भारतातील आर्थिक विषमतेला जातिसंस्थाच कारणीभूत आहे!
पडघम - अर्थकारण
हितेश पोतदार
  • ल्युकस चॅन्सेल आणि थॉमस पिकेटी
  • Mon , 22 January 2018
  • पडघम अर्थकारण ल्युकस चॅन्सेल Lucas Chancel थॉमस पिकेटी Thomas Piketty कॅपिटल इन द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी Capital in the Twenty-First Century

भारताचे दुर्दैवंच आहे की, आपले प्रश्न आपल्यालाच सांगायला बाहेरची व्यक्ती लागते. (नाहीतरी आपणच प्रश्न उपस्थित केले तर अँटी-नॅशनल ठरतो). यंदा  निमित्त झालं अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी आणि लुकास चान्सेल यांचं. नुकताच या जोडगोळीनं भारतातील विषमतेवर अहवाल काढला. ज्याची चर्चा बऱ्यापैकी माध्यमांमध्ये झाली. परंतु अहवाल जसा आहे तशाच चौकटीबद्ध रचनेत त्याची चर्चा झाल्याचे दिसून आले. त्याचे अर्थ-अन्वर्थ, चिकित्सात्मक विश्लेषण फार कमी प्रमाणात आपण केले. आणि तसे विश्लेषण होणे हे क्रमप्राप्त होते, कारण कितीही बाहेरच्या व्यक्तींनी आपले प्रश्न आपल्यालाच सांगण्याचा प्रयत्न केला तरी खरी ग्राउंड-झिरो परिस्थितीची जाण असणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे हे आपणाशिवाय कुणालाही त्याप्रकारे जमणारे नाही.

थॉमस पिकेटीने काही वर्षांपूर्वी ‘कॅपिटल ऑफ ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी’ या नावाने ग्रंथ लिहून जगातील आर्थिक विषमता ही कशा भीषण स्वरूपात वाढली आहे हे जगासमोर मांडले.  त्यांनतर पिकेटी ‘मॉडर्न कार्ल मार्क्स’ म्हणूनही प्रसिद्ध झाला. जागतिकीकरणाच्या काळात भांडवलशाही ही जगाला कशा प्रकारे आर्थिक विषमतेच्या खाईत घेऊन जात आहे, याचे विश्लेषण त्याने आपल्या पुस्तकात मांडले. त्यानंतर त्याचा भारत दौराही झाला. ज्यात त्याने भारतातील आर्थिक विषमता ही भारतासाठी कशी अधिक चिंतेची बाब आहे आणि त्याचे भविष्यात सोसावे लागणारे परिणाम, यातून मार्ग काढत कशी वाटचाल असावी यावर पिकेटीने आपली मते मांडली. त्याला विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न हा मोदीधार्जिणे अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांच्याकडून करण्यात आला, पण तो उथळ होता हेही लवकरच सिद्ध झाले.

पिकेटी व चान्सेल आणि क्रेडिट सुईज यांच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष 

भारतातील अव्वल १ टक्के  श्रीमंत लोकसंख्येचा एकूण संपत्तीमधील वाटा २००० मध्ये ३६.८ टक्के होता, तो क्रमाक्रमाने वाढत जाऊन २०१६ मध्ये ५८.४ टक्के इतका झालेला आहे. ज्यात १९९१च्या आर्थिक सुधारणानंतर सातत्याने व जास्त वेगाने वाढ झाल्याचे दिसून येते. जसे अव्वल १० टक्के श्रीमंत लोकसंख्येचा एकूण संपत्तीतील वाटा २०००मध्ये ६५.९ टक्के होता, तो क्रमाक्रमाने वाढत जाऊन २०१६मध्ये ८०.७ टक्के इतका झालेला आहे. त्याचबरोबर, २०००–२०१६ या काळात, भारतातील एकूण संपत्तीमध्ये सुमारे १६६ टक्के वृद्धी झालेली आहे.

ही सगळी आकडेवारी तर धक्कादायक आहेच, मात्र यातील सर्वाधिक वंचित हे अनुसूचित जाती व जमातीमधील आहेत आणि त्यातही ग्रामीण भागातील आहेत, असा निष्कर्ष आपण सामाजिक, आर्थिक व जाती जनगणना अहवाल-२०११ यातील माहिती व पिकेटीच्या अहवालातील विश्लेषण दोघांचे समांतर गुणोत्तर लावल्यास काढता येतो.

