मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज थोरच आहे, हे आता ठासून मांडलं जाईल. मात्र एक अशोभनीय लबाडी त्यांनी केली
संकीर्ण - पुनर्वाचन
हेमंत कर्णिक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 29 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन नरेंद्र मोदी Narendra Modi कोविड-१९ COVID-19 करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

मोदींच्या कालच्या भाषणाचं विश्लेषण होतं आहे. २० लाख कोटी हा आकडा त्यांनी घेतला आणि तो कसा राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या १० टक्के आहे; त्यामुळे कसं शेतकरी, कष्टकरी ते कारखानदार, अशा सगळ्यांचं कल्याण होणार आहे वगैरे ते बोलले. पण त्यांनी तपशील काही सांगितले नाहीत. ‘तपशील अर्थमंत्री सांगतील,’ इतकंच ते म्हणाले. अर्थात, ते पॅकेज कसं थोर आहे, हे त्यांनी अगोदरच सांगून टाकल्यामुळे तपशिलांविना, विश्लेषणाविना त्याचं गुणगान करण्याची तरतूद त्यांनी करून ठेवली.

प्रत्यक्ष पॅकेज उद्या येवो की परवा की महिन्याने, ते थोरच आहे, हे आता ठासून मांडलं जाईल. मात्र एक अशोभनीय लबाडी त्यांनी केली. ‘आत्मनिर्भर’, ‘आत्मनिर्भर’ असा गजर त्यांनी दहा-बारा किंवा जास्त वेळा केला, पण ‘रिझर्व बँकेने याआधी वितरित केलेल्या रकमा धरून वीस लाख कोटी रुपयांचं पॅकेज,’ असं मात्र ते एकदाच म्हणाले. याला लबाडीच म्हणतात.

त्यांच्या भाषणात विसंगती पुष्कळ होती. काही भाग अगम्य होता. उदाहरणार्थ, ‘Y2K’च्या संकटावर भारतीय तंत्रज्ञांनी मात केली, हे मोठं कर्तृत्व. ‘Y2K’मुळे भारतात इंग्रजी येणारे प्रशिक्षित संगणकतज्ज्ञ मोठ्या संख्येने आहेत, हा शोध जगाला लागला, ही गोष्ट खरी; पण त्यात भारतीयांची बुद्धी नाही सिद्ध झाली. असो.

‘भारतीय आत्मनिर्भरता वैश्विक कल्याणाला सामावून घेते, भारताची प्रगती म्हणजे विश्वाची प्रगती,’ अशा अर्थाचं काहीतरी ते बोलले. म्हणजे काय कोणास ठाऊक. पण पुढे ‘समय की मांग है के भारत हर स्पर्धा में जीते,’ असंही म्हणाले! या दोन विधानांत विसंगती दिसते.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

‘आत्मनिर्भरता ही पाच पिलरांवर (त्यांचा शब्द) उभी असते,’ असं सांगून त्यांनी ते पाच पिलर असे सांगितले - economy, infrastructure, technology-driven system, demography आणि demand. हे इंग्रजीत लिहिण्याचं कारण असं की, हे शब्द इंग्रजी आहेत, असं समजून त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे ‘इकॉनॉमी’ आणि ‘डिमांड’, हे दोन एकमेकांपासून वेगळे पिलर कसे, असा प्रश्न पडू शकतो. त्यात ‘डिमांड’ विशद करताना ते घसरून सप्लायवर गेले! सप्लायवरच बोलले. आणि ‘डिमांड’बद्दल अक्षरही बोलले नाहीत. ‘demography’ म्हणजे त्यांना काय अभिप्रेत आहे, हे कळणंसुद्धा अवघडच.

जे कळलं, ते असं -

१. लोकल के लिये व्होकल बनो. लोकलला इतकं मोठं करा की, ते ग्लोबल झालं पाहिजे.

एका बाजूने हे कळतं, पण एखादं उदाहरण दिलं असतं, तर बरं झालं असतं. याला ‘धोरण’ म्हणायचं, तर शासन आता कोणत्या क्षेत्रात, कोणत्या मालाची आयात कमी करणार आहे आणि स्थानिक उत्पादनाला उत्तेजन देणार आहे, हे स्पष्ट झालं असतं.

(पण माझ्या थिअरीनुसार त्यांचं बोलणं स्पष्ट नसणं, हेच सुसंगत आहे! कसं ते नंतर पाहू.)

२. पॅकेजमध्ये लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉज (सगळे त्यांचेच शब्द) यांवर जोर दिला आहे, असं ते म्हणाले.

यापासून सावध रहायला हवं. अगोदरच उत्तर प्रदेश सरकारने तीन वर्षांसाठी कामगार कायदे गुंडाळण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पॅकेजमधून जे बाहेर निघेल, ते सामान्यजनांसाठी सैतानी ठरू नये, ही प्रार्थना.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

३. लॉकडाउन-४विषयी पुरी जानकारी १८ मे च्या अगोदर मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे एक प्रकारे हात झटकले.

(पण माझ्या थिअरीनुसार हेदेखील सुसंगतच आहे!)

याशिवाय आणखी निरीक्षणं म्हणजे, मागचा भारताचा झेंडा. त्यातला हिरवा रंग अगदीच तोकडा दिसत होता. या माझ्या निरीक्षणाचं बिल माझ्या वाकड्या नजरेवर लावता येईल, हे खरं; पण मोदीजींच्या परफॉर्मन्समध्ये काहीही अनवधानाने घडतं, असं अजिबात वाटत नाही. तो ‘परफॉर्मन्स’च असतो. म्हणूनच ते जरी समोरच्या टेलिप्रॉम्प्टरवरचं वाचत होते, तरी रेकॉर्डिंग सलग नव्हतं. तीन तरी तुकडे जोडलेले होते.

दुसरं असं की, त्यांनी तीन वेळा संस्कृत वचनं उदधृत केली. (‘मित्रों’ न म्हणता) ‘साथियों’, अशा संबोधनामधून ते ज्या कोणाशी बोलत होते, त्यांच्यापैकी किती लोकांना ते संस्कृत समजलं असेल? आणि समजलं नसेल, तर संस्कृत वचनं आवर्जून सांगण्याचं प्रयोजन? ते दर वेळी संस्कृत वचन सांगतात. कधी ‘शास्त्रों मे लिखा है,’ अशी सुरुवात करून सांगतात.

मला असं दिसतं की, संस्कृत कोणाला कळो, न कळो; ‘संस्कृतात काहीतरी असं असतं, जे वेळोवेळी उपयुक्त ठरतं,’ असं एक मूल्य प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘संस्कृत ही भाषा आपल्या थोर वारशाचा भाग आहे, ती ज्ञानाने समृद्ध आहे, ती थोर आहे,’ असं ठसवलं जात आहे.

हा रस्ता आपल्याला कुठे नेणार, हे ज्याने त्याने पाहावं. पण संस्कृतात ते जे सांगतात, त्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही, हे नक्की.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

यातूनच मला जाणवतं ते असं, की बोलणं आणि करणं या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी असून त्यांचं कार्यसुद्धा वेगवेगळं आहे, याची पूर्ण जाणीव मोदीजींना आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावणं, त्यातली विसंगती दाखवून देणं, उक्ती आणि कृती यांच्यातल्या अंतराकडे लक्ष वेधणं, या गोष्टी त्यामुळे वरवरच्या आहेत.

ते बोलतात, तेव्हा अपरिहार्यपणे त्यांना विधानं करावी लागतात. पण त्यांना जे पोचवायचं आहे, ते त्यांच्या विधानांमध्ये आहे; असं मानणं ही भाषेला केवळ बौद्धिक संवादाचं माध्यम मानणाऱ्यांची अंधश्रद्धा आहे! त्यांच्या बोलण्यातून प्रक्षेपित होणारा संदेश विधानांमधून नाही, तर बोलण्याच्या पद्धतीमधून, ‘आत्मनिर्भर’ यासारख्या शब्दाच्या पुनरुच्चारातून, ‘ठेलावाले’, ‘रेडीवाले’, ‘पशुपालक’ अशा शब्दांचा नुसता उच्चार करण्यामधून प्रक्षेपित होत असतो. त्यांचे वेगवेगळे संवादोत्सुक श्रोते आपापला ‘शब्द’ उचलतात आणि संवाद पूर्ण होतो. एक सलगी निर्माण होते. त्यातून आपुलकी येते.

इथं एक प्रयोजन पूर्ण होतं. बोलण्याला, ‘शब्दा’ला कृतीची जोड हवी, ही अपेक्षा विश्लेषकांना असते; अशा प्रकारच्या संवादातून समाधान पावणाऱ्या श्रोत्यांना नसते!

मोदीजींचं (किंवा त्यांच्या सहकाऱ्यांपैकी आणखी कोणाचंही) बोलणं आणि त्यांच्या सरकारची वा पक्षाची कृती यांच्यात सुसंवाद शोधणं, हा वायफळ उद्योग आहे. त्यापेक्षा त्यांच्या बोलण्यातून काय साधलं जातं, याची चौकस पहाणी करावी आणि त्यांच्या कृतीतून ते काय साधतात, हे वेगळं तपासावं, असं मला ठामपणे वाटतं.

प्रथम प्रसिद्धी - १३ मे २०२०

..................................................................................................................................................................

लेखक हेमंत कर्णिक ‘अक्षर’ या दिवाळी अंकाचे एक संपादक आणि स्तंभलेखक आहेत.

hemant.karnik@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......