श्रीनिंचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षाग्रंथाकडे वळायचे, की या समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे, याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सदा डुम्बरे
  • श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि ‘डोह : एक आकलन’चे मुखपृष्ठ
  • Fri , 05 February 2021
  • ग्रंथनामा श्रीनिवास विनायक कुलकर्णी Shrinivas Vinayak Kulkarni डोह Doh डोह : एक आकलन Doh - Ek Akalan

मराठीतील ललित गद्य या साहित्यप्रकारात स्वत:ची निजखूण उजळ करणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आत्मनिष्ठता हे या लेखनप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अंतर्मुख होऊन जगण्याचा तळ गाठणारे चिंतनगर्भ लेखन करणे सहजसाध्य नाही. प्रयासाने लेखनकौशल्य प्राप्त करून भाषिक सामर्थ्यावर तडीला नेता येईल, असा हा वाङ्मयप्रकार नाही. आत्मचिंतनातून निर्माण होणाऱ्या अनाहत नादाला साक्षीभावाने ओळखून त्याच्या प्रकटीकरणाला शब्दस्वरांचे माध्यम उपलब्ध करून देण्याची ही प्रक्रिया गुंतागुंतीच्या आत्मलक्ष्यी मनोव्यापारांची असते. तरल, संवेदनशील, सजग आणि कविवृत्तीच्या लेखकाने केलेले अशा प्रकारचे लेखन वेगळ्याच भाववृत्तीचे असते. म्हणून ते अल्प असते, अल्पायुषी मात्र नसते.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी अशा जातकुळीचे लेखक आहेत. त्यांचा ललितलेखांचा पहिला संग्रह ‘डोह’ प्रसिद्ध होऊन आता पंचावन्न वर्षं झाली तरी तो आजही आपल्या मंद दरवळाने मराठी साहित्यविश्व सुगंधित करत आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे स्मरण म्हणून संकल्पित केलेल्या त्यावरील समीक्षेच्या संकलनाचे ‘डोह : एक आकलन’ हे देखणे पुस्तक अलीकडेच वाचकांच्या हाती पडले आहे. मराठीतील ललित गद्याच्या शिखरस्थानी असलेल्या ‘डोह’च्या मानमरातबाला साजेशी देखणी निर्मिती हे या पुस्तकाचे प्रथमदर्शन असले तरी त्या रूपाला शोभेल असेच त्याचे अंतरंग आहे.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत मराठीतील बहुतांश नामवंत समीक्षकांनी केलेल्या समीक्षेचे काटेकोर संकलन यात आहे, ‘श्रीनिं’च्या इतर ललित लेखनाच्या पुस्तकावरील परीक्षणे यात आहेत, त्यांची ओळख सखोल करणारे इतरांचे व त्यांचे स्वत:चे परिचयपर व आत्मनिवेदनात्मक लेख यात आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाचे अतिशय साक्षेपी संपादन करणाऱ्या विजया चौधरी यांची संपूर्ण पुस्तकाचे सार मांडणारी, संकलनात्मक व विवेचनात्मक अशा दोन्ही अंगांनी जाणारी विस्तृत प्रस्तावनाही आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

श्रीनिवास कुलकर्णी हे ‘मौज’चे लेखक आणि भूतपूर्व संपादक. ‘डोह’ची प्रथमावृत्ती व पुढील नऊ आवृत्त्याही त्यांनीच प्रकाशित केल्या. त्यांचे इतर संग्रहही त्यांनीच काढले. ‘डोह’ची संकल्पना व निर्मिती हा आपल्या लेखकाचा व संपादकाचा सन्मान करण्याची वाङ्मयीन कृती आहे, याचे भान मौज प्रकाशनाच्या विद्यमान संचालकांना असल्याचे प्रतिबिंब पुस्तकात उमटले आहे. त्यांचे मूल्यभान आणि अभिरुची इथे ठळकपणे अधोरेखित करणे समयोचित ठरेल.

या पुस्तकात समाविष्ट झालेले बहुतेक सारे लेखन हे स्वत: ‘श्रीनिवास’ कुलकर्णी यांनी गेले अर्धंशतक त्या त्या वेळी गोळा करून संग्रहित केले होते. यासाठी त्यांना दाद द्यायला हवी. वाङ्मयीन इतिहासलेखनासाठी अशा तऱ्हेची संग्राहक वृत्ती मोलाची ठरते, हे सर्वांना विदीत आहे.

अडीचशेवर पृष्ठांचे हे पुस्तक पाच भागांत विभागले आहे. चाळीस एक दिग्गज समीक्षक वा लेखकांना या पुस्तकावर व श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावर लिहावेसे वाटावे, हे त्यांच्या लेखनाचे वजन जोखणारे एक परिमाण आहे. वा. ल. कुलकर्णी, दुर्गा भागवत, म.द. हातकणंगलेकर, द. भि. कुलकर्णी, सरोजिनी वैद्य, सुधा जोशी, आनंद यादव, प्रल्हाद वडेर, वासंती मुझुमदार, प्रभा गणोरकर वगैरे कितीतरी नावं. प्रत्येकाची समीक्षादृष्टी आणि लेखनशैली आणि प्रत्येकाला आढळलेली सौंदर्यस्थळे भिन्न असली तरी मराठी ललित गद्याला या लेखनाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, याच समेवर येऊन ते थांबले आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एका निसर्गसंपन्न खेड्यातील बालमनाने घेतलेल्या उत्कट अनुभवांची एका सर्जनशील, प्रतिभावंत व संवेदनशील लेखकाने केलेली सौंदर्यशाली पुननिर्मिती हा ‘डोह’मधील लेखनाचा गाभा आहे. अनुभवांचं हे भावनांतून शब्दांत रूपांतर होताना लेखक त्याकडे एक निरीक्षक म्हणून अंतर ठेवून पाहू शकतो. अनुभव घेणाराही तोच आणि पाहणाराही तोच. एकाच व्यक्तीच्या दोन अवस्थांचा, बाल व प्रौढ मनांचा ऊन-सावलीसारखा होणारा पाठशिवणीचा खेळ शब्द व प्रतिमांच्या सामर्थ्याने वाङ्मयीन सौंदर्याचे अभूतपूर्व कलात्मक रूप धारण करतो. तरल सौंदर्यात्मक अंतर संपूर्ण लेखनात आणि लेखनाच्या प्रदीर्घ कालखंडात कायम ठेवण्याचे अग्निदिव्य लेखकाने पार पाडले आहे. काळाचे अंतर पार करून बाल व प्रौढ मनाचे अद्वैत साधणारी लेखनशैली हे या ललितलेखनाचे सत्त्व आहे. आध्यात्मिक अनुभवांच्या संदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या संज्ञांचे ढोबळपणे प्रयोजन करायचे तर दृश्य, दर्शक आणि द्रष्टा यांतील एकरूपता, एकतानता मराठी ललित गद्यात असाधारण आहे. इथे ही त्रिपुटी विरून गेली आहे. दोन ‘मीं’चे स्वतंत्र आणि स्वायत्त अस्तित्व अबाधित ठेवतानाही त्यातील एकतानतेने निर्माण होणारा स्वरसंवाद व स्वरमेळ उच्च प्रतीचा काव्यात्मक अनुभव प्रकट करतो.

सरोजिनी वैद्य, वा.ल. कुलकर्णी यांची आस्वादक समीक्षा किंवा आनंद यादव यांनी संहितेचे केलेले शैली वैज्ञानिक विश्लेषण, ललित गद्याचे बालकवी म्हणून म.द. हातकणंगलेकर यांनी लेखकाची केलेली स्थाननिश्चिती असे अनेक लेख या पुस्तकाला समीक्षा ग्रंथाच्या उंचीवर नेऊन ठेवतात. अलीकडच्या काळात मराठी साहित्यातील जीवनदर्शनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि अभिव्यक्तीचा स्वरही उंचावला आहे. दलित, ग्रामीण आणि स्त्री साहित्याने पारंपरिक साहित्यिक चौकटींची सर्जनशील मोडतोड केली आहे. त्या तुलनेत ‘डोह’मधील अनुभव विश्वाच्या मर्यादा नव्याने ठळक होत आहेत. परंतु तरीही लेखकाच्या आत्मनिष्ठ अभिव्यक्तीच्या सामर्थ्यामुळे ‘डोह’ची वाचनीयता आणि लोकप्रियताही टिकून आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा :

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ने परमोच्च आविष्काराचे गाठलेले शिखर अजून तरी अनुल्ल्यंघ राहिले आहे!

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललितलेखनावर आधारित अभिवाचनाची भन्नाट व्हिडिओ-मालिका

..................................................................................................................................................................

या लेखनाची आणखी समीक्षा होण्याच्या शक्यता संपल्या आहेत असे वाटत असताना, कादंबरीसारखी लोकप्रियता मिळालेल्या या पुस्तकाच्या वाचकलक्ष्यी समीक्षेतून त्यांच्या लोकप्रियतेचे नवे गमक गवसू शकेल.

पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा. ऐतिहासिक संदर्भात ‘डोह’चे वेगळेपण त्यामुळे लक्षात येते. प्रकाश संत आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘लंपन’ची चाहूल लागते. अशा तऱ्हेच्या लेखनाच्या भविष्यातील मार्गक्रमणाचे ते दिशादर्शक होते.

श्रीनिवास कुलकर्णींचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षा ग्रंथाकडे वळायचे, की या समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे हा पेच कसा सोडवायचा याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल. एक मात्र खरे; वाचनानंद दोन्हीकडेही आहे.                            

(‘रोहन साहित्य मैफल’च्या फेब्रुवारी २०२१च्या अंकातून साभार.)

..................................................................................................................................................................

‘डोह : एक आकलन’ - संपादन विजया चौधरी, मौज प्रकाशन गृह, मुंबई, पाने - २६४, मूल्य - ६०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan

..................................................................................................................................................................

लेखक सदा डुम्बरे ज्येष्ठ संपादक आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक म्हणून काम केले आहे.

sadadumbre@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......