टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • तिरुपती बालाजी, शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, आमीर खान आणि मोहन भागवत
  • Thu , 29 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या तिरुपती बालाजी Tirupati Balaji शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती Shankaracharya Vasudevanand Saraswati आमीर खान Aamir Khan मोहन भागवत Mohan Bhagwat

१. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात आधार कार्ड बंधनकारक करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही आधार कार्डाची आवश्यकता भासणार आहे. विना आधार कार्ड मंदिरात प्रवेश करता येईल परंतु देवाचे दर्शन आणि प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू घेण्यासाठी मात्र आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

अरे वा! आता लौकरच भाविकांच्या स्वप्नात दृष्टान्त देतानाही देव म्हणणार, खरं तर मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो होतो आणि तुझ्यावर कृपेचा वर्षाव करणार होतो- पण, तुझ्याकडे आधार कार्ड नसल्याने मी तुला कृपाप्रसादही देऊ शकत नाही आणि आधार देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने निराधार होतील ना आता 'निराधार' भक्त!

…………………………………

२. जे लोक हिंदू धर्मापासून दूर गेले आहेत. त्यांची घरवापसी करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

मोहनराव, हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांनाच नव्हे, तर अन्यधर्मियांनाही सहिष्णु, प्रगतिशील, आध्यात्मिक जगद्गुरू वगैरे वगैरे असलेल्या हिंदू धर्माची जाम ओढ लागलेली आहे. त्यांना फक्त एकच प्रश्न पडलाय… घरवापसी केल्यावर त्यांची जात कोणती असणार? सगळ्यांना ब्राम्हण किंवा अन्य तथाकथित उच्च जातीच हव्या आहेत. काय सांगू त्यांना?

…………………………………

३. आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदूंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर हम दो हमारे दो, हे सरकारी आवाहन नजरेआड करून एकेका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्यं जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचं पोट भरण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. : ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती

आजकाल एक गंमत होऊन बसलेली आहे. घरदार त्यागून सोयीस्कर फकिरी स्वीकारलेले भोट संसारी जनांना सल्ले देत फिरतात. या शंकराचार्यांनी उंटावरून शेळ्या न हाकता आधी संसारात उतरावं, आपण दहा पोरं जन्माला घालावीत आणि त्यांच्या लालनपालनाचं कर्तव्य पार पाडल्यानंतर त्या अनुभवातून सिद्ध झालेलं ग्यान लोकांना द्यावं. स्त्रियांना मुलं जन्माला घालण्याचं मशीन समजतात की काय हे शंकराचार्य?

…………………………………

४. नक्षल कमांडर आणि चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही पैसे देऊन खरेदी केले आहे; त्यामुळे आमचे आता कुणी काही बिघडवून शकत नाही, अशी मग्रुरीची भाषा लॉयड मेटल्स व्यवस्थापनाने सुरू केल्याने संतापलेल्या ३०-३५ नक्षलवाद्यांनी सूरजागड येथे या कंपनीची ७८ वाहने काही मिनिटांत जाळून टाकली आणि नक्षलवाद्यांची हिंस्त्र चळवळ जिवंत असल्याचं दाखवून दिलं.

अरेच्चा, पण, नोटाबंदीमुळे या चळवळीचं कंबरडं पुरतं मोडलं होतं ना? मग नेत्यांना पैसे देऊन विकत घेण्याची व्यवस्था कंपनीने कशी केली असेल? पेटीएममधून पाठवले की जनधन खात्यांत भरले? की नक्षलवाद्यांनीही कॅशलेस चळवळ चालवायला सुरुवात केली? तसं असेल तर मग हे केंद्र सरकारचं केवढं मोठं यश म्हणायचं!

…………………………………

५. अभिनेता आमीर खान याच्या एका वक्तव्याचा संदर्भहीन विपर्यास करून त्याच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारल्यानंतर स्नॅपडील या रिटेल वेबसाइटच्या ब्रॅंड अम्बेसिडर पदावरून त्याला हटवण्यासाठी देशभर चालवली गेलेली ऑनलाइन मोहीम सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखानेच सुरू केली होती, असा आरोप त्याच्याच एका माजी सहकारी महिलेने केला आहे. साध्वी खोसला ही महिला याच आयटी सेलची स्वयंसेवक होती. आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांनी सोशल मीडियाचा वापर करून आमिरच्या विरोधात मोहीम चालवली आणि स्नॅपडीलवर दबाव आणला, असा आरोप साध्वीने 'आय अॅम अ ट्रोल' या स्वाती चतुर्वेदी लिखित पुस्तकात केला आहे.

साध्वीताई, इतक्या उशिराने इतका निरर्थक गौप्यस्फोट करण्यात काय हशील? सोशल मीडियावर या असल्या मोहिमा, नोटेतल्या चिपांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातल्या छुप्या हेरगिरी यंत्रणांपर्यंतच्या विनोदी बातम्या कुठून प्रसृत होतात, हे सोशल मीडियावरच्या सगळ्यांना ठाऊक आहेच की! शिवाय, दिवंगत राजीव दीक्षितांना स्मरून चाललेलं महान वैज्ञानिक कार्यही लोकांपर्यंत त्याच वाटेने पोहोचत असणार, हो ना?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......