टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ग्लोबल टाइम्स, नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, मोहम्मद शमी, राष्ट्रीयकृत बँक्स
  • Thu , 20 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या ग्लोबल टाइम्स Global Times नरेंद्र मोदी Narendra Modi मन की बात Mann ki Baat मनोहर पर्रीकर Manohar Parrikar मोहम्मद शमी Mohammed Shami राष्ट्रीयकृत बँक्स Nationalised ‌Banks

१. चीनमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना आता नास्तिक व्हावं लागणार आहे. सदस्यांनी धर्म न सोडल्यास त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागेल, असा इशाराच पक्षाकडून देण्यात आला आहे. ‘पक्षाची विचारधारा लक्षात घेता सच्चा मार्क्सवादी होण्यासाठी सदस्यांना नास्तिक व्हावं लागेल,’ असं पक्षानं एका पत्रकात म्हटलं आहे. ‘पक्षाच्या सदस्यानं धार्मिक प्रथा-परंपरांचं पालन सुरू ठेवल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं ‘ग्लोबल टाइम्स’ या अधिकृत सरकारी वर्तमानपत्रानं म्हटलं आहे. चीनच्या संविधानानं देशातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे.

हे उफराटे तालिबानच आहेत. संविधानानं धर्मस्वातंत्र्य दिलेलं असताना ते नाकारण्याचा अधिकार कम्युनिस्ट पक्षानं कुठून मिळवला? धर्मश्रद्धा लादणं, धर्मश्रेष्ठत्व मानणं आणि धार्मिक कर्मकांडांचं सार्वजनिक स्तोम माजवणं जेवढं घातक तेवढंच नास्तिक्य लादणं घातक आहे. अर्थात, ज्या देशात लोकशाहीला, दुमताला, स्वतंत्र विचाराला थारा नाही, तिथं वेगळी अपेक्षा करता येत नाही. ज्या दिवशी चीनमधल्या कम्युनिस्ट राजवटीचा अंत होईल, त्या दिवशी हा देश पराकोटीच्या आणि तेवढ्याच घातक धार्मिकतेकडे वाटचाल करू लागेल.

.............................................................................................................................................

२. बुरखा न घातलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर शेअर केल्याच्या ‘अपराधा’बद्दल इरफान पठाणला फेसबुकवरच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागण्याचा प्रकार ताजा असतानाच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यालाही ‘ट्रोल’भैरवांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. शमीनेही आपल्या पत्नीचा हिजाबशिवाय फोटो प्रसृत केला. त्याबद्दल आणि त्याच्या छोट्या मुलीचा वाढदिवस साजरा केल्याबद्दलही त्याच्यावर हिंस्त्र टीका करण्यात आली. इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही, असं सांगून हिंदुत्ववाद्यांना खूश करण्यासाठी असले प्रकार करत आहे, अशी टीका कट्टरवादी मुस्लिमांनी केली.

अर्रर्र, ट्रोलिंग एके ट्रोलिंग एवढंच काम करण्याच्या नादात या इस्लामी ट्रोलभैरवांच्या लक्षात आलेलं नाही की, हिंदू ‘संस्कृती’च्या स्वघोषित आणि अल्पमती ठेकेदारांनाही स्त्रीस्वातंत्र्याची थेरं आणि वाढदिवसाचे केक मान्य नाहीत. शमी आणि इरफान हे बहुधा ख्रिस्तीधर्मीयांना खूष करत असावेत. त्यांच्याकडे हे प्रकार चालतात, चालवून घेतले जातात. इरफान आणि शमी हे असल्या दीडदमडीच्या धर्मभास्करांना न जुमानता आपलं आयुष्य आपल्या टर्म्सवर जगताहेत, हे कौतुकास्पद आहे.

.............................................................................................................................................

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मुळे ऑल इंडिया रेडिओनं १० कोटींची कमाई केली आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५.१९ कोटींची, तर २०१५-१६ मध्ये ४.४८ कोटींची कमाई केली आहे. बुधवारी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या संदर्भातील माहिती लोकसभेत दिली. ‘पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत ३३ वेळा ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम १८ प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. याशिवाय इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रसारण केलं जातं,’ अशी माहिती राठोड यांनी लोकसभेला दिली.

मोदींची ‘मन की बात’ आकाशवाणीसाठी ‘धन की बात’ ठरली तर. आता आकाशवाणीनं एखाद्या अर्थविषयक कार्यक्रमाला ‘धन की बात’ असं टायटल देऊन पाहावं. तोही कार्यक्रम सुपरहिट ठरेल. अधूनमधून ‘जन की बात’ आणि कधीतरी ‘जनधन की बात’ असेही कार्यक्रम सादर करायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

४. गोव्यात 'बीफ'चा तुटवडा भासू देणार नाही. कर्नाटक आणि अन्य भागांतून 'बीफ' आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, असं विधान करणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे त्यांच्याच परिवारातल्या विश्व हिंदू परिषदेच्या रडारवर आले आहेत. पर्रिकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे भाजपची प्रतिमा खराब झाली आहे, असं विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले.

विश्व हिंदू परिषदेचे नेते कोणी ‘जैन’ आहेत, हीच मुळी कळीची गंमत आहे. ती समजली की या परिषदेला हिंदू जीवनपद्धतीचं मूलभूत आकलनही का नाही, याचं ज्ञान होऊ शकतं. गोव्यात जनमताचा कौल नाकारून स्थापन केलेलं सरकार चालवण्यासाठी दिल्ली सोडून पर्रीकरांना गल्लीत यावं लागलं. आता ते हटले तर हे बुजगावणं कोलमडून पडायला वेळ लागेल का? आणि मुख्यमंत्रीपदी बसवणार कोणाला? तिथल्या कुप्रसिद्ध आश्रमातल्या एखाद्या रोबोटिक साधकाला?

.............................................................................................................................................

५. राष्ट्रीयीकृत बँकांनी बड्या उद्योगांना (कॉर्पोरेटस) दिलेली कर्जं अनुत्पादक होण्याचं प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास सहापटीनं वाढल्याची माहिती मंगळवारी राज्यसभेत देण्यात आली. २०१२-१३मध्ये ६२,४४९ कोटी रुपये असणारी स्थूल अनुत्पादक (ग्रॉस एनपीए) कर्जांची रक्कम २०१६-१७मध्ये थेट ३ लाख ४४ हजार ३५५ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आदी बँकांच्या अनुत्पादक कर्जांची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं.

बघा बघा, वेळीच वेसण न घातल्यामुळे आणि सरसकट कर्जमाफी केली गेल्यामुळे या शेतकऱ्यांनी कुठवर मजल मारली आहे. त्यांनी उद्योगधंदे स्थापन करून हजारो कोटींची कर्जं बुडवली आहेत. काय म्हणता, हे उद्योगधंदे शेतकऱ्यांचे नाहीत? काहीतरीच काय, या देशात बाकी कोणी फुकटे आणि कर्जबुडवे आहेत का? हे शेतकरीच असणार हो... शंभर टक्के.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......