‘समाजस्वास्थ्य’ : Relevant विषय, Irrelevant प्रेक्षक
संकीर्ण - पुनर्वाचन
महेंद्र तेरेदेसाई
  • ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचं एक पोस्टर
  • Fri , 22 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नाटकबिटक र.धों. कर्वे Ra. Dho. karve समाजस्वास्थ्य Samajswasthya अतुल पेठे Atul Pethe गिरीश कुलकर्णी Girish Kulkarni

काल महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले. त्यात यंदाचा रा. शं. दातार नाट्य पुरस्कार ‘समाजस्वास्थ्य’ या अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित (आणि आता अभिनितही) नाटकाला जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं या नाटकाविषयी ‘अक्षरनामा’वर १२ ऑगस्ट २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन...

.............................................................................................................................................

‘समाजस्वास्थ्य’ अस्वस्थ करणारं आहे.

हे मी वर्तमानाबद्दल बोलत नसून अतुल पेठेच्या नाटकाबद्दल बोलत आहे. ते आहे र. धों. कर्वे यांच्या जीवनकार्यावर आधारित. या नाटकाचं लेखन, क्राफ्ट, त्यातील कलाकारांचे सादरीकरण याविषयी लिहिणं गौण वाटावं इतकं ते नाटक सादर करण्याची असोशी (passion) जबरदस्त (passionate) आहे. आणि ती मिशनरी अतुल पेठेमध्ये आहे... आणि ती दिसतेच. रंगकर्मी हे विशेषण त्याच्यासारख्यांना चुकीचं ठरेल, कारण कला त्याच्यासाठी फार महत्त्वाची नसून विचारांचा प्रसार त्याच्या लेखी महत्त्वाचा असतो. याआधी नाटकातले असे अनेक प्रयोग त्याने केले आहेत. ज्यांची प्रयोगसंख्या ‘बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नमूद होत नाही. होऊही शकत नाही, तरीही अत्यंत महत्त्वाची आहे. मुळात आता व्यावसायिक रंगभूमीवर होणाऱ्या काही नाटकांना ‘प्रयोग’ न म्हणता ‘खेळ’ म्हणणं जास्त उचित ठरेल. ते निव्वळ लाईव्ह आहे, म्हणून त्याला ‘प्रयोग’ म्हटलं तर, तो अधिकार वाद्यवृंद, तमाशा आणि सर्कशीलाही द्यावा लागेल.

Relevant विषय

लैंगिक शिक्षण हा नाटकाचा विषय आहे आणि दुर्दैवानं तो आजही समर्पक आहे. संततिनियमन, शरीरसंबंध, योनीसुचिता, समलैंगिकता यावर गेल्या शतकात, तीस-चाळीसच्या दशकात, कर्वेंनी मांडलेले परखड विचार जर आजही तितकेच समर्पक वाटत असतील तर, आपला समाज एका डबक्यासारखा आहे का, हा विचार मनात येतो. संपत्ती संचयाला सुरुवात झाल्यावर समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठीच विवाहसंस्थेची सुरुवात झाली असावी. टोळ्यांनी वंश-वर्ण, मग धर्म, पंथ आणि जात-पात आणली. विवाहसंस्थेमुळे योनीसुचिता आली. वर्णसंकर होऊ किंवा ठरू लागले. सुचितेची बंधनं झाली. ती उल्लंघनं व्यभिचार वा स्वैराचार ठरू लागला. इतकंच नव्हे तर त्याविषयी बोलणंही अनैतिक, अश्लील ठरू लागलं. हस्तमैथुन आणि संभोग पाप ठरू लागलं. ‘जन्म हेच पाप’ हे अध्यात्म झालं.

हे आणि असे विचार सामान्यांचेच नव्हे तर महात्म्यांचेही होते. आत्मसंयम हाच संततिनियमनाचा उत्तम उपाय आहे, हे गांधींचं मत कर्वेंनी तेव्हाही खोडलं होतं. आणि त्याचे परिणामही भोगले होते. काहींच्या मते शृंगारातील संदिग्धता/ खाजगीपणा गेला तर त्यात नजाकत काय उरली. शृंगार हा काही चर्चेचा विषय नसून करण्याचा विषय आहे, हे जितकं खरं आहे तितकंच ते अनैतिक नाही आणि पाप तर नाहीच नाही, हे कर्वे ठासून सांगत होते. आणि म्हणून तेव्हाचे कर्मठ, सनातनी त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ओशोनं म्हटलं की, ‘संभोगाचा उच्चतम क्षण हा समाधीप्राप्त असतो’. त्याचीही खिल्ली उडवली गेली. एकीकडे काळानुरूप सामाजिक रूढी-परंपरांना छेद दिला जात होता, पण दुसरीकडे व्यक्तिगत आचार-विचारांवरील निर्बंध उठवण्यावर मात्र धार्मिक मज्जाव कायम होता. कारण कर्व्यांच्याच मते ‘तसं झालं तर धर्माचं महत्त्वच नष्ट होईल ही भीती होती.’ या नाटकात हे सगळं अत्यंत ढोबळ पद्धतीनं मांडलंय. अगदी सामान्य प्रेक्षकाला कळेल असं. विरोधकालाही विचार करायला लावेल असं.

Irrelevant प्रेक्षक

प्रयोग पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडे पाहून मला ‘Irrelevant प्रेक्षक’ असं म्हणावं लागतंय. प्रयोगाला भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, चित्रा पालेकर, अवधूत परळकर, पुरुषोत्तम बेर्डे, अनिल गवस, सुषमा देशपांडे, मंगेश सातपुते... ही आणि याच विचारांची वाटावी अशीच सगळी मंडळी प्रेक्षक होती. अशा मंडळींसमोर हा विषय मांडण्यात काय हशील आहे? एक ऐकीव किस्सा सांगतो, म्हणजे मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. (खरा खोटा हे महत्त्वाचं नसून, त्यातलं मर्म जास्त महत्त्वाचं आहे.) गप्पांच्या ओघात एकदा बाळासाहेबांनी य. दि. फडकेंना विचारलं की, ‘तुम्ही म्हणता की माझ्यापेक्षा प्रबोधनकार हे जास्त प्रभावी वक्ते होते. पण आज तुम्ही बघाल तर त्यांच्यापेक्षा माझ्या सभेला गर्दी जास्त असते.’ यावर य. दि. म्हणाले, ‘तुमच्या सभेला ‘होयबां’ची गर्दी असते. प्रबोधनकारांच्या सभेला सुरुवातीला विरोधक असणारा सभेच्या शेवटी, किंचित का होईना, त्यांच्या विचारांचा झालेला असतो.’  

टिळक, गांधी, सावरकर, आंबेडकर यांचे विचार असलेल्या नाटकांना वा कलाकृतींना लाभणारा प्रेक्षक हा त्या विचारांचाच समर्थक असतो. कारण विरुद्ध विचार ऐकायची त्याची तयारी नसते.

प्रेक्षकांचंही ध्रुवीकरण होतंय का? तर होतंय (किंवा झालंय) असं मला वाटतं.   

मग अशा नाटकांनी ‘समाजस्वास्थ्य’ सुधारेल ही अपेक्षा करावी का? तर करावी. कारण कुंपणावरचे काही असतीलच की!  

तेव्हा हे नाटक अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पाहिलंच पाहिजे. त्याचे फार प्रयोग होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पण त्याचं आश्चर्य वाटू नये, कारण अजूनही प्रेक्षकस्वास्थ्य काही ठीक नाहीय. पण त्याबाबतीत आशावादी असणंही काही चुकीचं नाही.

.............................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......