टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मधुर भांडारकर, इंदू सरकार, नरेंद्र मोदी, आणि जयंत पाटील
  • Tue , 01 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या मधुर भांडारकर Madhur Bhandarkar इंदू सरकार Indu Sarkar नरेंद्र मोदी Narendra Modi रामविलास पासवान Ram Vilas Paswan तेजस्वी यादव Tejaswi Yadav आनंद शर्मा Anand Sharma जयंत पाटील Jayant Patil

१. विरोधकांना भ्रष्टाचार आणि विकास यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर काहीच बोलता येत नसल्याने ते गोरक्षकांचा विषय उपस्थित करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली. गोरक्षणाच्या आधारे एका समुदायाला लक्ष्य करण्यात येत आहे, असे पासवान यांनी म्हटले आहे. गोरक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारे ऐकत नाहीत, मग पंतप्रधानांनी राज्यांमध्ये सैन्य पाठवायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गोगुंड एका नव्हे, दोन समुदायांना कसे लक्ष्य करत आहेत, याची जाणीव पासवान यांना नसावी; मग, यातल्या दलितांचे आपण नेते म्हणवतो, याची आठवण कुठून असेल. विरोधक जे मुद्दे उपस्थित करतील, ते मूलभूत महत्त्वाचे नसतात, आपण ज्यावर तुणतुणं वाजवू, तेच मूलभूत मुद्दे, ही भाजपनीती त्यांनी फार उत्तम प्रकारे अंगीकारलेली दिसते. बाटग्याचा एक दृष्टान्त त्यांच्या परिचयाचा असेलच...

.............................................................................................................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचं हार्दिक अभिनंदन. तुमच्या भक्तांच्या संख्येत आणखी एका भक्ताची भर पडली, अशा आशयाचं ट्वीट बिहारचे वादग्रस्त नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. त्याच वेळी, नरेंद्र मोदी २०१९ नंतरही देशाचे पंतप्रधान राहतील, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमारांना काँग्रेसने यांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली आहे. नरेंद्र मोदी देशाचे वाट्टोळे करणार आहेत, असे नितीश कुमार काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते, याची आठवण काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी करून दिली आहे.

नितीश यांनी घेतलेला निर्णय विश्वासघातकी, अनैतिक आणि संधीसाधू आहे, यात शंकाच नाही. पण, इतकं सगळं असूनही तोच बरोबर आहे, हे सिद्ध करण्याची अहमहमिकाच तेजस्वी आणि काँग्रेस यांच्यात सुरू आहे. नितीश यांचं जाणं आपल्या किती जिव्हारी लागलं आहे, ते किती महत्त्वाचे होते, हेच राजद आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं. समाज अशा रड्या पराभूतांबरोबर कशाला राहील? तुम्हाला पदरात घेऊन उगी उगी करत जोजवायला, जनता म्हणजे काय तुमची आई आहे की दाई आहे?

.............................................................................................................................................

३. ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का’ या गाण्याचा आधार घेत राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला. ‘लाचार सत्तेसाठी झोल झोल, जनतेचा वाजतोय ढोल ढोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल’ असे सांगत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. हे सोनू व्हर्जन ऐकून विधानसभेत हशा पिकला होता.

जयंतराव, अहो, तुमचे मुख्य घड्याळजी याच सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायला निघाले होते, हे विसरलात का?‌ तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी सरकारमध्ये एकमेकांना गोल गोल फिरवण्याचे इतके खेळ केलेत की, त्यांना विटून जनतेने तुम्हाला गोल गोल फिरवून रिंगणाच्या बाहेर भिरकावून दिलं... देवेंद्र आणि वाघाच्या कातड्यातले लोणीलंपट बोकोबा यांच्यातली सर्कस चालूद्यात... जनतेचा आपल्यावर रत्तीभर भरवसा का राहिलेला नाही, याचा विचार करा.

.............................................................................................................................................

४. ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या विरोधात राज्यात सर्वत्र काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. आणीबाणीच्या कालखंडाचं वादग्रस्त चित्रण करणारा दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी काँग्रेसने या चित्रपटाचा शो बंद पाडला. चित्रपट आणि मधुर भांडारकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

आणि अशा रीतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यात आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यसंकोची अशा अन्य कोणत्याही पक्षात कसलाही फरक नाही, हे सिद्ध केलं. त्यांच्या या पाचकळ उचापत्यांमुळे प्रेक्षकांनी गुणवत्तेअभावी हा सिनेमा बंद पाडला असता, ती संधी हुकली आणि या सिनेमाची फुकट प्रसिद्धी होऊन तो आठवडाभर तग धरू शकला. त्याबद्दल भांडारकरांनी मनोमन काँग्रेसजनांचे आभारच मानले असतील.

.............................................................................................................................................

५. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आटोपशीर भाषण करणार आहेत. आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी म्हणाले, माझं भाषण अनेकदा लांबलचक होतं, यावेळी मी भाषणाची लांबी कमी करण्याचा विचार करून ते आटोपशीर असावं असा विचार करतो आहे. प्रधान सेवक म्हणून दिल्या जाणाऱ्या या भाषणाच्या वेळी मी एक निमित्तमात्र असतो, देशाच्या सव्वाशे कोटी जनतेचा आवाज म्हणून मी बोलत असतो. देशाची स्वप्नं शब्दरूपात आणण्याचा तो एक प्रयत्न असतो. यावेळी हे भाषण छोटं आणि आटोपशीर करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदीजी, इतकं मनावर घेतलंच आहे, तर तुम्ही फक्त ‘मितरों’, अशी साद घाला आणि ‘जय हिंद’ म्हणून खाली बसा. मधलं सगळं भाषण सगळ्यांना पाठ आहे. शिवाय त्यातला काही भाग तुम्ही चातुर्याने ‘मन की बात’मध्ये बोलूनही घेतला आहे. तुमचं सरकार सर्व आघाड्यांवर यशस्वी आहे, याबद्दल देशातल्या कोणाच्याही मनात कसलीही शंका नाही, याबद्दल तुमचे चाहते नि:शंक आहेत. बाकीच्यांना गिनतंय कोण?‌

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......