अयोध्येतल्या व्यापाऱ्यांच्या खातेवह्या
संकीर्ण - व्यंगनामा
हरिशंकर परसाई
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन
  • Mon , 08 July 2019
  • संकीर्ण व्यंग्यनामा बजेट Budget अर्थसंकल्प २०१९ Budget 2019 निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९चा अर्थसंकल्प बॅगेतून आणण्याऐवजी लाल रंगाच्या कापडात बांधून आणला, संसदेत सादर केला. त्यावरून बरीच चर्चा होत आहे. त्यानिमित्तानं हिंदीतील प्रसिद्ध व्यंग्यलेखक हरिशंकर परसाई यांची ही एक व्यंग्यकथा. ही कथा बरीच जुनी आहे, काल-परवा लिहिलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवं. परसाई हजारो वर्षांपूर्वीच्या मिथकांशी आपल्या कल्पना जोडून त्याद्वारे आजच्या सामाजिक विसंगतींवर भाष्य करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. मग तो श्रीकृष्ण-सुदामा यांच्या भेटीचा प्रसंग असो की, त्रिशंकूची गोष्ट असो. त्यांची पात्रं स्वप्नात किंवा वास्तवात पाताळ किंवा स्वर्गाचा प्रवास करत असतात. ‘अपनी अपनी बिमारी’ (२००६) या त्यांच्या पुस्तकातील अशीच एक कथा.

.............................................................................................................................................

एका पोथीमध्ये लिहिलंय - ज्या दिवशी रावणाचा पराभव करून राम अयोध्येत आले, त्या दिवशी अयोध्यानगरी रोषणाईनं उजळून निघाली. दीपावलीचं हे पर्व अनंतकाळापर्यंत साजरं केलं जाईल. याच काळात व्यापारी हिशेबाच्या वह्या बदलतात आणि त्या लाल रंगाच्या कापडात बांधल्या जातात.

प्रश्न आहे की, रामाच्या अयोध्येत येण्याचा आणि हिशेबाच्या वह्या बदलण्याचा काय संबंध? आणि या हिशेबाच्या वह्या लाल कापडातच का बांधल्या जातात?

त्याचं असं झालं की, रामाच्या परतण्याच्या बातमीनं व्यापारी वर्गात खळबळ उडाली. ते म्हणू लागले, ‘शेटजी, आता मोठं संकट आलंय. शत्रुघ्नाच्या राज्यात सारं काही चालून गेलं, पण राम मर्यादापुरुषोत्तम आहेत. ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स चोरी खपवून घेणार नाहीत. ते आपल्या हिशेबाच्या वह्यांची तपासणी करतील आणि आपल्याला शिक्षा होईल.’
एक व्यापारी म्हणाला, ‘भाऊ, मग तर आपले दोन नंबरचे धंदे पकडले जातील.’

अयोध्यानगरीतील स्त्री-पुरुष रामाच्या स्वागताची तयारी करत होते, पण व्यापारीवर्गात घबराट पसरली होती.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

अयोध्येत पोहोचण्याच्या आधीच रामाला कल्पना आली होती की, तिकडं काहीतरी जुमला आहे. त्यांनी हनुमानाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘पवनसुता ऐक, आपण लंकेत युद्ध तर जिंकलंय, पण अयोध्येत आपल्याला रावणापेक्षा मोठ्या शत्रूचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे व्यापारी वर्गाचा भ्रष्टाचार. मोठमोठे वीर व्यापाऱ्यांसमोर भुईसपाट होतात. तू शक्तिमान व बुद्धिमान आहेस. मी तुझी सक्तवसुली संचालनालयाचा (ED) संचालक म्हणून नियुक्ती करतो. तू अयोध्येत पोहोचल्यावर व्यापाऱ्यांच्या हिशेबाच्या वह्यांची तपासणी कर आणि गैरव्यवहार शोधून काढ. भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शिक्षा कर.’

इकडं व्यापाऱ्यांमध्येही खळबळ माजली होती. ते म्हणायला लागले - अरे भाऊ, आता मेलो! हनुमानजींना ईडीचं संचालक नेमलंय. खूप कडक असामी आहे. लग्नबिग्न केलेलं नाही, मुलंबाळं नाहीत. लाचही चालणार नाही.

व्यापाऱ्यांचे कायदा सल्लागार एकत्र बसून विचार करू लागले. त्यांनी ठरवलं की, हिशेबाच्या वह्या बदलल्या पाहिजेत. राज्यात सगळीकडे ‘चेंबर ऑफ कॉमर्स’कडून आदेश गेले की, ऐन दिवाळीत हिशेबाच्या वह्या बदला.

