टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • आचार्य बालकृष्ण, शिक्षक पात्रता परीक्षा, धनंजय मुंढे, गिरीश बापट आणि राहुल गांधी
  • Thu , 03 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET Exam धनंजय मुंढे Dhananjay Munde गिरीश बापट Girish Bapat राहुल गांधी Rahul Gandhi हिंडोली Hindoli

१. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या विक्रमी २३० चुका झाल्याचं विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आता परीक्षा झालेली आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असे बेजबाबदार उत्तर हेल्पलाईनकडून मिळाले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील १ हजार ३६२ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या ‘टीईटी’च्या मराठीच्या १५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत शुध्दलेखनाच्या २३० चुका आढळल्या. यामध्ये बालकवींचे नाव त्र्यंबक बापूजी ठोबरे असे छापले आहे. ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाचे नाव ‘जेव्हा मी जात चोरली होती’, असे छापले आहे, ‘कैऱ्या’ ऐवजी ‘कैन्या’, ‘त्याला’ ऐवजी ‘ल्याला’, ‘पुढील’ ऐवजी ‘पुदील’, ‘उताऱ्या’ ऐवजी ‘उताण्या’, ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ यांचे नाव ‘तखर्डकर’ असे छापले आहे. प्रश्नपत्रिका दोनमध्येही चुका आहेत.

पात्र शिक्षक बनायला आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतल्या चुकांचा इतका बाऊ कशाला करायला हवा? अशी प्रश्नपत्रिका काढून परिषदेने त्यांच्या व्याकरणज्ञानाची ‘परीक्षा’च घेतलेली नाही का? उलट परीक्षेची ही झटपट पद्धत क्रांतिकारक आहे. प्रश्नपत्रिकाच चुकीची काढायची. जो जेवढ्या चुका काढेल तेवढे मार्क. परीक्षेची वेळ संपायच्या आधीच निकाल जाहीर करता येईल. ऑनलाइन-ऑफलाइनची झंझटही वाचेल. शिवाय परीक्षा केंद्रावर घातलेल्या गोंधळाच्या प्रमाणात काही वाढीव गुण देता येतील.

.............................................................................................................................................

२. हजारो परदेशी कंपन्या भारतावर आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवत आहेत. महिलांना साबण विकायला लावून आपली परंपरा, संस्कृती, मूल्य उद्ध्वस्त करत आहे. पूर्वी एकच ईस्ट इंडिया कंपनी होती. आता हजारो कंपन्या लुबाडत असून हे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वदेशी हाच राष्ट्रवाद आहे,' अशा शब्दांत स्वदेशीचा नारा देताना पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात आपल्या कंपनीचे 'ब्रँडिंग' केले.

कुठे लोकमान्यांचा स्वदेशीचा नारा आणि कुठे बाळकृष्णाचा धंदेवाईक पुकारा! हे बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांच्या स्वदेशीचं स्तोम याच भावनिक मार्केटबाजीमुळे आता घराघरात पोहोचलेलं आहे. बाजारात ग्राहकाला लुबाडणारा मल्टिनॅशनल नको, स्वदेशी हवा, एवढाच काय तो यांच्या स्वदेशीचा अर्थ. आजच्या युगात असले चोचले सगळ्या देशांनी करायचे ठरवले, तर भारताची निर्यात बंद होईल, त्याचं काय? बाळकृष्ण अँड कंपनीने देशातल्या गोरगरिबांना आपल्या कंपनीचे समभाग दर्शनी मूल्याला वाटून टाकले आणि त्यांना आपल्या उत्कर्षात सहभागी करून घेतलं, तर त्यांच्या उद्योगामध्ये देशहित वगैरे शोधण्यात काही अर्थ. अन्यथा ते एक धंद्याचं टेक्निक आहे बस्स.

.............................................................................................................................................

