टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामदेव बाबा यांचे पौष्टिक हॉटेल, नरेंद्र मोदी, स्नॅपचॅट आणि कार्ड पेमेंट
  • Mon , 17 April 2017
  • विनोदनामा टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev स्नॅपचॅट Snapchat नरेंद्र मोदी Narendra Modi पतंजली Patanjali पौष्टिक रेस्टॉरंट Postik restaurant स्नॅपडील Snapdeal

१. हजारो कोटींची उलाढाल असलेला रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योगसमूह आता हॉटेल व्यवसायात उतरला आहे. चंदीगडमध्ये पतंजलीचे शाकाहरी रेस्टॉरंट सुरू झाले असून या रेस्टॉरंटचे नाव ‘पौष्टिक’ असे ठेवण्यात आले आहे. चंदीगडमधील जिरकपूर भागात हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून इथे शुद्ध शाकाहारी पदार्थ खवय्यांची भूक भागवतात. भिंतींवर आणि मेन्यू कार्डवर बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

अरे देवा, आता पतंजलीच्या परंपरेप्रमाणे आसपासच्या हॉटेलांमधले लोकप्रिय पदार्थ पतंजलीच्या प्लेटींमध्ये मिळणार बहुतेक! पुन्हा वर तोंड करून हे सांगतीलही की, जो माल स्वत:च्या नावाने खपत नाही, तो पतंजलीच्या नावाने धडाधड खपत असेल, तर कोणाला अडचण काय?

............................................................................................................

२. सरकारने उद्योगांना भाडेपट्टय़ाने (लीज) किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनी निवासी वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी मुभा देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रासह पुणे, नाशिक व अन्य मोठ्या शहरांमध्ये बरीच जमीन निवासी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योगपतींचे उखळ पांढरे होणार असून बिल्डरांनाही मोठा लाभ होईल आणि गृहबांधणीला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, सरकारने भूसंपादन करून उद्योगांना जमीन दिली असेल, तर त्याचा मात्र निवासी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.

काही सरकारी अधिकाऱ्यांची, काही पक्षांची आणि काही लोकप्रतिनिधींचीही या निर्णयाने चांदी होणार आहे, हे बातमीत लिहिलेलं नाही. ते सर्वांनाच ठाऊक असल्याने लिहिलं नसावं. एकीकडे लाखो घरं बांधून तयार आहेत, ती घ्यायला ग्राहक नाहीत. दुसरीकडे लाखो लोक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. त्यावर काहीही ठोस करायला गेलं तर लाभार्थींच्या साखळीवर विपरीत परिणाम होईल. ते सरकारला कसं परवडेल? त्यापेक्षा असे निर्णय घेत राहिलं की सगळ्यांचंच रोलिंग सुरू राहतं.

............................................................................................................

३. भारतीय जनता पक्षातील नेत्यांची वक्तृत्वकला चांगली आहे. मात्र, सत्तेत असताना जरा गप्प बसण्याची कलाही त्यांनी शिकून घ्यायला हवी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपनेत्यांना रविवारी कानपिचक्या दिल्या. ओदिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप रविवारी झाला. तेव्हा मोदी यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या आपल्याच पक्षातील नेत्यांना फैलावर घेतले. ध्वनिक्षेपक म्हणजे बोलण्यास भाग पाडणारे यंत्र नव्हे, असा टोला लगावत, भाजपनेत्यांनी शांत बसण्याची कला शिकून घ्यावी, असे मोदी म्हणाले. पक्ष सर्वत्र जिंकत असताना पक्षातील मंडळींमध्ये उत्साह संचारणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र त्या उत्साहाचे रूपांतर उन्मादामध्ये होता कामा नये, असेही त्यांनी बजावले.

मोदी यांना हे सांगण्याचा सर्वार्थाने अधिकार आहे. ते त्यांच्या सोयीची ‘मन की बात’ सांगतात. कुठेही, अगदी वंदनबिंदन केलेल्या संसदेतही कोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या भानगडीत शक्यतो पडावं लागणार नाही, याची काळजी घेतात. निवडणुकीत पदाच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता वाट्टेल त्या थराची भाषा वापरून आक्रमक प्रचार करतात. अधूनमधून प्रवचनवजा सुभाषितं ऐकवतात आणि अनेक कळीच्या प्रश्नांवर मौन धारण करून बसतात. खरंच ही कला त्यांच्याकडून शिकून घ्यायला हवी भाजपच्या इतर नेत्यांनी.

............................................................................................................

४. स्नॅपचॅट हे अॅप श्रीमंतांसाठी आहे. भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये या अॅपचा विस्तार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल हे २०१५ साली झालेल्या एका बैठकीत म्हणाले होते, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भारतात तीव्र पडसाद उमटले. हे अॅप वापरणाऱ्यांनी ते अनइन्स्टॉल केलं, तर जे वापरत नव्हते, त्यांनी इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल केलं. त्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात घसरण झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा फटका स्नॅपडीललाही बसला. स्नॅपचॅटशी काहीच संबंध नसलेल्या स्नॅपडीलचं अॅपही लोकांनी अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आहे.

आपण किती विक्षिप्त काळात जगतो आहोत, याची ही झलक आहे. दोन वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी बोललं होतं, असं प्रसृत होतं आणि त्यातून लोक एखादी कृती करायला प्रेरित होतात, हे धक्कादायक आहे. शिवाय स्नॅपडीलला स्नॅपचॅट समजून ते अनइन्स्टॉल करणाऱ्यांनी एका वेगळ्या प्रकारच्या दारिद्र्याचं दर्शन घडवलेलं आहेच.

............................................................................................................

५. काश्मीरमधील दंगलींमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना पाकिस्तान कॅशलेस फंडिंग करत असल्याचे एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. पाकिस्तानने यासाठी वस्तू विनिमय प्रणालीचा अवलंब केल्याचे सांगण्यात येते. पैसे पुरवण्याऐवजी दंगलखोरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

भक्त मंडळींनी ही बातमी जरा जपूनच वाचायला हवी. कुठेही कॅशलेस हा शब्द वाचला की, ते लगेच मोदींचा जयजयकार करायला लागतात. मोदींनी सगळा देश कॅशलेस करायला घेतल्यानंतर, सर्वच प्रकारचे व्यवहार, त्यातही दोन नंबरचे धंदे कल्पकतेने कॅशलेस होणार हे उघडच होतं म्हणा! आता दहशतवादी आणि त्यांचे अर्थपुरवठादारही मोदींचा जयजयकार करत असतील ही आयडिया मिळाल्यामुळे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......