मीम चूक की बरोबर हा दुय्यम मुद्दा आहे... तरुणांची अस्वस्थता समजून घेण्यात कमी पडता कामा नये
संकीर्ण - पुनर्वाचन
विजय तांबे
  • हीच ती मीम, ज्यावरून गेले काही दिवस सोशल मीडियावर गदारोळ चालला आहे
  • Tue , 29 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन मीम Meme साने गुरुजी Sane Guruji श्यामची आई Shyamchi Aai श्याम Shyam

‘श्यामची आई’ या सिनेमातील ‘श्याम आणि त्याची आई’ यांची छायाचित्रं वापरून मास्क वापरासंबंधी मीम तयार करून सोशल मीडियावर सर्वत्र फिरली. माझ्या आठवणीप्रमाणे गेले काही महिने उत्पल व.बा. याच सिनेमातील ‘श्याम आणि त्याची आई’ हे छायाचित्रं वापरून वेगवेगळे मीम बनवत होते. त्याचे सोशल मीडियावर कौतुकही झाले. नुकतेच काही तरुणांनी हे तथाकथित वादग्रस्त मीम बनवले आणि गदारोळ झाला.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर राग, द्वेष, थट्टामस्करी, टिंगलटवाळी, तिरकस टीका करण्याचे अनेक प्रकार तयार झाले. अभिव्यक्तीचे हे प्रकार निर्विष विनोदापासून चारित्र्यहनन, अफवा पसरवण्यापर्यंत सगळ्यासाठी वापरले गेले. गांधीजी आणि नेहरू यांच्याबद्दल गलिच्छ अफवा पसरवण्यासाठी पगारी आयटी सेलने मीमचा वापर केला.

मीम म्हणजे नक्की काय असं कोणी विचारलं तर ‘आपल्याला सुचलेले मांडण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांवर काही प्रक्रिया करणे’ असे ढोबळमानाने मानाने म्हणता येईल. समाजामध्ये आज भेडसावणाऱ्या प्रश्नांची विविधता आणि गुंतागुंत प्रचंड आहे. माध्यमांचा स्फोट झालेला असला तरी माध्यमे कमी शब्दांची आणि भरपूर चिन्हांची झालेली आहेत. अशा वातावरणात वाढलेल्या तरुणांना वरुण ग्रोव्हर, कुणाल कामरा जवळचे वाटतात. अभिव्यक्तीसाठी रॅप आणि मीम आपले वाटतात. आहे त्या साधनांवर प्रक्रिया करताना ते मोडतोड करतात. व्यवस्थेवरचा राग, चीड, टिंगलटवाळी उपलब्ध छायाचित्रं, चित्रं किंवा फिल्मवर व्यक्त करतात.

हे व्यक्त करणाऱ्या तरुणांचे प्रकार नेहमीप्रमाणे वेगळे असतातच. काही थिल्लर असतात, काही टवाळी करतात, तर काही खरोखरीच गंभीरपणे संदेश पोचवण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारांनी दचकून जाण्याचे कारण नाही. हे सर्व प्रकार सर्वच प्रकारच्या अभिव्यक्तींमध्ये सनातन काळापासून चालत आलेले आहेत. या सगळ्यातून समाजाच्या सांस्कृतिकतेची पातळी ठरते.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

असं सगळं समाजात चालूच होतं. अश्लीलतेविरुद्ध खटले झालेच. अगदी आठवणीतली घटना म्हणजे वसंत दत्तात्रय गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता राष्ट्रीय नेत्याचे चारित्र्यहनन करते म्हणून पतित पावन संघटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं की, खूपसे प्रश्न सुटतात.

व्यक्त होण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य श्रेष्ठ आहेच, मात्र त्यात एक गंमत आहे आणि एक मर्यादा. मर्यादा ही आहे की धमकी देणे, हिंसा घडवून आणू, गुन्हा करू, हल्ला करू, शारिरीक इजा करू किंवा हे सगळं करण्यास चिथावणी देणे, हे सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अमान्य आहे. कुणीही दहशत निर्माण करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे चूकच आहे. मात्र गंमत अशी आहे की, थेट मतभेद, तिखट आणि परखड टीका नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अगदीच बेचव होईल ना?

वरील दोन्ही मुद्द्यांत भावना दुखावणे नावाचा प्रकारच आलेला नाही. भावना दुखावणे हणजे नक्की काय असतं? आपल्या मनात एक आदर्श असतो. मग तो तुकाराम असो, की सावरकर असोत, की डॉ आंबेडकर. व्यक्ती महत्त्वाची नाही. त्या आदर्शाची तत्त्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. सुरुवातीला तसे प्रयत्नही होतात. नंतर कळू लागतं की, दैनंदिन जीवनात आदर्शांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं फारच कठीण आहे. त्यापेक्षा आदर्शांची नावे वापरून गट तयार करावेत. सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू करावी. धर्मांचे, पंथांचे, जातींचे, विचारसरणीचे गट एकत्र येण्यासाठी आपल्या अस्मिता जागवण्यास सुरुवात करतात. त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा एक ‘आयकॉन’ शोधावा लागतो. आयकॉन म्हणजे आपल्या मनातल्या आदर्शाचे दैवतीकरण करणे. हे दैवतीकरण आपला धर्म, पंथ, जात, विचारधारा आंधळेपणाने घट्ट करण्यास मदत करतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

याचे कारण दैवतीकरणाचा एकमेव नियम असा आहे की, या दैवताची पूजा करावी. त्यासाठी कर्मकांड, प्रतीके, चिन्हे यांचा मुबलक वापर आणि प्रदर्शन करावे. दैवताबद्दल आपल्याला न आवडणारे बोलल्यास सर्वांनी संघटीत होउन बोलणाऱ्यास गप्प करावे. पण आपल्या आदर्शांचे विचार आपल्या जीवनात उतरू नयेत, याची पुरेशी खबरदारी घ्यावी. याची अनेक उदाहरणे देता येतील. हे सर्व झाले सर्वसामान्य माणसाच्या भावना दुखावण्याचे वर्णन.

ज्यांच्या भावना दुखावत नाहीत, त्यांच्याबद्दल काय मांडता येईल? माझे माझ्या आदर्शांवर अतिशय डोळसपणे प्रेम आहे. माझ्या आदर्शांचे गुण-दोष मला नीट माहीत आहेत. त्यांच्याबद्दल कोणी गंभीरपणे विधान करत असेल तर मी त्यावर नक्की विचार करेन. मात्र कोणी टिंगल करण्यासाठी किंवा मला भडकवण्यासाठी खोडसाळपणा करत असेल तर मी भडकावे का? मी भडकलो याचा अर्थ जे विरोधकाला अपेक्षित आहे, तसेच मी वागतोय. अशा वेळी प्रतिसाद न देता आपल्या मताशी ठाम राहणे हा उत्तम मार्ग असतो.

जो सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याचा या सर्वांपेक्षा वेगळा मार्ग असतो. सामाजिक कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळा असतो. त्याला समाजातील वास्तवाचे भान असते. त्याची स्वत:ची विचारधारा असते. कितीही विरोध, छळ झाला तरी लोकांमध्ये आपल्या विचाराचा प्रसार करणे, आपल्या विचारातील समाज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करणे, यात त्याला आत्मिक आनंद असतो. यातूनच त्याच्या वर्तनाची शैली इतरांपेक्षा वेगळी होते. मला जो विरोध करत आहे, त्याला मी कसे जिंकेन हे त्याच्या समोरचे आव्हान असते. निंदानालस्ती, टीका, टिंगलटवाळी याचे हलाहल पचवून मला त्यांनाच जिंकायचे आहे, ही त्याची भूमिका असते.

माझ्या भावना दुखावल्या म्हणून मी पोलिसात तक्रार केली तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी संवादाचे मार्ग तोडत असतो. कायद्याच्या चौकटीत आरोपी आणि फिर्यादी, न्यायनिवाडा, गुन्हेगार, शिक्षा असं सगळं असतं. तेथे संवाद, गैरसमज दूर करणे, मनमोकळे बोलणे, एकमेकांना समजून घेणे, परस्पर मैत्री, सहकार्य नसते.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

भारतामध्ये या सगळ्याची स्पष्टता गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी मंडळींना होती. हल्ली गांधीजींचा खून साजरा होतो, तरीही कोणीही गांधीवादी पोलिसात तक्रार करत नाही. समाजवादी साने गुरुजींना त्यांच्याच हयातीत भरपूर दूषणे मिळाली, मात्र गुरुजींच्या संवादात कुठेही फरक पडला नाही. एसेम जोशींच्या गळ्यात चपलांचा हार घातला तरी त्यांचे चित्त तसूभरही विचलित झाले नाही. साम्यवाद्यांनी भावना दुखावल्याची कुठे तक्रार केल्याचे वाचनात आलेले नाही. सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका ही आपल्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी संवादाची, माणसे जोडण्याची असते, कायद्याचा आधार घेऊन तक्रार करण्याची नसते.

एकंदरीतच सध्या चळवळींमध्ये तरुणांशी संवाद कमी झालाय. श्याम आणि त्याची आई यांचा मीम करणारी काही तरुण मुले आहेत असे ऐकीवात आले. या निमित्ताने एक चांगले झाले की, तरुण काय करत आहेत याकडे पन्नाशी पार केलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष गेले. आता ही दरी बुजवण्याचे काम तरुणांचे नाही, तर वय आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचे आहे. त्यांनी पुढाकार घेउन सोशल मीडियावर कृतीशील असणाऱ्या या आणि अशा सर्व तरुणांना भेटावे. त्यांचे विचार समजून घ्यावे. मोकळ्या मनाने त्यांची अभिव्यक्ती जाणून घ्यावी.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

साने गुरुजी म्हणजे गोळवळकर गुरुजी नव्हेत आणि गाडगेबाबा व तुकडोजी महाराज म्हणजे टिपिकल सध्याचे बाबा आणि महाराज नव्हेत, हे त्यांना सांगण्याची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आहे. गप्पांच्या ओघात देश कसा घडला त्याच्या गोष्टी सांगाव्या लागतील, देशाचे संविधान निर्माण झाले, त्याचे परिणाम काय हे सांगावं लागेल.

त्याचबरोबर देशाच्या आजच्या स्थितीबद्दल मुलांचा दृष्टीकोन समजून घ्यावा लागेल. कदाचित त्यांना आजच्या स्थितीची जाणीव करूनही द्यावी लागेल. सोशल मीडियावरील वाईट प्रचार समाजात कसे विष पसरवत आहे, या विषयावर एकमेकांशी गप्पा माराव्या लागतील.

एक मात्र नक्की, जो तरुण एका छायाचित्राची मोडतोड करून त्यातून काही सांगू पाहतोय, याचा अर्थच तो अस्वस्थ आहे. त्याचे मीम चूक की बरोबर हा दुय्यम मुद्दा आहे, मात्र त्याची अस्वस्थता समजून घेण्यात कमी पडता कामा नये.

प्रथम प्रसिद्धी - २७ जुलै २०२०

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......