नरेंद्र लांजेवार : बुलढाण्याचा सांस्कृतिक दूत...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • नरेंद्र लांजेवार (जन्म - ११ मे १९६८, मृत्यू - १३ फेब्रुवारी २०२२)
  • Wed , 09 March 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली नरेंद्र लांजेवार Narendra Lanjewar ग्रंथालय Library वाचन Reading

‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या दिवसांत कधीतरी नरेंद्र लांजेवारची ओळख झाली. त्याच काळात केव्हा तरी स्त्री अत्याचाराच्या विरोधात ठामपणे संघर्ष करणाऱ्या डॉ. सीमा साखरे यांनी बुलढाण्याजवळच्या सैलानी बाबा दर्ग्याच्या परिसरातील स्त्री शोषणाबद्दल लिहिलं होतं. त्या संदर्भात आम्ही दोघे तिघे पत्रकार अधिक माहिती घेण्यासाठी गेलो, तेव्हा नरेंद्र दिवसभर आमच्यासोबत होता. तेव्हा तो तरुण होता आणि शिकत होता. बहुधा ग्रंथपाल म्हणून त्याची नोकरीही सुरू व्हायची होती. २००३मध्ये ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा मी प्रमुख झालो. वार्ताहरांच्या बैठकीच्या निमित्तानं बुलढाण्याला गेलो, तर पुन्हा नरेंद्रची भेट झाली. ‘लोकसत्ता’चा बुलढाण्याचा वार्ताहर तेव्हा सोमनाथ सावळे होता. सोमनाथमुळे नरेंद्र माझ्या आणि ‘लोकसत्ता’च्या जणू परिवारातच सहभागी झाला. एव्हाना एक प्रयोगशील ग्रंथपाल आणि वाचनसंस्कृतीच्या तळमळीचा प्रसारक अशी नरेंद्रची ओळख विदर्भाबाहेरही होऊ लागलेली होती.

नरेंद्र बुलढाण्याच्या ‘भारत विद्यालया’त ग्रंथपाल म्हणून नोकरी करत होता. या विद्यालयाचे एक संस्थापक भय्यासाहेब आगाशे यांच्याशी एकेकाळी म्हणजे १९७०च्या दशकात माझा चांगला संपर्क होता. त्या काळात विधायक काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भय्यासाहेब आगाशे आस्थेचं ठिकाण होतं. भारत विद्यालयात म्हणजे नरेंद्र एका प्रयोगशाळेतच आहे, याची खात्री भय्यासाहेब आगाशे यांना ओळखणाऱ्या सर्वांना होती. नरेंद्रनं ती खात्री वास्तवात आणून दाखवली. भारत विद्यालयाचा हा ग्रंथपाल अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावला, ते त्या ग्रंथालयात राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे. विद्यार्थ्यांनी रांगा लावून पुस्तकं वाचायला मागावी, असं चित्र अख्ख्या महाराष्ट्रात दिसलं ते फक्त याच विद्यालयात आणि तेही नरेंद्रमुळेच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ग्रंथालयाचं ग्रंथपालपद म्हणजे मासिक वेतन देणारी नोकरी आहे, असं नरेंद्रनं कधी मानलंच नाही. पुस्तकांवर त्याचं नितांत प्रेम होतं. लहान बाळाला जोजवावं, तसं तो पुस्तकांची देखभाल करत असे. शाळकरी मुलांवरही नरेंद्रनं हाच संस्कार बिंबवला. शाळकरी वयातच जर वाचायची आवड निर्माण झाली, तर ती कायम राहील आणि तो वाचनसंस्कृतीचा मूळ संस्कार असेल, अशी ठाम धारणा नरेंद्रची होती. त्यामुळे शाळेतल्या मुलांवर त्यानं हा प्रयोग केला आणि तो मान्यताप्राप्तही झाला. त्या प्रयोगाचं कौतुक झालं, त्याला प्रसिद्धी मिळाली, नरेंद्रचं अभिनंदन झालं. इतर शाळांतही हा प्रयोग राबवण्याच्या ‘सरकारी बाता’ झाल्या, पण पुढे काहीच घडलं नाही. नरेंद्र लांजेवार ना सरकार होता ना शासनातला अधिकारी किंवा कर्मचारी, त्यामुळे टाकणं टाकावं, तसं काही त्याच्याकडून पुस्तकावरचं प्रेम आणि वाचन संस्कृतीबाबत घडलं नाही. शालेय विद्यार्थ्यांवर वाचनाचा संस्कार करण्याचा त्याचा वसा त्यानं कधीच सोडला नाही.

मध्यम उंची, किंचित स्थूल शरीरयष्टी, अतिशय हसरा चेहरा, उत्सुकतेनं आकंठ भरलेले डोळे, त्यावर चष्म्याचं कवच आणि साधेसे कपडे असं नरेंद्रचं व्यक्तिमत्त्व होतं. त्याच्या वागण्या आणि बोलण्यात एक छानसं मूल कायमच दडलेलं होतं. शालेय मुलांशी समरस होण्याआधी हे मूल प्रगट व्हायचं आणि त्या मुलांमधलाच एक म्हणजे नरेंद्र असायचा. मुलांना मूल होऊन साभिनय कविता शिकवणारा, गोष्टी सांगणारा, गावात आलेल्या पाहुण्यांना त्या मुलांसमोर बोलतं करणारा नरेंद्र नसायचा, तर त्याच्यातलं ते मूल असायचं. ते दृश्य पाहणं हा एक अवर्णनीय आनंद असायचा.

नरेंद्र जसा प्रयोगशील ग्रंथपाल होता, तसा लेखक, कवी, वक्ता, कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय चांगला वाचक होता. हे सगळं थोडं थोडं त्याच्यात होतं. खरं तर, त्याला या सर्वच क्षेत्रात खूप काही करायचं होतं, पण त्याचे व्यापच खूप होते. कार्यकर्ता असण्यामुळे चळवळीतला कुणीही कार्यकर्ता आला की, त्याची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी अर्थातच नरेंद्रवर असायची. लेखक, कलावंत किंवा अन्य कुणी मान्यवर आला की, असंच घडायचं. बुलढाणेकरांचा पाहुणा बनून आलेल्यांची काळजी घेण्याचं काम नरेंद्र घरच्या भाकरी खाऊन समरसून करायचा. असं वागणं त्याच्यात जन्मजातच होतं. साहित्य आणि सामाजिक विषयावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात तो गढूनच जायचं. अशी अनेक सभा संमेलनं बुलढण्यात आयोजित करण्यात त्याचा कायमच निर्विष पुढाकार राहिला. यामुळे परिणाम व्हायचा तो त्याच्या लेखनावर. 

बुलढाण्यासारख्या अतिशय आडवळणाच्या गावी राहूनही अशा स्वभावामुळे नरेंद्रचा गोतावळा राज्यभर पसरलेला होता. त्याची ओळख प्रयोगशील ग्रंथपाल आणि वाचन संस्कृतीचा कार्यकर्ता अशीच होती; शिवाय तो जणू बुलढाण्याला महाराष्ट्राशी जोडणारा  सांस्कृतिक दूतच झालेला होता! प्रयोगशील ग्रंथपाल, वाचनसंस्कृतीच्या पालखीचा आघाडीवरचा भोई, तळमळीचा कार्यकर्ता, लेखक या अशा विविध भूमिकांतला  महाराष्ट्रातला दादा माणूस म्हणून नरेंद्रचं नाव प्रस्थापित होतं गेलं आणि त्याचा जनसंपर्क आणखी वाढत गेला. त्यातून लष्करच्या भाकरी भाजण्याचे त्याचे व्यापही वाढत गेले.

निरलस भावनेनं एखादा माणूस केवढा अफाट गोतावळा निर्माण करू शकतो, याचं मनोहर उदाहरण म्हणजे नरेंद्र. मुंबई असो की, नागपूर नरेंद्र कुणाला भेटायला गेला आणि त्याला फार वेळ वाट बघावी लागली, असं कधी घडत नसे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

भारत विद्यालय, प्रगती वाचनालय यासोबतच अनेक संस्था-संघटनांशी नरेंद्रची नाळ जुळत गेली. विदर्भ साहित्य संघ, साधना परिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशी कितीतरी नावं त्या संदर्भात सांगता येतील. या सगळ्या संपर्कातून राज्यभर बाल वाचनालयाची एक चळवळ उभी राहावी, अशी त्याची खूप इच्छा होती. राजकारणातल्या अनेकांनी त्याला अनेकदा तशी आश्वासनंही दिली होती, पण राजकारणातली आश्वासनं म्हणजे पाण्यात निर्माण झालेले बुडबुडे असतात, हे न समजण्याइतका नरेंद्र भाबडा होता.

जतन करणं हीही एक नरेंद्रची सवय होती. विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्या, विशेषांक, नियतकालिकांचे वेगवेगळ्या विषयाला समर्पित असणारे अंक असं बरंच काही त्याच्या संग्रही होतं. एकदा बुलढाण्याच्या वाचनालयातलं व्याख्यान संपल्यावर ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीचा विषय निघाला. एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ती पुरवणी मंगला आणि मी सांभाळत असू. त्या काळात तसंही विदर्भाचं एक प्रमुख दैनिक ‘नागपूर पत्रिका’ होतं आणि आमची ‘साकवि’ (साहित्य, कला, विज्ञान या तीन शब्दांचं लघुरूप!) ही रविवार पुरवणी विविध विषय हाताळणीमुळे चर्चेत होती. ते दिवस मंतरलेले होते असं म्हणायला हवं.

आमचं हे बोलणं सुरू होतं त्या दिवसांत ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीत ‘नोस्टॉलजिया’ हा स्तंभ मी लिहीत होतो. त्या स्तभांत ‘नागपूर पत्रिका’च्या त्या मंतरलेल्या दिवसांबद्दल मी लिहावं असा आग्रह नरेंद्रनं धरला. एव्हाना ‘नागपूर पत्रिका’ आणि ‘नागपूर टाइम्स’ ही दैनिकं बंद पडली होती; बिल्डरनं तर त्या दैनिकांचे जुने अंक बल्लारपूर पेपर मिलला कधीचेच विकून टाकले होते. हे सांगितल्यावर ‘उद्या सकाळी मला विचारल्याशिवाय नागपूरचा प्रवास सुरू करू नका,’ असं जणू वचनच नरेंद्रनं घेतलं. रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफल रंगली तरी सकाळी साडेसातच्या सुमारास ‘नागपूर पत्रिका’ दैनिकाच्या ‘साकवि’ या रविवार पुरवणीचे पंचवीस- तीस अंक घेऊन नरेंद्र हजर झाला. पुढे मी त्या आठवणींचे चार-पाच लेख लिहिले. त्यात नरेंद्रनं दिलेले अंक वापरले, शिवाय त्याच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. तो उल्लेख वाचून हरखलेला त्याचा चेहरा आजही डोळ्यांसमोर आहे.

जतन करण्याच्या या वृत्तीमुळे संदर्भ पुरवण्यात तो तत्पर असायचा. त्याच्याकडे माहिती नसली तर ती मिळवून देण्यासाठी तो धडपड करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे संदर्भ देताना लहान-थोर असं भेदभाव करणं नरेंद्रच्या स्वभावात नव्हतं. 

‘अभिव्यक्तीची क्षितीजे’, ‘अभिव्यक्तीची स्पंदने’, ‘वाचू आनंदे परमानंदे’, ‘विदर्भ राज्य; आक्षेप आणि वास्तव’ अशा अनेक पुस्तकांचं लेखन नरेंद्रनं केलं. ‘विदर्भ राज्या’वरच्या पुस्तकासाठी तो वणवण फिरला. त्यासाठी त्यानं खूप वाचन केलं. असंख्यांच्या मुलाखती घेतल्या आणि अखेर हा ग्रंथ सिद्ध केला. त्याच्या मनात लिहिण्याचे आणखी काही प्रकल्प होते, पण ते तडीस जाऊ शकले नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अतिशयोक्ती न करता सांगायचं तर नरेंद्र सर्वार्थानं साने गुरुजींचा पट्टशिष्य होता. निकोप मनानं माणसाकडे पाहणं आणि तरीही स्पष्ट असणं, एकाच वेळी लहान मूल आणि प्रौढ माणूस म्हणून जगणं, व्यासपीठीय आणि कार्यकर्ताही असणं असे अनेक परस्पर नम्र विरोध नरेंद्रमध्ये होते. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी आलेली होती. त्या सर्वच रूपात त्याला पाहताना साने गुरुजींच्या साधेपणाची आठवण येत असे. नरेंद्र आणि त्याचा साधेपणा कायमचा पडद्याआड गेला आहे.

पत्रकार सोमनाथ सावळे आणि निगर्वी, तसंच काहीसा भाबडा असणारा नरेंद्र लांजेवार हे दोघे जण बुलढाण्याला जाण्याचं माझं मुख्य निमित्त असायचं. ते आता नाहीत. निमित्ताचं अस्तित्वच कायमचं संपुष्टात आल्यानं, माहीत नाही यानंतर कधी बुलढाण्याला जाणं होईल की नाही, आणि तिथल्या विश्रामगृहात पुन्हा गप्पांची मैफल पुन्हा रंगेल की नाही …

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......