टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पतंजली, राजीव शुक्ला, अरुण जेटली, रेमंड डेव्हिस आणि ‘द कॉन्ट्रॅक्टर’
  • Fri , 21 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali राजीव शुक्ला Rajeev Shukla अरुण जेटली Arun Jaitley रेमंड डेव्हिस Raymond Davis द कॉन्ट्रॅक्टर The Contractor

१. रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा सध्या बाजारपेठेत चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत पतंजलीने अल्पावधीतच बाजारपेठा आणि घराघरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच आता गृहोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी पतंजलीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नैसर्गिक उत्पादनांवर भर द्यायचं ठरवलंय. पतंजलीने यंदाच्या आर्थिक वर्षात २१ हजार कोटींची कमाई केली आहे. पतंजलीच्या महसुली उत्पन्नात यंदा दुपटीने वाढ झाली आहे.

संशोधन वगैरे करून नैसर्गिक उत्पादनं बाजारात आणाल, स्वत:च्या पाकिटांमध्ये स्वत:चीच उत्पादनं भरून विकाल, स्पर्धात्मक किमती ठेवून उत्पादनं स्वस्त राखाल; पण, पतंजलीची ‘स्वदेशी देशभक्ती’ कुठून आणाल? शिवाय कपालभाती वगैरे शिकून व्यक्तिगत विद्या असलेल्या योगासनांचं सामुदायिकीकरण करून टाकण्याची कला शिकायला किती जन्म घ्यावे लागतील?

.............................................................................................................................................

२. गोरक्षेच्या नावाखाली गोरक्षकांच्या देशभर सुरू असलेल्या उच्छादाविषयी राज्यसभेत झालेल्या चर्चेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन विरोधकांना केले. ‘हिंसेमुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. हिंसा हा कोणत्याही प्रश्नावरील उपाय असू शकत नाही,’ असे जेटली म्हणाले. काँग्रेस गोमांसाच्या मुद्यांचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोमांस, गोवंशहत्या यावरून होणारे राजकारण थांबवण्यात यावे, असे जेटली म्हणाले.

उपयुक्त पशूला माता माता करून डोक्यावर घेणार तुम्ही, तिच्याबद्दलच्या मठ्ठ भावनाबाजीला अवगाहन करणार तुम्ही, त्यातून काहीजण चेकाळून नुसत्या संशयावरून माणसं मारतात, तेव्हा गप्प बसणार तुम्ही, गोरक्षकांच्या नंग्या नाचाकडे सुरक्षा यंत्रणांनी डोळेझाक करावी, असं वातावरण बनवणार तुम्ही; कधीतरी सवड मिळाली तर पंतप्रधानांना कठोर कारवाईचे डोस द्यायला सुचणार आणि या प्रश्नाचं राजकारण करतेय काँग्रेस? तेवढं जरी त्या पक्षाला जमलं असतं, तर तुम्हाला दोन्ही बाजूंनी ढोल वाजवावा लागला असता का?

.............................................................................................................................................

३. भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. देशभरात टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाने नेमकं कोणत्या स्पर्धेत यश मिळवलंय हेच राजीव शुक्ला विसरले. त्यांनी वर्ल्डकप स्पर्धेऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

यावर त्यांची खिल्ली उडवणाऱ्या कितीजणांना भारतीय महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंची नावं माहिती असतील? कितीजण ते सामने पाहत असतील? ट्वीटमधली चूक शब्दाची आहे. क्रिकेटमधल्या भेदभावाची प्रवृत्ती फक्त शुक्लांची नाही; ती तथाकथित क्रिकेटप्रेमींमध्येही आहे. ते महिला क्रिकेटला लुटुपुटूचं क्रिकेट मानतात. राजीव शुक्लाही त्यांचेच प्रतिनिधी आहेत.

.............................................................................................................................................

४. पाकिस्तान अमेरिकेचा वापर एखाद्या पैसे संपणाऱ्या अमर्याद एटीएमप्रमाणे करतो आहे आणि अमेरिकेच्या बहुतांश आर्थिक मदतीचा उपयोग हा पाकिस्तानचं सैन्य पोसण्यासाठी केला जातो, असा धक्कादायक खुलासा रेमंड डेव्हिस या लेखकानं त्याच्या ‘द कॉन्ट्रॅक्टर’ या पुस्तकात केला आहे. रेमंड डेव्हिसला दोन पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता. रेमंड डेव्हिसचा खटला पाकिस्तानच्या कोर्टात सुरू होता. मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यानं त्याला सोडण्यात आलं.

केवढा मोठा गौप्यस्फोट हा रेमंडचा. आजवर कुणाला जणू हे माहितीच नव्हतं. शिवाय आव असा की, अमेरिका पाकिस्तानला फुकटातच पोसते आहे. अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था आणि महासत्तेची गुर्मी यांना जगातला असमतोल पोसत असतो. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ढवळाढवळ करून अमेरिकेला शस्त्रांसाठी गिऱ्हाईकं मिळवायची असतात आणि कोणताही देश आपल्या बरोबरीला येणार नाही, याची काळजी घ्यायची असते. त्यासाठी भारतीय उपखंडात हे भुभू बसवून ठेवलं आहे. त्याला पोसायला नको? त्यात उपकार आहेत काय?

.............................................................................................................................................

५. पाकिस्तानमध्ये हिंदूधर्मीयांच्या सक्तीने सुरू असलेल्या धर्मांतराबद्दल ‘डॉन’ या प्रसिद्ध वृत्तपत्राकडून आवाज उठवण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तानी सरकारकडे या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली असून या सगळ्याबद्दलचा सविस्तर अहवाल सरकारपुढे मांडला आहे. पाकिस्तानच्या थार येथील वाळवंटात हिंदू आणि मुस्लिम अशी मिश्र लोकसंख्या आहे. मात्र, या दोन्ही धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उर्वरित पाकिस्तानी समाज आणि जगासाठी हा मोठा आदर्श असल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे.

पाकिस्तानातलं कोणतंही सरकार असं काही करणार नाही, याची ‘डॉन’ला खात्री असेलच. मिश्रवंशीय लोकसंख्या, दोन धर्मांचे लोक आजच्या पाकिस्तानातल्या अनेक भागांमध्ये १९४७च्या आधीही गुण्यागोविंदानेच राहत होते. तरीही धर्माच्या आधारावर फाळणी करून दोन्हीकडच्या कट्टरवाद्यांनी अनेकांचं ‘वतन’ कायमचं तोडलंच. त्या फाळणीतून जन्माला आलेल्या, एका धर्माचा आधार असलेल्या देशात आता सलोख्याच्या धार्मिक सहजीवनाचे आणि थोर परंपरेचे गोडवे गाण्यात अर्थ काय?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......