अजित पवारांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अजित पवार
  • Sat , 23 November 2019
  • पडघम राज्यकारण देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari अजित पवार Ajit Pawar शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP शिवसेना Shivsena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भाजप BJP

आम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये-

- राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं. त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करू नये, भाकितं व्यक्त करू नयेत, भविष्य वर्तवू नये, तर फक्त बातमी द्यावी.

- त्याचा किमान काही नेत्यांशी थेट संपर्क असावा म्हणजे नेमकी माहिती मिळते, मात्र मिळणारी प्रत्येक माहिती बातमी नसते.

- शरद पवार जे बोलतात, ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत, ते सर्वांत आधी करतात.

- शिवाय दिवाळी संपल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला माझा संवाद जशाचा तसा देतो, कारण तो एसएमएसद्वारे झालेला आहे आणि अजून डिलीट केलेला नाही –

प्रश्न- तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात भाजप सरकार येणार कधी? This is strictly between you and me.

देवेंद्र फडणवीस – May take a month.   

प्रश्न- बाप रे! इतका दुरावा निर्माण झालेला आहे?

देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल ओठ बंद असलेल्या दोन प्रतिमा पाठवल्या!

अनेकांचे गैरसमज झाले तरी ही पथ्ये आणि हा संवाद यामुळे सरकार स्थापन झाल्याशिवाय कोणतंही भाष्य न करण्याचं टाळलं, त्यामुळे मी तोंडघशी पडलो नाही.

आज सकाळी भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. या दोघांनी रात्रीतून बहुमताचा दावा केला, तो राज्यपालांनी मान्य केला, राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि शपथविधीही पार पडला... हे सगळं इतक्या वेगात आणि एका रात्रीत घडलं की, ते एक स्वप्न वाटावं. हा वेग भारतीय क्रिकेट संघातील सध्या सुरू असलेल्या बांगला देश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या गोलंदाजीच्या वेगाला लाजवणारा आणि म्हणूनच आश्चर्यचकित करणारा ठरला! महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला हा मोठा भूकंप आहे आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहणार आहेत.

वर उल्लेख केलेल्या पथ्यांचा विचार केला तर पहिली बाब म्हणजे हे सरकार स्थापन होण्याबाबतच्या बातम्यांच्या संदर्भात माध्यमे चक्क तोंडावर आपटली आहेत आणि एकूणच माध्यमांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पहिलं म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चाणक्य/शिल्पकार ठरवण्याची माध्यमांची ‘old man in hurry for… सारखी घाई (पुन्हा एकदा) अंगलट आलेली आहे.

दुसरं म्हणजे नेमकी बातमी शोधण्यापेक्षा तथाकथित सूत्रांच्या हवाल्यानं नको पतंगबाजी करण्यात, भाकितं करण्यात आणि भविष्य वर्तवण्यात विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या गुंतल्या आणि तोंडघशी पडल्या, पण यातून कोणताही धडा ही माध्यमं घेणार नाहीत आणि यापुढेही त्यांचं वागणं असंच पिसाटल्यासारखं सुरू राहणार, असाच आजवरचा अनुभव आहे.

शरद पवार राजकारणी म्हणून बेभरवशाचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अजित पवार यांच्या बंडानं सर्वांत मोठी नामुष्की शरद पवार यांच्याच वाट्याला आलेली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात काही तरी वेगळं शिजतं आहे, याचा वास घेण्यात माध्यमंही साफ अयशस्वी ठरली. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असं ते जेव्हा म्हणाले तेव्हाच मनात पाल चुकचुकली की, ‘दया, कुछ तो गडबड हैं’. मग शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला तरी धोरण मात्र आस्ते कदम ठेवलं. पवार यांच्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या हालचाली आणि वक्तव्ये परस्परविरोधी होती (ती ‘पवारभक्त पत्रकारां’ना नेहमीप्रमाणे ‘चाणक्य नीती’ वाटली आणि दररोज पवारभक्तीची एक तरी कमेंट टाकल्याशिवाय त्यांचा घास घशात उतरेनासा झाला!)  

‘सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही’ असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी हे ट्विट केलंय ते सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी (या वेळेबाबत पवार भक्त वेगवेगळी स्पष्टीकरणं देतील आणि वाद घालतीलच!) आणि नव्या सरकारचा शपथविधी झाला सकाळी ८ वाजता! या ट्विटमध्ये ‘बिटवीन द लाईन्स’ वाचण्यासारखं काही आहे. नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही हे खरं, पण शरद पवार यांना हा निर्णय माहिती असण्याबाबत मात्र ‘सूचक मौन’ पाळण्यात आलेलं आहे. ट्विटची वेळ आणि हे सूचक मौन लक्षात घेता अजित पवार यांच्या या निर्णयाबाबत शरद पवार अनभिज्ञ होते किंवा आहेत, असं मुळीच म्हणता येणार नाही.

यावरून शरद पवार यांनी १९७८साली काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या कृतीची आठवण झाली. त्यावेळी शरद पवार यांचे राजकीय गुरू आणि गॉडफादर यशवंतराव चव्हाण यांचाही वसंतदादा सरकार पडण्याच्या कृतीला पाठिंबा नव्हता, पण शरद पवार यांच्या वसंतदादा पाटील यांचं सरकार कृतीबद्दल यशवंतराव अनभिज्ञ मात्र मुळीच नव्हते. अगदी तसंच यावेळी घडलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते सरकार पाडण्याची कृती शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या ‘पाठीत खंजीर खुपसला’ म्हणून गाजली होती. अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या या २०१९ मधील कृतीलाही ‘काकाच्या पाठीत पुतण्यानं खंजीर खुपसला’ असं संबोधता येईल. मात्र त्यासंदर्भात काका अनभिज्ञ होते असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. अजित पवार यांच्या या कृतीनं खंजीर खुपसण्याचं एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे, असंही तर म्हणता येईल. शिवाय खंजीर म्हणजे, आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसनंच अजित पवार यांच्या हाती सोपवलेलं होतं, हेही विसरता येणार नाही. आणखी एक म्हणजे, वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्याच्या म्हणजे शरद पवार यांच्या त्या कृतीचं जे समर्थन करतात, त्यांनी अजित पवार यांच्या कृतीला विरोध करणं हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.

अजित पवार यांच्या निर्णयातून अनेक पेच निर्माण होणार आहेत. दूरगामी परिणाम होणार आहेत. विधानसभेवर विजयी झालेले जे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटले आहेत, त्यांच्याबाबत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अनुषंगानं कीस काढला जाणार आहे, कोर्ट-कचेऱ्या होणार आहेत आणि त्यात बराच वेळ जाणार आहे. नवीन सरकारलाही स्थैर्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. या सरकारचा खरा कस विधानसभेचा अध्यक्ष निवडताना लागणार आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात जर भाजप आणि अजित पवार गट यशस्वी झाला तर मग मात्र पहिली लढाई जिंकून मैदान बऱ्याच अंशी साफ होईल. अन्यथा ३० नोव्हेंबरनंतर हे सरकार अस्तित्वात नसेल हे नक्की.

राज्यात सरकार स्थापनेच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावलेला आहे, एवढेच या घटनेचे परिणाम सीमित नाहीत. या निर्णयामुळे हे तीनही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेला आहे. हे नेते सत्ता मिळवण्यासाठी किती उतावीळ झालेले आहेत हेच समोर आलेलं आहे. त्यातही शिवसेनेची अवस्था तर ‘गाढव गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’ अशी झालेली आहे. आजवरच्या राजकीय जीवनात शिवसेनेची इतकी नामुष्की आणि पीछेहाट कधीच झालेली नव्हती. भाजपची साथ सोडण्याचा निर्णय हा केवळ हट्ट आहे, त्यात समंजसपणा नाही. आधी आपली ताकद वाढवावी आणि मगच युती तोडावी मात्र काँग्रेससोबत जाऊ नये, अशी भूमिका सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं होतं. पण संजय राऊत नावाचा ‘एचएमव्ही’ वारू वेगात दौडत निघालेला होता. वेगावर नियंत्रण नाही ठेवलं की, अपघात होतो हेच या वारूनं दाखवून दिलंय.   

सरकार स्थापनेबाबत दोन आठवड्यापूर्वीच्या लेखात म्हटलं होतं, राजकारण्यांच्या या वागण्याचं मुळीच आश्चर्य नाहीये कारण सर्वपक्षीय राजकारणी केवळ सत्तेचाच विचार करतात आणि ती मिळवण्यासाठी राजकीय विचार, तत्त्व, निष्ठा, साधनशुचिता, नैतिकता खुंटीला टांगून कोलांटउड्या मारत असतात. लोकशाही वाचवणं, धर्मांध शक्तीला विरोध, अमुक तमुकच्या हितासाठी, निवडणुकीतील आश्वासने ही धूळफेक असते, असा गेल्या ४० वर्षांच्या पत्रकारितेत असंख्य वेळा आलेला अनुभव आहे.

भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचं वागणं काय किंवा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणं काय, त्या म्हणण्याचं समर्थन करणारं आहे. सरकार स्थापनेचा जो काही खेळ एका रात्रीतून झाला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. ते या केंद्रस्थानी राहतात की बहुमताची लढाई हरतात, हे ३० नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vishal Rathod

Wed , 27 November 2019

बर्दापुरकर सर,पवारभक्त आणि भाजपभक्त मी नाही,परंतु लेखाच्या अनुषंगाने म्हणायचे झाले तर तुम्ही वर्तवलेली 30 नोव्हेंबर ची वाट सुद्धा पवारांनी पाहिली नाही.आज 26 लाच मा.मुख्यमंत्री यांनी राजीनामा देऊन झालाय.तुम्हीसुद्धा घाई केली की काय!! आतमध्ये काहीही झालेलं असो,साध्य हे सत्तासंपादनेचं होतं,ज्यामध्ये सध्या तरी भाजपविरोधी आघाडीला यश आलेलं दिसतंय. बाकी राऊत लोकांना स्पष्टवक्ता आणि शिवसेनेच्या घुसमटीला छेदणारा मनुष्य म्हणून भिडत चाललाय(इंटरनेट च्या मिम्स आणि पोस्ट्स च्यानुसार तसेच कट्टयावरच्या गप्पांनुसार). धन्यवाद


Gamma Pailvan

Sun , 24 November 2019

चुकलो. वेळ ०९२७ हवी होती.
-गामा पैलवान


Gamma Pailvan

Sun , 24 November 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर,

तुम्ही जे ट्विट म्हणताय ते हे आहे : https://twitter.com/PawarSpeaks/status/1198087830573965312
मात्र याची वेळ सकाळी ०८२७ ही आहे. बहुधा जुनं ट्विट साहेबांनी उडवून उशिराच्या वेळेस नवं केलेलं दिसतंय. असो. मात्र

...सकाळी साडेसहा-पावणेसातला एका सहकाऱ्याने टेलिफोन करून कळवले की आम्हाला इथे राजभवनला आणले गेले आहे.

हे सांगायला काका विसरले नाहीत. ज्याने त्याने आपापला बोध घ्यावा.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......