तरीसुद्धा व्यापारी वर्गात धाकधूक होतीच. हनुमानाला फसवणं ही सोपी गोष्ट नव्हती. ते अतिशय बुद्धिमान होते. त्यांना कसं खुश करायचं? चर्चा सुरू झाली- 

- हात गरम करून काम नाही भागणार?

- ते एक पैसा घेत नाहीत.

- ते नसतील घेत, पण मॅडम?

- त्यांना मॅडम नाहीत. साहेबांनी लग्न केलेलं नाही. तारुण्य लढाईत खर्च केलंय.

- इतर काहीतरी शौक असतीलच ना? दारू आणि इतर सगळे?

- ते बालब्रह्मचारी आहेत. कॉलगर्लला मार खाऊन यावं लागेल. कुठलीही नशा करत नाहीत. संयमी व्यक्ती आहेत.

- मग करायचं काय?  

- काय करायचं, तुम्हीच सांगा?

एका शहाण्या वकीलानं सल्ला दिला- ‘हे पहा, जो जेवढा मोठा असतो, तो तेवढाच खुशामत-पसंतखोर असतो. हनुमानाची कुठली संपत्ती नाही. ते शरीरावर शेंदूर फासतात आणि लाल लंगोट बांधतात. ते सर्वहारा आहेत आणि सर्वहारांचे नेते. त्यांना खुश करणं सोपं आहे. व्यापाऱ्यांनी हिशेबाच्या वह्या लाल रंगाच्या कापडात बांधाव्यात.’
रातोरात हिशेबाच्या वह्या बदलल्या आणि त्या लाल रंगाच्या कापडात बांधल्या गेल्या.

अयोध्यानगरी रोषणाईनं उजळून निघाली. राम-सीता-लक्ष्मण यांना पंचारतीनं ओवळलं गेलं. व्यापारी वर्गानंही जोरदार स्वागत केलं. त्यांनी हनुमानाभोवती गर्दी करून त्यांचा जयजयकारही केला.
दुसऱ्या दिवशी हनुमान काही पोलिसांना घेऊन अयोध्येच्या बाजारपेठेत पोहोचले.

पहिल्या व्यापाऱ्याजवळ गेले. म्हणाले, हिशेबाच्या वह्या दाखवा. तपासणी करायची आहे.

व्यापाऱ्यानं लाल कापडात गुंडाळलेल्या वह्या समोर ठेवल्या. हनुमानानं पाहिलं, वह्या गुंडाळलेलं कापड आणि आपला लंगोट एकाच रंगाचा आहे. खुश झाले.

म्हणाले, माझ्या लंगोटाच्या कापडात हिशेबाच्या वह्या बांधता?’

व्यापारी म्हणाला, हो. हे शक्ती आणि बुद्धीच्या देवा, आम्ही तुमचे भक्त आहोत. तुमची पूजा करतो. तुमचं निशाण हेच आमचं निशाण!

हनुमानाला भरून आलं!!

व्यापारी म्हणाला, वह्या सोडू? हिशेब तपासा.

हनुमान म्हणाले, राहू दे. माझा भक्त बेईमान असू शकत नाही!

हनुमान जिथं जिथं गेले, तिथं तिथं त्यांना लाल लंगोटाच्या कापडात वह्या गुंडाळलेल्या दिसल्या. एकदम खुश झाले. त्यांनी कुणाच्याही हिशेबाची तपासणी केली नाही.

प्रभू रामचंद्राना रिपोर्ट दिला की, अयोध्येतील व्यापारी खूप इमानदार आहेत. त्यांचे हिशेब अगदी चोख आहेत!

हनुमान जगातले पहिले कम्युनिस्ट होते. ते कष्टकरी\श्रमिकांचे नेते होते. त्यांचाच लाल रंग आजच्या कम्युनिस्टांनी घेतलाय.

पण कष्टकरी\श्रमिकांच्या नेत्यानं सावध राहिलं पाहिजे की, त्याच्या लंगोटात भांडवलदार आपल्या हिशेबाच्या वह्या तर बांधणार नाहीत ना?

अनुवाद : टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 08 July 2019

तिच्यायला, कसली बकवास कथा आहे. स्वत:ची असलेली किंवा नसलेली अक्कल पाजळायला शेवटी रामायणातली पात्रंच कामी येतात. स्वत्वपूर्ण ( = स्वत:चं ओरिजिनल ) काही लिहिता येत असेल तर शपथ. असो. बाकी हनुमानाला पप्पूसारखा बथ्थड रंगवलेलं आजिबात पसंतील उतरलं नाही. 'बुद्धिमतां वरिष्ठं' म्हणून प्रत्यक्ष रामानेच गौरवलेला हनुमान फालतू भूलथापांना बळी पडेलसं वाटंत नाही. काँग्रेसच्या चमच्यांना सांगायला बऱ्या आहेत असल्या बालवाडीतल्या परीकथा. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......