३. विधान परिषदेतील बहुमताच्या जोरावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांना बोलू देत नाही, असा आरोप करत बुधवारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधान परिषदेतून पळ काढावा लागला अशी बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. प्रकाश मेहता, राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी धारेवर धरल्याने सरकारची कोंडी झाली. शेवटी दुपारनंतर सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. ‘मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना बोलू द्यायचे नाही असा लोकशाहीविरोधी पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. सभापती आणि उपसभापतींनीही यावर विचार करण्याची गरज आहे. पाशवी बहुमताच्या जोरावरील दादागिरी सहन करणार नाही’ अशा शब्दात गिरीश बापट यांनी विरोधकांना सुनावले. सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गिरीश बापटांना ‘पाशवी बहुमता’ची उचकी लागलेली पाहून राज्यात अनेकांना हसण्याची उबळ आवरली नसेल. विरोधी पक्षात असताना राज्यसभेत आणि लोकसभेत आपल्या पक्षाची ज्येष्ठ मंडळी काय करत होती, याचा त्यांनी थोडा अभ्यास केला असता, तर असलं विधान त्यांच्या तोंडी आलं नसतं. त्यांच्या पक्षाने संसदेचं कामकाज बंद पाडण्याचा विक्रम केला होता. ही त्याची परतफेड समजा. पेराल, तेच उगवतं. तेव्हाचे मुंडेसाहेब मुलुखमैदान तोफ होते, आताचे धाकले मुंडे लोकशाहीचे मारेकरी ठरतायत, हा काळाचा केवढा उफराटा महिमा.

.............................................................................................................................................

४. राजस्थानच्या बुंदी तालुक्यातील हिंडोली या छोट्या शहरात ४० पक्की घरे आणि ३० चारचाकी वाहने आहेत. मात्र समृद्धी नांदत असलेल्या या गावातील लोकांना स्वच्छता आणि आरोग्याची काडीचीही चिंता नाही. त्यामुळेच गावात सगळ्या सोयीसुविधा असूनही शौचालये नाहीत. या गावातील एका घरापुढे तर १५ गाड्या उभ्या राहतात. मात्र या घरातील सर्व मंडळींना शौचासाठी बाहेरच जावे लागते. एका शौचालयाच्या उभारणासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. सरकारकडून केवळ १५ हजारांचा मदत दिली जाते. त्यात हे अनुदान मिळायला प्रचंड उशीर होतो,’ अशी तक्रार धन्नानाथ योगी यांनी केली. या गावातील बाबुल योगी यांनी त्यांच्या कुटुंबासाठी नुकतीच एक एसयूव्ही गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आधीच सहा गाड्या आहेत. मात्र अद्याप या घरात एकही शौचालय नाही. या कुटुंबात १० सदस्य असून हे सर्वजण उघड्यावर शौचास जातात.

‘टॉयलेट : एक शेमकथा’च आहे ही. भिकारडेपणा हा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तो रक्तात असतो, हेच या लाजिरवाण्या बातमीतून सिद्ध होतं. १० गाड्या घेण्याची ऐपत असणाऱ्यांना शौचालय बांधण्यासाठी सरकारच्या अनुदानाची गरज भासते, कारण, ते बांधून आपण सरकारवरच उपकार करतोय, अशी त्यांची भावना असते. कुटुंबातल्या १० सदस्यांपैकी कोणालाही परसाकडे जायचं असेल, तर त्या सोयीसाठी १५ गाड्या ठेवाव्या लागत असतील बिचाऱ्यांना. आपला देश महान आहे, तो उगाच नव्हे.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेची ‘मन की बात’ न ऐकता स्वत:ची ‘मन की बात’ देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘मोदींना देशातील जनतेच्या ‘मन की बात’ ऐकायची नाही. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करून देश चालवत आहेत,’ असे ते म्हणाले.

आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांच्या आदेशाच्या जाहीरपणे चिंध्या करणाऱ्या राहुल यांना मुळात पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीला स्वत:च्या ‘मन की बात’ असू शकते, हे माहिती असण्याची शक्यता कमी आहे. मोदी हे अमित शाह सोडल्यास अन्य कुणाशीही चर्चा-सल्लामसलत करतात, हा तर शुद्ध खोडसाळ आरोपच झाला. ते संघपरिवाराशी चर्चा करत असले, तर त्यात गैर काय? डॉ. मनमोहन सिंहांना आज चहा प्यायचा की कॉफी, हे तरी ठरवता आलं असेल का गांधी-परिवाराशी चर्चा केल्याविना?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......