पुष्पाताई गणिताच्या बाबतीत ‘अन-अ‍ॅपोलोजेटिकली प्यूरिस्ट’ असाव्यात. त्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘गणितासाठी गणित, रिगरसाठी-कसासाठी गणित, बौद्धिक आव्हानासाठी गणित’ असा असावा
संकीर्ण - श्रद्धांजली
मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर
  • प्रा. पुष्पा आगाशे
  • Fri , 08 October 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली पुष्पा आगाशे Pushpa Agashe ज्ञानप्रबोधिनी Jnana Prabodhini आरंभ महाविद्यालय Aarambha Mahavidyalaya

सुरुवातीला पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या ‘आरंभ महाविद्यालया’त आणि नंतर अमेरिकेतील विद्यापीठात गणिताच्या शिक्षिका म्हणून काम केलेल्या पुष्पा आगाशे यांचं पुण्यात २७ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झालं. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

माझी १९७६ ते १९८४ अशी आठ वर्षं ज्ञानप्रबोधिनीत गेली. त्यांपैकी १९७६-८२ प्रशालेत, १९८२-८४ आरंभ महाविद्यालयात. आरंभ महाविद्यालय हा ‘उद्वाहक’, ‘दूरभाष’, ‘दैनंदिनी’ अशा वजनदार शब्दांच्या मालिकेतला आणखी एक प्रबोधिनीतला खासा शब्द... ‘ज्यूनियर कॉलेज’ या अर्थी.

आरंभ महाविद्यालयाचं दुसरं वेगळेपण - ज्यासाठी मी प्रबोधिनीचा ऋणी आहे - ते म्हणजे निम्मा वर्ग बाहेरून आलेला होता. वलय नसलेल्या शाळांमधून आलेली मुलं आपल्याहून फारशी वेगळी नसतात आणि सामाजिक वैविध्य का महत्त्वाचं, हे समजायला लागायची माझी सुरुवात इथं झाली.

ही प्रबोधिनीतली शेवटची दोन वर्षं माझ्यासाठी फार महत्त्वाची ठरली, आणि त्याचं मोठं कारण म्हणजे पुष्पाताई.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पहिलं इम्प्रेशन. पुष्पाताई तोपर्यंत पाहिलेल्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या, मॉडर्न होत्या, आधुनिक होत्या. ही वेगळेपणाची यादी मोठी आहे. ‘क्राफ्ट चीज’ हे नाव आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडूनच ऐकलं. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक आधुनिक पॉलिश होतं. अस्सल अमेरिकन बाजाचं इंग्रजी, आत्मविश्वास आणि ठामपणातून येणारी स्थिर नजर, वागण्या-बोलण्यात तोपर्यंत फारसा न पाहिलेला एक वेगळा अनाग्रही उदारमतवाद आणि समोरच्याला गृहीत न धरण्याचा उदारपणा. समोरचं माणूस अनुभवानं-वयानं लहान-मोठं कसंही असलं तरी माणूस म्हणून आपल्या बरोबरीचंच आहे; त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपलं आहे; आपण त्याचा उद्धार करायला किंवा त्याच्याकडून आपला करून घ्यायला बसलेलो नाही, अशी त्यांची धारणा असावी असं आता वाटतं. यामुळे त्यांचं दडपण कधी वाटलं नाही, त्यांच्याबरोबरचं नातं सोपं राहिलं.

या त्यांच्या ‘सर्वजनसमभावा’चं एक गंमतशीर उदाहरण पुष्पाताईंनीच पुढे कधीतरी सांगितलं - माझे वडील (कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) त्यांना येता-जाता कधी भेटले की, त्यांच्याशी संस्कृतात बोलत आणि पुष्पाताई त्यांच्याशी अमेरिकन इंग्रजीत. हे कदाचित त्यांचं ‘सेल्फ-अॅसर्शन’सुद्धा असेल.

त्यांच्या बोलण्यातले विराम अर्थपूर्ण असत. आपल्याला काय वाटतं किंवा म्हणायचं आहे, हे स्पष्ट होईपर्यंत त्या थांबत असाव्यात. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा असायला पाहिजेत, असाही त्यांचा आग्रह नसे, असं मागे बघताना वाटतं.

पुष्पाताईंनी आम्हाला अर्थातच गणित शिकवलं. माझ्यासकट अनेकांना आपण बारावीत गणितात पास होऊ शकतो, इथपासून ते आपल्याला गणित(सुद्धा) समजू शकतं इथपर्यंत आत्मविश्वास दिला. ‘गणित’ हा शब्द मी इथे पाठ्यक्रमातला एक विषय आणि गणिती विचारपद्धती आणि मांडणी या दोन्ही अर्थांनी वापरतो आहे.

पुष्पाताई त्या काळात गणिताच्या बाबतीत ‘अन-अ‍ॅपोलोजेटिकली प्यूरिस्ट’ असाव्यात. निखळ सौंदर्यवादी किंवा जी. एच. हार्डीइतक्या कट्टर ‘प्यूरिस्ट’ होत्या की नाही, माहीत नाही, पण त्यांचा तेव्हाचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘गणितासाठी गणित, रिगरसाठी-कसासाठी गणित, बौद्धिक आव्हानासाठी गणित’ असा असावा. ‘उपयोग वगैरे दुसरं कोणी तरी कधी तरी शोधेल’ असाही असावा.

माझ्या एका वर्गमित्रानं एकदा ‘गणिताचा उपयोग काय?’ असा थेट प्रश्न विचारला होता. याची करॉलरी (अनुषंगिक, उपसिद्धान्त) ‘गणित का शिकायचं?’ ही होती. पुष्पाताईंना इतका थेट प्रश्न अनपेक्षित असावा. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं आणि थोडा विचार करून ते फारसं समाधानकारक नाही, हे स्वतःच मान्यही केलं. आपल्याला माहीत नाही किंवा आपण विचार केलेला नाही, हे स्पष्टपणानं मान्य करण्याचा मोकळेपणा त्यांच्याकडे होता. हाही एक संस्कार होता. ऑथेंटिसिटीचा.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या दोन वर्षांत पुष्पाताईंनी वैयक्तिक माझ्यासाठी दोन फार चांगल्या गोष्टी केल्या. मी आठवी-नववीत असल्यापासून मला कृष्णमूर्ती वाचायचं वेड लागलं होतं. पुष्पाताईंना कसं कळलं माहीत नाही, कदाचित मीच सांगितलं असेल. त्यांनी मला स्पष्टपणानं सांगितलं, ‘तुला सायन्स आवडतं, तुला त्यात गती आहे, तर सायन्सच्या अभ्यासातून आधी आपली निरीक्षण आणि विचार करण्याची, बारकावे समजून घेण्याची क्षमता वाढव, प्रगल्भ हो, आणि मग हे सगळं वाच.’ स्पष्ट सांगितलं तरी त्यात करकरीतपणा नव्हता. पुढे दोन वर्षांनी, जेव्हा माझं मलाच लक्षात आलं की, एका मर्यादेपलीकडे आपल्याला कृष्णमूर्ती कळत नाहीत, पण त्यांची भाषा, शैली, आणि प्रतिमासृष्टी यांची आपल्याला भुरळ पडते, तेव्हा पुष्पाताईंच्या या सल्ल्यामागचं शहाणपण मला कळलं.

तेव्हाच्या प्रबोधिनीत काही ‘टॅबू’ विषयांच्या बाबतीत फार बंदिस्त आणि कर्मठ म्हणजे डॉग्मॅटिक दृष्टिकोन होता. इथे दोष देणं हा उद्देश नाही, कटुता तर अजिबातच नाही. काय घडलं त्याची पार्श्वभूमी म्हणून सांगतो आहे. आधीच्या प्रशालेतल्या सहा वर्षांमुळे कळत-नकळत आपण ज्ञानप्रबोधिनी या संघटनेचा भाग आहोत आणि इथल्या सर्व गोष्टी - टॅबूंसकट - चिकित्सा न करता स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी काही तरी माझी विचित्र समजूत झाली होती. या बाबतीत मी एकटाच होतो असंही नाही, आणि तेव्हा तर हे सगळं स्वाभाविकच वाटत असे. यातून एका वर्गमित्राच्या बाबतीत माझ्याकडून टोकाची अनुदार आणि कोती भूमिका घेतली गेली. त्याचा बिचाऱ्याचा काही दोष नसताना त्याला त्रास झाला. हे पुष्पाताईंना कळलं. त्यांनी माझी खाजगीत परखड हजेरी घेतली, पण तीही समजावून सांगण्याच्या भूमिकेतून. याचा माझ्यावर झालेला दूरगामी परिणाम म्हणजे मी अपरिहार्यपणानं त्यांच्याच प्रकारच्या उदारमतवादाकडे आलो. झुंड पद्धतीनं वागायचं नाही म्हणजे काय हे मला चांगलं कळलं. डोकं-मन-बुद्धी गहाण टाकून भावनेच्या भरात वाहवत जायचं नसलं तर स्वतःला किती सांभाळायला हवं तेही कळलं. आपली भूमिका आपल्या स्वतःच्या विचारातून जाणीवपूर्वक आलेली असली पाहिजे, हे त्या प्रसंगातून पुष्पाताईंनी माझ्यावर बिंबवलं.

आमच्यानंतर एक बॅच होऊन आरंभ महाविद्यालय बंद झालं. वर्षभरात पुष्पाताई अमेरिकेत परत गेल्या. ‘मायदेशी गेल्या’ असले विनोदही करून झाले. इथं तुटलेला आमचा संपर्क पुढे १९९८मध्ये पुन्हा अमेरिकेत जुळला. आम्ही पिट्स्बर्गमध्ये १९९८ ते २००३ राहिलो. पुष्पाताई दोन-अडीचशे मैलांवर शेजारच्या ओहायो राज्यात रायो ग्रांड - अर्थात महानदी - नावाच्या नखाएवढ्या गावातल्या विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापक होत्या.

आम्ही त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो ते १९९९च्या वसंतात. त्या इतक्या वर्षांनी भेटणार याचं अप्रूप होतंच. त्याबरोबरच ज्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्या त्यांच्या आगगाडीच्या डब्यासारख्या लांबलचक ट्रेलर घराबद्दलसुद्धा तितकीच - म्हणजे लहान मुलासारखी - उत्सुकता होती. मधल्या वर्षांमध्ये त्यांच्या विनोदबुद्धीवर अमेरिकन मुलामा आणखी चढलेला असला तरी त्यातून पुणं अजिबात उणं झालेलं नव्हतं. आदल्या दिवशी त्यांनी फोन केला, तो काय आवडत नाही हे विचारायला. पण यासाठी त्यांनी उदाहरण काय द्यावं? तर जॉर्ज बुश सिनिअर यांना ब्रोकोली कशी आवडत नाही, हे. परत निघालो तेव्हा माझ्या बायकोला जवळ घेतलं आणि डोळे बारीक करून मला म्हणाल्या, ‘पुढच्या वेळेला तू पण आलास तरी चालेल!’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यांच्या विनोदाबद्दल आणखी एक आठवण. त्यांनीच सांगितलेली. वामनराव अभ्यंकर पुण्याहून निगडीला गेले आणि ‘भाऊ’ झाले. पुष्पाताई त्यांना म्हणाल्या, ‘पूर्वी मुलगी सासरी गेली की, तिचं नाव बदलायची पद्धत होती. तसे तुम्ही निगडीला जाऊन ‘भाऊ’ झालात!’ पुष्पाताई आणि वामनराव बहुधा कॉलेजमध्ये सहाध्यायी होते. त्यांचं हे खेळकर नातं तिथलं असावं.

‘रायो’चा उच्चार कोणी ‘रिओ’ असा केला तर त्या हमखास ‘रायो अॅज इन ओहायो’ असं सांगत. आपलं नाव अमेरिकन मंडळींना कळलं नाही तर ‘पुश-पा’ अशी फोड करून साभिनय सांगत.

इथून पुढे आम्ही अमेरिकेत होतो, तोपर्यंत वर्षातून दोनदा तरी त्यांच्याकडे हक्कानं जात असू. नोव्हेंबरमध्ये ‘थॅंक्स गिव्हिंग’च्या सुमाराला, आणि बाकी कधीही. आमची लेकही तान्ही असल्यापासून त्यांच्याकडे आणि त्यांच्याबरोबर रमायची. भारतातून पाहुणेरावळे-गणगोत कुणीही आलं की, आमची पुष्पाताईंकडे एक चक्कर ठरलेली असे. पुष्पाताई हेच एक प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखी.

उन्हाळ्यात त्यांच्या घरावर शेजारच्या झाडाचे आक्रोड दिवसरात्र पडत असत, त्याची गंमत वाटत असे. काही काळ त्या पियानो शिकत होत्या. खराखुरा पियानो त्यांच्याकडे प्रथम पहिला. पुष्पाताई आणि चांगली वाईन हे समीकरणही माझ्यासाठी रायोत तयार झालं. त्याही पिट्स्बर्गला आमच्याकडे एकदा येऊन गेल्या. त्यांनी त्यांचं मास्टर्स १९६०च्या दशकात कार्नेगी टेकमध्ये - आताची कार्नेगी मेलन - केलं होतं, तेव्हाच्या कडूगोड आठवणींची त्यांच्यासाठी उजळणी झाली.

एकटीचं आयुष्य त्यांनी जाणीवपूर्वक निवडलं असावं. जाणीवपूर्वक स्वीकारलं तर नक्कीच होतं. त्यामागे किती कन्व्हिक्शन होतं, ते माझ्या आईनं एकदा प्रत्यक्ष बघितलं. त्या भारतात आल्या की, माझ्या आई-वडलांना आवर्जून भेटायला येत. आई त्यांच्यासाठी ‘लाडक्या बाई’ होती, वडलांनीही त्यांना बहुधा स.प. महाविद्यालयात शिकवलं असावं.

अशाच एकदा त्या आल्या असताना दुसरंही कोणीतरी आलं होतं. या अगोचर महाभागानं काही कारण नसताना आधी कौटुंबिक चौकशा केल्या आणि नंतर ‘एकटं राहून तुम्ही पुष्कळ काही गमावलं’ अशी शेरेबाजीही केली. जे घडत होतं ते आईला अतिशय अडचणीचं झालं होतं, ती आतून चांगली तापली असणार. इकडे पुष्पाताई त्या गृहस्थांना न रागावता शांतपणानं म्हणाल्या, ‘एकटं राहून मी काय मिळवलंय याची तुम्हाला कल्पनाही येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो.’ ही आठवण माझ्या आईची आहे, पुष्पाताईंनी स्वतः याचा कधी उल्लेखही केला नाही.

त्यांना माणसांचं वावडं अजिबातच नव्हतं, जनसंपर्कही प्रचंड मोठा होता. अमेरिकेतल्या बऱ्याच किंवा बऱ्याचशा प्रबोधिनीयांसाठी पुष्पाताई हे हक्काचं ठाणं होत्या. पुष्पाताई हा पूर्वेचा गड आणि विद्याताई हा पश्चिमेचा. दुसरीकडे त्यांच्या अमेरिकाभर पसरलेल्या असंख्य भाचरा-नातवंडांचे, आप्तेष्टांचे आणि मित्रमंडळींचे उल्लेख ऐकून कधी कधी मला वाटायचं की, यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला हरकत नसावी.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

त्यांच्या तिकडच्या शिक्षक-अध्यापक कारकिर्दीची झलक कधी तरी गप्पांमध्ये मिळायची. रायोसारख्या छोट्या आणि ग्रामीण भागातल्या विद्यापीठात येणारे बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी कुटुंबांमधून येतात, त्यातली बरीच मंडळी ही त्यांच्या त्यांच्या घरांमधली विद्यापीठात शिकणारी पहिलीच पिढी आहे, हे कळलं. तुलनेनं लवकर लग्न आणि चूल-आणि-मूल हीच कौटुंबिक अपेक्षा अशा दडपणाखाली असलेल्या मुलींना शिक्षणाकडे आणि त्यातही गणिताकडे आणण्यासाठी विशेष कसून प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून त्या उन्हाळ्यात मुलींसाठी गणिताची शिबिरं घ्यायच्या. आपल्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचं नाव आपल्याला आणि वर्गातल्या सर्वांना माहीत पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. म्हणून आपल्या प्रत्येक कोर्सच्या सुरुवातीच्या काही तासांच्या सुरुवातींना त्या उषाताई-अशोकरावांच्या पद्धतीचे स्मृतीपोषक खेळही घेत असत.

२००३मध्ये आम्ही पुण्याला परत आलो. त्या भारतात यायच्या, तेव्हा भेटीगाठी व्हायच्या. पुढे त्यांनी त्यांच्या विद्यापीठातून निवृत्ती घेतली. अमेरिकेत भाचरांबरोबर आणि जवळपास काही काळ राहून पुण्याला परत आल्या. तिकडे असताना दोन-पाचशे मैलांवर राहूनही जो सहज संपर्क होता, तो इथल्या धबडग्यात दोन-पाच मैलांवर असूनही दुरापास्त झाला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

२०१९मध्ये त्यांनी माझ्या आग्रहाखातर पुणे विद्यापीठातल्या माझ्या विभागात एक कोर्स शिकवला. ते चार महिने आम्ही तिथे नियमित भेटत होतो. कुठली पुस्तकं वापरायची, ‘आजकाल’च्या विद्यार्थीवर्गाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि शिकण्याची शैली या आणि अशा बऱ्याच बारकाव्यांबद्दल पुष्कळ चर्चाही झाल्या. आमच्याकडे शिकवायला येणारी त्यांची एक बालमैत्रीणही इथं त्यांना अनपेक्षित भेटली. वेगळं सांगायची गरज नाही, पण विद्यार्थी त्यांच्यावर आणि त्यांच्या शिकवण्यावर निहायत खूष होते. माझ्यासारख्या अवघडदासाच्या गुरू म्हणूनही त्यांना त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटला असावा.

यानंतर मात्र माझा त्यांच्याशी संपर्क कमी होत गेला. कोविडच्या काळात तो पूर्ण तुटला. त्यांच्या  शेवटच्या काळात मी काही करू शकलो नाही आणि भेटायचंही राहून गेलं, याची रुखरूख आता राहिली आहे.

.............................................................................................................................................

लेखक मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्यूलेशन विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. 

mihir.arjunwadkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......