अजूनकाही
‘गुरू विवेकी भला’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या अंजली जोशी यांचा संशोधनप्रवास आहे. त्यांचे गुरू कि. मो. फडके यांच्याबरोबर वीस वर्षं चाललेला संवाद-प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला आहे.
एम.ए., एम.फिल. करून, पीएच.डी.चं रजिस्ट्रेशन झालेलं असताना, एसएनडीटी विद्यापीठाच्या महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांना भेटलेले हे गुरू. फडके हे जोशींचे पीएच. डी.चे मार्गदर्शक नव्हते. पण त्या अभ्यासासाठी, सुप्रसिद्ध अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी प्रवर्तित केलेल्या ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ (आरईबीटी) या मानसोपचारशास्त्राचा त्यांना वापर करायचा होता.
या मानसोपचारशास्त्राची मुहूर्तमेढ भारतामध्ये सर्वप्रथम फडके सरांनी रोवली. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार करणारं आणि विवेकनिष्ठ विचारसरणीवर आधारलेलं हे मानसोपचारशास्त्र भारतीयांना पूर्णपणे अपरिचित होतं. अशा काळात ‘आरईबीटी’चा प्रचार हेच आपलं जीवितध्येय ठरवून फडके सरांनी त्याचा नेटाने व एकनिष्ठतेने पाठपुरावा केला.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
“सरकारनेच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तर आम्ही काय करायचं? आम्ही खरोखरच ‘भारताचे नागरिक’ आहोत का?”
.................................................................................................................................................................
आरईबीटीवरील सैद्धान्तिक चर्चेबाबत एलिस यांच्याशी फडके सरांचा चाळीसहून अधिक वर्षं सातत्याने पत्रव्यवहार होता. १३५१ पृष्ठांचा चार खंडातील हा पत्रव्यवहार कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अर्काईव्हझमध्ये संग्रहित केलेला आहे.
आरईबीटीच्या सैद्धान्तिक विकासात, भारतीय मानसिकता विचारात घेऊन त्यानुसार आरईबीटीची मांडणी त्यांनी केली. तिला ‘एलीस-फडके थेरपी’ असं म्हटलं जातं. ‘अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट’ या संस्थेकडून फेलो व सुपरव्हायझर या दोन्ही नैपुण्यदर्शक अर्हता प्राप्त करणारे ते त्या काळातले एकमेव भारतीय मानसशास्त्रज्ञ होते. ‘आरईबीटी’वर अनेक मराठी व इंग्रजी पुस्तकं लिहून, व्याख्यानं देऊन, कार्यशाळांमधून प्रशिक्षण देऊन हा विषय सामान्यांपर्यंत पोचवण्याचा, जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सरांचे आरईबीटीचे प्रशिक्षण देणारे प्रायमरी आणि अॅडव्हान्स्ड कोर्सेस करण्यासाठी लेखिकेचा त्यांच्याशी प्रथम संपर्क आला. लेखिकेच्या जडणघडणीच्या काळात झालेल्या संस्कारांचा, सहवासाचा खोल ठसा उमटवणारा गुरू-शिष्य नात्याचा आलेख म्हणजे ‘गुरू विवेकी भला’.
मी जोशींचं याआधीचं ‘मी अल्बर्ट एलिस’ हे पुस्तक वाचलं होतं. त्यातील आठव्या प्रकरणात पुस्तक लिहिण्यापूर्वी फडकेसरांबरोबर जोशी यांची झालेली चर्चा येते. दोन वर्षांचा हा संवादप्रवास होता. या पुस्तकाच्या जन्मकथेच्या अनेक पैलूंचा, या पुस्तकावर सरांशी झालेल्या विचारविनिमयाचा विस्तृत पट या आठव्या प्रकरणात येतो. त्यातून या गुरू-शिष्यांचं नातंही उलगडत जातं. ‘गुरू विवेकी भला’ या पुस्तकाची बीजं काही प्रमाणात एलिसच्या त्या ललित चरित्रात आढळतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
पण गुरू-शिष्य नात्याचा हा आलेख आरइबीटीच्या शिक्षणाचा तर आहेच. पण त्यापलीकडे जाऊन स्वतःच्या व गुरूच्याही अंतरंगाचा शोध मानसशास्त्रीय पातळीवरून जोशी घेतात.
