टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, एम.एस. स्वामीनाथन, तरुण विजय, आयुष मंत्रालय, आयआयटी कानपूर आणि संजय राऊत
  • Wed , 14 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी एम.एस. स्वामीनाथन M. S .Swaminathan तरुण विजय Tarun Vijay आयुष मंत्रालय AYUSH Ministry आयआयटी कानपूर IIT Kanpur संजय राऊत Sanjay Raut

१. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जाहीरपणे ‘पप्पू’ असा उल्लेख केल्याबद्दल मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला सर्व पदांवरून दूर करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नुकतीच मंदसौरला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मेरठ जिल्हाप्रमुख विनय प्रधान यांनी व्हॉटसअॅप आणि सोशल मीडियावर राहुल गांधींचे कौतुक करणारे काही संदेश पाठवले होते. मात्र, त्यात राहुल यांचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला होता. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण द्विवेदी यांनी प्रधान यांना सर्व पदांवरून दूर केल्याचं जाहीर केलं. मात्र, प्रधान यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून अशा प्रकारचे कोणतेही मेसेजेस न पाठवल्याचा, तसंच स्क्रीनशॉटस् बनावट असल्याचा दावा केला.

काँग्रेसमध्ये, तेही उत्तर प्रदेशात जिल्हा प्रमुखपदावर पोहोचलेला अस्सल काँग्रेसी माणूस गफलतीने असं काही करील, असं वाटत नाही. ही मंडळी गांधी घराणेभक्तीच्या लोणच्यात अशी मुरलेली असतात की, रात्री झोपेतून उठवून विचारलं, तरी विनम्रपणे त्यांच्या आरतीची टेप लावतील. बाकी, पप्पूला पप्पू म्हटलं तर इतकं काय चिडायचं, काँग्रेसमध्ये काही लोकशाहीच नाही ब्वॉ, अशा छापाच्या प्रतिक्रिया देणाऱ्यांनी ‘फेकू चांगलं काम करतो, फेकूने देशाला दिशा दिली’ वगैरे कौतुकाची ट्वीट्स करून आपल्या पक्षातून येणारी प्रतिक्रिया जरूर पाहावी.

……………………………………………………………………………………………

२. देशात गोहत्या आणि बीफबंदीच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’चे माजी संपादक आणि भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांनी उत्तर भारतीयांच्या खानपानाच्या सवयी संपूर्ण देशावर लादू शकत नाही, असं म्हटलं आहे. कथित गोरक्षकांनी स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना पुन्हा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी वीज, रेल्वे, महामार्ग बांधणी आणि महिला सशक्तीकरण आदी मुद्द्यांवर काम करत आहेत. पण तुम्ही मात्र आपापल्या आवडीनिवडींवर देश चालवण्याचा प्रयत्न करत आहात, असे खडे बोलही त्यांनी गोरक्षकांना सुनावले आहेत.

तरुण विजय यांनी हा डोस जाहीरपणे दिला, याबद्दल अभिनंदन. मात्र, खासगीतलाही संदेश हाच असेल तर तोच आहे, हे या गो-गुंडांपर्यंत पोहोचवण्याची काही कठोर व्यवस्था व्हायला हवी. नाहीतर शून्य परिणाम होईल. त्यांना जाहीरपणे एक बोलल्यानंतर प्रत्यक्षात दुसरंच, त्याविरुद्ध करायचं असतं, अशी सवय अंगवळणी पडली आहे. त्यामुळे ते साक्षात पंतप्रधानांच्या कानपिचक्याही गांभीर्याने घेत नाहीत, तरुण विजय यांना कोण जुमानणार?

……………………………………………………………………………………………

३. कानपूरच्या प्रतिष्ठित आयआयटी संस्थेने विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभाच्या वेळी नेहमीच्या काळ्या रंगाच्या झग्याच्या पेहरावाऐवजी कुर्ता, पायजमा आणि चुडीदार असा पेहराव करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा प्रथमच विद्यार्थी पदव्या स्वीकारताना ब्रिटिशकालीन झग्याऐवजी कुर्ता-पायजमा (मुलांसाठी) आणि कुर्ता-चुडीदार (मुलींसाठी) परिधान करणार आहेत, असे आयआयटी-के मधील प्राध्यापक इंद्रनील मन्ना यांनी सांगितले. यापुढील सर्व दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांना भारतीय वस्त्रे परिधान करावी लागणार आहेत, असेही ते म्हणाले.

ही मुलं या संस्थांमध्ये जे काही शिकतात, त्यातले नेमके किती शोध भारतात लागले, भारतीयांनी लावले; किती तंत्रज्ञान इथं विकसित झालं, किती मूळ कल्पना इथं जन्मल्या, किती शाखांचा विकास इथं झाला, याचा विचार केला, तर भारतीय वेषाचा आग्रह विनोदी वाटायला लागतो. अर्थात, असं बोलण्यात अर्थ नाही. हे कपड्यांच्या बाबतीत आग्रही आहेत, तिथवर ठीक आहे. भारतीय ‘ज्ञाना’च्या नावाखाली सध्या जे काही उच्छाद मांडतंय, ते इथं हट्टानं शिकवायला लागले, तर आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्यांना गोशाळा काढायला जमतील फार फार तर.

……………………………………………………………………………………………

४. भूकंप हा चिलटा-झुरळांच्या सांगण्यावरून होत नसतो, अशी खिल्ली भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी उडवली. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राज्यात भूकंप होईल, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

ही एक वेगळीच गंमत आहे. राऊत यांचा आव आणि आविर्भाव खूप मोठा असला, तरी त्यांची महाराष्ट्रात बरी-वाईट अशी काही ना काही ओळख आहे. त्यांना चिलट आणि झुरळ म्हणायला किमान त्या वकुबाचा, त्यांच्या वरचा नेता तरी निवडायचा (ती हिंमत होत नाही, कुठे फटके पडतील किंवा शाई फासली जाईल, हे सांगता येणार नाही; शिवाय राऊत व्यक्तिश: पिसं काढतील ती वेगळीच); त्यांना चिल्लर ठरवायला कोणीतरी हाके पुढे येतात, त्यांच्या मोजमापासाठी कीटक तरी सापडेल का? थेट जिवाणू-विषाणू-अमीबाविश्वातच उतरायला लागेल.

……………………………………………………………………………………………

५. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी मोदी सरकारच्या शेती विषयक धोरणाचं कौतुक केलं आहे. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आखलेली धोरणं आणि योजना या खरोखरच शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आहेत, असं स्वामिनाथ यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यासाठी अनेक शिफारसी येत असतात. त्या शिफारसींचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतं आहे, असं ते म्हणाले आहेत.

हा हा हा, हे गृहस्थ आवडले आपल्याला. गेले काही दिवस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते आहे, म्हणून जो काही प्राप्तिकरदात्या मध्यमवर्गीय नोकरदारांचा विलाप सुरू होता, त्यात उत्पादनखर्च अधिक ५० टक्के असा हमीभाव देण्याची आणि तात्पुरता उपाय म्हणून का होईना, कर्जमाफी मान्य करण्याची सूचना करणाऱ्या स्वामीनाथन यांची अक्कल काढणाऱ्यांची बहुसंख्या होती. आता स्वामीनाथन यांनी मोदीस्तुती करून यांच्या पायाखालचं जाजम खेचलं आहे आणि इतके दिवस त्यांच्या सूचना कशा क्रांतदर्शी होत्या, असं सांगत फिरणाऱ्या शेतकरी नेत्यांवर तोंड लपवत फिरण्याची पाळी आणली आहे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......