काँग्रेससाठी आता ‘करो या मरो’ स्थिती!
पडघम - देशकारण
मोहम्मद अयुब
  • काँग्रसचे बोधचिन्ह
  • Wed , 29 May 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi नेहरू Nehru नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

ज्या काँग्रेस पक्षाने महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आणि पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्र उभारणी केली, तो आता मरणासन्न अवस्थेत आहे. १९७०च्या दशकात जेव्हा इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली, तेव्हाच काँग्रेस उतरणीला लागायला सुरुवात झाली होती, पण २००४ आणि २००९ मधील अनपेक्षित विजयाने ती प्रक्रिया तात्पुरती बदलली. २०१४ मधील निवडणुकीने स्पष्टपणे दाखवून दिले की, भविष्यातील भारतीय राजकारणाच्या संदर्भात काँग्रेस पक्ष पुष्कळच संदर्भहीन झाला आहे. २०१९च्या निवडणुकीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या घसरणीची कारणे म्हणजे पक्षात खोलवर रुजलेली हांजी हांजी करण्याची संस्कृती आणि वैचारिक कणा नसणे.

हांजी हांजी करण्याची संस्कृती

पक्षाच्या वरच्या पातळीवर हांजी हांजी करण्याची संस्कृती अनेक दशके होती. आणीबाणीच्या काळात पक्षाध्यक्ष देवकांत बरुआ यांनी तयार केलेल्या ‘India is Indira, Indira is India’ या प्रसिद्ध घोषणेतून तिला मूर्त स्वरूप आले. कोणतेही अधिकृत पद नसताना ज्या प्रकारे आणीबाणीत संजय गांधी यांनी घटनाबाह्य अधिकार वापरले, तेव्हाही ती दिसून आली होती. १९८४ मध्ये आईच्या हत्येनंतर राजकारणात नवखे असलेल्या राजीव गांधींची पंतप्रधानपदी झालेली निवड हेच दर्शवते की, खुशमस्करेपणाची संस्कृती काँग्रेसमध्ये इतकी खोलवर रुजली आहे, की त्यातील नेत्यांना गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणी पंतप्रधान होऊ शकतो, याचा विचारही अशक्य वाटला. राहुल गांधींना राजकारणात कसलाही अनुभव नसताना आणि त्यांची राजकीय अपरिपक्वता स्पष्ट दिसूनही २०१७ मध्ये त्यांना पक्षाचा अध्यक्ष केले गेले आणि नरेंद्र मोदींविरुद्ध पंतप्रधानपदाचा पर्याय म्हणून दर्शवले गेले. नंतर प्रियांका गांधी यांचे त्यांच्या आजीशी असलेले साम्य मतदारांना आकर्षित करू शकेल, या निष्फळ आशेने २०१९ मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक केली गेली.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी २०१४ नंतरच्या वाताहतीनंतर पुढचा आणखी कठीण काळ ओळखून त्यांचे नेतृत्व सोडू शकले नाहीत. यातून त्यांची राजकीय भाबडेपणापेक्षा स्वतःच्या फायद्यासाठी काय वाट्टेल ते झाले तरी पक्षावर स्वतःचे नियंत्रण ठेवण्याची इच्छा दिसते. जे पक्ष निवडणूक हरतात, त्यांच्या नेत्यांनी आपले पद ताबडतोब सोडण्याचा रिवाज ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या लोकशाहीची जुनी परंपरा असलेल्या देशांत आहे. त्या परंपरेला न जुमानता त्यांनी पायउतार होण्यास नकार दिला. आता २०१४च्याच निकालावर २०१९ने शिक्कामोर्तब केले आहे, तेव्हा पक्षाच्या हितासाठी सर्व गांधी कुटुंबियांनी त्यांच्या पक्षपदांचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

‘सौम्य’ हिंदुत्व

दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाने त्याच्या मूळ विचारधारेपासून पूर्णपणे दूर जाणे. ही प्रक्रियासुद्धा इंदिरा गांधींपासून सुरू झालेली आहे. त्यांनी १९८० मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी बिनदिक्कतपणे ‘हिंदू कार्डा’चा वापर केला होता. राजीव गांधी हिंदू-मुस्लीम या दोघांनाही खुश करत राहिले. शहाबानो या घटस्फोटीत मुस्लीम महिलेला नवऱ्याने पोटगी नाकारली असताना सर्वोच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल  दिला. त्याविरुद्ध जाऊन राजीव गांधींनी लोकसभेत कायदा संमत करून घेतला. मुस्लीम समाजातील टोकाच्या प्रतिगाम्यांना खुश करण्यासाठी हे त्यांनी केले. यावर टीका झाली म्हणून आणि तोल साधण्यासाठी म्हणून त्यांनी कट्टर हिंदू भावनांना गोंजारत बाबरी मशिदीच्या आवारात धार्मिक विधींना परवानगी देण्यासाठी मशिदीचे दरवाजे उघडले.

हिंदू समाजातील कट्टर मानसिकतेला शरण जाण्याचे अखेरचे कृत्य म्हणजे १९९२मध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जमावाकडून बाबरी मशीद उदध्वस्त केली जात असताना केंद्रातील काँग्रेस सरकार ते मूकपणे पाहत राहिले.

२०१४ च्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा धडा शिकला. तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा विकला जाऊ शकतो आणि जर तुम्ही हिंदू राष्ट्रवाद्यांचा पराभव करू शकत नसाल तर त्यांना सामील व्हा. राहुल गांधींनी आपण जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगत गेल्या दोन वर्षांत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. २०१९ च्या निवडणुकांआधी ‘धर्मनिरपेक्षता’, ‘अल्पसंख्याक’ ‘जमावाकडून हत्या’ हे शब्द काँग्रेसच्या बोलण्यातून पूर्णपणे नाहीसे झाले होते. काँग्रेसची प्रतिमा ‘मुस्लीमांचे तुष्टीकरण’ करणारा पक्ष अशी नाही, तर भाजपसारखा निष्ठावान हिंदूंचा पक्ष आहे, हे दाखवण्यासाठी ती मुद्दाम आखलेली खेळी होती. भाजपच्या ‘कट्टर’ हिंदुत्वाविरुद्ध काँग्रेसने ‘सौम्य’ हिंदुत्वाची प्रतिमा दाखवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न केला.

भाजपच्या मूळ कल्पनेची काँग्रेसने भ्रष्ट नक्कल करावी आणि त्याला भारतीय मतदारांनी पाठिंबा द्यावा इतके काही ते भाबडे नाहीत, हे राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांच्या लक्षात आले नाही असे दिसते. शेवटी काँग्रेस पक्ष काय करून बसला, तर हिंदू राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद या दोन संकल्पनांची सरमिसळ करण्यास मदत करून संघ परिवाराने पुढे आणलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला त्याने अधिकृत स्वरूप आणले.

काँग्रेस पक्ष आता पुन्हा नवजीवन मिळवण्याचा प्रयत्न एकाच मार्गाने करू शकतो. तो म्हणजे हांजी हांजी संस्कृती सोडणे, ‘राजघराणे’ कल्पनेला मूठमाती देणे, पक्षातील अंतर्गत लोकशाही पुनर्प्रस्थापित करणे आणि कसलाही किंतु न ठेवता महात्मा गांधी-पंडित नेहरू यांनी ज्या मूळ सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांचा अंगीकार केला होता, त्याकडे परतणे. हे जर त्या पक्षाने केले नाही, तर तो इतिहासजमा झालेला दिसेल.

मराठी अनुवाद - माधवी कुलकर्णी

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख दै. ‘हिंदू’मध्ये २४ मे २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा