टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सुरेंद्र जैन, अखिलेश यादव, जितू वाघानी, शोभा डे आणि स्मृती इराणी
  • Wed , 22 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या सुरेंद्र जैन Surendra Jain अखिलेश यादव Akhilesh Yadav जितू वाघानी Jitu Vaghani शोभा डे Shobhaa De स्मृती इराणी Smriti Irani

१. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन कुणी हिंदुत्ववादी होत नसतं. उत्तर आणि दक्षिण भारतातील हिंदूंना झोडपणाऱ्यांना हिंदुत्ववादी म्हणणं म्हणजे हिंदुत्वावर अन्याय करण्यासारखं आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे सहसरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते डॉ. सुरेंद्र जैन यांनी केली. शिवसेनेत एवढीच हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लढावे. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू.

याला म्हणतात, गरज सरो आणि शिवसेना मरो. शिवसेना हे उद्योग करत असताना यांचं एक पिल्लू सेनेच्या कळपात शिरून मुंबई आणि महाराष्ट्रात धष्टपुष्ट झालं, तेव्हा हे झोपले असणार बहुतेक गाढ. आपल्याच हिंदुबांधवांना झोडपणारी शिवसेना बाबरी मशीद पाडायला अग्रेसर होती, तेव्हा चाललं यांना. आता भाजपच्या नाकातोंडात पाणी जाण्याची भीती वाटू लागली, तेव्हा हे स्वघोषित ठेकेदार शिवसेनेच्या हिंदुत्वाचं माप काढणार? आणि जैनकाका, तुम्ही बांगलादेशी घुसखोरांविरोधात काय दिवे लावले आहेत, ते तरी सांगा.

……………………………….……………………………….

२. अभिनेते अमिताभ बच्चन हे गुजरातच्या पर्यटनाचे सदिच्छादूत आहेत. त्याचा संदर्भ देत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नका, हे माझे या शतकातील सर्वांत मोठ्या महानायकाला सांगणे आहे,’ असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्यावर ‘अखिलेश यांच्यापेक्षा गाढव निष्ठावान आहे. अखिलेश यांनी गाढवाकडून निष्ठा शिकायला हवी,’ अशी टीका गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी केली. 

गाढवाबद्दल एवढ्या अधिकारवाणीने कोण बोलू शकतं? एकतर स्वत: निष्ठावान गाढव किंवा गाढवाच्या निष्ठेचा अनुभव असलेला मालक. वाघानी यांच्याबाबतीत कोणता पर्याय योग्य मानायचा? ते त्यांच्या पक्षाचे आणि पक्षमालकांचे निष्ठावान सेवक तर असणारच ना?

……………………………….……………………………….

३. फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबईत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचं छायाचित्र ट्विट केलं. त्या पोलिसाच्या अवाढव्य आकारावरून 'हेवी पोलिस बंदोबस्त' अशी खिल्ली उडवणारी कोटी त्यांनी केली होती. मुंबई पोलिसांनी हा कर्मचारी आपल्या दलाचा नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देताना पातळी सोडून टीका केल्याबद्दल त्यांचा शेलक्या शब्दांत समाचारही घेतला.

डे बाई, डे बाय डे तुमची विनोदबुद्धी घसरत चालली आहे. एरवी कोणी कोणाच्या शारीरिक स्थितीवरून टिंगलटवाळी केली असती, तर तुम्ही कडक शब्दांत त्याची हजेरी घेतली असती. या पोलिसाच्या आकारमानावरून त्याची टर उडवताना त्याची अशी स्थिती होण्याला काही आजार कारणीभूत असू शकतो, त्याच्या कामाच्या अनियमित वेळा, मिळेल ते कदान्नच खावं लागणं, आनुवांशिक दोष अशी काही कारणं असू शकतात, याचा विचारही नाही आला तुमच्या मनात? की तुमच्या सहानुभूतीसाठी पात्र ठरायला सेलिब्रिटीच असावं लागतं?

……………………………….……………………………….

४. देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून त्यांत मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे. २०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून या शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे.

तरी नशीब हे सर्वेक्षण आता, गेल्या महिन्याभरात झालेलं नाही. त्यात पीएम १० आणि नायट्रोजन ऑक्साइडबरोबर पराकोटीच्या विखाराचे आणि विद्वेषाचे कणही प्रचंड प्रमाणात आढळले असते. शिवाय ध्वनीप्रदूषणाच्या पातळीने तर त्यांचं मापन करणारी यंत्रंही मोडून पडली असती… निवडणूक प्रचार सुरू होता ना या काळात?

……………………………….……………………………….

५. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे दहावी आणि बारावीतील शिक्षणाविषयीचे दस्तवेज तपासू देण्याच्या माहिती आयोगाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली असून त्यामुळे पदवीच्या सत्यतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इराणी यांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक लढवताना दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये स्मृती इराणी यांनी शिक्षणाविषयी चुकीची माहिती दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

हा स्मृतीबाईंना त्रास देण्याचा प्रकार आहे, असा न्यायालयाचा तर्क आहे. असा तर्क कशाला असायला हवा. तशी खात्रीच असायला हवी. पण, त्यावर त्यांच्या शिक्षणविषयक चौकशीला स्थगिती देणं हा 'दिलासा' कसा असू शकतो. स्मृतीबाईंनी कागदपत्रं दडवण्याचं कारण काय? त्यांनी पारदर्शकपणे खरं काय ते उजेडात आणलं पाहिजे ना. ती दडवल्याने दिलासा मिळत असेल, तर आरोप खरेच मानायला हवेत.

……………………………….……………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......