लोकशाहीविरुद्ध उठणारी वादळे
पडघम - देशकारण
पुरुषोत्तम गणेश मावळंकर
  • ‘लोकशाहीचे स्वरूप’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 23 May 2019
  • पडघम देशकारण लोकशाही Democracy एकाधिकारशाही Monarchy मतदान Voting मतदार Voter पुरुषोत्तम मावळंकर Purushottam Mavalankar

पुरुषोत्तम मावळंकर (३ ऑगस्ट १९२८- १४ मार्च २००२) हे भारतीय लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर यांचे चिरंजीव. ते अहमदाबादमध्ये जन्मले-वाढले. नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटीकल सायन्सेस या प्रख्यात संस्थेत उच्चशिक्षण घेतले. तिथे ब्रिटिश लोकशाही सुघड बनवण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रा. हेराल्ड लास्की यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मावळंकर यांनी अहमदाबादला ‘लास्की इन्स्टिट्यूट’ सुरू केली. आयुष्यभर प्राध्यापक, प्राचार्य म्हणून काम केले. सत्तरच्या दशकात ते लोकसभेचे सदस्य होते. जनता उमेदवार म्हणून ते प्रचंड बहुमताने निवडून आले होते. लोकसभेतील एक व्यासंगी, शालीन, निर्भय, निर्वेर, निष्पक्ष, समतोल सभासद म्हणून त्यांनी मान्यता मिळवली. आज भारतीय लोकशाहीच्या आयुष्यातला एक निर्णायक दिवस. त्यानिमित्तानं मावळंकरांच्या पुस्तकातील हे एक प्रकरण.

...............................................................................................................................................................

लोकशाहीच्या विरुद्ध सतत अनेक वादळे उठत असतात. राजेशाहीत राजा निकामी झाला तर काम बिघडते; पण लोकशाहीत लोकांचा निरुत्साह आणि कंटाळा सगळ्या समाजाला बिघडवून टाकतो. लोकशाहीचा जयघोष करणे सोपे आहे, तिला पचवणे फार अवघड आहे. लोकशाहीत प्रत्येकाने स्वत:च पचवण्याची क्रिया करावयाची आहे. दुसऱ्याने काम करायचे आणि आपण यश भोगायचे असे यात चालणार नाही.

लोकशाहीच्या विरुद्ध वादळे तसे पाहिले तर अनेक आहेत आणि अनेक दिशांनी ती आक्रमण करून येतात. व्यक्तिवादाच्या नावावर, कोणा सज्जन माणसाच्या नावावर, एखाद्या आदर्श पुरुषाच्या नावावर लोकशाहीच्या विरुद्ध आघाडी उघडली जाते. सगळ्या लोकांनी म्हणे राज्य चालवायचे हे शक्य तरी आहे काय? असा प्रश्न करून एखाद्या शहाण्या माणसाचे नेतृत्व मिळवण्याची खटपट होते. बहुतांशी असा शहाणा म्हटलेला एक माणूस स्वत: लोकसेवेच्या नावाने सगळे तंत्र हस्तगत करण्याच्या मागे लागतो.

लोकशाहीविरोधी दुसरे वादळसुद्धा या प्रकारच्या एकाधिकारशाहीमुळे पुढे येते. पण ही नवी एकाधिकारशाही सगळ्या समाजाविषयी गोड गोड गोष्टी करत उदयाला येते. समष्टीचे अदभुत हित करण्याकरता एखादा अवतारी पुरुष जन्माला आला आहे, अशी समजूत करून देण्याची चळवळ सुरू होते. लोकांची उदासीनता या रूपात असलेले वादळ तर लोकशाहीला सर्वांत मोठी भयावह गोष्ट आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आजचे अणुयुग म्हटले जाणारे युग एक प्रकारे निराशेचे आणि निरुत्साहाचे युग बनले आहे. या रीतीने लोक नाना प्रकारच्या दबावाखाली दडपलेले राहतात आणि रोजच्या रहाटगाड्यातून त्यांचे डोके क्वचितच वर उठू शकते. जीवनाच्या लहान लहान व क्षणभंगूर वस्तूतच अनेक लोक इतके गुंतून व गुंगून जातात की, त्यांना आपल्या तोकड्या कुंपणाच्या बाहेर जाणे किंवा पाहणे आवडत नाही. शिवाय लोकजीवनात एक वर्ग असा असतो की, जो नेहमी खटपटी करणारा, चळवळ्या आणि गडबड उडवून देणारा असतो! पण त्याची ही सर्व गडबड स्वार्थासाठी असते. सत्तेच्या भानगडी आणि स्पर्धा यांत तो नित्य रममाण झालेला असतो. अशा स्वार्थसाधूंचा लोकशाहीला कसा गराडा पडतो, ते आणखी वेगळे सांगण्याची गरज नाही. सत्तालोलुपता, स्वार्थ आणि लोभ यांतून निर्माण होणाऱ्या प्रवृत्तींची वादळे ही लोकशाहीला लागणारी कायमची ग्रहणे आहेत.

लोकांच्या पुरुषार्थाचा अभावसुद्धा लोकशाहीला अंधारात टाकून देतो. लोककल्याणाची इतकी अनेक कामे आहेत की, लोकांनी स्वत:च पुढाकार घेणे चांगले. सरकारकडून ती सगळी करवून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपणच परावलंबन ओढून घेण्यासारखे आहे. लोकशाहीत सरकारपासून तोंड फिरवण्याची जरुर नाही, तशी सरकारकडेच तोंड करून बसण्याचीही जरूर नाही. सरकारचा अतिकारभार लोकशाहीला घातक आहे. सरकार निष्क्रिय आणि निष्प्राण न राहणे हे जितके आवश्यक, तितकेच ते फाजील प्रवृत्ती वाढवणारे आणि अतिउत्साही व उद्यमी न होणे आवश्यक आहे.

लोकांच्या ऐच्छिक व सहकारयुक्त मंडळांनी सतत काम करत राहावे हे इष्ट आहे. त्यातून जे सर्जन होते ते समग्र लोकांच्या विशेष हिताचे ठरते. सरकारच्या मदतीवर आणि मेहेरबानीवर जगण्याचा मोह लोकशाहीत शक्य तितका सोडून दिला पाहिजे. लोककल्याणाकरता लोकसेवकांनी सतत लोकांच्या आश्रयावर टिकले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, सरकारची मदत आणि आर्थिक साहाय्य घेण्याविषयी तिटकारा किंवा बेफिकिरी ठेवावी. लोकशाहीत सरकार हासुद्धा लोकांचाच एक भाग आहे. म्हणून सरकारची मदत घेण्यात नामुष्कीसारखे काही नाही. कित्येक कामे अशी असतात की, ज्यात सरकारचे साहाय्य घेणे अनिवार्य होते. पण सरकारच्या तिजोरीतून प्रसाद प्राप्त करून स्वत:चे भरणपोषण करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती या लोकशाहीला फारशा पोषक ठरत नाहीत, ही मुद्द्याची गोष्ट आहे.

ऐच्छिकरीत्या काम करत राहण्यात दुसरा एक मोठा लाभ हा आहे की, समाजसेवेच्या क्षेत्रात प्रयोगशीलतेला वाव राहतो. सरकारी साहाय्य आले की, सरकारचा हस्तक्षेप, अंकुश आणि शहाणपणाचे प्रवाहसुद्धा त्याचबरोबर वाहायला लागतात. अशा वातावरणात मग प्रयोग, संशोधन, स्वतंत्र विचार वगैरेंना अवकाश राहत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकशाहीला घेरणाऱ्या वादळात भर घालणाऱ्या आणखी दोन विरोधी बळांविषयीही थोडा उल्लेख येथे केला पाहिजे. एकसारखे बोलत राहण्याच्या भोवऱ्यात लोकशाहीला गिरक्या मारायला लावण्याच्या धोक्याविरुद्ध सतत जागृत राहण्याची फार जरुर आहे. लोकशाहीत सतत चर्चा आवश्यक, याचा अर्थ अखंड चर्चाच करत राहावी असा नाही. वादविवादातून वितंडवाद निर्माण झाला की, लोकशाही अंधारली जाते. वाह्यात चर्चा थांबवली पाहिजे. व्यर्थ आणि फाजील बडबड विघ्नरूप मानली पाहिजे. म्हणजे नुसती बडबड अशी छाप किंवा आभास उत्पन्न झाला तर लोकशाहीविषयी कंटाळा वाढतो आणि त्यातूनच विरोधाची वावटळ जोर धरू लागते.

दुसरे विरोधी बळ आहे आर्थिक व्यवस्थेचे. उपासपोटी आणि अर्धनग्न शरीराने माणसे लोकशाही पचवू शकणार नाहीत. विविध स्वातंत्र्याविषयी बोलताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पहिले स्वातंत्र्य भुकेलेल्या-तहानलेल्या, उघड्या माणसांना खायला-प्यायला-ल्यायला पुरते मिळाले पाहिजे हे आहे. केवळ भाकरीवर माणूस जगत नाही हे खरे असले तरी भाकरीशिवाय माणूस कधी माणूस बनू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. जीवनाच्या दैनंदिन आवश्यकतांच्या वरवंट्याखालून जनता शक्य तितकी मुक्त राहिली पाहिजे. ते झाले नाही तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या प्रजेवर लोकशाहीविरोधी वादळे स्वार व्हायला वेळ लागत नाही.

सर्वाधिकारशाहीची प्रलोभने आणि जोखमी

सर्वाधिकारशाहीत सत्ता एकहाती असते. ‘हम करे सो कायदा’ असा तोरा त्यात असतो. लोकशाही लोकांवर विसंबून असते, तर सर्वाधिकारशाही एका माणसाच्या मुखत्यारीकडे डोळे लावून बसते. लोकशाहीत लोकभावनेची कदर होते, सर्वाधिकारशाहीत तिचा ऱ्हास होतो. सर्वाधिकारशाहीत सर्वसत्ताधीश हुकूमशहा जणू सर्कसमधल्या रिंगमास्टरप्रमाणे सर्वांना आसूड मारतो आणि स्वत:च्या इच्छेनुसार सर्वांना नाचायला लावतो. लोकांचा आत्मा सर्वाधिकारशाहीत नष्टप्राय होतो. अशा रीतीने लोकशाही आणि सर्वाधिकारशाही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, विरुद्ध दिशांना तोंडे फिरवलेली आहेत.

सर्वाधिकारशाही कशी उदय पावते त्याची थोडी चर्चा येथे लोकशाहीच्या संदर्भात केली तर ते अयोग्य होणार नाही. लोकशाहीला दुर्बल बनवूनच नेहमी सर्वाधिकारशाही स्थापली जाते असे नाही. लोकशाही शिथिल पडत चालली, वाईट बनत चालली, टीका-निंदेच्या फेऱ्यात सापडली की, मगच परिस्थितीचा लाभ घेऊन हुकूमशहा आपली वाट पाडतो आणि जम बसवतो असेही नाही. लोकशाहीची पडती म्हणजे सर्वाधिकारशाहीची चढती असे मानणे चुकीचे नाही, पण ही समजूत सर्वस्वी खरीही नाही. सर्वाधिकारशाही आपल्याकडूनसुद्धा लोकांचे चांगलेच आकर्षण निर्माण करू शकते. लोक मग मोहीत होऊन सर्वाधिकारशाहीच्या जादूच्या मायाजालात फसू लागतात. सर्वाधिकारशाहीसुद्धा नाना तऱ्हेची आकर्षणे आणि प्रलोभने दाखवते. त्यांना लोक वश होऊ लागतात. पुष्कळ वेळा असे वशीकरण अजाणता होते. लोकांत असलेल्या अज्ञानाचा आणि अजाणतेपणाचा लाभ घेऊन सर्वाधिकारशहा स्वत:चे योजलेले अमलात आणण्याला तत्पर असतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

स्थूलपणे आपली संकुचित सुरक्षितता टिकवण्यातच बहुसंख्य लोक गुंतलेले असतात. पुष्कळशी माणसे भयाकुल जीवन जगत असतात. जन्मापासूनच जणू भय हे प्रत्येक माणसाच्या पाचवीला पुजलेले असते! भयभीत लोक केवळ आपला जीव आणि मालमत्ता सांभाळून ठेवण्याच्या चिंतेत असतात. स्वत:च्या सुरक्षिततेची त्यांना काळजी असते. अंदाधुंदी आणि व्यवस्था यांना ते इतके भितात की, कोणी एक सर्वसत्ताधीश होऊन त्यांना हवी असलेली सुरक्षितता देऊ करील तर अशा माणसाची सत्ता आनंदाने मान्य करायला ते तयार होतात. निश्चित होऊन बसायला मिळत असेल तर हार पत्करण्याची त्यांना दिक्कत वाटत नाही. सुरक्षिततेच्या मागे अशी रीतीने अविरत धावण्यात सर्वाधिकाशाहीच्या उदयाची बीजे आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे.

दुसरी गोष्ट ही सुरक्षिततेची भावना केवळ शारीरिक नाही. आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततासुद्धा यात सामावलेली असते. प्रत्येकाला आपली मालमत्ता प्रिय वाटते. पुष्कळांना तर त्यांच्या स्वत:च्या आप्तांपेक्षासुद्धा आपली मालमिळकत अधिक प्रिय असते. संपत्तीकरता किंवा धनाकरता सख्ख्या भावाचे किंवा दुसऱ्या कुटुंबजनाचे डोके उडवायलासुद्धा हे धनलोभी मागेपुढे पाहात नाहीत. मिळकतीप्रमाणे कुटुंबसुद्धा प्रत्येकाला प्रिय असते. बहुतांश लोकांना रक्ताचे नातेच समजते, मानवजातीविषयीची ‘प्रेमसगाई सबसे उंची’ हे एखादा संतकवीच जाणे! म्हणून जी सत्ता लोकांच्या सामान्य मिळकतीचा आणि कुटुंबव्यवस्थेचा बचाव करेल किंवा बचाव करण्याचे यशस्वी ढोंग करू शकेल, त्या सत्तेला मान्यता द्यायला मोठ्या हौसेने लोक तयार होतात.

आर्थिक प्रगती आणि समृद्धी या बाबतीत सर्वाधिकारशाही अनेक प्रलोभने दाखवते. एकहाती सत्ता असेल तर निर्णय चटकन होतात आणि कारभार झरझर होतो, ही परिस्थिती आर्थिक कार्यक्रमाच्या दृष्टीने अनुकूल असल्यासारखी वाटते. भौतिक साधने व सोयी यांचा जास्तीत जास्त लाभदायक उपयोग करण्याची संधी यात अधिक दिसते, आणि नियोजनाचा सोयीस्करपणा विशेषकरून आढळतो. नाही तरी नियोजन म्हटले की केंद्रीकरण आलेच. जर राजकीय क्षेत्रातसुद्धा सत्ता केंद्रित असेल तर आर्थिक कार्यक्रमात एकवाक्यता आणि एकसूत्रता आणणे हे अधिक सुकर बनते. आर्थिक विकासाच्या कार्यक्रमात, पावलोपावली, अमूक वस्तू वापरायच्या नाहीत किंवा बनवायच्या नाहीत असा नियम ठेवावा लागतो. सर्वाधिकारशाही असेल तर लोकांकडून असा अमल सहजपणे करवून घेता येतो असे उघडच दिसते. आसूडाच्या जोरावर आणि दंड्याच्या भीतीने लोक चालले म्हणजे त्यांच्याकडून इष्ट ते करवून घेणे हे तात्पुरते सोपे होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुष्कळशा लोकांना आपल्या प्राथमिक गरजा पुरवल्या गेल्यानेच संतोष वाटत असतो. त्यातही जेथे बहुसंख्य लोक भयंकर गरिबीत जगत असतात, तेथे तर प्राथमिक गरजा पुऱ्या करणे हेच जणू सार्थक असते. लोकांचा जीवनाचा दर्जा सुधारणे ही गोष्ट बाजूलाच राहिली! जेव्हा कोणत्याही प्रकारचा जीवनाचा दर्जाच नसेल तेव्हा सर्वाधिकारशाहीची आर्थिक समृद्धीची जादूची कांडी भल्या-भल्यांची फसवणूक करते आणि त्यांना भ्रमात टाकते. शिकले-सवरलेलेसुद्धा मग म्हणू लागतात की, सर्वाधिकारशाहीशिवाय आपली धडगत नाही. आर्थिक समृद्धी चांगल्या प्रमाणात आणि त्वरेने आणायची असेल तर आपण सर्वाधिकारशाहीच स्वीकारली पाहिजे, असे युक्तिवाद जोरजोरात सुरू होतात. अशा वेळी फक्त लोकशाहीच्या व्यवस्थेवर केवळ टीकाच होत नाही, ‘लोकशाही हटवा’ एवढेच फक्त म्हटले जात नाही, तर उलट सर्वाधिकारशाहीची वकिली भावनोद्रेकाने आणि उत्सूकतापूर्वक ठिकठिकाणी केली जाते, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. कित्येक जण जे अधिक शिकले-सवरलेले असतात ते असे मानतात आणि समजावून देतात की, सुरुवातीला पाच-पंचवीस वर्षे सर्वाधिकारशाही मान्य करा, सर्व पदरात पाडून घ्या, आणि मग खुशाल शांतीपूर्वक लोकशाही सुरू करा! जणू लोकशाही म्हणजे एखादी शहाणीसुरती आणि आज्ञाधारक बाईच आहे, हुकूम केलात की हजर होणार आणि कामाला लागणार!

दुसरे कित्येक शहाणे मानले जाणारे लोक ‘लोकशाहीयुक्त सर्वाधिकारशाही स्वीकारा’ असे सांगतात. सर्वाधिकारशहा असला तरी तो बापडा भला नि भोळाभाबडा! त्याला सत्ता नको असते, स्वार्थ नको असतो! तो केवळ प्रजेच्या कल्याणाकरताच सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन बसतो! त्याची दृष्टी सर्वजनहिताची असते. तो हुकूमशाही आणील ती सर्वांच्या भल्यासाठी, आपला बडेजाव करण्यासाठी नाही! सर्वाधिकारशाहीच्या प्रलोभनांची आहे की नाही धन्य!

राज्यात आणि समाजात पुष्कळ कामे त्वरेने म्हणजे चांगल्या प्रकारे, कार्यक्षमतेने केली पाहिजेत असे मानून सर्वाधिकारशाहीला पसंत करणारी माणसेसुद्धा काही कमी नाहीत. कार्यक्षम, कुशल, समर्थ आणि कामसू माणसांकडून राज्यकारभार चालावा हे खरे, पण येथे युक्तिवाद हा आहे की, अशा गुणवान राज्यकर्त्यांची सर्वाधिकारशाही असेल तरच पोषण मिळते. शिस्त आणि कडक नीती-नियम सर्वाधिकारशाहीत नांदतात असे दर्शवले जाते. स्वच्छ आणि कुशल कारभार हा कोणत्याही राज्याचा पाठीचा कणाच आहे यात शंका नाही. जर कारभारात भ्रष्टाचार असेल तर सरकारची कंबर वाकेल आणि शेवटी मोडेल. म्हणून समर्थन अशा स्वरूपाचे केले जाते की, ताठ राज्यकर्ते पाहिजे असतील तर एका हुकूमशहाचे उत्तुंग राज्य स्वीकारा.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सर्वाधिकारशाहीत वेग असतो ससाण्याच्या वेगासारखा

सर्वाधिकारशाहीत समानता प्रस्थापित करता येते अशा प्रलोभनामुळेही कित्येक लोक हुकूमशाहीकडे खेचले जातात. हुकूमशहा सर्वांना एकसारखे मानतो असे म्हणतात. गोष्ट खरीच आहे. सर्व प्रजाननांना एकसारखे गुलाम आणि भोळे समजण्याचे आणि बनवण्याचे हुकूमशहाचे प्रयत्न आणि धडपड चाललेली असते हे कोण नाकारू शकेल? सगळेच गुलाम या अर्थाने समानतेची भव्य सिद्धी सर्वाधिकारशाहीत अवश्य पाहायला मिळते. सर्वांना एकसारखेच दु:खात ठेवून हुकूमशहा उत्तम समानता स्थापन करतो. सर्वांना एका तडाख्याने मार्गी लावून हुकूमशहा वरवरची समानता, शिस्त आणि संयमभावना सुखाने स्थापन करतो खरी!

परंतु सर्वाधिकारशाहीने दाखवलेल्या प्रलोभनात लाभापेक्षा गैरलाभ अधिक असतात, सुरक्षिततेपेक्षा धोका जास्त असतो, समृद्धीपेक्षा दीनता जास्त असते, प्रगतीपेक्षा अधोगती जास्त असते. मुख्य गोष्ट ही आहे की, सर्वाधिकारशाहीत आत्म्याचे निकंदन होते; व्यक्ती ही व्यक्ती न राहता जड लहानसा खिळा बनते. आणि हुकूमशहा मनाला येईल त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला इथे तिथे बसवून टाकतो. काम आणि स्थान यांना जमण्याजोगी ती व्यक्ती आहे की नाही ते पाहिले जात नाही. फक्त हुकूमशहाच्या भव्य योजनेत तिला असे बसवणे सहाय्यकारी आहे की नाही तेवढेच पाहिले जाते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सर्वाधिकारशाहीचा दुसरा धोका हा आहे की, त्यात वरवर दिसून येणारा वेग हा पुष्कळ वेळा ससाण्याच्या वेगासारखा असतो आणि त्यात भरीव व चांगले काम होऊ शकत नाही. लोकांत घाई असू नये असे नाही. उतावीळ असण्याचीही आवश्यकता आहे, असंतोषही पाहिजे. प्रगतीकरता या सर्वांची जरुरी आहे. परंतु नुसतीच धावपळ धोकेबाज आहे. सर्वाधिकारशाहीत गती पुष्कळ असते, पण ती केवळ यांत्रिक गती असते. तिच्या पाठीमागे प्रजेची शक्ती नसते. प्रवास करत असताना आपण वेगाच्या वाहनापेक्षा चांगल्या वाहनाची निवड करतो; ते चांगले असून वेगवान असेल तर काय, उत्तमच! लोकशाही आणि सर्वाधिकारशाही या दोहोंमधील निवडीतसुद्धा अशी विवेकशक्ती आपण नेहमी दाखवली पाहिजे.

सर्वाधिकारशाहीचा तिसरा धोका म्हणजे लोकजीवनात जी शिस्त आणि ऐक्य सिद्ध होत असल्याचे सांगण्यात येते, ते कृत्रिम असते. ही शिस्त आणि हे ऐक्य वरून ठोकून बसवलेले असते. स्वाभाविक क्रमाने आणि रीतीने, धक्के खाऊन आणि ठेचा लागून जी शिस्त आणि ऐक्य लोकांत येते, ते टिकावू होते. धाकदपटशाने आणि दहशतीने जे केले जाते, ते शेवटी कच्चे व क्षणभंगूरच ठरणार. लोकांनी एकमेकांशी स्वाभाविकपणे सहकार करावा हे आवश्यक आहे. संघर्ष टाळण्याची जरूर नाही. संघर्षातून मार्ग काढण्याची जरूर आहे. समतोलपणा व समभाव ठेवण्याचीही जरूर आहे. तोसुद्धा नैसर्गिकरीत्या आणि सावकाश येईल, मारूनमुटकून कोणाला कोणाचे बहीण-भाऊ बनवता येत नाही. भाईभाईचा घोष करून काही सगळे भाऊ बनत नाहीत. मनुष्यस्वभावातील दुर्बलता आणि वैशिष्ट्ये मान्य करून जी लोकशाही चालते, त्यातच गंमत आहे, तिलाच पुढची आशा आहे.

अधीरपणाने, अति उत्साहाने, धीर गमावून लोक स्वत:च्या विवेकशक्तीपासून दूर होतात हे कबूल. विलंबानेसुद्धा लोक चिडतात हे खरे. वश होण्याची वृत्ती प्रत्येकात थोडीबहुत असते हेसुद्धा खरे असू शकेल. परंतु म्हणून काही प्रत्येकाने कोणा एका सर्वोच्च नेत्याच्या ताब्यात जाण्याचा उत्साह दाखवण्याची गरज नाही. सर्वाधिकारशाहीचा आसरा घेण्याने तऱ्हेतऱ्हेचे धोके आणि जुलूम प्रजेच्या बोकांडी बसतात याची उदाहरणे इतिहासात थोडीथोडकी नाहीत.

(‘लोकशाहीचे स्वरूप’ - पुरुषोत्तम गणेश मावळंणकर, अनु. भाऊ धर्माधिकारी, सन्निष्ठ प्रकाशन, अहमदाबाद, ऑगस्ट १९७६, मूल्य – ३ रुपये.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा