मध्यमवर्ग आपल्या ‘मास्टर’चा झाला आहे. त्याला पॅकेज नाही, थाळी वाजवण्याचा कार्यक्रम हवाय.
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 21 May 2020
  • पडघम देशकारण मध्यमवर्ग

कोविड-१९ने भारतातील मध्यमवर्गाचा एक नवीन चेहरा समोर आणलाय. गेल्या सहा वर्षांतला हा बदल आता दिसू लागला आहे. विश्लेषक आश्चर्यचकित झालेले आहेत की, नोकरी आणि पगार गमावूनही हा मध्यमवर्ग मूग गिळून का बसलाय? मजुरांच्या दुर्दशेबद्दल मध्यमवर्ग गप्प का आहे? मी याआधीही लिहिलंय आणि आज पुन्हा लिहितो की, जर मध्यमवर्ग आपल्या दुर्दशेबद्दलच गप्प असेल तर तो मजुरांच्या दशेबद्दल कसा बोलेल? मध्यमवर्ग स्थिर नसतो, त्यामुळे त्याची परिभाषाही निश्चित नसते.

मी आजच्या मध्यमवर्गाला ‘मास्टरचा मध्यमवर्ग’ म्हणतो. जो आपल्या ‘मास्टर’ला घाबरवत होता किंवा ‘मास्टर’ ज्याला घाबरत होता, तो मध्यमवर्ग आता राहिलेला नाही. भारतीय मध्यमवर्गाची एक सुप्त इच्छा होती की, एखादा ‘हंटरधारी मास्टर’ यावा. म्हणूनच त्याला समस्यांवरचा उपाय सैन्याच्या शिस्तीत दिसत होता किंवा हिटलरच्या अवतारात. भारताचा मध्यमवर्ग आता लोकशाहीची आकांक्षा असलेला राहिलेला नाही. त्यामुळेच तो लोकशाहीच्या संस्थांच्या ऱ्हासाचा विरोधकही राहिलेला नाही.

शक्यता आहे की, हा मध्यमवर्ग पगारकपातीमुळे किंवा नोकरी गेल्यामुळे निराश झाला असेल, पण बाहेरून तो त्याच माहोलासोबत राहू इच्छितोय, जो तो बनवत आलाय. त्याने या माहोलाविरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला पायतळी तुडवण्यासाठी मदत केली आहे. ‘गोदी मीडिया’ला दर्शक उपलब्ध करून देण्याचं काम याच मध्यमवर्गाने केलं आहे. ‘गोदी मीडिया’साठी विरोधीविचारांवर हल्लासुद्धा केलेला आहे. आता जर याच मध्यमवर्गामध्ये नाराजी किंवा बेचैनी असेल तर तो कुठल्या तोंडानं या माध्यमांकडे जाईल? त्यांना ‘गोदी मीडिया’ बनवण्यात त्याचाही हात आहे. म्हणून तर त्याचं तोंड बांधलं गेलंय.

ही असामान्य गोष्ट आहे की, जर या देशात कोट्यवधी लोक बेरोजगार झाले असतील तर त्यात मध्यमवर्गातल्या सर्व स्तरांचाही समावेश असेल. पण त्याने एखाद-दुसरा प्रसंग सोडला तर आपली नाराजी बोलून दाखवलेली नाही. आपल्यासाठी बेरोजगार भत्ता मागितलेला नाही. या मध्यमवर्गाने गेल्या सहा वर्षांत विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला पायतुळी तुडवण्याचं काम केलं आहे. त्याला माहीत आहे की, आवाजाला काही अर्थ नाही. तो ज्या ‘गोदी मीडिया’चा राखणदार आहे, त्यालाही सांगू शकत नाही की, आमच्याबद्दल आवाज उठवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा एका मध्यमवर्गाची निर्मिती केली आहे, जो आपल्या वर्गहिताचाही राखणदार नाही. त्याचं हित फक्त ‘नरेंद्र मोदी’ हे आहे. हा राष्ट्राचा म्हणजे सरकारचा वर्ग आहे. हा तो मध्यमवर्ग आहे, ज्याला फक्त सरकारचा उदोउदो करणं आणि उदोउदो करणाऱ्या बातम्या वाचणं यांचीच चाह आहे. या मध्यमवर्गाने आयटी सेल उभा केलाय. त्याच्या भाषेला सामाजिक आधार दिलाय. सरकारच्या बाजूने असलेल्या पत्रकारांना ‘हिरो’ बनवलं. हा वर्ग कुठल्याच बाजूने कमकुवत नाही. त्यामुळे मी अनेक विश्लेषकांना सांगत आलोय की, मध्यमवर्गाच्या मूग गिळून बसण्याला हलक्यात घेऊ नका.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मध्यमवर्गाचं नवं राष्ट्रीय चरित्र तोडू पाहणारे फसले. या मध्यमवर्गाला माहीत आहे की, गेल्या सहा वर्षांत त्याचं उत्पन्न घटलंय. त्याच्या व्यवसायाने गचके खाल्ले आहेत. त्याच्या घराच्या किमती गडगडल्या आहेत… सगळं तो जाणून आहे. पण या समस्या त्याच्या प्राधान्यक्रमावर नाहीत. या वर्गाने बेरोजगारीसारखे ज्वलंत मुद्दे भारतीय राजकारणातून संपवून टाकले आहेत. त्यामुळेच जेव्हा हरयाणा सरकारने सांगितलं की, एक वर्ष सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होणार नाही, तेव्हा या मध्यमवर्गाने त्याचं सहर्ष स्वागतच केलं. प्रत्येक राज्यात सरकारी नोकऱ्यांची दुर्दशा झालेली आहे, पण ही ना त्या तरुणांची राजकीय प्राथमिकता आहे, ना त्यांच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांची.

मध्यमवर्गाची ओळख बेरोजगारीची होरपळ आणि नोकरीची चौकट यांतून तयार झाली होती. आजचा मध्यमवर्ग या सीमांपासून मुक्त आहे. मध्यमवर्ग मुद्द्यांचा पक्ष घेणारा वर्ग राहिलेला नाही. मागच्या सहा वर्षांत त्याने अनेक मुद्दे उडवून लावले आहेत. राजकारणाकडे आर्थिक चष्म्यातून पाहणारे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरलेही असतील, पण भारताच्या आजच्या काळात ते चुकीचे आहेत. लक्षात घ्या, मी मध्यमवर्गाला निश्चित नसलेला वर्ग म्हटलं आहे, तो बदलेल तेव्हा बदलेला, पण आज तसा नाहीये.

कुठलाही वर्ग एका परिभाषेत सामावला जाऊ शकत नाही. प्रत्येक वर्गामध्ये अनेक वर्ग असतात. मध्यमवर्गामध्येही एक छोटा वर्ग आहे, तो राजकीय वा सरकारी दबावाचं प्रतिनिधित्व करत नाही. तो आपल्या नैतिकतेला उत्तरदायी आहे. म्हणून तो आपली कमाई खर्चून समाजसेवा करत आहे. पण त्याची ही समाजसेवाही ‘आता तरी बोलायला हवं’ या त्याच्या वर्गाच्या भावनेला चालना देऊ शकत नाहीये. मध्यमवर्गातला हा दुसरा वर्ग आपल्या वर्गहितापासून विन्मुख आहे, हताश आहे. पण तो हे स्वीकारायला तयार नाही की, आपल्या वर्गाचा एक मोठा भाग बदलला आहे. त्याचं ‘नव-निर्माण’ झालं आहे. चांगलं असेल किंवा वाईट असेल, काहीही असो. पण हे नक्की की, हा तो मध्यमवर्ग नाही, ज्याला जुन्या निकषांवर समजून घेता येईल.

या मध्यमवर्गाची ओळख ‘वर्ग’ नाही, तर ‘धर्म’ आहे. कदाचित धर्माची ओळख अर्धीही असेल. पण त्याच्या ‘नव-निर्माणा’त धर्माने मोठी भूमिका निभावलीय. हा वर्ग आर्थिक प्रश्नांवरून संचलित किंवा उत्प्रेरित होत नाही. त्याने अनेक वेळा आर्थिक संकटांकडे कानाडोळा केलाय. त्यामुळे विश्लेषकांनी त्याच्या आर्थिक संकटांमध्ये त्याच्या राजकीय शक्यता शोधण्याचा गैरलागू प्रयत्न करू नये. हे स्वीकारायला हवं की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्यासाठी या वर्गाची निर्मिती केलेली आहे.

हा तो वर्ग आहे ज्याच्या बँक खात्यात १५ लाख जमा न झाल्याबद्दल त्याची कितीतरी चेष्टा केली गेली, पण या वर्गाने चेष्टा करणाऱ्यांनाच उडवून लावलं. विरोधकांना आशा होती की, १५ लाखांची आठवण करून दिल्यावर या मध्यमवर्गाला ठेच पोहचेल. पण या मध्यमवर्गाने आठवण करून देणाऱ्यांनाच ठेच पोहोचवली. ज्या मध्यमवर्गाने १५ लाखाला महत्त्व दिलं नाही, तेव्हा तो आर्थिक पॅकेजमधल्या पाच-पन्नास हजाराची वाट पाहत बसला असेल? नोटबंदीच्या वेळेस या वर्गालाही फटका बसला, पण त्याने आपल्या राष्ट्रीय प्रतिमेपुढे आपल्या धंद्याच्या बरबादीचा प्रश्न येऊ दिला नाही. विश्लेषकांनी या बदलाचा जरूर अभ्यास करावा, पण यातून राजकीय बदलाची शक्यता गृहित धरू नये. त्यांचं विश्लेषण कुचकामी ठरू शकतं. कारण मध्यमवर्गाचा ‘स्वाभिमान’ बदलला आहे.

मध्यमवर्गाला त्याच्या अनुभवावरून माहीत आहे की, ‘मेक इन इंडिया’ अयशस्वी ठरलंय. ‘स्मार्ट सिटी’ या नावावर तो हसतो. तो ‘आत्मनिर्भर भारत’ची जुमलेबाजीही जाणून आहे. त्याला प्रत्येक ‘फेक न्यूज’ माहीत आहे. त्याने ‘असत्या’ला ‘सत्य’ मानण्याचा पण जाणूनबुजून केलेला आहे. त्याने ‘गोदी मीडिया’ला स्वत:चा मीडिया उगाच बनवलेलं नाही! त्याच्यातील राजकारण संपलेलं आहे. त्यामुळे तो राजकीय दबाव निर्माण करू शकत नाही. तो कुणाला तरी आपलं म्हणणं दबक्या आवाजात सांगेल. अगदी मला सांगतानाही तो याची पूर्ण काळजी घेईल की, यामुळे त्याच्यात कुठली राजकीय उलथापालथ सुरू होणार नाही ना. म्हणजे तो अजिबात मोदींवर टीका करणार नाही. तो थाळी वाजवणं सोडून मशाल उंचावणार नाही. तो बॅनर घेऊन मोर्च्यात जाणार नाही. त्यामुळे तो जेव्हा समस्या सांगेल, तेव्हा शांतपणे तिच्याविषयी लिहा, तुमचं काम संपेल.

कोविड-१९च्या महामारीत भारतीय मध्यमवर्गाने स्वत:साठी कुठलीही मागणी केलेली दिसली नाही. येता-जाता त्याने सांगितलंय की, पगारकपात का झाली, नोकरी का गेली, ईएमआय का कमी झाला नाही, पण त्यानंतर आपण काय बोललो हे तो विसरून गेला. आता हे सरकारवर अवलंबून आहे की, त्याने गेल्या सहा वर्षांत ज्या मध्यमवर्गाचं ‘नव-निर्माण’ केलं आहे, त्याला तो काय देणार? नाही दिलं तरी सरकारला काही फरक पडणार नाही. कारण त्याने बनवलेली इमारत इतक्या लवकर कोसळणार नाही. हा मध्यमवर्ग त्याचा साथीदार आहे.

एका पत्रकाराच्या नजरेतून मला ही गोष्ट हैराण करते की, मोदी सरकारने मध्यमवर्गाचा काहीच का विचार केला नाही? आणि नाही केला, तर मध्यमवर्गाने आवाज का उठवला नाही? दोन-चार लोक बोलताना दिसले, पण या वर्गाचा समग्र आवाज काही ऐकायला आला नाही.

भारताचा मध्यमवर्ग आता मोठमोठे लेख वाचत नाही, मग त्यात त्याच्या भल्याची का गोष्ट असेना. त्याला सगळं व्हॉटसअॅप, मीममध्ये हवंय. ईएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्यांमध्ये हवंय. मीम हा त्याच्या ज्ञानाचा ईएमआय आहे. त्याचं स्वप्न बदललंय. तो टीक-टॉकवर स्वत:ला सिद्ध करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे. तुम्ही टीक-टॉकवर मध्यमवर्गाचं जीवन आणि अपेक्षा पाहू शकता. हुशार नेत्याने आर्थिक पॅकेजऐवजी चांगली मालिका दिली, तर मध्यमवर्गाच्या रात्री चांगल्या जातात. तो त्या मालिकेत वापरलेले कपडे आणि बोलले गेलेले संवाद जगू लागतो.

राष्ट्रीय संकटाच्या या काळात मध्यमवर्गाच्या राष्ट्रीय चरित्राचं दर्शनच तुम्ही घडवू शकत नसाल तर तुम्ही कसले समाजशास्त्रज्ञ!

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख एनडीटीव्हीच्या पोर्टलवर प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

https://khabar.ndtv.com/news/blogs/middle-class-needs-the-task-of-beating-plates-not-a-package-by-ravish-kumar-2230303

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......