आर्थिक विषमता व जातिसंस्था यांतील संबंधांची कारणमीमांसा 

आर्थिक विषमतेविषयी बोलताना आर्थिक वर्गासकट जातीसंस्थेचाही विचार व्हायला हवा. ज्यामुळे लोकांचे बहुविध आर्थिक-सामाजिक शोषण ठळकपणे दिसण्यास मदत होते. कारण इतिहासातील वर्णव्यवस्थेमधूनच आनुवंशिक/वारसा व्यावसायिक वर्गसंस्था (Hereditary Occupational Class System)  उदयास आलेली दिसते. जसे चांभार समाजातील बहुतांश लोकांनी चपलांचाच व्यवसाय करावा, लोहाराने लोखंडाचाच, सोनाराने सोन्याचाच. परंतु इतर बहुजन वर्गात पौराहित्य, राष्ट्ररक्षण वर्ष परंपरागत पद्धतीने होताना दिसत नाही. इथे मात्र आर्थिक विविधता दिसून येते. याच वर्गाने इतिहासापासून आजतागायत वंचितांनी केलेल्या कामाची, श्रमाची मूळ किंमत (Full Labour-value) पूर्ण स्वरूपात दिल्याचे कुठेही आढळून येत नाही. उदाहरणार्थ, कितीही दर्जा सारखा असला तरी साध्या व्यवसायिकांपेक्षा 'गुच्ची' ब्रॅण्डच्या चपलेलाच जास्त भाव दिला जातो. परंतु वस्तुमान-गरिबीचा विचार वर्णव्यवस्थेतून निर्माण झालेल्या जातिव्यवस्थेचे स्वरूप लक्षात न घेता झाल्याचे दिसून येते. अर्थात वर्णव्यवस्थाही अन्यायीच होती. यातच भर घालून जागतिकीकरण झालेल्या भांडवलशाही व्यवस्थेत आजही इतर बहुजन वर्ग ७० टक्के भांडवलावर मक्तेदारीठेवतो. म्हणजे जागतिकीकरणाचाही फायदा हा वंचितांना कुठेही झालेला आढळत नाही कारण भांडवलाचे जागतिकीकरण झाले पण श्रमाचे व श्रमिकांचे नाही. आता विचार करा, अशा व्यवस्थेत मोठे कोण होणार? भांडवलावर मक्तेदारी कुणाची?

कमाईच्या उत्पन्नापेक्षा वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचे अर्थव्यवस्थेतील प्रमाण वाढत जाते, आणि आर्थिक विषमता मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत जाते, ज्यास पिकेटी ‘पैतृक भांडवलशाही’ (patrimonial capitalism) असे संबोधतो. म्हणजेच जातीसंस्थेला सरसकट मुळापासून उखडून न फेकल्यासपुढे पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे मरणारे वंचितच असतील.

दुसरीकडे परंपरागत निर्वाहावर विसंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थाही कोलमडताना दिसून येतात. याचा अर्थ असा होत नाही की, जातीचा प्रभाव कमी होत आहे. फरक एवढाच की तो इतर परिमाणांमधून दिसून येतो. नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतून त्याने नवीन स्वरूप घेतल्याचे दिसून येते. त्याने नवीनजाती-व्यवसाय हित-जाळे (caste-occupation nexus) तयार झाले आहे.

अब्राहम मास्लोची गरजांच्या पदानुक्रमची थेअरी व जातीव्यवस्था

अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात असताना व्यवस्थापनशास्त्राच्या विषयात एक थेअरी होती अब्राहम मास्लोची- ‘थेअरी ऑफ मोटिवेशन’. त्यानुसार मास्लो मानवी गरजांना पिरॅमिड स्वरूपात पाच भागांत क्रमाने विभागतो. शेजारी दिलेल्या आकृतीत दिल्याप्रमाणे : पिरॅमिडच्या खालच्या भागापासून वर जाताना लोकसंख्येचे प्रमाण कमी-कमी होत जाते. खालून-वर जाताना मास्लो म्हणतो, माणसाला अस्तित्वानंतर लगेच सर्वप्रथम गरज असते ती अन्न, वस्त्र-निवाऱ्याची म्हणजेच प्राथमिक गरजा. त्यानंतर तो पैसे वाचले तर दुसऱ्या स्थराला पोहचून भविष्यातील सुरक्षेसाठी मागणी करू लागतो. म्हणजेच पोलिसी, इन्शुरन्सेस इत्यादी. त्यानंतर त्याची समाजात ओळख प्रस्थापित व्हावी यासाठी आटापिटा चालतो. या सगळ्यांतूनही पैसे वाचले तर तो चैनीच्या आणि ऐषारामीच्या वस्तूंची मागणी करू लागतो. याचाच अर्थ काल अल्टो गाडी असेल तर त्याला आज होंडा सिटी हवी आणि शेवटाला तो फक्त आत्मसंतुष्टीसाठी काम करतो.

