‘म्युझिक मिरर : ए-६ आकाशगंगा’ - हा ८१ मिनिटांचा लघुपट आपल्याला एका आध्यात्मिक अनुभूतीच्या वेगळ्या स्तरावर घेऊन जातो
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अंजली अंबेकर
  • अन्नपूर्णादेवी आणि त्यांच्यावरील लघुपटाचं पोस्टर
  • Sat , 02 December 2023
  • कला-संस्कृती चलत्-चित्र अन्नपूर्णादेवी Annapurna Devi पंडित रविशंकर Ravi Shankar म्युझिक मिरर Music Mirror

मैहर-सेनिया घराण्याची संगीत परंपरा विलक्षण तडफेनं आणि असोशीनं पुढे नेणाऱ्या अन्नपूर्णादेवींवर लघुपट करणं, हे त्यांना जाणणाऱ्या वा ओळखणाऱ्या सर्वांनाच विलक्षण वाटेल, परंतु ते शक्य झालं फिल्ममेकर निर्मल चंदेर आणि अन्नपूर्णादेवींचे शिष्य, ज्येष्ठ बासरीवादक नित्यानंद हल्दीपूर यांच्यामुळे. मुंबईतील प्रथितयश सांस्कृतिक संस्था ‘एनसीपीए’मध्ये १ डिसेंबर २०२३ रोजी या लघुपटाचा प्रिमीअर शो झाला आणि त्यासाठी दिग्दर्शक निर्मल चंदेर यांच्यासोबत संगीत क्षेत्रातील अनेक जाणकार उपस्थित होते. 

अन्नपूर्णा देवींचं निधन २०१८ साली झालं. त्यांच्या शेवटच्या काळात नित्यानंदजींनी त्यांची मनोभावे सेवा केली. ते त्यांच्याजवळच होते. त्यांचं हवं नको ते सगळं बघत होते. त्याच काळात अन्नपूर्णादेवींनी चंदेर यांना त्यांचं घर शूट करण्याची परवानगी दिली होती, परंतु त्यांच्या खोलीच्या आत कॅमेऱ्याला प्रवेश नव्हता.

अन्नपूर्णादेवींवर यापूर्वी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक- स्वपन कुमार बंदोपाध्याय यांचं ‘अँन अनहर्ड मेलडी : अन्नपूर्णा देवी’ आणि दुसरं, त्यांचे शिष्य अतुल मर्चंट जटायू यांनी लिहिलेलं- ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ रेक्लुसिव्ह जिनिअस’.

अन्नपूर्णादेवींचे पहिले पती, विश्वविख्यात संगीतकार पंडित रविशंकर यांनी स्वतः लिहिलेल्या आणि त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या असंख्य पुस्तकांमधून अन्नपूर्णादेवी काळ्या-पांढऱ्या /ग्रे शेडमधून समोर येतातच, मग या लघुपटातून वेगळं काय सांगितलं जाणार आहे, असा प्रश्न संगीतप्रेमी आणि जाणकारांच्या मनात येऊच शकतो. तो योग्यही आहे. त्याचं उत्तर सोपंही आहे आणि त्याच वेळी अवघडही आहे. शब्दांतून जाणवलेला अन्नपूर्णादेवींच्या व्यक्तिमत्त्वातील ठेहराव, संगीताबाबतची पॅशन आणि त्यासाठीचं आयुष्य समर्पण, हे सगळं या लघुपटातील दृकश्राव्य माध्यमातून अधिक गडद होत जातं. हा ८१ मिनिटांचा लघुपट आपल्याला एका आध्यात्मिक अनुभूतीच्या वेगळ्या स्तरावर घेऊन जातो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या लघुपटाची तशी ढोबळ मानाने बांधीव पटकथा नाही. नित्यानंदजींना सापडलेली काही रेकॉर्डिंग्ज, मांचे संभाषण, त्यांच्या शिष्यांचे अनुभव असा सगळा ऐवज वापरून हा लघुपट तयार झाला आहे. नित्यानंद हल्दीपूर यांचं निवेदन आहे. त्यांच्यामार्फत लघुपट पुढे जातो. त्याची सुरुवात अन्नपूर्णाजींच्या घराच्या पाटीपासून होते. त्यावर लिहिलेलं असतं- ‘Please ring  the bell only  three times, if no one answers, kindly leave your card/letter. Thank you for your cooperation.’ मग ‘ए-६०१’चा दरवाजा उघडतो. आतलं फक्त आणि फक्त संगीताचीच तरंग असणारं घर दिसतं. यामध्ये अन्नपूर्णादेवींच्या उपलब्ध रेकॉर्डिंग्जपैकी राग मांझ खमाज, राग कौशिकी आणि राग यमन कल्याणचे तुकडे वाजत असतात. अद्भुत असा अनुभव येतो आणि आपण त्यात गुंतून जातो.

नित्यानंदजी स्वतः लघुपटाचं मुख्य पात्र आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण आकाशगंगेतील अन्नपूर्णादेवींच्या प्रवासाचे साक्षीदार होतो. त्यांना त्यांचे शिष्य गुरुमा, मां असे संबोधतात. नित्यानंदजी त्यांच्या शिष्यांशी बोलतात, संगीतकार आणि संगीताचे संशोधक अनीशजी प्रधान असतात, ते भारतीय संगीतातील महिला वादक कलावंताबाबत बोलतात. त्यात अन्नपूर्णादेवींचं नाव आणि योगदान अव्वल स्थानी असतात. त्यांच्या शिष्यांपैकी हेमंत देसाई असतात. ते सितार /सुरबहार मांकडून शिकलेले असतात. नित्यानंदजी अन्नपूर्णादेवींना विचारतात की, हेमंत आले आहेत, त्यांना तुमच्याकडे घेऊन येऊ का? त्या त्यांना परवानगी देतात आणि त्यांना स्वतःच्या नाजूक अवस्थेतही रियाझाबद्दल विचारतात, त्यांच्या वादनाबद्दल कौतुकोद्गार काढतात.

अन्नपूर्णादेवींचे दुसरे पती रुषीकुमार पंड्या यांचं २०१३ला निधन झाल्यानंतर, नित्यानंदजी अन्नपूर्णादेवींच्या घरी, त्यांची सेवा करण्यासाठी येऊन राहतात. त्यांच्या जेवणापासून औषधांपर्यंत सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष देतात. त्या संदर्भात ग्वाल्हेरच्या तानसेनच्या स्मारकाचा शॉट घेतला आहे. निवेदनात संत हरिदास आणि तानसेन यांची कथा येते. बादशाह अकबर यांच्या कानावर हरिदासांचे अलौकिक स्वर पडतात आणि बादशाह मंत्रमुग्ध होतात. ते तानसेनांना त्याबाबतचा एक प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर म्हणून तानसेन बादशाहांना सांगतो की, माझं गाणं तुम्हाला खूष करण्यासाठी आहे, तर हरिदासांचं गाणं परमेश्वरासाठी आहे, म्हणून त्याला अलौकिकत्वाचा स्पर्श झाला आहे. 

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

त्यानंतर लघुपट आपल्याला मैहरला घेऊन जातो. मैहर अन्नपूर्णादेवींचं जन्मस्थान. तिथे त्यांचा संगीतासोबतचा प्रवास सुरू झाला. तिथे त्या रोशन आराच्या अन्नपूर्णादेवी आणि पुढे मिसेस रविशंकर झाल्या. त्यांची ही पॅशन बघून बाबा (उस्ताद अल्लाउद्दीन खान) यांनी त्यांना सूरबहारसारखं कठीण वाद्य शिकवलं.

पुढे त्या केवळ सूरबहारमध्येच नाही, तर सितार, सरोदमध्येही पारंगत झाल्या आणि अजून विशेष म्हणजे जगभरात त्यांचे सूरबहार, सितार, सरोद, बासरी, दिलरुबा, व्हायोलिनसारखी अनेक वाद्यं वाजवणारे शिष्य तयार केले. एवढेच नव्हे तर त्यांनी वाद्यसंगीतासोबत कंठसंगीताचीही तालीम दिली. त्यापैकी विनय भारत राम या लघुपटमध्ये त्यांच्या अनुभवासह येतात.

केवळ संगीताचा ध्यास म्हणून हे १९४१ला हिंदू-मुस्लीम असं जगावेगळं लग्न झालं. दुर्दैवानं या लग्नात खूप वादळं आली आणि या वादळांनी ते कोसळलंही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. पंडितजींनी ते लिहून अभिव्यक्त केलं, तर अन्नपूर्णादेवींनी मौनांत राहणं पसंत केलं. त्यात त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं शुभोशंकरचं निधन झालं आणि त्यांनी स्वतःला अधिकच मिटवून घेतलं. पंडितजी आणि त्या एकत्र वादन करायचे. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांच्या मैफली झाल्या. त्यांत अन्नपूर्णादेवी सरस सिद्ध व्हायच्या, पंडितजींचा मेल इगो दुखावला जायचा. त्यातून जो संघर्ष झाला आणि अन्नपूर्णादेवींच्या मनांवर कायमचा ओरखडा आला. त्यांनी १९५५नंतर मैफलीत वादन करणं  कायमचं सोडून दिलं. त्या फक्त चार भिंतीत स्वतःला कैद करून, शिष्यांमार्फत संगीतसेवा करत राहिल्या.

याबाबत नित्यानंदजींनी फिल्ममध्ये पंडितजींचं चरित्र लिहिणाऱ्या ऑलिव्हर क्रास्कनेही निरीक्षण नोंदवलं आहे. त्याच्या मते पंडितजी आणि अन्नपूर्णादेवी ही दोन परस्परभिन्न व्यक्तिमत्त्वं होती. पंडितजीनी त्यांच्या वयाच्या विशीपर्यंत बरचसं पाश्चात्य जग बघितलं होतं, कारण ते बाबांकडे सितारचं शिक्षण घेण्यापूर्वी आपल्या भावाच्या उदयशंकरजी (ख्यातनाम नर्तक) यांच्या डान्स ट्रूपमध्ये नर्तक होते आणि त्या निमित्तानं युरोपिअन देशांमध्ये बरेच फिरले होते. तिथली संस्कृती, अभिव्यक्तीमधील मोकळेपणा, स्त्री-पुरुष संबंधांमधील खुलेपणा अनुभवला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्याविरुद्ध अन्नपूर्णादेवींनी मैहर बाहेरचं जग फारसं बघितलं नव्हतं. त्यांची जडणघडण बाबांच्या कडक शिस्तीत आणि पारंपरिक मुस्लीम घरातील मूल्यव्यवस्थेत झालेली होती. त्यामुळे दोघांमधील मूळ भेद कधी सांधल्याच गेले नाहीत. यातूनच त्यांच्या नात्याला कधी न सांधले जाणारे तडे गेले. पंडितजींचं संगीत आकाशाला गवसणी घालण्यासाठी जग भ्रमंती करत बसलं आणि त्यातून त्यांनी संगीतातील नवनवीन शिखरं पादाक्रांत केली. भारतीय संगीताची मोहोर जगावर उमटवली आणि इकडे अन्नपूर्णादेवींनी आकाशगंगेच्या चार भिंतीत स्वतःला कोंडून घेतलं. त्यांच्या शिष्यांच्या स्वरांचा दरवळ जगात पोचावा, यासाठी कटिबद्ध झाल्या.

काही बाबींचं वेगळं स्पष्टीकरण लघुपटामधून मिळतं. एकदा ज्येष्ठ अमेरिकन-ब्रिटिश व्हायोलिनिस्ट आणि बीटल्सचे ज्येष्ठ गिटारिस्ट जॉर्ज हॅरिसन यांनी अन्नपूर्णादेवींचं वादन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती, तोपर्यंत देवींनी सार्वजनिक सादरीकरण करणं बंद करून अनेक दशकं उलटून गेली होती.

तेव्हा त्या दोघांनी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान मा. श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांनी विनंती केली होती. तेव्हा इंदिराजींनी अन्नपूर्णादेवींना त्याबाबतची विनंती केली, तेव्हा सादरीकरण करायला त्यांनी नम्र नकार दिला, परंतु त्यांचा रियाज ऐकायला अनुमती दिली, अशी कथा लिखित संदर्भातून समोर येते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी इंदिराजींनाही नकार दिला, तेव्हा पंडित रविशंकरांच्या विनंती वरून त्या तयार झाल्याचा संदर्भ लघुपटामधून नित्यानंदजींनी दिला आहे.

प्रत्यक्षात येहुदी मेन्युहीन यांना काही तातडीच्या कामासाठी परतावं लागलं होतं, परंतु त्यांचं वादन आणि रियाज ऐकण्याचं भाग्य जॉर्ज हॅरिसन यांना मिळालं होतं. अन्नपूर्णादेवी सूरबहारसारखं अत्यंत कठीण आणि पकडायला अत्यंत जड असं तार वाद्य वाजवायच्या. त्यांनी हे शिकायला सुरुवात केली, तेव्हा त्या तब्येतीनं अत्यंत कृश अशा होत्या, तेव्हा त्यांचे भाऊ व निष्णात सरोद वादक उस्ताद अली अकबर खान त्यांना चिडवायचे, असे मजेशीर संदर्भ या लघुपटामध्ये आहेत.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

१९५७च्या दिल्लीच्या मैफलीनंतर अन्नपूर्णा देवींनी सार्वजनिक कार्यक्रम पूर्णपणे बंद केले. त्यांचे मोजके जे पंडितजींसोबत कार्यक्रम झाले, ते ऐकणाऱ्यांपैकी बंगलोर स्थित ज्येष्ठ गायिका आणि लेखिका यांनी त्यांचा अनुभव फिल्ममध्ये शेअर केला आहे. त्यात त्यांनी अन्नपूर्णादेवींच्या वादनातील ‘ओव्हर पॉवरिंग फॅक्टर’ विशद केला आहे. अन्नपूर्णादेवींना पैसे घेऊन वादन करणं पसंत नसायचं. त्यानंतर काही दिवस त्यांनी कोलकत्याच्या ‘अली अकबर स्कुल ऑफ म्युझिक’मध्ये काही दिवस शिकवलं आणि पुन्हा मुंबईत शिफ्ट झाल्यावर एनसीपीए या संस्थेत काही दिवस संगीत शिकवलं, पण नंतर त्यांनी तेही बंद केलं. त्यांना शिष्यांकडून फी घेणं पटणारं नव्हतं. याबाबतीत बाबांचा वारसा त्यांनी पुढे नेला, असा एक संदर्भ फिल्ममध्ये येतो.

ज्येष्ठ बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी ही त्यांचे अन्नपूर्णादेवींसोबतचे अनुभव सांगितले आहेत. ते त्या वेळी फिल्म म्युझिक आणि रेडिओ कार्यक्रमात व्यस्त असायचे. तेव्हा रात्री ११नंतर अन्नपूर्णादेवींकडे शिकायला जायचे. त्यांचं पूर्वीचं शिक्षण, धारणा पुसून अन्नपूर्णादेवींनी त्यांना शुद्ध संगीताकडे कसं वळवलं, याचा अनुभव सांगितला आहे. पंडित हरिप्रसादजी अन्नपूर्णादेवींना रात्री  ड्रायव्हिंगही शिकवायचे.

अन्नपूर्णादेवींच्या काही लिहिलेल्या डायरीज नित्यानंदजींना सापडल्या, त्यांनी असा बराच जुना ऐवज जपून ठेवला होता. त्या डायरीज बंगाली भाषेत लिहिल्या होत्या. त्याचा हिंदी भाषेत अनुवाद या लघुपटामध्ये केला आहे. त्यात प्रामुख्यानं पंडित रविशंकरांचे ‘टॉर्चर्स’ अनुभव लिहिले आहेत. पंडितजी एकीकडे स्वतः खुल्या संबंधाचे पुरस्कर्ते होते, परंतु अन्नपूर्णादेवींच्या बाबतीत ते कसे पझेसिव्ह आणि संशयी होते, याचा संदर्भ येतो.

अन्नपूर्णादेवी आणि पंडितजींचे, हे ‘लव्ह-हेट’ संबंधाचे पडसाद फिल्मभर जाणवतात. अन्नपूर्णादेवींच्या बंगाली संभाषणाचं रेकॉर्डिंग फिल्ममध्ये वापरलं आहे. त्यात हे सगळे संदर्भ येतात. अन्नपूर्णादेवी आणि पंडितजींच्या प्रत्यक्ष नात्याचा अल्प कालावधी होता. त्याहून अधिक अन्नपूर्णादेवीं रुषीकुमार पंड्यांसोबत राहिल्या, पण शेवटच्या काळात पंडितजींचंच नाव त्यांच्या तोंडी होतं. लघुपट संपल्यानंतर प्रेक्षकांमधून या आशयाचा प्रश्न नित्यानंदजींना विचारल्यावर, त्यांनीही अन्नपूर्णादेवींना पंडितजींबाबत खूप आदर वाटायचा, हे आवर्जून सांगितलं. अन्नपूर्णादेवींना बंगाली, हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी अशा अनेक भाषा यायच्या. त्यांचं तसं फार शिक्षण झालं नव्हतं, पण त्या खऱ्या अर्थानं बहुश्रुत होत्या.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे फिल्मला बांधीव पटकथा नाही, ती संगीत साधना जशी असते, त्या फ्लोमध्ये पुढे जाते. पडद्यावर न दिसणाऱ्या अन्नपूर्णादेवींचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं आणि कानात अन्नपूर्णादेवींच्या रेकॉर्डिंगमध्ये बद्ध झालेल्या शुद्ध स्वरांचा नाद असतो. याचं सर्व श्रेय अन्नपूर्णादेवींच्या संगीतातातील योगदानाचं आहेच, परंतु या उजागर न झालेल्या कथेला दृश्यातून सांगू पाहणाऱ्या दिग्दर्शकाचंही आहे.

निर्मल चंदेर यांनी आजवर अनेक लघुपट दिग्दर्शित केले आहेत. त्यात प्रामुख्याने ‘जिक्र उस परवरिश का’ (बेगम अख्तर), ‘ड्रीमिंग ताज महल’, ‘ऑल द वर्ल्ड’, ‘द स्टेज’, ‘द लोटस अँड द स्वान’ आणि ‘मोती बाग’चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मोती बाग हा लघुपट त्यावर्षीची भारताची ऑस्करसाठी ऑफिशिअल एंट्री होती. या लघुपटाची निर्मिती संगीत नाटक अकादमीमार्फत होणार होती, परंतु नंतर नित्यानंदजींनी अन्नपूर्णादेवी फौंडेशनमार्फत पूर्ण केली.

आकाशगंगा इमारतीच्या माँच्या दरवाजातून लघुपट सुरू होतो आणि सगळ्या संगीत संदर्भातून ८० मिनिटे फिरवून आणते. शेवटच्या क्षणात माँचं निधन होतं आणि त्यानंतर नित्यानंदजी, अन्नपूर्णादेवींनी नकार दिलेल्या त्यांच्या खोलीत कॅमेरा घेऊन जायची परवानगी देतात. खोलीत अन्नपूर्णादेवी तर नसतात, पण त्यांचं सर्वत्र पहुडलेलं संगीताचा दृष्यात्म भास होतो. फिल्म तशी पडद्यावर संपते आणि आपल्या मनात, कानात सुरू राहते.

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now              

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......