टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शशी थरुर, सुब्रह्मण्यम स्वामी, रेड्डी कन्येचा शाही विवाह आणि पतंजली उत्पादने
  • Sat , 19 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali शशी थरुर Shashi Tharoor सुब्रह्मण्यम स्वामी Subramanian Swamy

१. नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच अर्थ खात्याने आपत्कालीन नियोजन करून ठेवायला हवं होतं. तसं केलं असतं, तर लोकांना त्रास सहन करावा लागला नसता : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी हे एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही पंचाईत करतात, हे त्यांचं अदभुत सामर्थ्य आहे. आता स्वामी हुशार आहेत, बरोबरच बोलतात, असं सत्ताधारी किंवा भक्तगण म्हणू शकत नाहीत आणि ते तर निव्वळ वाचाळशिरोमणी आहेत, असं विरोधक किंवा अभक्तगण म्हणू शकत नाहीत.

...............

२. हजारो कोटींचे कर्ज थकवणाऱ्या धनाढ्य कर्जदारांनी वेळोवेळी परतफेड केली असती या देशाची अर्थव्यवस्था कोसळली नसतीच. पण त्यासोबतच हा नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला नसता : शिवसेना

व्हिडिओकॉनने पक्षाला ८५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी नेमकी याच दिवशी यावी, एवढा एक विलक्षण योगायोग सोडला, तर बाकी सगळं बरोबर आहे. आता निदान या कर्जबुडव्यांकडून मुखपत्राच्या मुखपृष्ठावरच्या जाहिरातींसाठी वार्षिक करार तरी करून घ्या घसघशीत. जनतेपर्यंत ज्वलंत विचार तरी पोहोचत राहतील व्यवस्थित.

...............

३. उदारमतवादी इतिहासकारांचं मत काहीही असलं, तरी ब्रिटिश राजवट अन्यायकारकच होती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी २०१६च्या सुरुवातीला तिथल्या शिखांची जाहीर माफी मागितली. ब्रिटिश पंतप्रधानांनीही जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी : डॉ. शशी थरूर

त्यानंतर लगेचच १९८४च्या दंगली आणि शीख हत्याकांडासंदर्भात, देशातल्या ६० वर्षांच्या दिशाहीन, भोंगळ कारभाराबद्दल, साफ चुकलेल्या निर्णयांबद्दल काँग्रेस पक्षही माफी मागेल देशाची, हो ना थरूरसाहेब?

...............

४. रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहात शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्यासाठी विदेशात नव्याने वापरलं जाणारं भ्रूण प्रत्यारोपणाचं (एम्ब्रिओ ट्रान्स्फर) तंत्र आता वापरलं जाणार. त्यामुळे भारतीय गोवंशाच्या आनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती होऊन ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध मिळणार.

देवा देवा देवा, केवढा हा अनाचार? देशी गाईंचा वंश सुधारण्यासाठी विदेशी तंत्राचा वापर? आपल्या देशात हजारो वर्षांपासून प्लास्टिक सर्जरीचं (तीही हत्तीचं मुख मानवी धडावर बसवणारी) तंत्र विकसित झालेलं असताना, पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिलेला असताना साक्षात देशी गोमातेसाठी विदेशी तंत्रज्ञान? दुधाबिधाचं जाऊद्याहो, ते नसलं तरी चालतं… आपले ३३ कोटी देव राहतील ना सुखरूप या नव्या देशी गायींच्या पोटात? गोठ्यात आणताना गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्ध करून घेत चला, बरं का!

...............

५. कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या शाही विवाहसोहळ्यावर पाचशे कोटींचा खर्च; सर्व खर्च चेकनं केल्याचा रेड्डींचा दावा.

भर मांडवात नाट्यमय पद्धतीने आर्थिक विभागांचे अधिकारी काही कारवाई करतील, अशी अपेक्षा असताना खुद्द शुचितासम्राट येड्युरप्पा यांनी दोन वेळा हजेरी लावल्यामुळे लग्नकार्य पवित्र करून घेण्यात आलेलं आहे, हे स्पष्टच आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मंदीचं सावट पसरलेलं असताना लग्नाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला रोखविहीन चालना दिल्याबद्दल रेड्डी बंधूंचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानपूर्वक पक्षात परत आणलं पाहिजे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......