पर्जन्याआधीची पिडा
पडघम - राज्यकारण
आसाराम लोमटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 01 July 2019
  • पडघम राज्यकारण दुष्काळ महाराष्ट्र आसाराम लोमटे साधना साप्ताहिक

मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद आहे. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियावर पावसाच्या कविता, आठवणी यांची नेहमीप्रमाणे उधळण सुरू आहे. मात्र महिनाभरापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण म्हणावा असा दुष्काळ होता. कथाकार, पत्रकार आसाराम लोमटे यांनी या दुष्काळाचा प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यातून ‘साधना’ साप्ताहिकाचा ५६ पानी रंगीत अंक तयार झाला. हा अंक आज, १ जुलैपासून सर्वत्र उपलब्ध होत आहे. या अंकासाठी लोमटे यांनी लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावलीय. ‘असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा’, ही कविकल्पना म्हणून ठीक असली तरी, एवढा उशिरा येणारा पाऊस कित्येक जीवांचा अंत पाहणारा असतो. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. महाराष्ट्रातल्या दीडशे तालुक्यांमध्ये सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला. तसा दुष्काळ हा काही अचानक टोळधाडीसारखा येत नाही. त्याची चाहूल आधीच लागलेली असते, अंदाज आलेला असतो. दुष्काळात होरपळणार्‍यांची जी दुर्दशा होते, त्याला केवळ निसर्गच जबाबदार असतो असेही नाही. शिवाय दुष्काळ हा काही फक्त अन्नधान्याचा, पाण्याचाच नसतो- तो नियोजनाचा, धोरणांचा, राजकीय इच्छाशक्तीचा व मूलभूत उपायांचाही असतो.

‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा माझा लेख एप्रिलमध्ये दै. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे डोक्यात होते. हा लेख वाचूनच ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी साधनाचा एक पूर्ण अंकच दुष्काळावर करण्याची कल्पना बोलून दाखवली. चर्चेतून या अंकाला आकार येत गेला. मग तो अंक संपूर्ण एकहातीच करावा, असे त्यांनी सुचवले. अंकातील सर्व मजकूर एकट्यानेच लिहून काढण्याचे आव्हान होते. प्रत्यक्ष कामाचे स्वरूप ठरल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणार्‍या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने फिरता आले. 

४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणार्‍या रयतेच्या कहाण्यांचा दाह  शरीर-मनाला चटके देणाराच होता. दुष्काळ सोसणार्‍या आणि दुष्काळाशी दोन हात करणार्‍यांशी यानिमित्ताने संवाद साधता आला.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

मराठवाड्यातल्या मंठा, केज, धारूर, भूम, परांडा; विदर्भातल्या लोणार, बुलढाणा, रिसोड, वाशिम, यवतमाळ, अमरावती; माणदेशातल्या सांगोला, आटपाडी, माण, खटाव, जत आणि खानदेशातल्या पारवा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन दुष्काळाची दाहकता समजून घेतली. 

किती तरी गोष्टी नव्याने कळत गेल्या. यातूनच जाणिवा विस्तारतात, आकलनाच्या कक्षा रूंदावतात. समाज मन समजून घेण्याचा पैस वाढतो. असे अनुभव आपल्यालाही खूप काही नव्याने शिकवणारे असतात. आता पावसाने सुरुवात केलीय. अर्थात पाऊस पडला म्हणजे अचानक परिस्थिती बदलते असे होत नाही. आपण मात्र लगेच वेगळ्या परिवेषात जातो. झाडा-पानांवरून निथळणारा पाऊस आणि थंडगार वार्‍याचा स्पर्श यामुळे आधीच्या चटक्यांचा विसर पडू लागतो. एवढेच नाही तर पडत्या पावसात दुष्काळ हा शब्द उच्चारणेही अस्थानी वाटू लागते. पुढची भयाण चाहूल लागेपर्यंत तरी आपल्याला कशाचीच आच लागत नाही. तसे होऊ नये. पर्जन्याआधीची पिडा समजून घ्यावी एवढेच म्हणणे आहे.

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......