आपल्या पूर्वजांचे विज्ञान - अश्रूंची झाली मुले!
संकीर्ण - व्यंगनामा
रसिकलाल कोठडिया
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 29 June 2017
  • संकीर्ण व्यंगनामा अश्रुंची झाली मुले childbirth from Tears गर्भधारणा pregnancy खजुराहो Khajuraho बजरंग दल Bajrang Dal

खजुराहोच्या कामजीवनावर आधारित मूर्ती पाहून अनेक भाविक बेचैन होतात. बजरंग दलाच्या नेत्यांनी पहिला हल्ला त्या पुस्तक विक्रेत्यांवर केलेला आहे, जे खजुराहोच्या मंदिरातील शिल्पाचे फोटो असलेली पुस्तकं विकत आहेत. कालांतरानं संपूर्ण मंदिर कपड्यानं झाकण्याचा विचार असल्याचं बोललं जात आहे. बजरंग दलाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! 

आपल्या या भूमीची महान परंपरा लोकांच्या विस्मृतीत जाऊ लागली आहे. प्राचीन काळी या भूमीवर गर्भधारणेसाठी अनेकविध मार्ग उपलब्ध होते. त्यातील सर्वांत हमखास मार्ग हा अश्रुपाताद्वारे होणारी गर्भधारणा, हा होय. त्याचप्रमाणे द्रोणात अश्रू किंवा वीर्य भरून ते इप्सित स्थळी पोचवून गर्भधारणा करण्यात आपले पूर्वज पटाईत होते. द्रोणाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रयोग आधुनिक काळात टेस्ट ट्यूब बेबी या नावानं पुन्हा एकदा समोर आलेले आहेत! 

अश्रूविज्ञानाच्या बाबतीत आपले पूर्वज फारच पुढे गेलेले होते. हा मार्ग सोपा व अहिंसक होता. वयात आलेल्या पुरुषानं डोळ्यातून अश्रू काढले की, जवळ असलेली व वयात आलेली स्त्री गर्भार व्हायची. राजा-राणीला मूल होत नसल्यास त्या काळातील ऋषी यज्ञ करायचे. या यज्ञात खूप धूर व्हायचा. त्यामुळे राजाच्या व ऋषींच्याही डोळ्यांतून अश्रू निघायचे. शेजारी असलेल्या राणीला त्यामुळे गर्भधारणा व्हायची. ही गर्भधारणा राजाच्या अश्रूमुळे झाली की ऋषींच्या, ही गोष्ट फक्त ऋषीलाच ठाऊक असायची. पण त्यामुळे राजा आनंदी व्हायचा व राणीही आनंदी व्हायची. यज्ञाच्या काळात राज्यातील अनेक स्त्रिया गरोदर व्हायच्या. (राणी ही गर्भार असायची व सर्वसामान्य स्त्रीही गरोदर असायची)

त्या वेळचे एका प्रख्यात नाटककार श्री पसंत दानेटकार यांनी त्यावर आधारित ‘अश्रूंची झाली मुले’ हे नाटकही लिहिलं होतं. आधुनिक काळातील नाटककार वसंत कानेटकर यांनी या नाटकापासून प्रेरणा घेऊन ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक लिहिलं. हेही नाटक गाजलं. आता काही संशोधक यावर संशोधन करत आहेत की, ‘मुले’ शब्द बदलून ‘फुले’ शब्द वापरण्यामागे माळी समाजाची तर बदनामी करायचा हेतू नव्हता ना? महात्मा फुलेंचे वारस या नावाविरोधात दाद मागण्याच्या विचारात होते, पण मग वसंतरावांनी सन्माननीय तडजोड करून नाटकाच्या आड येणारं विघ्न बाजूला सारलं.

असो. तर सांगायचा मुद्दा असा की, अश्रूच्या माध्यमातून गर्भधारणा करण्याचं कसब आपल्या पूर्वजांना अवगत होतं. हे ज्ञान या पूर्वजांना कुठून मिळालं असेल याचे तर्क करत असताना आम्हा पामराचं ज्ञान अपुरं पडत होतं. पण राजस्थानातील एका न्यायमूर्तींनी केलेल्या विधानामुळे आम्हाला तो साक्षात्कार झाला. मोर आपल्या पायाकडे पाहून रडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू  येऊ लागतात. ते अश्रू पिऊन सौभाग्यवती मयूर (लांडोर) गर्भार होतात. हे वाचून माझ्याही डोळ्यातून अश्रू आले. सुदैवानं माझी बायको वा माझी मैत्रीण शेजारी नव्हती. अन्यथा काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही!

अश्रूच्या माध्यमातून होणारी गर्भधारणा हा प्रकार हाताळायला थोडासा अवघड होता. म्हणून घरात लहानपणापासून आया मुलांना रडायची सवय लागू नये याची काळजी घ्यायच्या. ‘लेका मर्द आहेस. पुरुषासारखा पुरुष असून बायकोसारखा रडतोस काय’! असे संवाद घरोघरी कानावर पडायचे. घरात काही अघटित घडल्यास आजूबाजूला कोणी नाही ना, असं पाहून पुरुष एकांतात जाऊन रडून घेत असत. अजूनही बरेचसे पुरुष असंच करतात. 

आपल्या या सुजलाम सुफलाम देशात अनेक देशांतून लोक येत असत, कधी आक्रमक म्हणून, कधी व्यापारी म्हणून तर कधी पर्यटक म्हणून. त्यातील काही असंस्कृत परदेशी लोकांमध्ये गर्भधारणेसाठी वेगळीच पद्धत असायची. असली तर असली, आपल्याला काय त्याचं! पण त्यातील काही लोकांनी चक्क 'त्या' अवस्थेतील शिल्पं तयार करून ती उपासनेसाठी असलेल्या इमारतींवर लावली. आपली माणसं त्याला भुलली. आपली परंपरा विसरून त्या पद्धतीप्रमाणे वागू लागली. कालांतरानं काही विद्वानांनी असं सांगितलं की, ‘ही पद्धत तर आमच्याकडे प्राचीन काळापासून आहे. यात काय नवीन?’ 

पण बरं झालं. बजरंग दलाच्या विद्वानांना यातील धोके लक्षात आले. त्यांनी आपल्या देशाला संकटातून वाचवण्याचा मार्ग दाखवला आहे. केंद्र सरकारानं गर्भसंस्कारासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यात गर्भधारणेच्या आपल्या प्राचीन पद्धतीचाही समावेश करावा आणि त्यासाठी बजरंग दल, न्यायमूर्ती, साधुश्री ब्रह्मचारी इत्यादींचं सल्लागार मंडळ नेमावं. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी ज्यांना मिळू शकली नाही, त्यांनाही त्यात तज्ज्ञ म्हणून घेता येईल. खजुराहोच्या परिसरात देशी वा परदेशी सर्व पर्यटकांवर बंदी घालावी, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांची 'ताकद' टिकून राहील! 

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......