अजूनकाही
एखादं योग्य दिशा दाखवणारं होकायंत्र बिघडलं तर आपण दिशा हरवून भरकटत राहतो, पण कवी शेषराव पिराजी धांडे यांचा ‘बिघडलेले होकायंत्र’ हा कवितासंग्रह दिशादर्शकाचं काम करतो. यातील कविता वास्तव जीवनाचं दर्शन घडवतात. या कवितेत सामाजिक भान असून मनाच्या तळापर्यंतचा विद्रोह मांडला आहे. आजूबाजूचं वातावरण प्रतिकूल असूनही कवी आपल्या कवितेतून वास्तविकता मांडतो -
कितीही सांभाळतो म्हटलं मनाला
आवरत नाही मेंदूतील चीड, येत राहते शब्दात
बर्बाद झालेल्या कुटुंबाची उजळणी होते
पुन्हा पुन्हा हिंसकवृत्तीने जाळतील घरे
तरीही मी तुमचा आदरच करू?
या कवीमध्ये दोन व्यक्तिमत्त्वं वावरताना दिसतात. त्यातील एक सतत दुर्लक्ष करत राहतो, पण दुसरा विद्रोहाचा गाठोडं घेऊन निघाला आहे. स्वस्थ बसत नाही, तो प्रश्न विचारतो. या कवीला अन्याय आणि अन्याय करणाऱ्यांचे हात दिसतात. इतर व्यक्ती सत्तेसोबत असल्या तरी कवी अन्यायाविरुद्ध बंड करून आपली व्यथा मांडतो आहे. कवी आशावादी आहे. तो म्हणतो, ‘आम्ही सारे एक आहोत.’
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
आपल्याला विसाव्याची हक्काची जागासुद्धा नाही. वरती आभाळ मोकळं आहे, असं वाटत असलं तरी त्यावर शत्रूचा ताबा आहे. आपलीच पाखरं दिशाहीन झाली आहेत. इथं रोज नवे नवे प्रश्न जन्म घेत आहेत. आपल्याच प्रश्नावर संधिसाधूंनी पोळी भाजली आहे. ती खाऊन ते ढेकर देत आहेत, पण आपल्या भाकरीचं काय? कुठलातरी स्वयंघोषित नेता येतो आणि त्याचा स्वार्थ साधून शत्रूला मिळतो, मग समाजानं कोणाकडे बघावं?
कोमात गेलेली चळवळ पडून आहे खाटेवर
हताश झालेली बुढी निरखून पाहते संविधानाचा शब्द नि शब्द….
आपल्या स्वार्थासाठी माणसाला नागवलं जातं, नाचवलं जातं, हवं तसं वागवलं आणि वाकवलं जातं. इथले वंचित खऱ्या अर्थानं गुलाम आहेत. त्यांना मानसिक गुलाम बनवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय त्यांना दिसत नाही, कळत नाही. इथल्या नाकारलेल्या वर्गाला पुढे जाऊच दिलं जात नाही. इथल्या अंधारावर मात करण्यासाठी कवी म्हणतो – ‘झोपडीत अंगार घेऊन जगत आहे एक म्हातारा.’
सत्ताधाऱ्यांनी समाजात काहीही चित्र उभं केलेलं असलं तरी कवी सांगतो, मतांसाठी लोकांना जाती-धर्मात वाटलं, धर्माचं राजकारण वाढवलं, धर्माच्याच चर्चा केल्या, मग आपण धर्मनिरपेक्ष कशावरून आहोत?
कवीला गुलामी मान्य नाही, तो म्हणतो,
गुलाम म्हणून जगत आले माझे पूर्वज
इतिहासाचा ठेवा सांभाळत
मी जगू पाहतो यापासून वेगळा…
..................................................................................................................................................................
हेही वाचा : रा. ना. चव्हाण हे ‘अॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!
..................................................................................................................................................................
सत्य सांगणं, मांडणं सोपी गोष्ट नाही. सत्ताधाऱ्यांना तर सत्य अजिबात आवडत नाही. कारण सत्यामुळे सिंहासनं सोडावी लागतात. सत्याची बाजू घेणं खूपच दुःखदायक झालं आहे, तरीही कवी संकटांना घाबरत नाही. तो म्हणतो -
कालपर्यंत बोललो नाही
शत्रू ठरलो नाही जगाचा
आज सत्य मांडलं समाजासमोर
कर्दनकाळ ठरलो जगाचा
दुनिया बदलेलं या इराद्याने
रोपांना घातले पाणी….
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हल्ली शत्रू आणि मित्र यात फरक उरला नाही. पाय मागे खेचण्याचे काम मित्र करू लागले आहेत. नीतिमत्ता मातीत मिसळवली आहे आणि एकमेकांना पाण्यात पाहण्याची स्पर्धाच चालू झाली आहे. दुसऱ्याच्या अपयशासाठी स्वतःचं नुकसान करून घेणाऱ्या माणसांकडून नात्यातील प्रेम टिकवण्याची आशा का करावी? हल्ली स्वतःच्या लाभासाठी माणसं खालच्या पातळीला जात आहेत. ते कवी दररोज बघतो.
पूर्वीसारखा ओलावा उरला नाही नात्यात
धुसफूस कशाने वाढली हेदेखील कळत नाही
समधर्मीय, समव्यवहारी एकाच बाजारपेठेत चालू झाली स्पर्धा…
दोन समाजाच्या स्थितीत आणि विचारप्रणालीत खूप मोठं अंतर आहे. देशात संविधानामुळे समानता आली खरी, पण ती कायद्यापुरतीच मर्यादित राहिली. हजारो वर्षांचा जुलूम काही वर्षांत कमी होऊ शकत नाही. लोकांची मानसिकता बदलणं खूप कठीण काम आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य नाही. तरीही इथला प्रस्थापित वर्ग ते चिमूटभर स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेण्याच्या विचारात आहे. इथल्या वंचितांना मिळणाऱ्या हक्कामुळे उच्चवर्णीयांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे कवी त्यांना म्हणतो की, ‘पोटात दुखणाऱ्यांनी उपचार करावा मेंदूचा…’
कवी वंचितांच्या, शोषितांच्या, विस्थापितांच्या बाजूनं उभा आहे. त्यांचे प्रश्न, जीवन-मरण, हाल-अपेष्टा, सुख-दुःख स्वतः जगत आहे, भोगत आहे. म्हणूनच त्याच्या कवितेला एक विलक्षण खरेपणाची धार आहे. तो म्हणतो,
कुठलंच आकाश नव्हतं माझ्या वाट्यावर
तुमच्या आभाळाचे गुणवंत कशासाठी गाव?
हे ‘बिघडलेले होकायंत्र’ आपल्याला खरी दिशा दाखवण्याचं काम करतं. या कवितासंग्रहातील सर्वच कविता वस्तुस्थिती मांडतात.
..................................................................................................................................................................
बिघडलेले होकायंत्र - शेषराव पिराजी धांडे
सृजन प्रकाशन, मुंबई
पाने - ६४, मूल्य - १५० रुपये.
..................................................................................................................................................................
हेमंत दिनकर सावळे
hemantsawale15@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment