म. गांधींच्या दीड वर्षाच्या सहवासाने अरुण खूपच बदलले, आयुष्यभर पुरेल इतका ‘प्रेमाचा वारसा’ व ‘रागाचे वरदान’, अशी शिदोरी त्यांना मिळाली. त्या बळावर पुढील ७५ वर्षे ते कार्यरत राहिले
संकीर्ण - श्रद्धांजली
विनोद शिरसाठ
  • अरुण गांधी आणि त्यांच्या ‘रागाचे वरदान’ व ‘प्रेमाचा वारसा’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 12 May 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली अरुण गांधी Arun Gandhi महात्मा गांधी Mahatma Gandhi रागाचे वरदान Ragache Vardan प्रेमाचा वारसा Premacha Varsa

दि. १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे जन्मलेले अरुण गांधी यांनी २ मे २०२३ रोजी कोल्हापूर जवळील हणबरवाडी या लहान गावात अखेरचा श्वास घेतला. तब्बल ८९ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. सुरुवातीची दोन दशके दक्षिण आफ्रिकेत, नंतरची तीन दशके भारतात आणि त्यानंतरची साडेतीन दशके अमेरिकेत त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने राहिले. तारुण्याची जडणघडण व शिक्षण दक्षिण आफ्रिकेत झाल्यावर, त्यांनी भारतात ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्रकार म्हणून काम केले. मात्र १९८७नंतर त्यांनी सामाजिक कार्याला पूर्ण वेळ वाहून घेतले आणि मग त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने अमेरिकेत राहिले.

महात्मा गांधी यांचे नातू व मणिलाल गांधी यांचे चिरंजीव, अशी त्यांची प्रारंभीची ओळख. गांधीजी १९१५मध्ये दक्षिण आफ्रिका सोडून भारतात आले ते कायमचे. तेव्हा त्यांचे द्वितीय चिरंजीव मणिलाल व त्यांची पत्नी सुशीलाबेन हे दोघेही गांधीजींनी सुरू केलेले काम चालू ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतच राहिले. तिथे मणिलाल यांनी फिनिक्स आश्रम व ‘इंडियन ऑपिनियन’ हे साप्ताहिक चालवले. त्या साप्ताहिकाचे ते १९२०पासून १९५६पर्यंत संपादक राहिले.

मणिलाल हे बालपणातच दक्षिण आफ्रिकेत गेले आणि मृत्यूपर्यंत (१९५६) तिथेच राहिले. अधूनमधून ते भारतात येत राहिले. १९३०च्या दांडीयात्रेतील ७८ सहभागी यात्रेकरूंमध्ये ते होते. मात्र असे अपवाद वगळता, ते भारतातील स्वातंत्र्यलढ्यात न राहता, दक्षिण आफ्रिकेत राहून तिथल्या भारतीयांच्या हक्कांसाठी आणि वर्णभेदांच्या विरुद्ध गांधीजींच्याच विचाराने लढत राहिले. त्यांना तीन अपत्ये- अरुण हा मुलगा आणि सीता व ईला या मुली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर अरुण हा महात्मा गांधींचा सर्वांत थोरला नातू. भारतीय स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात होता, तेव्हा बालकुमार वयात असलेला अरुण, दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक परिस्थितीशी संघर्ष करत होता. त्याला तिथल्या गोऱ्या मुलांकडून ‘काळा’ म्हणून व काळ्या मुलांकडून ‘गोरा’ म्हणून हिणवले जात असे. त्या संघर्षात काही कृष्णवर्णीय व काही गौरवर्णीय मुलांशी त्याची जोरदार मारामारी होत असे. त्याचे हे वाढत जाणारे आक्रमक रूप पाहून त्याच्या आई-वडिलांची काळजी वाढत गेली आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांनी बापूंच्या सहवासात राहण्यासाठी अरुणला भारतात आणून सोडले.

११ वर्षांचा अरुण भारतात आला, तो १९४६च्या मध्याचा काळ होता. दुसरे महायुद्ध संपले होते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या होत्या, फाळणीची तयारी अंतिम टप्प्यात होती, काँग्रेस व गांधीजी यांच्यातील तणाव वाढत चालला होता. कस्तुरबांचे नुकतेच निधन झाले होते. गांधीजींचे ते अखेरचे पर्व होते. तेव्हा गांधीजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात वास्तव्याला होते. पुढील दीड वर्ष अरुण आजोबांच्या सहवासात सेवाग्राममध्ये व ते जातील तिथे राहिला. बापूंनी सेवाग्राममध्ये असताना त्याला ‘आसपासच्या गावातील मुलांबरोबर खेळायला जाणे आणि आसपासच्या गावातील मुलांना आश्रमात बोलावून शिकवणे’, ही दोन कामे नेमून दिली होती.

देशाची फाळणी झाल्यावर गांधीजींनी देशभर दौरे करायला सुरुवात केली, तेव्हा जानेवारी १९४८मध्ये अरुणला दक्षिण आफ्रिकेत पुन्हा पाठवण्यात आले. अरुण तिकडे गेला आणि काहीच दिवसांनी इकडे गांधींची हत्या झाली. ती बातमी ऐकून आक्रोश करणाऱ्या अरुणने तत्काळ दिलेली प्रतिक्रिया होती- “मी आता भारतात असतो, तर गांधींच्या मारेकऱ्याला जिवंत ठेवले नसते.” त्याही परिस्थितीत ‘आजोबांकडून मागील दीड वर्षात तू काय शिकलास?’ याची आठवण करून देण्याचे काम मणिलाल व सुशीलाबेन यांनी केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पुढे अरुणने दक्षिण आफ्रिकेत राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, नंतर भारतात आला असताना एका सर्जरीसाठी त्याला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहावे लागले. तिथे सुनंदा या महाराष्ट्रीय नर्सची ओळख झाली, प्रेम जुळले आणि त्या दोघांनी विवाह केला. मात्र विवाहानंतर त्या दोघांना दक्षिण आफ्रिकेत राहण्यासाठी आफ्रिकन सरकारने परवानगी नाकारली. म्हणून अरुण व सुनंदा मुंबईत स्थायिक झाले. पुढील तीस वर्षे अरुण यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्रकार म्हणून काम केले. त्याच काळात ते दोघेही मुंबईतील अनाथ व बेघर मुलांसाठी सेवाभावी काम करत होतेच.

दरम्यानच्या काळात त्यांचे अधूनमधून अमेरिकेत जाणे होत होते. आणि मग वयाच्या पन्नाशीनंतर त्या दोघांनीही अमेरिकेत जाऊन देश-विदेशातील अनाथ मुलांसाठी काम करायचे ठरवले. काही काळ शिकागो आणि नंतर न्यूयॉर्कमध्ये राहून त्यांनी ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हायोलन्स’ या व अन्य काही संस्थांच्या माध्यमांतून काम केले. (२००७मध्ये सुनंदा यांचे निधन झाले.) विविध कार्यक्रम आणि परिसंवादातून भाषणे दिली. देश-विदेशात प्रवास केला. विपुल लेखन केले. त्यातून डझनभराहून अधिक इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्याच सामाजिक कामाच्या प्रक्रियेतून कोल्हापूर जिल्ह्यातील ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) या संस्थेशी ते जोडले गेले. त्या संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. परिणामी वर्ष दोन वर्षांतून एकदा ते कोल्हापूरला येऊ लागले. ‘अवनि’ या संस्थेतही कचरा वेचणारी मुले, ऊसतोड कामगारांची मुले, बेघर मुले, अनाथ मुले यांच्यासाठी काम केले जाते. या अरुण चव्हाण यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. मात्र या संस्थेच्या अनुराधा भोसले व अन्य सहकाऱ्यांसोबत अरुण गांधी यांचे ऋणानुबंध जुळलेले असल्याने, ते आताही भारतात आल्यावर ‘अवनि’ या संस्थेतच (फेब्रुवारी महिन्यापासून) वास्तव्याला होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशा या अरुण गांधी यांच्याशी त्यांची दोन पुस्तके ‘साधना प्रकाशना’कडून मराठीत आणण्याच्या निमित्ताने थोडा संपर्क आला होता. त्याचे असे झाले....

डिसेंबर २०१८मध्ये एका दुपारी अरुण चव्हाण ‘साधना’ कार्यालयात अचानक आले, स्वतःची ओळख थोडक्यात करून देत म्हणाले, “अरुण गांधी यांच्या ‘लिगसी ऑफ लव्ह’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘वारसा प्रेमाचा’ या नावाने) आम्ही सोनाली नवांगुळ यांच्याकडून करून घेतला आहे. हे पुस्तक कोणी प्रकाशित करावे, यावर आमच्या कार्यकारिणीत चर्चा झाली. सर्वप्रथम ‘साधना प्रकाशना’ला विचारावे आणि ते तयार नसतील, तर अन्य प्रकाशकांकडे विचारणा करावी, असे आम्ही ठरवले आहे.” साहजिकच पुस्तकाच्या आशयाचा व विषयाचा अंदाज घेतला, अनुवाद पाहिला आणि त्यांना होकार दिला. त्याचदरम्यान अरुण गांधी भारतात येणार होते आणि कोल्हापुरात ‘अवनि’मध्ये काही दिवस राहणार होते, म्हणून ठरवले त्यांच्या उपस्थितीतच ‘वारसा प्रेमाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करावे.

मग पुढील तीन आठवड्यांत सर्व तयारी करून ५ जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरात या पुस्तकाचे प्रकाशन सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते व तुषार गांधी (अरुण गांधींचे चिरंजीव) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या पुस्तकातील आशय व विषय गहन व गंभीर पण ललितरम्य भाषेत तर आहेच, पण तो अनुवादही अचूक व प्रवाही झाला आहे. म्हणून अरुण गांधी यांची आणखी काही पुस्तके आम्ही मागवली. तेव्हा लक्षात आले, ‘द गिफ्ट ऑफ अंगर’ हे त्यांचे पुस्तक ‘लिगसी ऑफ लव्ह’चे मोठे भावंडं म्हणता येईल. म्हणून जानेवारी २०२०मध्ये अरुण गांधी भारतात आले, तेव्हा सोनाली नवांगुळ व अरुण चव्हाण यांना सांगून त्या पुस्तकाच्याही अनुवादाचे हक्क मिळवले. तोही अनुवाद सोनाली नवांगुळ यांनी अल्पावधीत अचूक व प्रवाही केला, ‘वरदान रागाचे’ या नावाने आला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

करोना कालखंड असल्यामुळे त्या पुस्तकाचे प्रकाशन करता आले नाही, म्हणून आधी तो ‘कर्तव्य’वर क्रमशः प्रसिद्ध केला. त्या दोन्ही पुस्तकांच्या अनुवादाचे हक्क ‘साधना’ला देताना अरुण गांधी यांनी लिहिले होते, “या पुस्तकाची लेखकाला मिळणारी सर्व रॉयल्टी ‘वेरळा विकास सोसायटी-अवनि’ या संस्थेला देण्यात यावी. तिथल्या अनाथ व बेघर मुला-मुलींसाठी तिचा वापर व्हावा.”

वस्तुतः अरुण गांधी यांची बापूंशी ओझरती पहिली भेट झाली, ती वयाच्या पाचव्या वर्षी आणि दीड वर्षांचा सहवास मिळाला तो वय वर्ष ११ ते १३ या काळात. या दीड वर्षाच्या काळात अरुण खूपच बदलला होता, आयुष्यभर पुरेल इतका ‘प्रेमाचा वारसा’ व ‘रागाचे वरदान’, अशी शिदोरी त्याला मिळाली होती. त्या बळावर पुढील ७५ वर्षे तो कार्यरत राहिला.

दीड वर्षांचा सहवास संपवून १९४८च्या जानेवारीत अरुण पुन्हा दक्षिण आफ्रिकेत जायला निघाला, तेव्हा बापूंनी त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली होती. चिठ्ठीवर पुढील मजकूर लिहिला होता- ‘Seven Social Sins - Wealth without Work, Pleasure without Conscience, Knowledge without Character, Commerce without Morality, Science without Humanity, Religion without Sacrifice, Politics without Principle’.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

होय, हीच बापूंनी जगभर लोकप्रिय केलेली सात सामाजिक पातके : ‘कष्टाविना संपत्ती, विवेकहीन सुखोपभोग, चारित्र्यविना शिक्षण, नीतिमत्तारहित व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागरहित भक्ती, तत्त्वहीन राजकारण’. या सात सामाजिक पातकांमध्ये आठवे पातक अरुण गांधी यांनी स्वतः जोडले आहे- Rights without Responsibility, जबाबदारीविना अधिकार.

ही आठही सामाजिक पातके जगभरातून कमी होत जावीत, यासाठी पाऊण शतक काम करणारे अरुण गांधी स्वतःला ‘शांती पेरणारा शेतकरी’ असे संबोधत असत. अशा या शेतकऱ्याच्या देहाचे त्याच्या इच्छेनुसार कोल्हापूरजवळील नंदवाळ (ता. करवीर) या खेड्यात ‘अवनि’ संस्थेची सेंद्रिय शेती असलेल्या परिसरात दहन केले आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १३ मे २०२३च्या अंकातून साभार.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......