चार घटकांसाठी (कसोटीचे) तीन दिवस
पडघम - साहित्य संमेलन विशेष
विनोद शिरसाठ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 11 January 2019
  • पडघम साहित्य संमेलन Sahitya Sanmelan नयनतारा सहगल Nayantara Sahgal

७ जानेवारीच्या पूर्वसंध्येला अतिशय वाईट, धक्कादायक आणि लाजीरवाणी बातमी पुढे आली आहे. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या काळात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण संयोजकांनीच मागे घेतले आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वात खळबळ माजली आहे, राग व संताप व्यक्त होत आहे, निषेध केला जात आहे, बहिष्काराचे अस्त्र उपसले जात आहे. त्यामुळे संयोजक संस्था, साहित्य महामंडळ आणि संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष हे काय भूमिका घेणार आहेत, याकडे मराठी विचारविश्वाचे लक्ष लागले आहे. आमंत्रण मागे घेतल्याची बातमी आल्यानंतरच्या २४ तासांत वरील तीनही घटकांकडून ठोस व निश्चित असा काही निर्णय आलेला नाही. साहजिक आहे. असे अनपेक्षितपणे काही घडते तेव्हा जबाबदारीच्या जागेवर असलेल्या व्यक्तींना सारासार विचार करावा लागतो आणि कमीत कमी नुकसानकारक पर्याय निवडावा लागतो.

आणि कोणताही पर्याय निवडला तरी त्याचे स्वागत व टीका वाट्याला येतच असते. त्यामुळे सद्सदविवेकाचा कौल आणि व्यापक समाजहित या दोहोंची सांगड घालणारा निर्णय घ्यावा लागतो. भल्याभल्यांसाठी ही कसोटी कठीण असते. परंतु व्यक्तीच्या व संस्थेच्याही आयुष्यात असे काही क्षण येत असतात की, त्याक्षणी त्यांचे वर्तन ऐतिहासिक दृष्टीने मोलाचे ठरत असते. त्या निर्णयाचा परिणाम, कर्तव्य बजावल्याचे समाधान किंवा कसोटीच्या क्षणी नापास झालो अशी भावना, त्या संस्थेच्या इतिहासात वा व्यक्तीच्या भावी आयुष्यात कायम रूतून बसते, कमी-अधिक प्रमाणात त्रास देत असते. भावी इतिहासकार त्या व्यक्तीचे वा संस्थेचे मूल्यमापन करताना त्या विशिष्ट क्षणी घेतलेल्या निर्णयाला विशेष महत्त्व देत असतात. असे मूल्यमापन मानवजातीच्या इतिहासात सर्वत्र होत आले आहे, यापुढेही होत राहणार आहे. कसोटीच्या क्षणी महान, थोर, बुद्धिवान, प्रतिभावान, चारित्र्यवान, धैर्यशील, तत्त्वनिष्ठ, सर्वगुणसंपन्न वगैरे समजली जाणारी माणसे नापास झाल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत. आणि लहान, बारकी, साधी, लव्हाळी वाटणारी माणसे अशा कसोटीच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन, प्रसंगी आहुती देऊन अजरामर झालेली आहेत.

तर अशा कसोटीची ही वेळ आहे. शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशी, ब्राह्मणी इत्यादी विशेषणांनी अनेकांनी हिणवले असले तरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील मराठी जनांचे, मराठी मनाचे, मराठी विचारविश्वाचे, महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च विचारपीठ राहिले आहे. शतकभराच्या वारशातून, घणाघाती वादसंवादांतून या विचारपीठाला ते स्थान मिळालेले आहे. कितीही वादावादी झाली, कितीही कमी क्षमतेची माणसे साहित्य संस्थांमध्ये आली आणि कितीही चढउतार आले तरी ते स्थान अद्यापही अबाधित आहे.

या पार्श्वभूमीवर चार घटकांच्यावर आताच्या परिस्थितीची जबाबदारी आहे; ती पार पाडण्यासाठी तीन दिवसांचा वेळ हाताशी आहे.