हे वाचत असताना मला सॉक्रेटिस आणि प्लेटो या गुरू-शिष्यांची आठवण येत होती. विषयांतर वाटेल, पण इथे हे सांगणे गरजेचे वाटते. मानवी जीवन सफल करणारी काही वस्तुनिष्ठ मूल्यं आहेत, त्याचे ज्ञान होऊ शकते, असा सॉक्रेटिसचा विचार आहे, पण त्यासाठी मन पूर्वग्रहदूषित असता कामा नये. स्वतःच्या मतांची व इतरांच्या मतांची आपण चिकित्सक दृष्टीकोनातून परीक्षा केली पाहिजे, असा चिकित्सक विचार करायला लोकांना प्रवृत्त करणे, हे सॉक्रेटिसचे जीवित कार्य होते. त्यासाठी त्याने श्रोत्यांच्या उलट तपासणीचा प्रयोग केला. यालाच ‘सॉक्रेटिस आयरनी’ म्हणतात. चर्चा-संवादाच्या माध्यमातून सॉक्रेटिसने मांडलेले तत्त्वज्ञान ही नैतिकतेच्या ऱ्हासावरची एक प्रतिक्रिया होती.
सॉक्रेटिस आपले विचार प्रणालीबद्ध करण्यास नकार देत असत. त्यानी वापरलेली संवाद पद्धती, जिला द्वंद्वात्मक पद्धती म्हटले जाते ती कळीची भूमिका बजावते. त्यांनी तत्कालीन कवींच्या आणि धर्मपंडितांच्या लेखनातून येणाऱ्या मिथ्यकथांवर टीका केली. ‘युथिफ्रो’ या संवादात त्याने पावित्र्याच्या पारंपरिक कल्पनेवर टीका केली. तो गूढवादी नव्हता. धर्माला त्याने नीतिशास्त्राचे अंग बनवले आणि पावित्र्याच्या बौद्धिक चिकित्सेतून धार्मिक सदाचरणाची पुनर्व्याख्या केली पाहिजे असे मानले. प्रणालीबद्ध तत्त्वज्ञान त्यानी मांडले नसले, तरी सैद्धान्तिक तत्त्वज्ञानाला त्यानी दिलेले योगदान अभूतपूर्व होते. ‘स्वतःला जाण’ या बोधवाक्याचा त्यानी पुरस्कार केला. सॉक्रेटिसला देहदंड झाल्याचा गंभीर परिणाम प्लेटोवर झाला. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोने सॉक्रेटिसची प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळे आज ती जगाला माहीत झाली. नंतर प्लेटोने आपली अकॅडमी स्थापन करून तत्कालीन ग्रीक नगरराज्यात सॉक्रेटिसचे विचार, लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सबंध आयुष्य खर्ची घातले.
दर शनिवारी कॉलेज संपल्यावर जोशी फडके सरांकडे जात. ते खूपदा लागट, फटकळ, अपमानास्पद बोलत. कारण आपल्याकडून ज्ञान घेऊन बाहेर कौन्सिलिंगचा बाजार मांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून आलेला कडवटपणा त्यांच्या गाठी होता. अतिउच्च नैतिकता, दुराग्रहाच्या टोकावर पोचणारा त्यांचा स्वाभिमान होता. एवढं कशाला, शब्दांचा वापर अचूक आणि अर्थ नेमकेपणाने व्यक्त होईल, याबाबत ते दक्ष असत. ज्ञानाच्या ठिकाणी आवश्यक निष्ठेच्या त्यांच्या अपेक्षा त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवल्या.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा :
मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...
मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा
मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे
“सरकारनेच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, तर आम्ही काय करायचं? आम्ही खरोखरच ‘भारताचे नागरिक’ आहोत का?”
.................................................................................................................................................................
त्या वेळी लेखिका दुखावली जाते आणि त्यांच्याकडून शिकल्या आरईबीटीपैकी एकाही गोष्टीचा वापर तिच्या प्रबंधात करणार नाही असा शब्दही देते. त्यादरम्याने लेखिकेने स्वतःच्या आणि सरांच्या मनाचा घेतलेला शोध हा विवेकनिष्ठही (rational) आहे आणि भावनिकही (emotional) आहे. यासाठी प्रामाणिकपणा आणि लेखनकौशल्य या दोन्हीचा कस लावणारे अंजलीताईंचे लिखाण मुळातून वाचायला हवे. शेवटी त्या शेवटचा पर्याय म्हणून ‘रॅशनल’ आणि ‘इमोशनल’ असं पत्र सरांना लिहून त्यांच्याकडे शिकण्याची विनंती करतात. जे पत्र सर मरेपर्यंत मोलाचं धन असावं, तसं जपून ठेवतात.
ते पत्रही या पुस्तकात आहे. कारण सरांनी ते आपला अखेरचा प्रवास सुरू झालाय, हे समजल्यावर लेखिकेकडे सुपूर्द केले. इथून हा प्रवास सुरू होतो. ‘पुन्हा संपर्क करू नका!’ या ठणकावून सांगितलेल्या वाक्यापासून ते शेवटच्या पर्वात ‘पुन्हा केव्हा येशील? उद्या येशील?’ म्हणत वाटेकडे डोळे लावून बसलेल्या सरांना आश्वासन देणारे शब्द - ‘शंभर टक्के!’ इथपर्यंतचा हा प्रवास आहे.
प्रत्येक वेळी सरांकडे चर्चेला घेतलेला अभ्यासविषय आणि त्यांच्यात झालेली प्रश्नोत्तरे अंजलीताई लिहून ठेवत. हा वीस वर्षे लिहून ठेवलेला दस्तऐवज म्हणजे पुढील पिढ्यांसाठी ज्ञानाचा वारसा ठरावा.
एलिसचे विचार, सिद्धान्त यावर चर्चा करताना ओघात अनेक मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या उपपत्ती येत. फडकेसर त्याला धरून अनेक पुस्तकांचा संदर्भ देऊन बोलत. ‘गुरू विवेकी भला’ पुस्तक वाचताना मी यादी करायला लागले, तर पन्नासच्या वर पुस्तकांची यादी मीच बनवली! ती पुस्तकं वाचणं, त्याबाबत स्वतःची मतं आणि सरांची मतं यावर चिकित्सक दृष्टीकोनातून खंडनमंडन, कधी त्यात काव्य साहित्य यायचं, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समुपदेशनासाठी येणाऱ्या केसेस, असे अनेक विषय येत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
ना.सी. फडके हे मानसशास्त्राचे प्राध्यापक होते आणि या विषयावरील त्यांच्या पुस्तकांची नावं, हे सगळं लेखिकेला सरांकडूनच कळतं. सरांच्या घरची व्यवस्थित कव्हरं घातलेली पुस्तकं, विविध प्रकारचे कोश यातूनही सरांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते.
दहा भागात विभागलेल्या या विषयांत एकमेकांचे विचार, मतं, ती मांडण्यातला वस्तुनिष्ठपणा, पूर्वग्रहदूषित नसणारा सच्चेपणा आहे. गुरू-शिष्यांमध्ये विश्वासाचे, सहवासातून येणाऱ्या शब्दांविना संवादाचे असे नाते निर्माण होते. जोशींनी आपल्या विवेकी गुरूच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा केली आहे. एखादी केस हाताळावी तसे निर्भीडपणे विचारलेले प्रश्न... त्यांचं अविवाहित राहणं, एकाकीपण, एकटेपणातून उभे राहणारे प्रश्न आणि अशा अतिव्यक्तिगत प्रश्नांचीही विवेकनिष्ठपणाने केलेली चिकित्सा आणि तितक्याच प्रामाणिकपणे गुरूने दिलेली उत्तरे हा सगळाच भाग वाचताना कमालीचा वेधक आहे.
फडके सरांच्या आयुष्याचं उत्तरायण मात्र विवेकी गुरूचं ‘शंभर टक्के’ दर्शन घडवून जातं. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी नसणाऱ्या या विद्यावाचस्पतीसाठी लेखिकेने दिलेलं योगदानही तोलामोलाचं आहे. एकाकीपणाने ज्ञानाला, आरईबीटी सिद्धान्ताला, त्या अभ्यासाला, त्यातून लिहिलेल्या पुस्तकांना, संशोधनाला सरांनी वाहून घेतलं. नैतिक मूल्ये, स्वाभिमान जपताना सोडाव्या लागलेल्या लाखमोलाच्या नोकऱ्या... समाजात, ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याला म्हणावी तशी दाद मिळाली नाही. याची जाणीव, खंत असल्याने त्यांच्या पंचाहत्तरी निमित्ताने ‘लोकसत्ता’मधून त्यांच्या कार्याचा गौरव करणारा लेख लिहिला.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
............................................................................................................................................................
ज्या पुस्तकांवर सर दहान् दहा वर्षं काम करत होते, ते काम वय झाल्यावर पुरं होणं शक्य नव्हतं. हट्टाने सरांची परवानगी घेऊन, ती पुस्तकं पूर्ण करून, मराठी व इंगजी पुस्तकांसाठी प्रकाशकांशी बोलणी करून प्रसिद्ध केली. तिथेही या विवेकी गुरूने पुस्तक फक्त स्वतःच्या नावानं न छापता दोघांच्या नावानं छापायला लावलं. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही शैली, स्पष्टीकरणासाठी येणारी उदाहरणं, माझी नाहीत. त्यांच्या वयाच्या ऐशीची भेट म्हणून विकिपिडियावर त्यांच्या नावाचं पेज तयार करण्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार त्या पूर्ण करतात आणि ‘पेज’ सिद्ध होते...
गुरूच्या अखेरच्या प्रवासात फडके सरांच्या नातलगांनी आणि जोशींनी शिष्या म्हणून दिलेली साथ बघून गुरूंनाच काय, आपल्यालाही कृतकृत्य वाटतं.
‘गुरू विवेकी भला’ - डॉ. अंजली जोशी
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे | मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment