरून असे म्हणता येईल की काही कथा या गुदमरलेल्या कादंबऱ्या आहेत,’ असे विधान केले होते. तेव्हा त्यावर बराच वाद झाला होता.

मात्र सर्जनशील लेखनाविषयी फार ठाम भूमिका घेता येत नाहीत याचं ते चांगलं उदाहरण आहे. म्हणूनच विजयाबाई कुठल्याही सिद्धान्ताची फूटपट्टी कवितेला विनाकारण लावत नाहीत. पण त्यातही त्यांचा म्हणून एक ठामपणा असतोच.

विजयाबाईंची समीक्षा ही आस्वादक किंवा चरित्रात्मक स्वरूपाची आहे. अशा प्रकारच्या समीक्षेला मराठी साहित्य व्यवहारात फारसं मानाचं स्थान दिलं जात नाही. हा आक्षेप जमेस धरून विजयाबाई आपलं लेखन करत राहिल्या आणि आता त्यांनी त्यालाच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. विजयाबाई बहुप्रसवा कथालेखिका आहेतच, पण तशाच त्या चांगल्या वाचकही आहेत. मराठीतल्या प्रस्थापितांपासून अगदी नवोदित कवी-कथाकारांचं लेखनही त्या तितक्याच अगत्यानं वाचत असतात. इंग्रजी साहित्याचंही त्यांचं मोठं वाचन आहे. 
२००१च्या इंदूर इथं भरलेल्या साहित्य संमेलनाच्या विजयाबाई अध्यक्ष होत्या. तिथल्या आपल्या अध्यक्षीय भाषणाला त्यांनी ‘सार्वकालिक आणि समकालीन’ असं अन्वयर्थक शीर्षक दिलं होतं. त्यात साहित्याचा नेमका अर्थ, सृजनाची प्रक्रिया कशी असते, सर्जनाच्या वाटेवर काय काय असते याविषयी त्यांना आकळलेलं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं असिधाराव्रत अजूनही चालू आहे, असंच चालू राहो.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......