१. संयोजक संस्था

नयनतारा सहगल यांना या संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याचा निर्णय कोणाच्याही सूचनेनुसार झालेला असला तरी, एकदा तो निर्णय झाल्यावर व तसे आमंत्रण पाठवले गेल्यावर आणि त्यांनी ते स्वीकारल्यावर, ते आमंत्रण मागे घेणे ही संयोजकांसाठी सर्वोच्च नामुष्की आहे. भले ते आमंत्रण अजाणतेपणाने दिलेले असो. आपण उद्घाटनासाठी ते नाव मान्य करण्यात चूक केली आहे असे वाटले म्हणून किंवा अंतर्गत वा बाह्य दबावाला बळी पडून, ते आमंत्रण यवतमाळच्या संयोजक संस्थेने मागे घेतलेले आहे. एक शक्यता अशी आहे की, यातून किती मोठी नामुष्की ओढवली जाणार आहे, याचा अंदाज त्यांना आलेला नसणार. मात्र ती बातमी बाहेर आल्यावर २४ तासांत आलेल्या प्रतिक्रिया आणि पुढील आठवड्यात काय घडू शकते याचा अंदाज पाहता, संयोजकांनी नयनतारा सहगल यांची माफी मागावी आणि संभाव्य परिणाम लक्षात घेऊन उद्घाटनाला येण्याचा आग्रह पुन्हा धरावा. त्या ‘आता येणार नाही’ असे म्हणाल्या, तर ते संपूर्ण भाषण संमेलनात वाचून दाखवावे आणि त्याच्या प्रती उपस्थित श्रोत्यांना वाटप कराव्यात. असे केले तर संयोजकांची उरलीसुरली इज्जत वाचेल. मात्र संयोजकांना यात स्वत:चा अहंकार दुखावला जाईल असे वाटत असेल किंवा आमंत्रण मागे घेण्याची कृती संयोजकांनी जाणीवपूर्वक केलेली असेल आणि ‘आहे त्याच परिस्थितीत संमेलन पार पाडायचे’ असे ठरवले असेल तर मग त्यांच्यासाठी काहीही सूचना वा सल्ला नाही.

२. साहित्य महामंडळ

मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई) या चार प्रमुख घटक संस्था आणि अन्य काही उपघटक असणार्‍या संस्था यांचे मिळून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही शिखर संस्था आकाराला आलेली आहे. दरवर्षी अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी संयोजक संस्थांची निवड करण्याचे काम साहित्य महामंडळ करत असते. अर्थातच, संयोजक संस्थेची भूमिका संमेलनाच्या आयोजनात मध्यवर्ती असते. पण साहित्य महामंडळाची मूलभूत चौकट, किमान आचारसंहिता व महत्त्वाचे संकेत यांचा त्या संमेलनावर प्रभाव असतोच असतो. त्यामुळे संयोजनातील त्रुटींच्या संदर्भात सर्वसाधारण परिस्थितीत महामंडळाची भूमिका ‘समर्थनीय नाही पण क्षम्य’ अशी असू शकते. मात्र जेव्हा मर्मावर घाव घातला जातो, मूलतत्त्वांनाच छेद दिला जातो, तेव्हा साहित्य महामंडळाने कठोरातील कठोर भूमिका घ्यायला तयार असले पाहिजे. तशी वेळ आता आली आहे. म्हणून साहित्य महामंडळाने तातडीने हालचाली करून, संयोजक संस्थेला त्यांनी केलेल्या गंभीर चुकीबद्दल स्पष्टपणे खडसावून, माघार घ्यायला सांगितले पाहिजे. जर संयोजक संस्था ते मान्य करणार नसेल तर महामंडळाने त्यांना कळवले पाहिजे- ‘तुम्हाला संमेलन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने संमेलन पार पाडा, मात्र तुम्ही केलेली गंभीर चूक लक्षात घेता महामंडळ त्यात सहभागी होणार नाही.’

साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी, मोठी इच्छाशक्ती दाखवून मागील तीन वर्षांत काही मूलगामी बदल करण्याचे प्रयत्न साहित्य संमेलनांच्या आयोजनात व अध्यक्षीय निवडीच्या संदर्भात केलेले आहेत. म्हणून आता त्यांनी तातडीने सर्व घटक व उपघटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून (आपापल्या ठिकाणी राहून बैठक घेता येते) वरीलप्रमाणे निर्णय घेण्यासाठी पूर्ण ताकद लावली पाहिजे. परंतु त्यावर एकमत होत नसेल तर ‘साहित्य महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने अशा संमेलनाला मी उपस्थित राहू शकत नाही’ अशी भूमिका घेऊन ‘पुढील निर्णय साहित्य महामंडळाने घ्यावा’ असे ठामपणे सांगितले पाहिजे.

३. संमेलनाच्या अध्यक्ष

अरुणा ढेरे यांची ओळख मराठी साहित्यविश्‍वाला त्यांच्या सकस व विविधतापूर्ण साहित्यनिर्मितीसाठी जशी आहे, तशीच त्यांच्या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वासाठीदेखील आहे. २००४ मध्ये ज्येष्ठ समीक्षक रा.ग.जाधव यांना बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यानंतर तशी योग्यता असलेल्या मोजक्या नावांमध्ये अरुणाताईंचे नाव अग्रभागी घेतले जात असे. आणि त्यामुळेच, या वर्षीपासून साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक रद्द करून, साहित्य महामंडळानेच अध्यक्षाची निवड करायचे ठरवले, तेव्हा पहिला मान अरुणा ढेरे यांना मिळालेला आहे. नयनतारा यांचे आमंत्रण रद्द झाले, त्याचदिवशी सकाळी महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी अरुणाताईंचा उल्लेख ‘गोड बोलणाऱ्या आणि करारी व्यक्तिमत्त्वाच्या’ असा केला आहे. आता त्यांना मोठीच संधी प्राप्त झाली आहे. विसाव्या शतकातील इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, सुनीता देशपांडे यांच्या करारीपणाचे प्रत्यक्ष दर्शन अरुणाताईंना घडलेले आहे. एकोणिसाव्या शतकातील करारी व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महिलांची ओळख (अभ्यास व संशोधन करून) अरुणाताईंनी मराठी वाचकांना करून दिलेली आहे. आणि मराठी साहित्यातील अनेक संत कवयित्रींचा करारीपणाही त्यांनी नव्याने प्रकाशात आणलेला आहे. हे सर्व लक्षात घेता, संयोजक संस्था व साहित्य महामंडळ यांना अरुणा ढेरे यांनी ‘तर मी उपस्थित राहणार नाही’ असे नम्रपणे कळवायला हवे. आज अरुणा ढेरे यांची नैतिक ताकद इतकी जास्त आहे की, त्या एका वाक्याने सर्व चित्र पालटू शकते आणि नाहीच पालटले तरी मराठी साहित्यविश्‍वासाठी तो प्रचंड मोठ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय पुढील काही दशके तरी राहील.

४. राज्य सरकार : अखिल भारतीय मराठी साहित्य

संमेलनाच्या आयोजनात (५० लाख रुपयांची) देणगी विनाअट देणे, यापलीकडे महाराष्ट्र राज्य सरकारची काहीही भूमिका नसते (नसावीच!) मात्र आता नयनतारा यांना आमंत्रण नाकारण्याची परिस्थिती संयोजकांवर आली, त्याची दोन कारणे पुढे आलेली दिसतात. एक- सत्ताधारी पक्षाचे लोक किंवा सरकारशी संबंधित घटकांनीच अशी परिस्थिती आतून निर्माण केली. दुसरी शक्यता- अन्य संघटनांनी वा व्यक्तींनी दिलेली धमकी व आणलेला दबाव. वरील दोन्हींपैकी काहीही खरे असले तरी राज्य सरकारने ते दोन्ही प्रकार कठोरपणे हाणून पाडावेत, संयोजक संस्थेला पूर्ण आश्वस्त करावे आणि हे संमेलन नयनतारा सहगल यांच्यासह (त्या नाही आल्या तर त्यांच्या भाषणासह) पार पाडण्यासाठी आवश्यक ती सुरक्षितता द्यावी. असे करणे हे राज्य सरकारचे किमान कर्तव्य ठरते.

वरील चारही प्रमुख घटकांनी दुर्लक्ष केले आणि आहे त्या परिस्थितीत वरवरची मलमपट्टी करून संमेलन पार पाडायचे ठरवले तर समस्त मराठीजनांनी सनदशीर मार्गांनी आपापला निषेध नोंदवावा, बहिष्काराचे अस्त्र चालवावे. नयनतारा सहगल यांचे भाषण, त्यात मांडलेले विचार व केलेले भाष्य मागील तीन-चार वर्षांत सर्वत्र व्यक्त झालेलेच आहेत. काहींना ते पूर्णत: मान्य आहेत, काहींना अंशत: मान्य आहेत, काहींना पूर्णत: अमान्य आहेत. त्यावर वाद-चर्चा व टीका करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १९ जानेवारी २०१९च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......