ही ‘भारतीय संस्कृती’ नाही, ‘भयाची संस्कृती’ आहे!
संकीर्ण - पुनर्वाचन
अमेय तिरोडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 29 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन अमेय तिरोडकर Amey Tirodkar नरेंद्र मोदी Narendra Modi मोहन भागवत Mohan Bhagwat संघ RSS भाजप BJP

बॅरी ग्लासनर हे अमेरिकेतले नामांकित समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक संज्ञा सतत वापरून अमेरिकन चर्चाविश्वाच्या मुख्य प्रवाहात आणली – ‘The Culture of Fear’ (भयाची संस्कृती!). अमेरिकन समाजात भयाची जी कारणं आहेत, त्यातली बहुतांशी कशी बिनबुडाची आणि कुणाच्यातरी राजकारणाची कशी परिणती आहेत, हे अगदी सप्रमाण त्यांनी दाखवून दिलंय. ‘The Culture of Fear’ याच नावाचं त्यांचं पुस्तकही आहे.

आज भारतात जे काही सुरू आहे, ते बघताना ग्लासनर यांच्या या संज्ञेची आणि कामाची आठवण होणं साहजिक आहे. आपल्या देशात ‘भयाची संस्कृती’ रुजवण्याचा आणि पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे. 

मी भाजप म्हणतोय तेव्हा उजव्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचा सगळा परिवारच त्यामध्ये मला अपेक्षित आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे. संघ परिवारातल्या इतर संघटनांना भाजपपासून वेगळं काढून परिस्थितीकडे बघण्याचा बावळटपणा देशात अनेक जण करत आलेत. आणि त्यामुळेच भाजपच्या सत्तेच्या साहाय्याने या विखारी संघटना गेल्या ३० वर्षांत अतोनात फोफावल्या आहेत. 

आज देशात हिंसेचं आणि भीतीचं जे थैमान सुरू आहे, ते भाजपच्या केंद्रातील सत्तेच्या जीवावर सुरू आहे. या देशाच्या मूलभूत जाणिवांना हात घालून इथं मनुवादी व्यवस्था आणायचा हा कट आहे. या कटाचा आधार आहे, ती ही भयाची संस्कृती! भय आणि त्या जोरावर द्वेष पसरवत आपली सत्ता टिकवत व वाढवत न्यायची ही रणनीती समजून घेणं, या लढाईत गरजेचं ठरणार आहे.

मानसशास्त्रानं हे सिद्ध केलं आहे की, माणसाच्या मनात जो एखाद्या व्यक्ती, समाज किंवा विभागाबद्दल द्वेष असतो, त्याच्या मुळाशी पराकोटीची भीतीच असते. महात्मा गांधींनीही म्हणूनच ‘निर्भीडता ही प्रेमातून येते आणि द्वेष करणारे ही मुळात भित्रे असतात’ असं म्हटलं होतं. भाजपच्या वाढीत ही अशी भीतीची बीजं आहेत.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

गेली ७० वर्षं एक भय या देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी सतत पसरवलं, ते म्हणजे मुस्लीम लोकसंख्यावाढीचं. एक ना एक दिवस मुस्लीम समाज हिंदूंपेक्षा जास्त संख्येचा होईल, हा अत्यंत बोगस प्रचार संघ परिवार करत राहिला. यातून इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या मनात भीती आणि त्यातून मुस्लीम समाजाबद्दलचा द्वेष पसरवायचा हा हेतू यामागे होता.

खरं तर मुस्लीम लोकसंख्या वाढीचा वेग आणि हिंदू लोकसंख्या वाढीचा वेग यात फारसा फरक नाही, किंबहुना मुस्लीम लोकसंख्या वाढीचा वेग काहीसा कमीच आहे, हे अनेकदा अनेक जणांनी लिहून, मांडून दाखवलं आहे. पण खोटं सतत बोलत रहायचं आणि तेच लोकांच्या मनावर ठसवायचं, हे जगातल्याच सगळ्या फॅसिस्ट मंडळींचं तंत्र आहे. 

या भीतीची मग एक किंवा एकमेव गरज असते, ती म्हणजे मुस्लीम लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये आहे आणि हिंदू वाढत आहेत असं पसरवत राहणं. आपण जेव्हा सरसंघचालकसुद्धा हिंदूंनी चार चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असं विधान करताना बघतो, त्यामागे हिंदू समाजाची कणव नसते, तर संख्येनं आपण नेहमीच कसे पुढे राहू याबद्दलची भीती समाजाच्या मनात कायम ठेवण्याची चाल असते! याच रणनीतीचे वेगवेगळे पदर म्हणजे गेल्या काही काळात भाजपकडून सुरू असलेलं ‘अजेंडा राजकारण!’

काय केलं भाजपनं सत्तेत आल्यावर? ट्रिपल तलाकचा निर्णय घेतला! हिंदू समाजात मुस्लीम लोकसंख्येवरून ज्या अनेक गैरसमजांना पसरवलं गेलं. त्यातला एक गैरसमज म्हणजे मुसलमानांना चार बायका करायचा अधिकार त्यांचा कायदा देतो, त्यांना खूप मुलं होतात आणि तीन वेळा तलाक  म्हटलं की घटस्फोटही देता येतो, म्हणजे त्या मुलांची जबाबदारीही नाही. आपण सगळ्याच जणांनी या प्रकारचे मॅसेजेस वाचलेले आहेत. ट्रिपल तलाकचा निर्णय घेताना त्यामुळेच तो मुस्लीम महिलांना दिलासा म्हणून घेण्यापेक्षा या हिंदू समाजात आपणच पसरवलेल्या अफवेला आणखी खतपाणी घालणं आणि बघा ‘आपलं सरकार कसं मुस्लीम लोकसंख्येला काबूत ठेवत आहे’ असं म्हणणं ही मूळ भावना यामागे होती. त्याचाच परिणाम म्हणून संसदेत आणि बाहेर विरोध असतानाही मुस्लीम पुरुषांसाठी यामध्ये अत्यंत चुकीच्या अशा क्रिमिनल तरतुदी केल्या गेल्या. ‘आता मुसलमान बरोबर दहशतीत राहतील’ अशी ‘भयाची संस्कृती’च यानिमित्तानं वाढवली गेली!! 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काश्मीर हे भारतातील मुस्लीमबहुल राज्य. त्याचं मुस्लीमबहुल असणं हाच या इतकी वर्षं न सुटलेल्या प्रश्नाचा मूळ अडचणीचा मुद्दा आहे, असंच संघ परिवार आजवर कुजबुजत आला. यातूनच काश्मीरमध्ये बघा मुसलमानांचे कसे लाड सुरू आहेत, हे सांगितलं गेलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय हा या प्रचाराच्या राजकारणाशी जोडून बघितला पाहिजे. ३७० रद्द करत असताना काश्मीरची फोड भाजपने केली आणि त्या राज्याचा राजकीय नकाशा बदलला. एकप्रकारे उर्वरित भारतातल्या हिंदूंना आता काश्मिरात मुसलमानांचा अप्पर हँड नसेल, असं सांगण्याचा हा धूर्त प्रकार होता. यातून काश्मीर प्रश्न सुटला नाहीच, तो असा सुटणारच नव्हता, पण उर्वरित भारतात जे भीतीच्या जीवावर राजकारण करायचं होतं, ते करणं भाजपला शक्य झालं! 

नागरिकत्वाचा मुद्दा हा असाच पुढे आणला गेलाय. CAAमुळे यायचेच म्हटले तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून साधारण किती हिंदू किंवा बौद्ध किंवा जैन भारतात येऊ शकतील? याचा अभ्यास सरकारच्या पातळीवरून केला गेलेला आहे. जेमतेम १० हजार लोकंच इथं येऊ शकणार आहेत. पण वातावरण असं बनवलं गेलंय की, कोट्यवधी हिंदू आता भारतात येण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यामुळे मुसलमानांना आणखी चपराक बसणार आहे. यालाच भयाची संस्कृती म्हणतात!! 

या सगळ्यातून हिंसा पसरवण्याची सुरुवात या वेळी कुठे केली गेली? एक जामिया मिलिया या विद्यापीठात आणि दुसरी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात! मी दिल्लीत राहिलोय. असंख्य वेळा जामियामध्ये गेलोय. पण मला माहितीये की दिल्लीतही अनेक लोकांना असं सिरियसली वाटतं की, जामियामध्ये फक्त मुस्लीम शिकतात. ज्या दिवशी जामियामध्ये पोलीस घुसले, असे व्हिडिओज समोर आले, त्या दिवशी एका मुलीचा बाईट दाखवला जात होता. मी शिक्षण सोडून परत गावाला चालली असं म्हणत होती ती मुलगी. दुसरी एक मुलगी पोलिसांवर आणि केंद्र सरकारवर टीका करत गरिबांचा शिक्षण घेण्याचा हक्क का काढून घेता असं विचारत होती. या दोन्ही मुली हिंदू होत्या! 

आता जेएनयुमध्ये हल्ला झाला. अगदी दिल्ली पोलिसांच्या छुप्या संरक्षणात आणि तिथल्या प्रोक्टरपासून ते काही प्रोफेसरांना याची पूर्ण कल्पना असताना हा हल्ला झालाय, हे समोर आलं आहे. आणि नेमक्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या निवडणुका जाहीर झाल्या! 

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

सतत काही ना काही हिंसा होईल अशा घटना घडवत ठेवायच्या किंवा द्वेषाचे मुद्दे पुढे येतील अशी तजवीज करायची आणि विशेषतः निवडणुका आल्या की, हे अधिक जोरजोरानं करायचं, असा हा पॅटर्न आहे. बिहार २०१५च्या निवडणुका होत्या तेव्हा दादरीच्या अखलाकला गोमांसच्या संशयावरून मारलं गेलं, तेव्हापासून दर निवडणुकीत हे असं सुरू आहे.

सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या या काळात यामुळे सातत्याने हिंसेचे, द्वेषाचे मुद्दे लोकांच्या स्क्रीनवर जातात. प्रचारात परत तेच दिसतं. आणि त्यामुळे ‘भीती’ पसरायला, वाढायला मदत होते. बॉब वुडवर्ड या जगप्रसिद्ध पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या म्हणजे २०१६च्या निवडणुकीत आणि नंतरच्या अध्यक्षीय काळात ‘भीती’ या भावनेचा कसा वापर केला गेला, हे सांगणारं पुस्तकच लिहिलंय. ‘FEAR’ असंच नाव आहे त्याचं. भारतात तोच प्रकार सुरू आहे. 

या पुस्तकात भीती पसरवण्यासाठी सोशल मीडिया कंपन्या कशा मदत करतात याचंही सविस्तर विवेचन आहे. आपल्याकडे सोशल मीडिया फिडमधून अल्गोरिदमच्या नावाखाली जो सतत विखारी कंटेंट लोकांच्या समोर फेकला जातोय, तो याच भयाच्या प्रचाराचा भाग आहे. 

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्याला आठवत असेल की, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरातच ‘घरवापसी’ची चर्चा झाली होती. त्या घरवापसीपासून ते या देशात सगळे हिंदूच राहतात, असं मोहन भागवतांनी अधूनमधून म्हणणं ते थेट नागरिकत्व ही सगळी राजकारणाची अशी तीक्ष्ण आणि विखारी रेघ आहे. 

संघ परिवार वारंवार ही भीती दाखवून राजकारण करू शकतो, कारण भीतीचे जे मुद्दे आहेत ते चिकाटीने सतत खोडून काढून वस्तुस्थितीची प्रभावी मांडणी करणारी व्यवस्था उभी करता येत नाही, हे आहे. यातूनच मग सामान्य हिंदूंना फसवणारे असे हे भयकारी मुद्दे पसरत जातात आणि त्यातून भाजपचं राजकारण आकार घेतं. 

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रसार हे आमचं उद्दिष्ट आहे, असं संघानं सरदार वल्लभभाई पटेल यांना लिहून दिलेलं आहे. पटेलांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे वातावरण तयार केले त्यातूनच गांधीजींचा खून झाला’ असं स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे. संघाला आणि परिवाराला हेच वातावरण देशात कायम रहावं असं वाटतं. सत्तेच्या जीवावर अशा सतत घडवल्या जाणाऱ्या पूरक घटनांतून हा ‘भयाच्या संस्कृतीचा भारतीय चेहरा’ मग आपल्यासमोर येतो आहे! 

प्रथम प्रसिद्धी - ७ जानेवारी २०२०

..................................................................................................................................................................

हेही पहा, वाचा

‘भीती’ हाच भारतीय राजकारणाचा आधार झाला आहे! - अमेय तिरोडकर

..................................................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर राजकीय पत्रकार आहेत. 

ameytirodkar@gmail.com

ट्विटर - @ameytirodkar 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......