‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ : ‘आपण कवितेत कोणतीही तडजोड न करता भूमिका मांडतो’, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या कवीचा नवा संग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
किरण शिवहर डोंगरदिवे
  • ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 16 May 2022
  • ग्रंथनामा शिफारस अग्निपरीक्षेचे वेळापत्रक Agnipariksheche Velapatrak यशवंत मनोहर Yashvant Manohar

ज्यांचा शब्द त्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे आजवर अजिंक्य आहे आणि साहित्याचे अनेक प्रवाह व काव्याचे अनेक मौसम ज्यांनी पाहिले आहेत, काव्यातील, जीवनातील आणि समाजातील स्थित्यंतरं ज्यांनी अनुभवली आहेत, असे कवी म्हणजे यशवंत मनोहर. मराठी काव्यक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव, भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्ठा असलेले आणि मानवतेसाठी, समतेसाठी आग्रही असलेले स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कवी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीवर भिस्त ठेवून विज्ञाननिष्ठा आणि मानवी जीवनाचा तळ शोधणारे मराठीत जे काही मोजके कवी आहेत, त्यात यशवंत मनोहर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. काही लोकांना कायमस्वरूपी गुलाम ठेवण्याची व्यवस्थेची व्यूहरचना, त्यातून शोषित-पीडितांचा संघर्ष, मानवी मूल्याचा शोध इत्यादी बाबतीत यशवंत मनोहरांची लेखणी सातत्याने स्फुल्लिंग चेतवत असते.

१९८०मध्ये आलेल्या ‘उत्थानगुंफा’पासून २०२१मध्ये आलेल्या ‘शिवराय आणि भीमराय’ या संग्रहापर्यंत मराठी रसिक तो सजीव परिवर्तनवादी अनुभव घेत आहेत. नुकताच त्यांचा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ हा नवाकोरा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. ३२१ पानांवर स्वतःचं अस्तित्व ठासून सांगणाऱ्या ५५ कविता आणि उर्वरित १२ पानांवर ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा काव्यलेखनामागची भूमिका सांगणारा लेख असे या संग्रहाचे स्वरूप आहे. व्यवस्थांतराचा ध्यास धरणाऱ्या पेरियार रामस्वामी, केशवसुत आणि कवी ब्रेख्त यांना हा संग्रह अर्पण करण्यात आला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘कवी उगवतो तेव्हा’ या कवितेत मनोहर म्हणतात-

‘हजारो वर्षांच्या तुरुंगावर

निर्णायक हल्ला करणारा

पहिला हातोडाही कवीचाच आहे.’

अन्यायाच्या विरुद्ध उभे राहणाऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून कवी असतो, हे सांगताना अज्ञानाला नागडे करणारा, अन्यायाला आग लावणारा, जुलमी सत्तेच्या बुडाखाली सुरुंग लावणारा, अशा अनेक पातळ्यांवर कवीला मनोहर उभे करतात. पूर्णपणे बरबाद झाले तरी कवींचे शब्द नवा जन्म घेतात. तुकोबांच्या गाथेप्रमाणे इंद्रायणीच्या पात्रात बुडाले तरी अमर होणारे शब्द या समाजाने पाहिलेले आहेत, त्यामुळेच कवीने स्वतःची ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि स्वतंत्र विचारसरणी जपली पाहिजे, असे मनोहर सांगतात. त्यांच्या मते-

‘कवी मृत्यूला शिकवतो जीवन

शिकवतो सभ्यता

त्याच्या असभ्यतेला

आणि मरणही जाते मरूनच

पेटलेल्या जंगलासारखा 

कवी उगवतो तेव्हा...’

कवीचे असणे हीच एक परिवर्तनकारी ललकारी आहे, मात्र त्याचे भान स्वतः कवीला असणे गरजेचे असते. जोपर्यंत स्वतःला झळ लागत नाही, तोवर हा समाज किंवा आजचे वर्तमान निव्वळ झोपेचे सोंग घेऊन पसरलेले असते. जेव्हा नाकातोंडात पाणी जायला लागते, अगदी जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र सागरात आग लावण्याची तयारी होती, असे मनोहर नमूद करतात. मात्र प्रत्येक वेळी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत आपण बेसावधच असले पाहिजेत का, असे प्रश्नही त्यांनी या संग्रहात उभे केले आहेत. ‘नदीमाय’ या विलक्षण प्रवाही कवितेतली किनाऱ्यांच्या चौकटीत अडकून राहणारे अस्तित्व नाकारून पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहणारी नदी, ही प्रत्येक व्यक्तीच्या मनातील स्वातंत्र्याची आणि विस्तार विचारांची नैसर्गिक नांदी असल्याची नोंद आहे, असे वाटते. मनोहर लिहितात -

‘तिला माहीतच नसते प्रयोजन

तिला माहीत नसतो धर्म माणसाप्रमाणे

तिला माहीतच नाही कुठला भेद

तिला नसते कोणतीही जात माणसाप्रमाणे

नदी करत नाही कोणत्याही देवाची पूजा

ती करत नाही प्रार्थना कोणाचीही’

त्याचबरोबर समुद्र म्हणजे नदीचा प्रियकर ही काव्यकल्पना नाकारून समुद्र हा नद्यांचाच जैविक अनुवाद असून अनेक नद्यांची संयुक्त वसाहत आणि प्रबोधनसभा आहे, अशी संकल्पना मनोहरांनी मांडली आहे. नद्यांवर बंधारे आणि धरणे बांधून त्यांचा प्रवाह थांबवणे म्हणजे त्यांचा जनसंपर्क तोडणे, अशा विलक्षण प्रतिमा या संग्रहात वापरल्या आहेत. थोडक्यात, मनोहरांनी सांप्रत वर्तमानाचा आढावा घेत एक नवी, मात्र सर्वसामान्य जनजीवनातील प्रतिमासृष्टी निर्माण केली आहे.

‘रस्ते’ या कवितेत मनुष्य आणि रस्ते यांचा तुलनात्मकदृष्ट्या आढावा आहे. त्यातील ‘मशाली झालेल्या माणसांची वाट’, ‘सूर्याचा मेंदू असलेला माणूस’ या उपकविता जास्त प्रभावित करतात.

‘ज्या खिळ्यांनी ठोकले जातात

मायमाऊल्यांचे धिंडवडे वर्तमानाच्या क्रुसावर

ते खिळेच उगवतात आता दिवसांबदली मोकाट वस्त्यांमधून’

‘बेबंद बलात्काराचे मुजोर युग’ अशा शब्दातून ‘कलेवर संस्कृती’ या कवितेत मनोहर विदारक चित्र मांडतात. ‘वासनेच्या उन्मादाच्या संसर्गाने धार्मिक उन्मादही करतात’ या ओळीतून जातीधर्माचा उन्माद, पौरुष्य सिद्ध करण्यासाठी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे इत्यादी संकल्पनांसोबत राजकीय गुंड आणि लोकशाहीची झालेली वाताहत इत्यादींची परस्परपूरक मांडणी दिसते. ‘मयसभेला लोक राजकारण म्हणतात’ या ओळीतून राजकारण किती फसवे आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अंधारग्रस्त वर्तमान’ या कवितेत ‘सूर्य’ नावाच्या उपशीर्षक असलेल्या कवितेत मनोहर म्हणतात -

‘ज्यांनी सूर्यच बघितला नाही

असे अब्जावधी लोक बघितले मी

विझलेल्या डोळ्यांचे

त्यांच्या डोळ्यावरील पट्ट्यांशी चर्चा केली मी

पट्ट्या लपवित होते सत्य.

पाहणाऱ्याच्या मनात उगवलाच नसेल सूर्य

तर तो दिसणारच नाही बाहेर...’

हाच भाव ‘त्याच्या उजेडाची कविता’, ‘हे असेच सुरू राहिलं तर’, ‘बेट’, ‘आज तसे घडत आहे’, ‘उच्छादाचे काळे ढग’ इत्यादी कवितांतूनही जाणवत राहतो. हे सांगत असताना

‘आल्या आल्या त्यांनी

दिशा बुडविल्या धुक्यात

आणि गवई बंधुप्रमाणे धाकलीच्या

त्यांनी रस्त्याचे डोळे काढले.’

असे उदाहरणे देत दलितांवरील अन्याय-अत्याचाराचा समाचार घेत, हे चित्र बदलण्यासाठी उभे राहणे गरजेचे असण्याचे आवाहन मनोहरांनी केले आहे.

काव्यात बुद्धाचे व्यक्तित्व, विचारदर्शन, तत्तज्ञान आणि बुद्धाचा अंगीकार-स्वीकार कसा असावा याचा सुंदर परिपाठ या संग्रहामधील ‘बुद्ध!’, ‘बुद्धा!’, ‘बुद्ध आगीतून बाहेर नेणारा रस्ता’, या कवितांमधून दिसतो. 

‘युद्धभूमीवर होत्या दोन छावण्या

एका छावणीत होती दुःखे

जिथे होते रथी, महारथी वा अतिरथी.... 

आणि दुसऱ्या छावणीत होता

बुद्ध झालेला उजेड’

कधी बुद्धाबाबत चर्चा, कधी चिंतन, तर कधी बुद्धाशी संवादी पद्धतीने संभाषण करत मनोहर व्यक्त झाले आहेत.

बुद्धाइतकेच अनन्यसाधारण महत्त्व असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ‘सूर्यगृह’ या कवितेतून मनोहरांनी बाबासाहेबांच्या निवासस्थानाचा म्हणजे राजगृहाचा परिवर्तनाचे प्रतीक म्हणून गौरव केलेला दिसतो.

‘नोटबंदीच्या महापुरातही

वाहूनच गेली खूप गरीब माणसं

अडचणीचाही थांबत नव्हता पाऊस...

हे सर्वच उच्चांक नियोजनाच्या दुष्काळाचे’

असे स्पष्टपणे सांगत, नोटबंदीच्या काळात गरिबांचे झालेले हाल आणि नियोजन शून्य निर्णयाचे जीवघेणे पडसाद यावर भाष्य केले आहे. तर त्याच वेळी

‘थांबविले नाही कोणत्याही परम शक्तीने

कुलपे लावणाऱ्या हातांना.

विषाणूंपुढे माना टाकणाऱ्या कोणालाही

त्या शकल्या नाहीत वाचवू…

तरी थांबत नाही साकडे संस्कृती.’

अशी चपराकही दिली आहे. या सर्व अतार्किक श्रद्धांचा अजूनही या समाजाला कंटाळा येत नाही, ही मनोहरांची खंत आहे.

मनोहरांनी ‘झाडे’, ‘अस्वस्थ झाडे’, ‘आपण झाडे वाचतो म्हणजे’, अशा कवितांतून झाडाच्या नैसर्गिक, परोपकारी आणि परोपकारी व्यक्तीच्या रूपाला झाड म्हणून वापरत विविध विवेचन केले आहे. ‘मृत्यू येण्याआधीच’ या कवितेत

‘डोळ्यात येत नाही अश्रू

आणि मृत्यू येण्याआधीच

जंगलही आता मरून चाललंय’

या ओळींतून मानव आणि निसर्ग यांच्या तुटत चाललेल्या नात्यांची तळमळ व्यक्त केली आहे.

थोडक्यात,

‘लपवित नाही काहीही

माझी कविता

माझ्यासारखीच.’

हे सत्य या कवितासंग्रहात पूर्णपणे उतरले आहे. कवी म्हणतात त्याप्रमाणे त्यांची कविता या वर्तमानाचे पर्यावरण बदलण्याचा प्रयत्न करणारी आहे. त्या अनुषंगाने ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या शीर्षकांतर्गत ‘धोका’, ‘अंधराष्ट्र’, ‘जागेपण हरवलेले लोक’, ‘सत्य असण्याचा गुन्हा’ अशा २९ कवितांतून ही अस्वस्थता मनोहर मांडत जातात. साधारणतः सर्वच काव्यातून व्यवस्थांतर, परिवर्तनवादी किंवा विद्रोही भूमिका, मानवी जीवनातील संघर्ष, उत्क्रांतीचा जयघोष पाहायला मिळतो. 

अगदी कवीच्याच शब्दात सांगायचे तर-

‘वादळाचे निरोप गेले आहेत

बाकीच्याही सर्व वादळांना.

वेदना देत आहेत निरोप जखमांना

आणि जखमा घेत आहेत

वेदनेचे निशाणे हातात

... कधीतरी डोळे भरले होते माझे,

आता आभाळही भरून आले आहे.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मनोहरांच्या कवितेतील अनेक संदर्भ आणि शब्दातील ज्वालांचा आलेख या संग्रहाच्या शेवटी असलेल्या ‘मी अशीच कविता का लिहितो’ या लेखामधून समोर येते. त्यात मनोहर म्हणतात, “माझी कविता जशी आहे, तशी सर्वच वाचकांच्या पुढे आहे. तिच्या गुणदोषांची चर्चा करण्याचा अधिकार वाचकांचा आहे.” असे सांगून कवितेबाबतचे निर्णय वाचक घेतील, आपण कवितेत कोणतीही तडजोड न करता भूमिका मांडतो, अशी परखड भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.

वर्णमुद्राने हा कवितासंग्रह यशवंत मनोहरांच्या काव्याच्या तोलामोलाचा काढला आहे. दा. गो. काळे या नि:स्पृह समीक्षकाची ‘पाठराखण’ (Blurb) संग्रहातील जाणिवांचा अर्थ सांगणारी आहे. तर श्रीधर अंभोरे यांनी चेहरे हरवलेल्या समाजाची रेखाटने तितक्याच प्रभावीपणे काढली आहेत. संग्रहाची उंची वाढवणारे मुखपृष्ठही त्यांचेच असून त्यातून कवितेचा तोंडवळा व्यक्त होतो.

‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ - यशवंत मनोहर

वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

पाने – ३३६

मूल्य – ४५४ रुपये.

.................................................................................................................................................................

किरण शिवहर डोंगरदिवे

kdongardive@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......