टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू
  • Sat , 09 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya भगतसिंग Bhagat Singh सुखदेव Sukhdev राजगुरू Rajguru

१. महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लीम आदी जाती-धर्माच्या आरक्षणाच्या प्रश्नावर महामोर्चाच्या स्वरूपात आंदोलनांचा सिलसिला सुरू झाला आहे. यातून प्रत्येक घटक आपापल्या परीनं शक्तिप्रदर्शन करत शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याच मालिकेत आता वीरशैव लिंगायत समाजही स्वतंत्र धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी रस्त्यावर उतरला आहे. नांदेड आणि लातूरनंतर नुकताच सांगलीतही लिंगायत महामोर्चा काढून आपल्या शक्तीचं विराट दर्शन घडवलं आहे. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील लिंगायत समाज स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळण्यासाठी एकवटला असून याच एकजुटीतून ‘भारत देशा, जय बसवेशा’ची गर्जना करत हा समाज लवकरच मुंबईतही महामोर्चा काढणार आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजावर भाजप आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रभाव आहे. भाजपपासून म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेपासून लिंगायत समाजाला तोडण्याचा आणि भाजपला सरळ सरळ कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा शुद्ध डाव दिसून येतो. लिंगायत समाजाचा हिंदू धर्माशी म्हणजेच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नाही तर तो बसवेश्वरवादी आहे, हे बिंबविण्याचा प्रयत्न पाहावयास मिळतो.

‘एक माणूस, एक अब्ज माणूस’ अशी घोषणा चुकून कोणी कधी दिलीच तर आठवणीनं जागं करा आम्हाला. आता तशी शक्यता दुरावत चालली आहे. त्यामुळे समाजाच्या सारासार विचारशक्ती आणि विवेकशक्तीप्रमाणे आपणही गाढ झोपी गेलेलं बरं! 

.............................................................................................................................................

२. गुजरातमधील निवडणुकांच्या आधी एका पक्षाकडून जीएसटीत बदल करण्यात आले. मात्र, त्याचा जनतेशी आणि देशाशी काहीही संबंध नाही. या पक्षाला फक्त निवडणुकांची काळजी आहे, असं युवासेनेचे प्रमुख आदित्य यांनी म्हटलं आहे. गुजरात निवडणुकीच्या आधीही लोकांना जीएसटीचा त्रास होत होता. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. आता निवडणुकीत त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर लगेच जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे या पक्षाचा ‘नेशन फर्स्ट’चा मुखवटा फाटला आहे. त्यांच्यासाठी ‘इलेक्शन फर्स्ट’ आहे, हे दिसून आल्याचं आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘आपण हसे लोकाला...’ ही म्हण आदित्य यांना माहिती नसेल तर इंग्रजीत किंवा जर्मनमध्ये किंवा त्यांना अवगत असलेल्या भाषेत कुणीतरी भाषांतरित करून सांगा. ते सांगतायत त्या भारतीय जनता पक्षानं इतकी हिणकस वागणूक दिल्यानंतर, दोन्ही पक्षांमध्ये कणभरही गोडवा उरलेला नसताना आणि मुख्य म्हणजे तो पक्ष इतका नादान असताना आपण सत्तासोबत का करत आहोत, याचा विचार त्यांनी करायला हवा ना? इतक्या बंडल पक्षाबरोबर राज्यकारभार करण्यापेक्षा बाणेदारपणे बाहेर पडून टीका करा, ती कोणीतरी पाच टक्के तरी गांभीर्यानं घेईल.

.............................................................................................................................................

३. विविध सरकारी योजनांअंतर्गत मिळणारे अनुदान तसेच सेवांना ‘आधार’शी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली असून याबाबत शुक्रवारी अधिसूचना जारी केली जाईल, अशी माहिती सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. सरकारी शिष्यवृत्त्या, अनुदानित एलपीजी सिलिंडर, कृषी कर्ज, निवृत्तीवेतन यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. मोबाईल क्रमांक आणि आधार जोडणीची अंतिम सहा फेब्रुवारी हाच असेल, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

जेवढ्या हट्टाग्रहानं आधारजोडणी रेटली जात आहे, तेवढ्याच जबाबदारीनं आधारसाठी घेतलेली माहिती खासगी कंपन्यांना विकली जाणार नाही, याची खात्री दयायला सरकारकडून कोणी पुढे का येत नाही? ठरलेल्या शुल्काच्या चौपट ते आठपट आकारणी करणाऱ्या आधार केंद्रांनी केलेला घोटाळा अब्जावधी रुपयांचा असेल, तो राजरोस सुरू आहे. तो थांबवण्याची उपाययोजना कोणी इतक्याच ठामपणे सांगेल का?

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

४. देशातील कोट्यवधी तरुणांचं प्रेरणास्थान असलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना अद्याप ‘शहीद’ हा दर्जा देण्यात आलेला नाही, माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. याबद्दल भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय इतिहास संशोधन परिषदेनं नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमध्येही या तीन क्रांतिकारकांचा उल्लेख कट्टरतावादी तरुण आणि दहशतवादी म्हणून करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी या तरुण क्रांतिकारकांकडे दुर्लक्ष केल्याचंच आरटीआयमधून समोर आलं.

ही माहिती काँग्रेसच्या सत्ताकाळात समोर आली असती, तर तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या एका थोर नेत्यानं काँग्रेसच्या सरकारच्या राईराईएवढ्या चिंधड्या उडवल्या असत्या. त्याच्या व्हर्च्युअल सेनेनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असता. पण, उपरोल्लेखित तीन क्रांतिकारक राष्ट्रगीताला उभे राहिले होते की नाही, बँकेसमोरच्या रांगेत उभे राहिले होते की नाही आणि त्यांनी गोमातेच्या रक्षणार्थ दोनपाच मानवांचं किमान रक्त काढलं होतं की नाही, याबद्दलची माहिती आरटीआयमधून मागवल्याशिवाय त्यांच्याविषयी आता निश्चित भूमिका घेणं कठीण जात असावं.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर ५३ दिवसांतच दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात दाखल झाल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील (एनसीआरबी) अधिकृत माहितीतून समोर आलं आहे. एनसीआरबीच्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, दोन हजार रुपयांची आणि पाचशे रुपयांची नवी नोट आठ नोव्हेंबरनंतर लगेचच चलनात दाखल झाली होती. ज्या काळात देशातील बहुसंख्य लोक दोन हजाराच्या नोटांच्या प्रतीक्षेत होते, त्याच काळात बनावट नोट चलनात आलेलीही होती. दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा गुजरातमध्ये (१३००) सापडल्या. त्यानंतर पंजाब (५४८), कर्नाटक (२५४), तेलंगणा (११४), महाराष्ट्र (२७), मध्य प्रदेश (८), राजस्थान (६) आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरयाणा (३) तर जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन बनावट नोटा आढळून आल्या. मणिपूर आणि ओडिशामध्ये दोन हजार रुपयांची प्रत्येकी एक नोट आढळून आली होती.

नव्या नोटांचं आर्टवर्क तयार झाल्याबरोब्बर बनावट नोटा बनवणाऱ्यांशी ते शेअर झालं की काय? इकडे खऱ्या नोटा छापून झाल्या की पुढच्या शिफ्टमध्ये बनावट नोटा, अशी छपाई झाल्यासारखंच हे चित्र आहे. अर्थात मुळात बनावट नोटांना आळा घालणं हे काही नोटाबंदीचं उद्दिष्ट नव्हतंच मुळी; त्यामुळे, ही माहिती काही फार विचारात घेण्याची गरज नाही. काही काळाने आमच्या काळात देशातला बनावट नोटा बनवण्याचा वेगही मेक इन इंडिया अंतर्गत किती वाढला, याची टिमकी वाजवली गेली, तर आश्चर्य वाटायला नको.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......