उजवे आणि बुद्धिवादी
पडघम - सांस्कृतिक
संबुद्ध मित्र मुस्तफी, अनुवाद – अजित वायकर
  • अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि अभिनेते गजेंद्र चौहान
  • Sat , 22 October 2016
  • संबुद्ध मित्र मुस्तफी अजित वायकर Ajit Waykar अमर्त्य सेन गजेंद्र चौहान Amrtya Sen Gajendra Chauhan

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात बुद्धिवादविरोध कळसाला पोहोचला आहे. प्रख्यात नोबेलविजेत्याला विद्यापीठाच्या कुलपतीपदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याचवेळी देशातील आघाडीच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कामुक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता विराजमान होतो. परंतु, अमर्त्य सेन यांची गच्छंती आणि गजेंद्र चौहान यांची नियुक्ती या दोन गोष्टींचा अर्थ केवळ शिक्षणाच्या भगवेकरणापुरता मर्यादित नाही.

या घडामोडींचा मुख्य गाभा म्हणजे उजव्यांकडून सृजनशीलता आणि बुद्धिवादाचा करण्यात येणारा पराकोटीचा तिरस्कार. नालंदा विद्यापीठ आणि भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या बाबतीत घडलेलं नाट्य त्याकडेच निर्देश करतं. हा तिरस्कार जसा केवळ भारतीय परिप्रेक्षापुरता मर्यादित नाही, तसाच तो एकमार्गीदेखील नाही. हा दोन विचारधारांचा वैश्विक संघर्ष आहे. उदारमतवादी, शैक्षणिक- कलात्मक आदर्शवाद विरुद्ध प्रत्येक कल्पनेला विकास आणि राष्ट्रवादाच्या ताळेबंदात करकचू पाहणारी सनातनी मनोवृत्ती यांच्यामधील हे द्वंद्व आहे.

जागतिक पातळीवर जसे कलाकार, पत्रकार, अभिनेते, शिक्षणतज्ज्ञ यांच्यापैकी बहुतांश सर्जनशील व बुद्धिवादी वर्ग उजव्यांचा तिरस्कार करतो, तसेच उजवे या बुद्धिवाद्यांना पाण्यात पाहतात. अमेरिकेत बहुतांशी हॉलिवूड डेमोक्रॅटिक विचारधारा मानतं. अनेक प्रतिष्ठित अमेरिकन विद्यापीठं उदारमतवादी बुद्धिवाद्यांची केंद्रं मानली जातात. मागील वर्षी करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, केवळ सात टक्के पत्रकारांचा कल कर्मठ रिपब्लिकन विचारधारेकडे होता, तर सुमारे पन्नास टक्के पत्रकारांनी ‘आपण उदारमतवादी डेमोक्रॅट’ असल्याचं सांगितल. भारतातदेखील थोड्या-फार फरकानं याच निष्कर्षांची पुनरावृत्ती होऊ शकते.

‘बुद्धिवादी आणि समाजवाद’ या शीर्षकाखाली १९४९मध्ये ऑस्ट्रियन अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक हायेक याचा निबंध प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यानं बव्हंशी बुद्धिवादी वर्ग समाजवादाकडे का झुकलेला असतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला होता. भांडवलशहांच्या मालकीची वृत्तपत्रं, प्रतिक्रियावादी सरकारी संस्थांच्या निगराणीखाली असणारी विद्यापीठं, कर्मठ शासनाच्या अधिपत्याखालील दृकश्राव्य माध्यमं समाजवादाच्या दिशेनं जनमत प्रभावित करण्यासाठी ओळखले जातात. कारण, या संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची समाजवादाप्रतीची धारणा तितकी दृढमूल असते, असं विवेचन हायेकने केलं होतं.

हायेक हा मुक्त बाजारव्यवस्थेचा समर्थक होता. तसेच, रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर या सनातनी प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांचाही तो सल्लागार होता. त्यानं आपल्या निबंधात हे कबूलदेखील केलं होतं की, ‘या दृढसमजांमागे ना स्वहित साधणारे स्वार्थ असतात, ना दुष्कर्माकडे झुकू पाहणारे हेतू. चांगुलपणाचा हेतू आणि सद् भावाची ऊर्मी बुद्धिवाद्यांची मतं बळकट करत असतात.’

समाजवाद आदर्शांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच बुद्धिवादी समाजवादाकडे आकर्षित होतात. या आदर्शवादाला प्रभावी उत्तर शोधणं अद्यापपावेतो तरी मुक्त अर्थव्यवस्थेच्या समर्थकांना जमलेलं नाही.

आता बुद्धिवादाला विरोध करणाऱ्या उजव्या मंडळींच्या समर्थकांकडे वळूयात. उद्योजक, बँकर्स, तंत्रज्ञ ( मुक्त अर्थव्यवस्थेचे उत्साही प्रचारक) आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची तळी उचलणारा अल्प-मध्यम उत्पन्नगट यांचा यात समावेश होतो. धडक कृती आणि आर्थिक प्रगती यांनी हुरळून जाणाऱ्या या स्त्री-पुरुषांना बुद्धिवाद्यांचा वैश्विक आदर्शवाद समजत नाही. उजवे त्यांची ‘सिक्युलर’, ‘गांजेकस’ अशा शेलक्या शब्दांत जरी संभावना करीत असले, तरी या बुद्धिवाद्यांच्या विद्वत्ता आणि अभिव्यक्तीच्या प्रभावाने प्रसारमाध्यमं आणि समाजात त्यांना अनुसरणारा पंथ निर्माण होतो, ही बाब नाकारता येणार नाही.

विकास आणि संस्कृती यांचा बुद्धिवादीपुरस्कृत असंतोष आणि सामाजिक सुधारणा यांच्याशी अन्योन्य संबंध आहे, याकडे उजवे दुर्लक्ष करतात. विसाव्या शतकाच्या मध्यात झालेल्या प्रॉटेस्टंट चळवळीमुळेच आधुनिक भांडवलशाहीनं जन्म घेतला. रोमन कथॉलिक चर्च सर्वसामान्य लोकांच्या जीवनात करत असलेल्या अतिहस्तक्षेपामुळे असंतुष्ट असलेल्या बुद्धिवाद्यांनीच ही चळवळ सुरू केली होती. या चळवळीनं व्यक्तींना उदारमतवादी जगात संचारासाठी अधिकाधिक स्वातंत्र्य दिलं, स्वतःचे उद्योगधंदे सुरू करण्यास प्रोत्साहित केलं आणि संपत्तीनिर्माणास मदत केली.

पण प्रत्येक वेळी उजवेच चुकले आहेत, असंही काही म्हणता येणार नाही. कारण, आदर्शवादी डावे हे बुद्धिवादी आणि शिक्षणक्षेत्रातील मंडळींचे नैसर्गिक सहकारी आहेत. डाव्या राजवटींमध्ये शिक्षणाचे राजकियीकरण मोठ्या प्रमाणावर झालं.

“पश्चिम बंगालच्या उच्च शिक्षण व्यवस्थेवर तेथील डाव्या राजवटीनं पद्धतशीर हल्ला चढवला. यातून विद्यार्थीवर्गावर डाव्या पक्षानं अकल्पनीय वर्चस्व प्रस्थापित केलं”, असं निरीक्षण प्रताप भानू मेहता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नोंदवलं आहे. “नालंदापेक्षाही कलकत्ता विद्यापीठाचा विध्वंस ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात घडलेली भयावह घटना आहे. त्यामुळे आजमितीस उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत पश्चिम बंगालचा क्रमांक उत्तर प्रदेशच्याही खाली लागतो.”

कदाचित अमर्त्य सेन यांच्या आदरापोटी असेल, परंतु मेहता एक महत्त्वाची गोष्ट येथे सांगत नाहीत. ती म्हणजे, बंगालच्या उच्च शिक्षण क्षेत्रावर पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी डाव्यांनी सेन आणि इतर बुद्धिवाद्यांच्या वलयाचा केलेला वापर. या सर्व प्रकारावर सेन आणि इतरांनी मात्र चुप्पी साधली होती. वैचारिक जवळीक आणि मार्क्सवादी नेत्यांशी मैत्री यातून त्यांनी गप्प राहणं पसंत केलं असावं.

त्यामुळे जेव्हा सेन ‘द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये लिहितात की, सध्याच्या राजवटीकडून प्रत्येक बाबीमध्ये होणारा हस्तक्षेप अभूतपूर्व प्रमाणात वाढला असून तो बऱ्याचदा राजकीयदृष्ट्या तीव्र स्वरूपाचादेखील आहे, जी काळजीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालबाबतदेखील असं का लिहिलं नाही, असा प्रश्न विचारला तर वावगं ठरणार नाही. असंतोष व्यक्त करण्याच्या बाबतीत सेन यांनी डावं-उजवं केलं नसतं तर त्यांच्या भूमिकेला नक्कीच बळकटी आली असती.

दरम्यान, पुण्यात गजेंद्र चौहान यांनी निश्चिंत राहावं. ‘युधिष्ठिर’पासून ‘जंगल लव्ह’पर्यंत निर्माण केलेल्या त्यांच्या कलाकृतींना सध्याच्या सरकारमध्ये सेन यांच्या तात्त्विक विचारमौक्तिकांपेक्षा निश्चितच अधिक चाहते लाभतील. कारण, पुराणवाङ्मय म्हणजेच इतिहास यावर विश्वास असणाऱ्या आणि अंमळ जास्तच छाती असणाऱ्या कृतीबहाद्दर लोकांचं हे सरकार आहे. बुद्धिवाद्यांकडे पांडवांप्रमाणे विजनवासात जाण्याचा मार्ग आहे.

 

(www.thepoliticalindian.com या ऑनलाइन संकेतस्थळावर १८ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद.)

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......