आता आपण एका उद्योजकाच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. समजा एक अशी व्यवस्था ज्यात सगळे आर्थिकरीत्या समान आहेत, पण याच व्यवस्थेत जातिव्यवस्थाही आहेच. सर्व लोकांनी सुरुवातीला प्राथमिक गरजांचीच मागणी करणे स्वाभाविक आहे. मी उद्योजक म्हणून अशा प्राथमिक वस्तूंची निर्मिती व पुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यातील काही लोकांच्या या गरजा पूर्ण होऊन त्यासकट त्यांनी सुरक्षाविषयक सोयींची मागणी करण्यास सुरुवात केली. माझा उद्योजक म्हणून फायदा सुरक्षाविषयक सुविधा पुरवण्यातच आहे, म्हणून मी प्राथमिक गरजांची निर्मिती सोडून वरील पातळीच्या सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. मग त्यातीलही काही लोकांची बढती होऊन ऐषारामीच्या सेवांची मागणी सुरू झाली. मी पुन्हा पूर्वीचा उद्योग सोडून या सेवांची पूर्तता करण्यास सुरूवात केली कारण यात नफा फारच जास्त आहे. परंतु पिरॅमिडमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि व्यवस्थेत जातिव्यवस्था असल्यामुळे फारच कमी म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा कमी लोक वरील पातळीवर स्थलांतरित होतात. असे होत होत ऐषारामाची मागणी करणारे फारच तुरळक असतात. परंतु त्यांच्या सेवांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मी जास्तीत जास्त संसाधने ज्यांचा मुळातच तुटवडा आहे, अशी संसाधने ऐषारामीच्या सेवांची मागणी पूर्ण करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ जी लोक अजूनही पिरॅमिडच्या तळाशी आहेत त्यांच्यासाठी अन्न शिजवायला जी भांडी लागणार आहेत, त्यासाठी लागणारे सर्व स्टील मी मर्सिडीजच्या निर्मितीसाठी वापरले.

अशा प्रकारे संसाधने चैनीच्या गोष्टींच्या निर्मितीकडे वळवून परिणामी रसातळाला असणारे अजून जास्त गरिबीत जगतात. आणि आर्थिक विषमता वाढून जगणे अवघड होऊन बसते. विसरता कामा नये या व्यवस्थेत जातिसंस्था होती!

निश्चलनीकरण आणि त्याचे सामाजिक परिणाम 

निश्चलनीकरणाचा फटका जो बसला तो असंघटित, अनौपचारिक क्षेत्रालाच. ज्यात देशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त बहुजन वर्ग अजूनही काम करतो. उच्च वर्गाला याचा फरक पडलाच नाही असे नाही पण त्यांच्याकडे यातून बाहेर येण्यासाठीची साधने आणि मार्ग होते. ‘निश्चलनीकरण’ (Digitilisation) ज्याला आपण इथे 'द्विजी' टीलायझेशन म्हणूयात- याच्या साधनांवरही उच्च वर्गीयांचीच मक्तेदारी जास्त आढळून येते. यामागे वर्षानुवर्षांपासून शिक्षणापासून वंचित ठेवले गेल्याचा आरोपही जातीसंस्थेवर होऊ शकतो. उच्चवर्गाला 'द्विज'वर्ग असेही म्हटले जायचे. (पण याला योगायोगच म्हणूयात). पुरुषसूक्तात म्हटल्याप्रमाणे उच्च वर्ग शरीराचा वरचा भाग म्हणजे डोके (मेंदू) येतो, ज्याची मक्तेदारी ही बौद्धिक श्रमावर असते. म्हणजेच आजची softwareची मक्तेदारी ('अर्थात' paytm किंवा अन्य Digital wallets वापरणे) आणि इतर वर्गांना पायाची उपमा दिली जाते; ज्यांचे काम बहुतांशी शरीरश्रमात आहे (ज्यांच्याकडे आजही स्मार्टफोन्सची वानवा आहे.). यानुसार सगळ्यात जास्त फटका वंचितांनाच बसावा हे निश्चित. म्हणूनच कुठलीही योजना आणण्यापूर्वी भारताची सामाजिक-आर्थिक संरचना व सरकारी योजनेचे त्या संरचनेवर होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत, या स्वातंत्र्यापासून चालत आलेल्या प्रथेला धाब्यावर बसवूनच निश्चलनीकरणाची योजना आणल्याचे दिसते. यातून तुमचे-आमचे financial-social inclusionचे उद्दिष्ट्य कसे साध्य होणार?

सामाजिक, आर्थिक आणि जाती जनगणना-२०११ आणि हादरून सोडणारी आकडेमोड

भारतात अनुसूचित जाती व जमातींमधील ५ टक्क्यांपेक्षा कमी घरे अशी आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न दहा हजारांपेक्षा जास्त आहे. म्हणजे ९५ टक्क्यांपेक्षा जास्तघरांना आजच्या काळातील प्राथमिक गरजा (शिक्षण आणि आरोग्य) 'खासगी' शाळांत, कॉलेजांत, इस्पितळांत भागवणे परवडणारे नाही. आणि तरीही बहुतांश प्राथमिक उपचार केंद्रांना ताळे दिसतात, ज्यांना गंज चढायलाही सुरुवात झालीये. किंवा तिथे डॉक्टर्स नाहीत किंवा असतीलच तर त्यातलेही अधिक हे बोगस आहेत. इतर सोयी-सुविधा तर सोडूनच द्याव्यात.

.............................................................................................................................................

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

अनुसूचित जाती-जमातींमधील फक्त १३ टक्के लोक आज पदवीधर आहेत. आणि आपण आरक्षण काढून टाकण्याची मागणी करताना आज दिसतो. यातीलच ७० टक्के लोकांकडे आज जमीन नाही. याचाच अर्थ जमीन विकून पोरा-पोरींना शिकवणे जमणारे नाही. (म्हणजे दावावर लावायला शरीराखेरीज काहीच नाही. कार्ल मार्क्स म्हणतो- We have nothing to loose but the chains. Its high time for revolution. आपल्याकडे गमावण्यासाठी (वर्षापरंपरागत) साखळ्यांशिवाय काहीही नाही. हीच क्रांतीची वेळ आहे. सहज आठवलं म्हणून).

आजही भारतात दीड लाखांपेक्षा जास्त लोक मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग (मैला व विष्ठा वाहून नेण्याची प्रथा) मध्ये काम करतात. जिथे संविधानातील कलम २१ला खीळ बसते. ज्यानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा जपून (Right to Dignity) जगण्याचा अधिकार आहे. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर. जवळपास साठ हजार आपल्याच राज्यात या क्षेत्रात आहेत.

२०१५ मध्ये भारतात ५ वर्षांखालील मुलांचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण आढळून येते. त्यातीलही ५० टक्क्यांपेक्षा अधिक हे अनुसूचित जाती-जमातींमधील आढळून येतात. पुन्हा ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे बॉडी-मास निर्देशांक १८.५ खाली आहे जे की, जागतिक आरोग्य संघटनेनुसार तीव्र-कुपोषण मानले जाते.

एवढी भीषण परिस्थिती असतानाही काही लोक व सरकार, व्यवस्था जातिसंस्थेचे अप्रत्यक्षरीत्या समर्थनच करत असतील तर ती व्यवस्था मुळासकट उखडून फेकायला कारणे व निश्चित वेळ कशाला हवी?

.............................................................................................................................................

ल्युकस चॅन्सेल व थॉमस पिकेटी यांच्या शोधनिबंधासाठी पहा -

Indian income inequality, 1922-2014: From British Raj to Billionaire Raj?

http://wid.world/document/chancelpiketty2017widworld/

.............................................................................................................................................

लेखक हितेश पोतदार विविध महाविद्यालयं आणि स्पर्धापरीक्षा केंद्रांत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे अध्यापन आणि अध्ययन करतात.

hdpotdar199@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 22 January 2018

हितेश पोतदार, तुम्ही लेख लिहिला आहे की मस्करी केलीये? च्यामारी, चान्सेल व पिकेटी यांच्या शोधनिबंधात कुठेही caste हा शब्द आढळून येत नाही. सर्व विषमतेस जातीव्यवस्थेच्या तंगडीत गुंतवण्याचा तुमचा प्रयत्न अनाकलनीय व केविलवाणा आहे. शिवाय निबंधलेखक द्वयीने विदा अचूक नसल्याचं मान्य केलं आहे (संदर्भ : पीडीएफ पान क्रमांक १० वरील वाक्य - The exact reason why Indian tax administration stopped publishing data in 2000 remains unknown. पीडीएफ पान क्रमांक ३६ वरील वाक्ये : Our contribution is in fact relatively modest; better data series on the distribution of income inequality can and should lead to better informed democratic conversation on the state of the Indian economy. We stress the need for more research dedicated to reconcile micro and macro estimates of income and consumption inequality in India. ). असा प्रांजळपणा तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण की तुम्ही प्राध्यापक आहात (किंवा तसं म्हणवून घेता). ही अशी कुडमुडेगिरी तुमच्या पदास शोभंत नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


Rohit joshi

Mon , 22 January 2018

@Ameya T and @Rahul Ram तुम्ही लेख नीट वाचायला हवा एकदा. लेखकाने कुठेही ऎसा उल्लेख केलेला नाही आहे की पिकेटी जातींच उल्लेख करतो. लेखकांनी एकूण संपतीचे वितरण आणि Socio-Economic and Caste Census जो की भारत सरकारच काढते- इत्यादींचे संदर्भ घेऊन विश्लेषण केले आहे. आणि लेखकांवर सवर्ण द्वेषाचा ठपका लावणे चुकीचे ठरेल. मी स्वतः लेखकांना ओळखतो ते स्वतः सवर्ण आहेत. त्यामुळे तुमचे युक्तिवा उथळ ठरतात


Rahul Ram

Mon , 22 January 2018

या लेखाला फोटो पिकेटी व चॅन्सेल यांचा दिला आहे, त्यामुळे 'जातीसंस्था भारतातील आर्थिक विषमतेला जबाबदार आहे' हा त्यांचाच निष्कर्ष आहे असा गैरसमज निर्माण होतो. हि फसवणूक नाही का ? वास्तविक पाहता, पिकेटी व चॅन्सेल यांच्या शोधनिबंधात कुठेही भारतातील जात किंवा धर्माचा उल्लेख नाही, तसेच जातीव्यवस्थेस त्याने भारतातील विषमतेसाठी कारणीभूत मानले नाही. मात्र तसे असताना 'जातीव्यवस्थाच आर्थिक विषमतेला जबाबदार आहे' असा शोध या कोणा कुडमुड्या विद्वानाने कोणत्या आधारे लावला ? Ameya T या वाचकांने त्याच्या प्रतिक्रियेत या कुडमुड्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला आहे...काही लोकांना सगळ्या गोष्टींचे, अपयशाचे खापर दुसरयांवर, जातीसंस्थेवरच फोडायचे असते. पण हे करताना आजकाल पिकेटी व चॅन्सेलसारख्या विद्वानांच्या लेखाचा आधार घेऊन खोटा प्रचार केला जातो, हे खरचं दुर्देवी आहे.


Brad D

Mon , 22 January 2018

@ Ameya T, Very juvenile comment Sir! Please read the article and if possible also go through the report.


Ameya T

Mon , 22 January 2018

असं म्हणतात की ' काळा चष्मा लावल्यावर सगळं जगच काळं दिसायला लागतं '. पण अश्यावेळी जगाने बदालयची व स्वत:ला पांढरा रंग मारून घ्यायची खरचं गरज नसते कारण जर बघणारया माणसानेच काळा चष्मा उतरवला तर प्रश्न सुटणार असतो. तसाच काहीसा प्रकार येथे जाणवतो, काही लोक स्वत: जातियवादी असल्याने व ते सवर्ण जातींचा द्वेष, दुःस्वास करत असल्याने त्यांना प्रत्येक समस्येचे मूळ हे जातिव्यवस्था हेच आहे व सवर्णच त्यास जवाबदार आहेत असे वाटते. या अश्या प्रवृत्तीच्या लोकांना आता आर्थिक विषमतेसपण जातिव्यवस्थाच जबाबदार आहे असे वाटते. हे अत्यंत हास्यास्पद आहे कारण जर जातिव्यवस्था जर विषमतेस जबाबदार असेल तर युरोपात का विषमता आहे हो ? तेथे तर जातिव्यवस्था नाही ना ? ह्या लोकांचा ढोंगीपणा असा की यांना जातिव्यवस्था तर नष्ट करायची आहे पण जातीवर आधारित आरक्षण मात्र पाहिजे आहे. जे आता गरिबीची , विषमतेची खोटीनाटी आकडेवारी फेकत आहेत, त्यांना असे विचारयला हवे की अजून किती दिवस 'विक्टिम कार्ड' खेळणार तुम्ही ? एवढे वर्षे आरक्षण होते ना मग परिस्थिती का नाही सुधारली ? जर इतक्यात वर्षात परिस्थिती सुधारली नसेल तर आरक्षणाचा फोलपणाच दिसून येतो ( शिक्षण क्षेत्राचा जो खेळखंडोबा झाला आहे तो पाहत आहोतच आम्ही... शिक्षकांना त्याचा विषयच माहीत नसतो आजकाल.. )....व जर परिस्थिती सुधारली असेल तर ज्यांची परिस्थिती सुधारली त्यांनी त्यांच्या जातीतील गरिबांना मदत करावी उगाच देशाला व सरकारला गरिबांसाठी दावणीला बांधू नये.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......