साताऱ्याचा स्वाभिमान आणि बारामतीचा आदेश
पडघम - राज्यकारण
राजा कांदळकर
  • शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार
  • Wed , 23 November 2016
  • राज्यकारण शरद पवार Sharad Pawar पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan अजित पवार Ajit Pawar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या सहा जागांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर धक्का देणारे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांनी या निकालानंतर अत्यंत स्फोटक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘साताऱ्यात काँग्रेसच्या मोहनराव कदम (हे पतंगराव कदम यांचे बंधू आहेत.) यांना लोकांनी जिंकवले आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारली. यावरून सातारा-सांगलीची जनता स्वाभिमानी आहे हे दिसते. या जनतेने बारामतीचा आदेश धुडकावला आणि स्वाभिमान जपला.’

बाबांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादीला झोंबणार हे उघड आहे. कारण या निवडणुकांच्या निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत जास्त तोटा झाला आहे. या सहा जागांपैकी चार जागा राष्ट्रवादीच्या खिशात होत्या. त्यापैकी फक्त पुण्याची जागा अनिल भोसले यांनी राखल्याने राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. इतर तीन जागा मात्र राष्ट्रवादीला हकनाक गमवाव्या लागल्या. अजितदादा पवार यांच्या हेकट, हट्टी धोरणामुळे राष्ट्रवादीला हा पराभव पत्करावा लागला हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजितदादांना टीकेचे धनी व्हावे लागणार हे ओघाने आलेच.

यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले राजकारण पुन्हा टकराव घेणार आहे. बाबा आणि दादा यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य जगजाहीर आहे. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे अजितदादांचे काही चालू देत नसत. उपमुख्यमंत्री असूनही आपला योग्य मान ठेवला जात नाही याचे शल्य अजितदादांना नेहमी वाटत असे. त्यामुळे या दोघांमध्ये सतत खटके उडत.

पवार-चव्हाण वादाला सातारा-सांगलीच्या राजकारणाचीही पार्श्वभूमी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना ऐन उमेदीच्या काळात कराड लोकसभा मतदार संघांत श्रीनिवास पाटलांकडून शरद पवारांनी हरवले होते. तो पराभव बाबांच्या एवढा जिव्हारी लागला होता की, पवार हे नाव काढले तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडत.

राजकीय अपरिहार्यता म्हणून पृथ्वीराज चव्हाण-शरद पवार-अजितदादा यांनी आघाडीचे राजकारण केले खरे, पण त्यांचे सूर कधी जुळले नाहीत. हे सूर न जुळण्याला वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणाचेही कंगोरे आहेत. सांगली-सातारा भागात वसंतदादांचा गट नेहमी प्रबळ असे. हा गट शरद पवारांना कधी मानत नसे. कारण १९७८साली शरद पवारांनी फसवून वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून घालवले आणि अल्पमतात असूनही स्वत:च्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेतली. वसंतदादांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसल्याची ही बोच सांगली-सातारकरांना नेहमी सलते. असो.

तर बाबा-दादांच्या राजकारणाचे हे कंगोरे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकदार झाले आहेत. लिहिता लिहिता आठवले. चालू वर्ष वसंतदादा पाटलांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. वसंतदादा माणूसलोभी लोकनेता म्हणून प्रसिद्ध होते. त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रम होतील. दादांच्या स्मृती जागवल्या जातील. अवघे काँग्रेसजन एक करणे हे, त्यांचे ध्येय होते. नेमक्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच बारामतीचा आदेश आणि साताऱ्याचा स्वाभिमान यांची टक्कर व्हावी हे विशेष घडले आहे. तर हेही असो.

या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीचे अनिल भोसले, यवतमाळमधून शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमधून काँग्रेसचे अमर राजूरकर, भंडारा-गोंदियामधून भाजपचे परिणय फुके, सांगली-साताऱ्यातून काँग्रेसचे मोहनराव कदम, जळगावमधून भाजपचे चंदूलाल पटेल हे उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्वांचे अभिनंदन करायलाच हवे. पण त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये या निवडणुकीचे जे विश्लेषण आले आहे, त्याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.

या निवडणुकीतले प्रसारमाध्यमांचे पहिले टीका-निरीक्षण असे आहे की, या निवडणुकीत पक्षांच्या निष्ठेपेक्षा पैसा जिंकला. पक्षनिष्ठा, तत्त्व या साऱ्याला या निवडणुकीत तिलांजली देण्यात आली. उमेदवारांनी लक्ष्मीदर्शनाला महत्त्व दिले. या निवडणुकीतले मतदार महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे सदस्य म्हणून निवडून आलेले असतात. सध्या नगरपालिका निवडणुकांचा सुकाळ, हंगाम जोरात आहे. एकाद्या छोट्या वार्डातून, गटातून निवडून येण्यासाठी या सदस्यांना वारेमाप पैसा खर्च करावा लागतो. स्वत: पैसा वाटून निवडून आलेले हे लोक स्वत:चे मतदान साधूवृत्तीने करणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैसा वाटून निवडून आलेल्यांची मते अधिक पैसा वाटून मिळवण्याची चढाओढ झाली असणार, यासाठी कुठल्या पुराव्याची गरज नाही.

लक्ष्मीदर्शनाचा यथेच्छ वापर या निवडणुकीत होतो हे आता लपून राहिलेले नाही. म्हणून निवडून आलेले लोक धनबलाने श्रेष्ठ होते म्हणूनच आमदार होऊ शकले हे कुणी बोलले तर त्यात सत्याचा काही अंश असणारच हे गृहीत धरायला काहीच हरकत नाही.

या निवडणुकीत जळगावचा निकाल एकनाथ खडसेंना पीडादायक आणि मंत्री गिरीश महाजनांना आनंददायक ठरणारा आहे. खरे तर भाजपने चंदूलाल पटेल या पक्षात फारसे सक्रिय नसणाऱ्या पण पैसेवाल्या उमेदवाराला तिकीट दिले होते. पटेल हे महाजनांच्या जवळचे. त्यामुळे खडसे या निवडणुकीपासून दूर फेकले गेले. महाजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा उमेदवार पडणे परवडणारे नव्हते. म्हणून खडसेंनी पाडापाडीचे राजकारण केले नाही, पण त्यामुळे त्यांचा प्रभाव या निवडणुकीवर दिसला नाही. यापूर्वी खडसे म्हणजे सबकुछ जळगाव हे चित्र होते. ते आता महाजनांनी खोडून काढले आहे. खडसेंना आपले उपद्रवमूल्य या निवडणुकीत दाखवता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव दिसला नाही. जळगावात महाजनांनी एकहाती बाजी मारली.

आजवर विधान परिषदेत राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पक्ष होता. आता काँग्रेस हा पक्ष मोठा झाला आहे. आपली संख्या जास्त म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना घालवून रामराजे निंबाळकरांना आणले, धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेता बनवले. आता मात्र राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाही. त्यामुळे येत्या काळात बारामतीचे आदेश आणि साताऱ्याचा स्वाभिमान यांची टक्कर सतत घडेल. त्यातून पडणाऱ्या राजकीय ठिणग्या महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहेत.

 

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......