अजूनकाही
मराठीत बाल-कुमारांसाठी तुलनेने खूपच कमी प्रमाणात लिहिले जाते. जे साहित्य आहे ते एकतर रंजनवादी आहे किंवा थेट अतिवास्तववादी तरी. मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे, त्यांच्या कल्पना, व्यक्त होण्याचे विविध आयाम, त्यांची भाषा, शाळा, शिक्षक, झपाट्याने बदलत असलेले जग, त्यातून निर्माण होत असलेले नवनवे प्रश्न, आजची शिक्षण पद्धती, याविषयीची वस्तुनिष्ठ निरीक्षणे, असा परीघ कवेत घेत, प्रबोधनाचा अभिनिवेश टाळून नेमका संदेश पोचवणारे साहित्य तर दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे.
या पार्श्वभूमीवर नामदेव माळी यांची ‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही बाल-कुमार कादंबरी लक्षणीय ठरते. कोंबडा आणि त्याची आरवण्याची अभिव्यक्ती, ही जितकी नैसर्गिक तितकीच, या कादंबरीतील पात्रे, घटना, भाषा आणि संदर्भही नैसर्गिक व अस्सल आहेत.
गौरवच्या आजीने ‘गब्रू’ नावाचा ऐटबाज कोंबडा पाळलेला असतो. तो तिचा जीव की प्राण होता. मात्र त्याच्या आरवण्याचा त्रास होतो, म्हणून शेजारचे आजी-आजोबा पोलीस तक्रार करतात. ती नेमकी ‘लोकशाही दिना’लाच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचते. त्यावर ते निवाडा देतात, ढोबळमानाने हे या कादंबरीचे कथानक आहे.
पण हा सारा प्रवास उलगडताना लेखक सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतून ठेवतो. त्याचबरोबर शहरे आणि ग्रामीण संस्कृती यांतील फरक, ग्रामीण शहाणपण, लुप्त होत असलेल्या म्हणी, लोकगीते, समृद्ध ग्रामजीवन यांसह मुलांचे भावविश्व, मोठ्यांचं तऱ्हेवाईक वागणं, यांबाबत लेखकाची मार्मिक निरीक्षणे... प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या नैसर्गिक हक्कावरील मानवी अतिक्रमणे, त्याचे परिणाम, माणसांचा दुटप्पीपणा, याचाही प्रत्ययकारी आढावा वाचायला मिळतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘सृजनकट्टा’ या मुलांच्या अभिव्यक्तीशी निगडीत संकल्पनेचा समर्पक वापर करताना लेखकाने शाळकरी वयातील मुलांचे विचार, त्यांची अभिव्यक्ती, वर्तमानातील विविध घटनांकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन, आपसांतील चर्चा\संवाद, दाद देण्याची आणि विरोध नोंदवण्याची सुसंस्कृत पद्धती, मोजक्या घटना आणि शब्दांतून तरलतेने चितारली आहे. ती मोठ्यांना विचार करायला भाग पाडते. त्यामुळे या कादंबरीतून उपदेशाचा अभिनिवेशी दृष्टीकोन न बाळगता खूप काही सांगून जाणे, हा बालसाहित्याचा महत्त्वाचा गुण अधोरेखित झालेला आहे.
प्रचलित शिक्षण पद्धतीमधील त्रुटी मुलांच्या विचारप्रक्रियेतून, संवादातून समोर येतात आणि त्यात बदल व्हायला हवा, हे आपल्याला मनोमन पटते, हे या कादंबरीचे बलस्थान म्हणावे लागेल. शिक्षण म्हणजे मुलांना चार भिंतीत कोंडून करून शिक्षकाने एकतर्फी बडबडणे, या रूढ, पारंपरिक समजाला खोडून काढत शिक्षकाने न शिकवताही मुलं नैसर्गिक पद्धतीने आणि निसर्गाकडून सहज शिकत असतात, हे मूल्य अनेक प्रसंगांतून सिद्ध करत लेखकाने शिक्षणक्षेत्रातील जाणकारांपुढेही अनेक प्रश्न उभे केले आहेत.
‘सृजनकट्ट्या’वर होणारा मुलांचा परस्परसंवाद\चर्चा, गुगलसर्च करून जागतिक संदर्भ शोधत त्यांना स्थानिक प्रश्नांशी जोडत, त्यावर उपाय शोधणे, या गोष्टी तर सध्या शिक्षणक्षेत्रातही चर्चेचा विषय झालेल्या आहेत. यातून एकविसाव्या शतकातील संवाद, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि सहकार्य, या चार जीवनकौशल्यांशी लेखक नातं सांगतात
कोंबड्याच्या आरवण्यावर बंदी घालण्याची मूळ घटना फ्रान्समध्ये घडलेली आहे, हा मूळ संदर्भ येऊ लागतो, तेव्हा ही कादंबरी माहितीच्या अंगाने जाऊन विरस होतो की काय, अशी शंका येऊ लागते, पण ती अल्पकाळच. कारण लेखकाने जाणीवपूर्वक वेगळा फॉर्म निवडला आहे. लेखकाने सलग गोष्ट न सांगता घटनाक्रमाची वेगळ्या प्रकारे मांडणी केली असली, तरी एकसंध वाचनानुभवाला ती बाधक ठरत नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गौरवचे कोंबड्यात रूपांतर होणे, त्याने गब्रूसोबत जंगलातील प्राण्यांच्या सभेत सहभागी होणे, तिथे विविध प्राण्यांच्या माणसांविषयी मार्मिक तक्रारी ऐकायला मिळणे, हा भाग अद्भुतता, रंजकता यांचा तोल जपतो, तेही वास्तवाचे भान सुटू न देता, ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते.
शेवटाकडे जाताना लेखकाने दिलेले अनपेक्षित वळण, संपत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती, ज्येष्ठांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण, त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक समस्या, यांवर भाष्य करते आणि त्यावर उपायही सुचवते.
मुलांना काय समजते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे, पण त्यांची समज अनेकदा मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालते. वर्तमानातील अनेक चुकीच्या आणि घातक बाबींवर उपाय शोधायचे असतील आणि संविधानिक मूल्यं जपायची असतील, तर या साऱ्या घटनांकडे समाजधुरिणांनी मुलांच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहायला हवे. असे घडले, तर त्यांना त्यांच्या भूमिका अवश्य तपासून पाहाव्याशा वाटतील, हा विचार मांडणारी ही कादंबरी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.
‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ - नामदेव माळी
साधना प्रकाशन, पुणे | पाने - ९४, मूल्य - १२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment